Thursday, July 2, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना


 

वृत्त क्रमांक

वन महोत्सव २०२६ ची उत्साहात सुरुवात ; जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते देगलूर नाका येथे घनवन प्रकल्पाचे उद्घाटन

नांदेड, दि. २ जुलै : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान तसेच ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वन महोत्सव २०२६ चे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड यांच्या वतीने देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातील ०.४० हेक्टर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या घनवन रोपवनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.

कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरविंद गायकवाड तसेच सहाय्यक वनसंरक्षक नितेश निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपण करून वन महोत्सवाची सुरुवात केली. कार्यक्रमास पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर, वनपाल अशोक कॅदरवाड, वनरक्षक ज्ञानेश्वर मुंडे, सुभाष पिलाजी आणि बळवंत शिंदे यांनीही वृक्षाणात सहभाग घेतला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर यांनी माहिती देताना सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या परिसरात यंदाच्या वन महोत्सवानिमित्त १८ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अंतर्गत ३५ ते ४० विविध देशी वृक्षप्रजातींची घनवन (Miyawaki) पद्धतीने लागवड केली जाणार असून, त्यामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरण संवर्धनास आणि जैवविविधतेच्या संरक्षणास मोठी चालना मिळणार आहे.

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान आणि ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

00000













वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

पहिल्याच दिवशी घेतला खातेप्रमुखांच्या कामकाजाचा आढावा

नांदेड, दि. २ जुलै :  नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे महेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

महेश पाटील हे यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व  खातेप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविणे, विकासकामांना गती देणे, तसेच नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या. तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. डी. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंते खराडे, संजय शिंदे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री द्वारकादास राठोड व बालाजी पवार, व्यंकटराव चव्हाण, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

000000



विशेष लेख - 2      

दुष्टचक्रातून कायमची सुटका... अन् पतपात्र शेतकरी !

v पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सहकार विभाग, बँका यांच्या समन्वयातून अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून कायमची सुटका करण्यासाठी, त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर अशा तरतुदी शासनाने या योजनेत केल्या आहेत. यापूर्वीच्या लेखात आपण दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा, योजनेला दिलेले विचारपूर्वक असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव, शासनाचा या योजनेमागील दूरदृष्टीकोन पाहिला.  आज या योजनेतील अभ्यासपूर्ण अशा तरतुदी पाहुयात.

शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी कल्याणाचा ३०० वर्षांपूर्वीचा आदर्श या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि नियमित परतफेड करणाऱ्यास प्रोत्साहनपर लाभ ही योजनेची तीन मुख्य स्तंभ आहेत. तब्बल ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर काढणारी ही योजना आहे. यातून  थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल. ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान अल्पमुदत पीक कर्ज घेतले. ज्यांची ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकी ३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत राहिली. अशा शेतकऱ्यांना रुपये २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठित, फेरपुनर्गठित मध्यम मुदत कर्जात रूपांतर झालेल्या खात्यांचाही समावेश असेल.

ज्या शेतकऱ्यांनी २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत घेतलेल्या पीक कर्जाची मुदतीत नियमित परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना रुपये ५० हजार पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळेल. जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये याचीही काळजी सरकारने घेतली आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. पण 2025-26 व 2026-27 मध्ये  अल्प मुदत कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करावी लागणार आहे.

              सन 2023-24 किंवा 2024-25 मध्ये अल्प मुदत कर्ज घेतले, फेडलेही. प्रत्यक्ष परतफेडीची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास किमान रुपये ५ हजार किंवा प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम प्रोत्साहनपर लाभ म्हणून दिली जाईल, अशाप्रकारे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही शासन करत आहे. त्यामुळे वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन मिळेलच.

ज्या शेतकऱ्यांची एकूण थकबाकी २ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा केल्यास त्यांना उर्वरित रुपये २ लाखांपर्यंतच्या रकमेचा 'एकवेळ समझोता' (OTS) अंतर्गत लाभ मिळणार आहे. बऱ्याचदा कर्ज दोन लाखांपेक्षा थोडे जास्त  असते आणि शेतकरी योजनेतून बाहेर पडतो. पण यावेळच्या योजनेत तसे नाही. जर तुमचे कर्ज दोन लाखांहून अधिक असेल, तर वरची अतिरिक्त रक्कम तुम्ही बँकेत भरून या योजनेत सहज सहभागी होऊ शकता. ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, ही OTS शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९' चा लाभ घेतला आहे, त्यांना या नवीन योजनेअंतर्गत रुपये ५० हजार मर्यादेपर्यंत कर्जमुक्ती किंवा OTS चा लाभ दिला जाणार आहे, हा पूर्वीच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त असा दिलासाच आहे.

