Thursday, March 19, 2026

वृत्त क्रमांक 346

पायाभूत सुविधा बळकटीसाठी ठोस निर्णयांवर भर : मंत्री संजय राठोड 

नांदेड, दि. 19 मार्च : देश व राज्य पातळीवर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून ठोस व धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. 

माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या शक्तिपीठ बंधाऱ्याच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. दीक्षागुरू प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार भीमराव केराम, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, धरमसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 

मंत्री राठोड म्हणाले की, माहूर गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात व पैनगंगा नदीत स्नान करतात; मात्र आवश्यक सुविधा अपुऱ्या होत्या. शक्तिपीठ बंधाऱ्याच्या माध्यमातून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध होणार असून हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विकासकामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार भीमराव केराम यांनी सांगितले की, प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांनी विनामोबदला जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या बंधाऱ्यात स्नान घाट, रेलिंग, प्रकाश व्यवस्था, संरक्षण भिंत, पार्किंग व सभामंडप यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. तसेच या मठासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

मतदारसंघात सुमारे 1100 कोटी रुपयांच्या निधीतून तीन उच्च पातळी बंधारे उभारले जात असून त्यातील सर्वात मोठा प्रकल्प किनवट-माहूर मतदारसंघात होत असल्याचे त्यांनी सांगितले. धनोडा उच्च पातळी बंधारा पूर्ण झाल्यानंतर माहूर येथील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

तसेच सहस्त्रकुंड प्रकल्प मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून  त्याद्वारे सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर व किसनराव वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर कचकलवार यांनी केले.

00000







 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबतच्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठीच्या प्रवेशिका मागविण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेशिका मागविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२६ असा होता; तथापि, आता दि. ३१ मार्च, २०२६ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन / छायाचित्रे / वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने https://dgipr.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

0000

https://setusamitinanded.in/index.php जिल्हा सेतू समिती, नांदेड अंतर्गत ग्रामीण भागासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' अर्जांची पहिली याद...