वृत्त क्रमांक 546
विकसित कृषी संकल्प अभियान : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
नांदेड दि. 27 मे :- कृषि मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाचा उद्देश
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पिके, पशुपालन, मत्स्यपालन तसेच
विविध सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देणे हा आहे.
जिल्ह्यातील विशेष उपक्रम
नांदेड जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र सगरोळी हे या
अभियानाचा भाग म्हणून 8 तालुक्यांतील
(बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा व कंधार) 90 गावांमध्ये विशेष उपक्रम राबविणार आहे. या
अभियानाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ नियोजन, शासकीय योजनांचे फायदे, नव्या
तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे लाभ
· तज्ज्ञांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन
· सुधारित तंत्रज्ञान आणि नव्या जातींबाबत सविस्तर माहिती
· सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि लाभांविषयी संपूर्ण माहिती
· प्रगतशील शेतकऱ्यांच्या नवकल्पना व नव्या प्रयोगांचे
दस्तऐवजीकरण अभियानाचा नियंत्रण आणि समन्वय
अभियान प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी विशेष समिती स्थापन करणार असून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अधिकारी, संशोधक आणि प्रगतशील शेतकरी यात सहभागी होतील. व्हॉटसॲप WhatsApp गट आणि दैनिक
अहवाल संप्रेषणाच्या माध्यमातून नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.
शेतकऱ्यांना आवाहन
या अभियानाद्वारे नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास निश्चितच होणार
आहे. शेतकऱ्यांनी या अभियानात जास्तीतजास्त सहभाग
घेऊन नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या उत्पादनक्षमतेत वाढ करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे करण्यात आले आहे.
00000