Wednesday, June 4, 2025

 वृत्त क्रमांक 575

हवामान अनुकूल शेतीतून उत्पादनवाढीचा मार्ग 

विकसित कृषि संकल्प अभियानाचा सहावा दिवस संपन्न 

नांदेड दि. 4 जून :- "विकसित कृषि संकल्प अभियान" अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रभावी वापर करून उत्पादनवाढीच्या संधींवर केंद्रित सत्र आयोजित करण्यात आले. विशेषतः ऊस शेतीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भर देण्यात आला. आज धर्माबाद तालुक्यातील शेळगाव, माष्टी, मोकली व देगलूर तालुक्यातील शेळगाव, कोटेकल्लुर, तमलुर या गावी अभियान नुकतेच संपन्न झाले. 

प्रमुख तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित

या महत्वपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे आणि शास्त्रज्ञ श्री. राहुल sab यांनी शेतीत डाळिंब उत्पादन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन केले. ऊस संशोधन शास्त्रज्ञ डॉ. थोरात आणि डॉ. बोरसे यांनी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी उन्नत तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि काटेकोर व्यवस्थापन यावर चर्चा केली. 

संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. कपिल इंगळे, डॉ. माधुरी रेवणवार आणि डॉ. प्रियंका खोले यांनी हवामान अनुकूल शेती, पीक विविधता आणि जैविक शेतीच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापुरे, प्रशांत शिवपणोर आणि संतोष लोखंडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली, ज्यांनी शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

उत्तम उत्पादनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान

·         सुधारित लागवड तंत्रज्ञान - हवामान बदलांचा परिणाम कमी करण्यासाठी योग्य पीक योजना

·         मृदा आरोग्य आणि जैविक शेती - जमिनीच्या सुपीकतेसाठी संतुलित खत व्यवस्थापन

·         जलसंधारण आणि आधुनिक पाणी व्यवस्थापन - ड्रिप सिंचन, सूक्ष्म सिंचन आणि सेंद्रिय उपाय

·         पीक संरक्षण उपाय - नैसर्गिक उपायांचा प्रभावी उपयोग 

कृषी व्यवसाय आणि उत्पादनवाढीचा मार्ग

·         सेंद्रिय शेती आणि जैविक उत्पादनांचा वापर - निर्यात व मूल्यवर्धित उत्पादनास चालना

·         डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक विक्री व्यवस्था - शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचा मार्ग

·         सेंद्रिय खत निर्मिती आणि जैविक प्रक्रिया उद्योग - गट शेतीद्वारे अधिक नफा मिळवण्याची संधी

 

शेतीत नवी क्रांती - शेतकऱ्यांसाठी संधी

शेतकऱ्यांनी उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी योग्य नियोजन करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाद्वारे हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असून ते शेतीत नव्या संधी शोधत आहेत. शेतीच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, गट शेती आणि शासकीय योजनांचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 574

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा 

नांदेड दि. 4 जून :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे 6 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 6 जून 2025 रोजी वाशिम येथून मोटारीने दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.10 वा. नांदेड विमानतळ येथून पुणेकडे  प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 573

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

नांदेड दि. ४ जून :-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 व 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासणी सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येत असून, अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ माहिती व्यवस्थीत भरावी जेणेकरुन या वर्षीचा लाभ देणे सोयीचे होईल.

नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क न साधता व कुठल्याही अमिषाला बळी न पडता प्रत्यक्ष संबंधीत कार्यालयातील स्वाधार विभागाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयातील जबाबदार व्यक्तीकडे संपर्क करावा व माहिती  घ्यावी. ही योजना थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरीत केली जाते. यामुळे आपण या बाबतीत जागृत राहून कार्यालयाबाहेर कुठल्याही यंत्रणेस संपर्क साधु नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 572

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 4 जून :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुररूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुररूज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणे करणे या बाबींचा समावेश आहे. 

तरी सर्व शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणे करणे तसेच आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 571

शाश्वत शेतीसाठी जैविक संसाधनांचे महत्व

विकसित कृषि संकल्प अभियानाचा आज सातवा दिवस

नांदेड दि. 4 जून :- शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आणि जैविक शेतीला चालना देण्यासाठी विकसित कृषि संकल्प अभियान यशस्वीपणे सातव्या दिवशी पोहोचले. या उपक्रमाद्वारे शाश्वत शेतीसाठी जैविक संसाधनांचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे, अशी माहिती सगरोळीच्या कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी दिली. 

