Saturday, December 25, 2021

 मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी कटिबद्ध 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका), दि. 25 :- राजकारण, मतभेद याच्या पलिकडे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आलो  आहोत. परभणी, हिंगोली व इतर जिल्ह्यामध्ये विकास कामांची अत्यावश्यकता मी ओळखून आहे. या कामातील प्राधान्यक्रम लक्षात घेऊन जे प्रकल्प पूर्ण करता येतील त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, अशी निःसंधिग्ध ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.  

नांदेड येथे कर्मचाऱ्याकरिता निवासस्थानाच्या संकुलाचे भूमिपूजन व सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता अविनाश धोंडगे, बसवराज पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.  

भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद ते नांदेड हे अंतर जास्त आहे. प्रशासकीय कामासाठी ज्या मान्यता आवश्यक असतात त्या प्रक्रियेला या अंतरामुळे व काही कार्यालये औरंगाबादला असल्याने यात वेळेचा होणारा अपव्यय टाळणे आवश्यक होते. प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने यावर विचार करुन नांदेड येथे अधिक्षक अभियंता विद्युत, वास्तुशास्त्रज्ञ यांचे कार्यालय, संकल्प चित्र विभाग, दक्षता व गुणनियंत्रण यांच्यासह मुख्य अभियंता कार्यालये हे नांदेड येथे आपण सुरू केले. याच बरोबर लातूर व हिंगोलीला आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंडळ व विद्युत उपविभागाचे कार्यालय प्राधान्याने सुरु केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.  

मराठवाड्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या समृद्धी महामार्गापासून नांदेड व शेजारी जिल्ह्यातील काही भाग वंचित राहत असल्याची बाब सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली. या महामार्गाला जोडण्यासाठी नांदेड ते जालना पर्यंतच्या नव्या महामार्गाच्या कामाला त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत मंजूरी दिली. या महामार्गाचे काम येत्या दोन वर्षात युद्ध पातळीवर पुर्ण करता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  या महामार्गाच्या भूसंपादनासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्यात आम्ही ठेवला आहे.  या महामार्गावर होणाऱ्या पुलांची कामे अत्याधुनिक पद्धतीने व्हावेत, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल त्याच्या नियोजनापासून ते प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण होण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नांदेडहून पुणे येथील वाहतुकीची सुविधा ही अधिकाधिक सुलभ व्हावी यावरही आमचा भर आहे. त्या दृष्टीने नांदेड ते लातूर हा स्वतंत्र 100 कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी आम्ही आग्रह धरला आहे. हा मार्ग झाल्यास नांदेड येथून जलदगती ट्रेनच्या माध्यमातून अवघ्या एक ते दीड तासात लातूरला पोहोचता येईल व लातूर मार्गे अवघ्या 6 ते 7 तासात पुण्यापर्यंतचा प्रवास सुलभ होईल. यासाठी खासदार हेमंत पाटील व आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधानांकडे या कामांबाबत आम्ही आग्रह धरु असे त्यांनी स्पष्ट केले.  

मराठवाड्याच्या विकासासाठी बदलत्या नैसर्गिक संसाधनांचा विचार करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. जायकवाडी सारख्या मोठ्या धरणाची उपयोगीता धरणाच्या खालच्या बाजुला आता कमी होत चालली आहे. ही उपयोगिता 50 टक्केही राहिलेली नाही. धरणाच्या वरच्या भागात म्हणजेच कॅचमेंट एरियामध्ये पाण्याचे स्रोत जर भक्कम राहिले तरच त्याची उपयोगिता ही खालच्या भागात जाईल. विकासाच्या या परिभाषेकडे आम्ही स्वच्छ दृष्टीने पाहत असून यात कोणतेही राजकारण न ठेवता केवळ सर्वंकश समतोल विकास कसा होईल याला आम्ही प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.  

नांदेडच्या प्रशासकीय कामासाठी जे एकत्रित संकुल अत्यावश्यक आहे, त्याचेही नियोजन आम्ही केले आहे. कौठा येथील सुमारे 100 एकर जागेवर हे संपूर्ण प्रशासकीय संकुल एकाच भागात आकारास येणार  असल्याने नागरिकांनाही आता ते अधिक सोयीचे होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.  नांदेड शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुमारे 700 कोटी निधीची तरतूद केली आहे. हे सिमेंटचे रस्ते अधिक गुणवत्तापूर्ण व्हावेत अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राजकीय लाभापेक्षा मराठवाड्याच्या विकासासाठी  

चव्हाण कुटुंबाचे योगदान मोलाचे - खासदार हेमंत पाटील  

मराठवाड्याच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांनी सुरुवातीपासून राजकारणाच्या पलिकडे जाऊन एक बांधिलकी जपली. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या भागात पाणी कसे पोहोचेल याचा ध्यास त्यांनी घेतला. जायकवाडीपासून विष्णुपूरीपर्यंत व इतर धरणांसाठी व पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. हीच कटिबद्धता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जपून समतोल विकासासह समतोल राजकारणाचाही चांगला पायंडा पाडल्याचे गौरवोद्गार खासदार हेमंत पाटील यांनी काढले.  नांदेडसह परभणी आणि हिंगोलीच्याही विकास कामांना ते कमतरता पडू देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे.  हिंगोली व नांदेडमधून वाहणारी पैनगंगा नदी ही जीवनदायिनी असून नदीच्या दोन्ही काठांना जोडणारे मार्ग आणि आवश्यक त्या ठिकाणी पूलांच्या बांधकाम कामाकडे त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे लक्ष वेधले.  

कामाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी दक्षता व्यक्त करण्यासमवेतच माझ्या करिअरची सुरुवातही कंत्राटदार म्हणून झाल्याचा उल्लेखही त्यांनी अभिमानाने केला. शासनाचा निधी हा मोठ्या कष्टाने आणावा लागतो. या कष्टाने आणलेल्या निधीची उपयोगिता तेवढीच न्यायपूर्ण करावयाची असेल तर संबंधित कंत्राटदारांनी व संबंधित अधिका-यांनी गुणवत्तेची अधिक दक्षता घेतली पाहिजे. चांगले काम करणारे अधिकारी यांच्या पाठिशी आम्ही सदैव उभे असून अधिकाऱ्यांना जर चांगले काम करण्यात कोणी आडकाठी करीत असेल तर त्याची आम्ही गय करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रास्ताविक केले. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे यांनी आभार व्यक्त केले.

000000










 नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 मुंबईदि.23 : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये "ओमिक्रॉन" ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे.


या परिपत्रकानुसार कोवीड- 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. नाताळ / ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर (Social Distancing) राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे. ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.  चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर/ परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नयेध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.


कोविड- 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागमदत व पुनर्वसनआरोग्यपर्यावरणवैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिकापोलीसस्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.असे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले असून हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

०००

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...