Monday, October 20, 2025

२० ऑक्टोबर 2025

वृत्त क्रमांक  1118

नांदेडकरांची सुरेल पहाट ! 

पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची 'संगीत अनुराधा'

बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव
                                                                                                                                                         नांदेड, दि. 20 ऑक्टोबर : गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये कैसे, नजर के सामने, हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिये या व अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी आज प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी नांदेडच्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम गाजवला. भल्या पहाटे प्रेक्षकांची अभूतपूर्व गर्दी हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये होते.

जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, सचखंड गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या विद्यमाने गेल्या तेरा वर्षापासून गोदावरी तटावर बंदाघाट येथे या दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.                                                                                                                                                                                                 गोदावरीच्या तीरावरची ती मंद पहाट, वाऱ्याच्या सळसळीने आलेला गारवा, धुक्याच्या हलक्या लहरींनी सजलेला बंदाघाट परिसर आणि त्या वातावरणात घुमणारे सुमधुर स्वर! अशी दैवी अनुभूती देणारी ‘दिवाळी पहाटने’ यंदाही नांदेडकरांच्या मनात सुरांची सुवासिक फुले फुलवून गेली.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हेमंत पाटील, आमदार आनंद पाटील तिडके बोंढारकर, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल व संयोजन समितीच्या सदस्यांनी केले. 

 हा कार्यक्रम जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन प्रभावी पद्धतीने केले, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. तसेच, मनपाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यास सहकार्य केले आहे.

या सांगीतिक सोहळ्याची सुरुवात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने होताच संपूर्ण परिसर पवित्रतेने भारून गेला. ‘संगीत अनुराधा’ या शीर्षकाखाली सादर झालेल्या त्यांच्या मैफिलीत भक्ती, प्रेम, देशभक्ती आणि लोकसंगीताचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.

प्रारंभीच्या सत्रात ‘मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा’, ‘ओ शेरावाली, तूने मुझे बुलाया शेरावालिये’ या आराधनात्मक गीतांनी वातावरण भक्तिभावाने ओथंबून गेले. त्यानंतर चांदणं चांदणं झाली रात, एकविरेची पहात होते वाट...’ या लोकगीताने रसिकांना महाराष्ट्राच्या मातीच्या सुगंधात रंगवले.                                                                                                                                                                                                                                सुरांची लय पुढे प्रेमगीतांच्या तालावर झुलली. ‘रुपेरी वाळूत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना’ या गाण्याने तरुणाईला रोमँटिक अनुभूती दिली, तर ‘काळ्या मातीतं मातीतं, तिफनं चालते ’ आणि ‘हृदयी वसंत फुलताना’ 'अश्विनी ये ना' या हलक्याफुलक्या व युवा वर्गाला सर्वाधिक आवडणाऱ्या गीतांनी आनंदाची झुळूक निर्माण केली.
                                                                                                                                                        संगीताचा रंग गडद होत गेला तसा प्रेक्षकांचा उत्साहही वाढत गेला. ‘धीरे धीरे से मेरी ज़िंदगी में आना’, ‘अजीब दास्तॉं है ये, ‘दिल दिया है, जान भी देंगे’ या त्यांच्या लोकप्रिय हिंदी गीतांवर रसिकांच्या टाळ्यांचा गजर गोदावरीच्या लाटांवर मिसळला. तीन दशकांच्या त्यांच्या सुमधुर गायन प्रवासाचा सुवास या सुरावटींतून दरवळत राहिला.

मैफिलीची सांगता पौडवाल यांनी भक्तिभावाने ‘हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला...’ या गाण्याने केली. कार्यक्रमात सहगायक म्हणून रवींद्र अहिरे व रेषमा उपासे, तबला-ढोलकावर गौरव बोयाना, आदेश मोरे, संवादिनीवर आयुषी बोयाना, सिंथेसायझरवर किरण वेहेळेकर तर ऑक्टोपॅडवर राकेश पुलेकर यांनी अनुराधाजींच्या गायकीला मनभावी सुरसाथ दिली. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सत्कार केला.
                                                                                                                                                                                                                                                                                                                संपूर्ण संकल्पना आणि निवेदन सुप्रसिद्ध लेखक डॉ. नंदू मुलमुले यांनी साकारले तर सूत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी उत्साही शैलीत केले. गतवर्षी अन्नपूर्णा मंदिर व चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख सुषमा गहेरवार यांनी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा कार्यक्रम होईल असे जाहीर केले आणि त्यांनी आपला शब्द पूर्ण केला.