            या तरतुदी अन् अंमलबजावणीतून लाखो शेतकरी बँकिंग व्यवस्थेत पुन्हा पतपात्र बनतील. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, ते यातून उभारी घेतील. ही केवळ कर्जमाफी नाही, तर क्षमता बांधणी आहे. तसेच शेती अर्थव्यवस्थेची संरचनात्मक सुधारणा देखील.                                        (क्रमश:)

 

     - डॉ. श्याम टरके,

  सहायक संचालक (माहिती),

 विभागीय माहिती कार्यालय, लातूर





वृत्त क्रमांक

पावसाळ्यातील आजार, काळजी आणि उपाययोजना : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांचे आवाहन

नांदेड दि. 2 जुलै : पावसाळा सुरू झाला की निसर्ग बहरतो, मात्र याच काळात दूषित पाणी आणि डासांमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आजारांवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्यात उद्भवणारे प्रमुख आजार

पावसाळ्याच्या दिवसांत प्रामुख्याने खालील आजार पसरण्याचा धोका असतो:

जलजन्य आजार :  दूषित पाण्यामुळे डायरिया (अतिसार), गॅस्ट्रो, कावीळ (हिपॅटायटीस ए आणि ई), आणि विषमज्वर (टायफॉइड).

कीटकजन्य आजार : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झाल्यामुळे मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकनगुनिया.

इतर आजार : लेप्टोस्पायरोसिस (दूषित पाणी व उंदरांच्या मूत्राद्वारे पसरणारा आजार) आणि फ्लू (सर्दी, खोकला, ताप).

प्रतिबंधात्मक उपाययोजना (काय काळजी घ्यावी?)

आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी खालील त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

पाण्याचे शुद्धीकरण आणि स्वच्छता :

पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे. पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि ती झाकून ठेवावीत. विहिरी व पाण्याच्या टाक्यांमध्ये नियमितपणे टी.सी.एल. (ब्लिचिंग पावडर) चा वापर करावा.

डास उत्पत्ती केंद्रांचे निर्मूलन (कोरडा दिवस) :

घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका. टायर, कुलर, नारळाच्या करवंट्या, तुटलेली भांडी त्वरित नष्ट करा. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस' (Dry Day) म्हणून पाळावा, ज्यामध्ये घरातील पाणी साठवण्याची भांडी पूर्णपणे रिकामी करून पुसून वाळवावीत. झोपताना डासदाणीचा वापर करावा.

वैयक्तिक स्वच्छता व अन्न सुरक्षा:

जेवणापूर्वी आणि शौचावरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा कापलेली फळे खाणे टाळावे. नेहमी गरम आणि ताजे अन्न खावे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात चालणे टाळावे. अपरिहार्य कारणास्तव जावे लागल्यास पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

जिल्हा आरोग्य विभागाची सज्जता

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा, ओ.आर.एस. (ORS) पाकिटे,  पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले आहे.

महत्त्वाचे आवाहन 

"पावसाळ्यात कोणताही ताप, उलट्या किंवा जुलाब झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती उपचार किंवा मेडिकलमधून स्वतः औषधे घेण्याऐवजी, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत." - डॉ. संतोष सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड

00000



 वृत्त क्रमांक

एसआयआर अंतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 

तहसीलदार यांची चौफाळा भागात पाहणी ; प्रत्यक्ष गणना फॉर्म भरून डिजिटायझेशनचे प्रात्यक्षिक

नांदेड, दि. २ जुलै : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ०८७ नांदेड विधानसभा मतदारसंघातील चौफाळा भागास आज तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

यावेळी संबंधित भागातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. शेख, पर्यवेक्षक तसेच सुमारे ४० बीएलओ व सहाय्यक बीएलओ यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम अचूक, पारदर्शक व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणना फॉर्मचे वाटप, संकलन तसेच प्राप्त फॉर्मचे ॲपवर तात्काळ डिजिटायझेशन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच कामाचा आढावाही घेण्यात आला.