शेतीसाठी जैविक संसाधनांची गरज

या अभियानाच्या सातव्या दिवशी तज्ज्ञ आणि कृषी मार्गदर्शकांनी 7 हजार 368 गावांचा दौरा केला. जिथे 7.95 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जैविक शेती, मृदा आरोग्य, नैसर्गिक खतांचा वापर आणि जलवायु अनुकूल शेती तंत्रज्ञान याबद्दल माहिती देण्यात आली. 

आज हे अभियान देगलूर तालुक्यातील कुषावाडी, होट्टल, काठेवाडी आणि धर्माबाद तालुक्यातील पाटोदा खुर्द, पाटोदा बुद्रुक व चिकना या गावी प्रभावीपणे पार पडले. 

मृदा आरोग्य राखणे, रासायनिक घटकांचा अतिरेक टाळणे आणि सेंद्रीय शेतीच्या संधीचा विकास हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहेत. शेतीतील जैविक संसाधनांचा प्रभावी वापर केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसेच मृदाची सुपीकता आणि जलसंधारण सुधारते, असे शेतकरी वैज्ञानिकांनी सांगितले. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योजनांचा आढावा

या अभियानात कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील तज्ञांची दोन टीम्स सहभागी झाल्या असून, त्यांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक उपाय आणि तंत्रज्ञान यांचे मार्गदर्शन केले. 

तज्ज्ञांची नावे

या अभियानात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे आणि राहुल डमाळे, ऊस संशोधन शास्त्रज्ञ डॉ. थोरात आणि डॉ. बोरसे तसेच संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. कपिल इंगळे, डॉ. माधुरी रेवणवार आणि डॉ. प्रियंका खोले यांनी हवामान अनुकूल शेती, पीक विविधता आणि जैविक शेतीच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. 

तसेच प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापुरे, प्रशांत शिवपणोर आणि संतोष लोखंडे उपस्थित होते. शायकीय योजनांची प्रभावी लाभ घेण्यासाठी कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

याशिवाय कापूस संशोधन केंद्राचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. चींचाने यांनी कापूस उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञान, जैविक संसाधनांचा प्रभावी वापर आणि आधुनिक व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन केले. 

शाश्वत शेतीकडे एक महत्वाचा टप्पा

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या सातव्या दिवशी शेतकरी, तज्ज्ञ आणि कृषी संस्थानी एकत्र येऊन जैविक शेतीच्या प्रवासाला गती देण्याचा निर्धार केला. आगामी दिवसांत याला अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी शासन आणि संस्थात्मक पातळीवर निर्णय घेतले जातील. शाश्वत शेती आणि जैविक संसाधनांच्या प्रभावी वापरामुळे पर्यावरण अनुकूल शेतीस चालना मिळेल, याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

00000


 

वृत्त क्रमांक 570

सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी 

महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून

जागतिक स्तरावर उच्च शिक्षणासाठी जाता येणार 

नांदेड दि. 4 जून :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज 16 जून 2025 पर्यत सादर करावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.  

अर्ज प्रक्रीया आणि मदत

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्प्रिंग 2025 (एप्रिल/मे 2025), 2025(जुलै/ऑगस्ट/सप्टेंबर 2025) आणि 2026 (जानेवारी ते मार्च 2026) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.

योजनेचा उद्देश आणि व्याप्ती

ही योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडी QS World University Ranking मध्ये 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी/पदवीका आणि 25 जागा पीएचडी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.

शिष्यवृत्तीचे स्वरुप  

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आणि वैयक्तीक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रतिवर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल 30 लाख रुपये आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

पात्रता निकष 

नागरिकत्व आणि रहिवास लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक पात्रता

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी.

वयोमर्यादा : पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय 35 वर्ष आणि पीएचडी साठी 40 वर्ष

उत्पन्न मर्यादा

 कुटूंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गानी प्राप्त एकूणप वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

विद्यापीठ प्रवेश पात्रता 

क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकींग 200 च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी अनकन्डींशनल ऑफर पत्र असणे आवश्यक आहे.