गोदावरीच्या शांत पाण्यावर उमटलेले सूर, पहाटेच्या मंद प्रकाशात झळकणाऱ्या दिव्यांची लय आणि त्या लयीशी एकरूप झालेले रसिक नांदेडकर हीच खरी ‘नांदेडकरांची अविस्मरणीय दिवाळी पहाट ठरली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, समितीचे अध्यक्ष प्रख्यात गझलकार बापू दासरी, समितीचे सदस्य सुरेश जोंधळे, शंतनू डोईफोडे, लक्ष्मण संगेवार, महेश होकर्णे, चारुदत्त चौधरी, उमाकांत जोशी, वसंत मैया, मकरंद दिवाकर, विजय जोशी, अॅोड.गजानन पिंपरखेडे, हर्षद शहा, विजय बंडेवार आदी मंडळी या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

उद्या सकाळी प्रख्यात निवेदक प्रा.सुनिल नेरलकर यांची संकल्पना असलेला स्वर सरिता हा शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रम होणार असून, पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा प्रख्यात गायिका अंकिता जोशी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. तर २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला व संकल्पना व निवेदन अॅरड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून १९६० ते १९८० या वर्षातील मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ रुपेरी सोनसळा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे असून, प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, सौ. कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे व विजय जोशी हे मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील दर्जेदार गीतांचे गायन सादर करणार आहेत. तर २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सतीश तांदळे यांच्या काफिला कोल्हापूर निर्मित जीयारथ हा मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्याची संगीतमय प्रेमयात्रा हा आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची असून, सुरेश जोंधळे आणि मकरंद दिवाकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. 

प्रवेश द्वाराजवळ  अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्त मदत निधीसाठी एक कक्ष आणि बॉक्स ठेऊन मदतीचे आवाहन संयोजन समितीने केले होते त्यास नांदेड कर मंडळीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 
00000











२० ऑक्टोबर 2025

 वृत्त क्रमांक  1117

20 व 21 ऑक्टोबर या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी

नांदेड, दि. २० ऑक्टोबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :

1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

4) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

5) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

19 ऑक्टोबर 2025

वृत्त क्रमांक  1116

नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाइनतर्फे अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक बियाणे वाटप 

इतर अशासकीय संस्थांनीही मदतीचा हात पुढे करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड, दि. 19 ऑक्टोबर:- जिल्ह्यात माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशन संस्थेने कृषी विभागाच्या समन्वयाने हरभरा पिकाचे 600 व ज्वारी पिकाचे 160 क्विंटल बियाणे मोफत उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इतर शासकीय संस्थानीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, जिल्हा समन्वयक कुंपलवार, समन्वयक दत्तात्रय गरजे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गीते (देगलूर), श्री. शिरफुले (नांदेड), तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल आणि  नांदेड व अर्धापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 86 टक्के क्षेत्र सोयाबीन व कपाशी पिकाखाली असून ही पिके नैसर्गिक आपत्तीला अधिक बळी पडणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग, ऊस, रेशीमशेती आदी अतिवृष्टीला प्रतिकारक पिकांकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

तसेच आपत्ती सौम्यीकरणासाठी पुढील कालावधीत जिल्ह्यातील नदी-नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण, जलतारा, विहीर पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी आदी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदीकाठांवर बांबू लागवड करून पुर नियंत्रणाचे कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करून मजुरी समस्येवर मात करावी. तसेच अशासकीय संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांद्वारे मदतीचा हात द्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आवाहन केले.