बैठकीनंतर तहसीलदार संजय वारकड यांनी चौफाळा येथील बालाजी कोकलवार यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष गणना फॉर्म भरून घेतला. त्यानंतर त्याचे त्वरित ॲपवर डिजिटायझेशन करून उपस्थित बीएलओ व सहाय्यक बीएलओ यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.

यावेळी बीएलओ मिनाक्षी शहा, पर्यवेक्षक विलास शृंगारपुतळे तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपअभियंता, विष्णुपुरी प्रकल्प श्री. शेख गुलाम उपस्थित होते.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंदणी व माहितीचे वेळेत डिजिटायझेशन करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

00000



वृत्त क्रमांक

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड दि. 2 जुलै :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 29 जुलै, 2026 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे.  

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या 115 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 29 जुलै, 2026 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811, संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 7219709633, 9881524643, 9518997868, वर संपर्क करावा, असेही कळविले आहे.  

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 29 जुलै, 2026 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

नांदेड, दि. 2 जुलै 2026 : विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज अपर जिल्हाधिकारी  नांदेड डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश कॉलनी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी मतदारांच्या घरी भेट देऊन मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेतले तसेच फॉर्मचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. SIR अभियान प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपायुक्त, महानगरपालिका नितीन गाढवे उपस्थित होते.

यावेळी सोमेश कॉलनी येथील मतदार सुभाषचंद्र लीलाधर शहा तसेच मतदार सौ. श्वेता सुनीलराव वट्टमवार यांनी मतदार गणना प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

पाहणीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ एम. एच. पवार, साहेबराव पांडुरंग जाधव तसेच बीएलओ पर्यवेक्षक श्री. ब्याले यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000




 वृत्त क्रमांक

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २०२६

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः गणनापत्र भरून केली मोहिमेची पाहणी

नांदेड दि. 2 जुलै:- भारतातील लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदाराचे गणनापत्र भरुन घेण्याची प्रक्रीया 30 जून पासून आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल नांदेड येथील कौठा व विष्णुपूरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मतदारांचे गणनापत्र (एन्युमरेशन फॉर्म) भरुन ॲपवर ऑनलाईन सादर केले.

यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना अचूक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.

३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 27 लाख 77 हजार 73 एवढया मतदारांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 88 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), 310 बीएलओ पर्यवेक्षक, 9 मतदार नोंदणी अधिकारी आणि 90 सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

🏡 बीएलओ आपल्या घरी आल्यावर काय करावे?

✅ अंशतः भरलेले गणनापत्र काळजीपूर्वक तपासा.

✅ आवश्यक दुरुस्त्या असल्यास त्या नोंदवा.

✅ दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करा.

✅ अद्ययावत छायाचित्रासह संबंधित बीएलओकडे गणनापत्र जमा करा.

✅ कोणतीही माहिती लपवू नका; अचूक माहिती द्या.

पूर्वतयारी केल्यास पडताळणी अधिक सोपी होईल

घरभेटीपूर्वी voters.eci.gov.in संकेतस्थळ किंवा ECINet App वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा मतदार तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक) तपासून ठेवा. त्यामुळे बीएलओकडील पडताळणी जलद आणि सुलभ होईल.

ही कागदपत्रे तयार ठेवा

जर तुमचे किंवा तुमच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या विशेष सखोल पुनरीक्षणात नोंदलेले नसेल, तर जन्माचा दाखला, दहावीचे गुणपत्रक/शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, शासनाकडील जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक/टपाल/भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी जारी केलेले ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा.

विशेष पुनरीक्षणाचे वेळापत्रक

🟢 ३० जून ते २९ जुलै २०२६ – घराघरांत जाऊन माहिती संकलन व पडताळणी

🟢 ५ ऑगस्ट २०२६ – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

🟢 ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारणे

🟢 ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ – दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे

🟢 ७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

"अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची योग्य नोंद होणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती अचूक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्या आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करा."

आपल्या एका सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त होईल. चला, सक्षम लोकशाहीसाठी आपण सर्वजण जबाबदारीने सहभागी होऊ या!

00000




Wednesday, July 1, 2026

 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ संलग्न करा.

#शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #आधार #महाराष्ट्रशासन #शेतकरी #महाराष्ट्र #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfare



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...