वृत्त क्रमांक
सीताखंडी घाटातील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना
पीएमएनआरएफ मधून २ लाखांची मदत; जखमींना ५० हजार देण्यासाठी पाठपुरावा
पालकमंत्री अतुल सावे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केले दुःख
नांदेड (जिमाका), दि. ११ : भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच जखमींना आवश्यक उपचार व वैद्यकीय सुविधा मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या अपघातातील जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “या दुःखद घटनेत जीवितहानी झाल्याने मनस्वी दुःख झाले. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
अपघातातील मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असून त्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
**
No comments:
Post a Comment