Wednesday, June 11, 2025

 वृत्त क्रमांक 602

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

११ ते १५ जून पाच दिवस यॅलो अलर्ट जारी  

नांदेड, दि. ११ जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 11 जून 2025 रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 11 जून 2025 ते 15 जून 2025 या पाच दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 11 ते 13 जून 2025 हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस व 14 व 15 जून 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 601

एआय आधारित ऊस शेती ठरेल फायद्याची - डॉ. बोरसे

नांदेड दि. 11 जून :-विकसित कृषि संकल्प अभियानाचा 14 दिवस उमरी तालुक्यातील निमटेक, नागठाणा, तळेगाव, वाघलवाडा व गोळेगाव येथे पार पडला. या अभियानात संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने विशेष योगदान दिले.

ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव

ऊस शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण आणि पिकाच्या गुणवत्तेत सुधारणा कशी करता येते यावर तज्ज्ञांनी सविस्तर चर्चा केली. डॉ. बोरसे यांनी स्पष्ट केले की एआय आधारित विश्लेषणामुळे शेतकऱ्यांना जमिनीची गुणवत्ता समजते, योग्य खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि पीक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते.

संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चे योगदान

या अभियानात संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी तर्फे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. केंद्राने शेतकऱ्यांना ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना आणि एआय तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगाची माहिती दिली.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी नियोजन, तण नियंत्रण आणि पीक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते. ऊसाच्या कापणीसाठी योग्य वेळ निश्चित करण्याचे तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दरात विक्री करता येते.

ऊस उद्योगाच्या भविष्यासाठी नव्या संधी

एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मागणी आणि पुरवठयाचा अचूक अंदाज लावता येतो. तसेच ऊस प्रक्रियेसाठी नवे तंत्रज्ञान  विकसित करण्याच्या संधी निर्माण होत आहेत. या अभियानात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. माधुरी रेवणवार, प्रा. कपिल इंगळे, डॉ. प्रियंका खोले तसेच प्रशांत शिवपणोर, बालाजी चांदापुरे, प्रभुदास उडतेवार आणि संतोष लोखंडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी ऊस शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याची तयारी दर्शविली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी च्या सहभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता अधिक चांगल्या प्रकारे समजली आहे.

00000



 वृत्त क्रमांक 600

विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. ११ जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी योजना राबविल्या जात आहेत.

तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी)  व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केलेली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उददीष्ट देण्यात आलेले आहे. या तिन्ही महामंडळां अंतर्गत पुढीलप्रमाणे योजना राबलिल्या जातात.

वैयक्तिक  कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यत असुन अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना -  या योजनेची मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल साठी 8 लाखाच्या मर्यादीत असावी. ही योजना ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.

1 लाख रुपये थेट कर्ज योजना - या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपर्यत),रेशन कार्ड ,आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इ. कागदपत्रांसह  संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील.

बीज भांडवल योजना - ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यंत) ,रेशनकार्ड ,आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र ,संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन कार्यालयात दाखल करावी लागतील . यापुर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

वरील योजनेचे सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे - 150,05,01,  गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे  01,01,01, बीज भांडवल कर्ज योजना - 01,01,01 , रुपये 1 लाख थेट कर्ज योजना - 200,20,20 असे उदिष्ट प्राप्त झाले आहे.  जिल्हयातील इच्छुक लाभार्थीनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड. फोन क्र.02462-220244 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवडे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 599

जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 

पंचनामे तात्काळ सादर करा - पालकमंत्री अतुल सावे 

नांदेड दि. 11 जून :- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह पशु, कच्चा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडून घेतली व जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनास अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर  शासनस्तरावर निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेल्या मंडळामध्ये कंधार तालुक्यात कंधार मंडळात 85.75 मिमी, कुरूळा  86.00, फुलवळ 68.75, उस्माननगर 81.75, लोहा तालुक्यात लोहा, सोनखेड व कलंबर मंडळात प्रत्येकी 81.75  तर किनवट तालुक्यात जलधरा 72.75, शिवनी मंडळात 69.25 मि.मी. एवढ्या पाऊसाची नोंद झाली आहे. 

00000

  वृत्त क्रमांक  640 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी    नांदेड, दि. 19 जून :- जिल्ह्यातील बेरोजगार ...