नाम फाउंडेशनने साधारणतः 95 लाख रुपये किमतीचे हरभरा पिकाचे बियाणे नांदेड जिल्ह्यास पुरवठा केले असून ते गाव पातळीवर कृषी विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीने बाधित 6 हजार शेतकऱ्यांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात सांगितले.  

शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा यांनी सांगितले की, संस्थेमार्फत निविष्ठा स्वरूपात मदत तर केली जातेच, तसेच मानसिक पाठबळही दिले जाते. नैराश्य वा वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाइनच्या 8955771115 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.

नाम फाउंडेशन राजाभाऊ शेळके यांनी सांगितले की, संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील 41 नाल्यांवर 30 हजारांहून अधिक बांबू लागवड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच शेतात गाळ टाकण्याची कामे सुरू आहेत.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. नाम फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवठा केल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी या संस्थेचे आभार मानले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सानप, तंत्र अधिकारी राजेश मिरगेवार, तंत्र अधिकारी फलोत्पादन स्वामी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

000000











19 ऑक्टोबर 2025

 वृत्त क्रमांक  1115

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन 

दिल्लीत देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन  

कुसुम सभागृह नांदेड येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम

दि. १9 ऑक्टोबर-  सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी  गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि श्री किरण कुलकर्णी (भाप्रसे)मा.सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे. 

दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे  ७:०० वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे रंगणाऱ्या या कार्यक्रमात संज्योती जगदाळे संगीतातील लावण्यवती पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सिने व पार्श्वगायिका तथा उपविजेती -सुर नवा ध्यास नवा-पर्व 5 तसेच निवेदक  बापु दासरी (सुप्रसिद्ध कवी व गझलकार),महेश जैन (गायक/संगीत संयोजक), अंकुश डाखोरे (तबला वादक),रागेश्री जोशी (प्रसिद्ध गायिका), गणेश इंगोले (मृदंग), निवेदिता जोशी (प्रसिद्ध गायिका), राज लामटिळे (की बोर्ड), शिवकुमार मठपती (प्रसिद्ध गायक), किशोर आवटे (ऐक्टोपॅड) हे गायक व वादक कलाकार गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता व ऐकता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहुन आश्वाद घ्यावे, असे आवाहन श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

000000

19 ऑक्टोबर 2025

 वृत्त क्रमांक  1114

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्वाचा - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

बालविकास प्रकल्प कार्यालय ,नांदेड शहर तर्फे आयोजित आठव्या पोषण माह चा समारोप

नांदेड, दिनांक 19 ऑक्टोबर - बाल विकास प्रकल्प कार्यालय नांदेड शहर तर्फे आठव्या राष्ट्रीय पोषण माह चा समारोप साई लॉन्स येथे आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले होते.त्यांनी यावेळी बालक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अंगणवाडी केंद्राना सक्षम करण्यासाठी खेळणी,इतर साहित्य पुरवले जाईल व शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये वर्ग उपलब्ध असल्यास तिथे अंगणवाडी भरविण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगितले. 

बाल विकास प्रकल्प कार्यालय,नांदेड शहर ने राष्ट्रीय पोषण माह मध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी सर्व मदतनीस व सेविका यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 30 हजार रुपये रक्कम दिली.

कार्यक्रमास लेखाधिकारी नीलकंठ पाचंगे, वैद्यकीय अधिकारी रिठे ,बाल न्याय मंडळ सदस्या श्रीमती सुप्रिया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पोषण महा दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पोषण माह दरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पाककला आयोजित करण्यात आली होती.पोषण व आरोग्य यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी केली.या दरम्यान त्यांनी महिनाभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका श्रीमती गुंडारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व पर्यवेक्षिका गुंडारे,पेंदे ,शिसोदे ,गरुड ,खिराडे ,राहेगावकर , श्री आऊलवार,श्री खूपसे ,यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी प्रकल्पातील सर्व मदतनीस,सेविका व पालक वर्ग उपस्थित होते.

०००००




वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...