इतर अटी

यापूर्वी कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटीव्ह अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला आणि आयटीआर 2025-26, फार्म नं. 16, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका इतर आवश्यक दाखले, परदेशी विद्यापीठाचे बिनशर्त ऑफर पत्र, विद्यापीठाच्या माहिती पत्रकाची प्रत, अद्यावत QS World University Ranking ची माहिती.

विशेष सूचना

विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खचा्रची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल.

संपर्क 

अधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सारथी कार्यालयाचा संपर्क क्रमांक -0220-25592507 असा आहे.

000000

दि. ३ जून 2025

वृत्त क्रमांक 569

जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा 

विक्रम देशमुख (पतंगे) यांनी पदभार स्विकारला 

नांदेड दि. 3 जून :- नांदेड जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून विक्रम देशमुख (पतंगे) किल्लेवडगावकर हे मंगळवार 3 जून 2025 रोजी रुजू झालेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, अप्पर कोषागार अधिकारी विष्णु सुर्यवंशी, सहाय्यक संचालक श्रीमती सुनिता सुंकवाड तसेच जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी विशाल हिवरे यांनी त्यांचे स्वागत केले.  

0000



दि. ३ जून 2025

वृत्त क्रमांक 568

जागतिक सायकलींग दिनानिमित्त 

“संडे ऑन सायकल”रॅलीस नांदेडकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद 

नांदेड दि. ३ जून :-  आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक सायकलींग दिवसानिमीत्त संडे ऑन सायकलचे आयोजन रविवार 1 जून,2025 रोजी सकाळी 7 वा. करण्यात आले होते. या रॅलीत नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 

या संडे ऑन सायकल रॅलीमध्ये सायकल चालवा निरोगी रहा, सायकल चालवा पर्यावरणास वाचवा, सायकल चालवा- शरीरातील रोग घालवा असे श्लोक म्हणत सायकल स्वारांनी नागरीकांना संदेश दिला व सायकल रॅलीस सुरुवात केली. तसेच सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल पटुना गुलाबाचे फुल व प्रत्येकांना पाण्याची बॉटल देवून त्यांचे स्वागत केले. 

ही संडे ऑन सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, चंद्रकांत गव्हाणे, विदयानंद भालेराव आदींनी सहकार्य केले.

00000



दि. ३ जून 2025

 वृत्त क्रमांक 567

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी

नांदेड दि. ३ जून :- पेरणीचा हंगाम उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांनी आता योग्य बियाणांची निवड आणि त्यावर बीजप्रक्रिया करण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

रोगट बियाणांमुळे शेतकरी संकटात सापडतात आणि उत्पादनावर परिणाम होतो. योग्य बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमतेची खात्री झाल्यास पेरणीनंतरचा नुकसानीचा धोका मोठ्या प्रमाणावर टळतो. तसेच दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. बियाणांची उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. बियाणांच्या साठ्यातून सुमारे १०० दाणे निवडून त्यांची उगम चाचणी करावी. त्यासाठी मातीचा ट्रे, गोणपाठ किंवा टिशूपेपर वापरता येतो. ५ ते ७ दिवसांत किती दाण्यांतून कोंब फुटले यावरून उगवण क्षमता समजते. किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उगम दिसल्यास ते बियाणे वापरण्यायोग्य ठरते. बियाणांवर योग्य प्रक्रिया न केल्यास उगम दर कमी होतो आणि उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून घ्यावी.

बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते. जमिनीत असणाऱ्या किडींचा तसेच पेरणी पासून ३०-३५ दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते. बियाण्याची उगवण क्षमता वाढवते. जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना/पिकांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात. त्यामुळे झांडाची/पिकांची वाढ जोमाने होते. उत्पादनात वाढ होते.

बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या व इतर संरक्षण करणाऱ्या बाबीचा वापर करावा. बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किंवा सीड ड्रम/यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किवा पिशवी मध्ये एकत्र मिसळून घ्यावे. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत. बीजप्रक्रिया केलेले बियाणे ३-४ तासाच्या आत पेरणी साठी वापरावे. बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जीवाणू अशा क्रमाने करावी.

00000

  वृत्त     नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी 1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा   नांदेड, दि. 18 :   नोंदणी व मुद्रांक विभा...