Thursday, May 29, 2025

 वृत्त क्रमांक 555

विकसित कृषी संकल्प अभियानाची 

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतुन उत्साहात सुरुवात

नांदेड दि. 29 मे :- कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे विकसित कृषी संकल्प अभियानाची आज उत्साहात सुरुवात झाली. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन यांची माहिती देणे आहे.

अभियानाचा व्यापक विस्तार

या अभियानाद्वारे शेतीतील सुधारित तंत्रज्ञान, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय, सेंद्रिय शेती आणि पिकांची विविधता वाढवणे यावर भर दिला जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या मार्गदर्शनाखाली हे अभियान ७२३ जिल्ह्यांमध्ये राबवले जात असून ७३१ कृषी विज्ञान केंद्रे आणि ११३ संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

विशेष कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे आयोजित शिंपाला, सगरोळी, बोळेगाव, आदमपूर, खतगाव, अटकली या गावांतील कार्यक्रमात शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात आले. प्रगत तंत्रज्ञान, मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलसंधारण, विविध शासकीय योजना आणि बियाण्यांची उगवणक्षमता यासंदर्भात तज्ज्ञांनी माहिती दिली. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन 

या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्रीगुरे, श्री. दमाले, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवर, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभूरे, डॉ. निहाल मुल्ला, भारतीय ऊस संशोधन संस्था प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, डॉ. बोरसे आणि तालुका कृषी अधिकारी बिलोली श्री. तिडके यांनी मार्गदर्शन केले.

उद्घाटन सोहळा आणि पुढील दिशा

या अभियानाच्या सगरोळी येथील उद्घाटन प्रसंगी श्री. सुनील देशमुख, विश्वस्त, संस्कृति संवर्धन मंडळ उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. 

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, सेंद्रिय शेतीचे फायदे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

0000

 वृत्त क्रमांक 554

जिल्हा रुग्णालयात “मासिक पाळी स्वच्छता दिवस" साजरा 

नांदेड दि. 29 मे :- जिल्हा रुग्णालय येथे “मासिक पाळी स्वच्छता दिवस" आज साजरा करण्यात आला. यावेळी मासिकपाळी संदर्भात समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) डॉ. आर.एस.बुट्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, श्रीमती डॉ.पुष्पा गायकवाड, तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या मेट्रन सहाय्यक अधिसेविका श्रीमती सुनिता राठोड नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती सुनिता बोथिकार तसेच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट चा उजास उपक्रमाचे जिल्हा समन्वयक स्वाती महानंदा सुरेश व संवादक सुकेशनी टालमाणी हे यावेळी उपस्थित होते.  

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड व श्रीमती धनश्री अर्जुनराव गुंडाळे राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम समुपदेशक यांनी मासिकपाळी संदर्भात माहिती देऊन मासिक पाळी स्वच्छता दिवस का साजरा केला जातो, मासिक पाळी विषयी समाजात असलेले समज गैरसमज बद्दल मार्गदर्शन केले. मासिक पाळी म्हणजे काय ? व सॅनेटरीपॅडचा उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळी मध्ये काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा घ्यावा, योगा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याविषयी माहिती दिली, तसेच कवितेतुन व "का का कुमारी" ह्या नाटिकेच्या माध्यमातून मासिक पाळी विषयी समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी खूप छान प्रकारे संदेश दिला आहे. या विषयीवर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण, नातेवाईक यांना माहिती सांगितली.

000000




 वृत्त क्रमांक 553

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘एसडीआरएफ’ची तुकडी नांदेडात तैनात 

आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी जाऊन मदत कार्य करा : जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड दि. 29 मे :- नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संकटे उद्भवतात. आगामी पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेड येथे तैनात करण्यात आलेली आहे. 28 मे रोजी सकाळी 6.30 वा. या तुकडीचे नांदेड येथे आगमन झाले आहे. 28 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी ही तुकडी नांदेड येथे तैनात राहणार आहे. या तुकडीमध्ये एकूण 39 जणांचा समावेश असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी व बाकी 35 जवान आहेत.

नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या प्रमुख नद्या असून जिल्ह्यातील 337 गावे पूरप्रवण आहेत. राज्य शासनाने ‘एनडीआरएफ’ च्या धर्तीवर राज्यात येणाऱ्या विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) ची स्थापना केली आहे. या टीमने आज जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मराठवाडा विभागातील पूरप्रवण भागाची माहिती घेतली. 

कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पिडीत व्यक्तीला पहिल्या एका तासात (गोल्डन अवर) मध्ये मदत मिळाली तर पिडीताचे प्राण आपण वाचवू शकतो. त्यामुळे विभागात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास योग्य समन्वय साधून कमीत कमी वेळेत घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी या टीमला दिल्या.  

या तुकडीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजुक्रिष्ण सुदाम कोल्हे हे करीत आहेत तर पोलीस उपनिरीक्षक दिलीप सडया चौरे, रोहित भीमराव पानपाटील व दिनेश मधुकर तायडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत. या दलाची राहण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे करण्यात आली आहे. ही तुकडीजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे हे काम पाहत असून ९४२२८७५८०८ हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 552

जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले           

नांदेड दि. 29 मे :- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन बालविवाह निर्मूलन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, पंचायत, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), उमेद या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला “बालविवाह मुक्त नांदेड जिल्हा” हा कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” ची नियुक्ती केली आहे. या सर्व विभागाच्या चॅम्पियन्ससाठी एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेचे 28 मे रोजी हॉटेल सिटी सिंफोनी नांदेड येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.   

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजुषा कापसे, शिक्षणाधिकारी प्रा. श्रीमती सविता बिरगे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

बालविवाहाच्या कोणत्याही प्रकरणात दिरंगाई होणार नाही याबाबत सर्वांनी कटाक्षाने कायद्याचे पालन करावे. बालविवाहात कोणतेही बालक ओढले जाणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून कार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मनमोकळा संवाद साधला.  

या प्रशिक्षणात  आराखडयाची अंमलबजावणी, पाठपुरावा, नियोजन, माहिती विश्लेषण, समन्वय, मूल्यमापन आणि संनियंत्रण संदर्भातील गुगल फार्मवर देखरेख  तालुका निहाय, बालविवाहाची कारणे व विभाग निहाय उपाय व हॉटस्पॉट गावाची ओळख, महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण परिणाम, सक्षम कार्यक्रम आढावा, बालहक्क, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, असुरक्षित बालकांची ओळख, बालविवाह प्रकरण हाताळणे हेतु कार्यवाही व पाठपुरावा, किशोरवयीन मातांसाठी सहाय्य करण्यासाठी यंत्रणांचे बळकटीकरण विभागांचा दृष्टिकोण व समन्वय, बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सची भुमिका आणि जबाबदारी, कम्युनिकेशन किट, युनिसेफचे-बालविवाह समाप्त करण्यासाठी जागतिक कार्यक्रम, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा कार्यान्वयन योजना तयार करणे, साप्ताहिक देखरेखीचे फॉरमेट तयार करणे, जिल्हा कृती दल बैठकीसाठी अहवाल तयार करणे, जिल्हा कृती आराखड्यासाठी सहाय्य व नियोजन, महिती संकलन आणि विश्लेषण, प्रेरणादायी व सकारात्मक प्रकरणांचे दस्तऐवजीकरण आदी विषयांवर हे प्रशिक्षण घेण्यात आले.  

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय कर्मचारी, चाईल्ड लाईन 1098 कर्मचारी, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद अभियान) यांनी नियुक्त केलेल्या एकूण “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास साधन व्यक्ती म्हणून एसबीसीथ्रीचे बालविवाह निर्मूलन प्रकल्पाचे प्रकल्प अंमलबजावनी प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बढिये, प्रकल्प समन्वयक रुचिका अहिरे, मोनाली धुर्वे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात संबंधित सर्व विभागातील बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स यांचा उत्कृष्ट सहभाग होता.

0000




28.5.2025

 वृत्त क्रमांक 551

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन 

                                                                                                                                                                        नांदेड दि. 29 मे :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांचेही आगमन झाले.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,  पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी  त्यांचे स्वागत केले.   

यावेळी आमदार आनंदराव तिडके व विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर  परभणी येथील नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण केले.

000000









वृत्त क्र. 645     पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनां चे वितरण   नांदेड 20 जून - न...