Thursday, October 16, 2025

 वृत्त क्रमांक  1105

दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षे प्रविष्ट होण्याची सुविधा 

नांदेड दि. 16 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी ) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षे प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

. 10 वी व इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे. 

फेब्रु-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) विलंब शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. 

विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन मूळ अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळे / कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे या तपशीलानुसार विलंब शुल्कासह (प्रति विद्यार्थी शंभर रुपये) नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा गुरुवार 16 ऑक्टोबर ते शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 या राहतील. 

खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व इ. 12 वीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्र व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत: जवळ ठेवावा, ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. 

पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक  1104

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न  

प्रशिक्षणाच्या दोन सत्रात एकूण 700 कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

नांदेड, दि. 16 ऑक्टोबर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) 5 वी बटालियन, पुणे यांच्यामार्फत मौजे काळेश्वर, विष्णुपुरी येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व सराव सत्र बुधवार 15 ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या पार पडले.

या प्रशिक्षणासाठी कमांडर रविंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील 17 जणांच्या दलाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील तहसील, पंचायत, पोलीस, मनपा, नगरपरिषद, कृषी आदी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

भूकंप, पूर आदी आपत्ती प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच शोध व बचाव कार्याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत प्रत्यक्ष हाताळणीसह जवळपास 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. नदीकाठच्या पूरप्रवण गावांतील स्थानिक कर्मचारी, मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद, लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशन क्षेत्रातील पोलीस पाटील, महसूल कर्मचारी तसेच हिमायतनगर येथील नायब तहसीलदार आणि माजी सैनिक हयुम पठाण यांनी त्यांच्या टीमसह सक्रीय सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, सर्व तालुक्यांतील नायब तहसीलदार, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, सहाय्यक अग्नीशमन अधिकारी निलेश काबळे यांच्यासह मनपाचे अग्नीशमन तसेच शोध व बचाव पथक उपस्थित होते.

शोध व बचाव कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा परिचय, सी.पी.आर. पद्धती, आय.आर.बी. रबरी बोटची तयारी व वापर या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण व सराव देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारकुजी मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील प्रविण हंबरडे, विष्णुपुरी यांनी मानले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हृयात 6 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाचे विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, पुरप्रवण गावे, होमगार्ड, मनपा, एन.सी.सी., एन.एस.एस., आपदा मित्र, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हे प्रशिक्षण सत्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आज 16 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक नांदेडहून पुण्याकडे रवाना झाले.

00000








 वृत्त क्रमांक  1103

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 16 ऑक्टोबर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी http//hmas.mahait.org या संकेतस्थळावर गुरूवार 30 नोव्हेंबर 2025 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची एक प्रिंट आवश्यक कागदपत्रासह संबंधित शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. संबंधीत महाविद्यालयाने सदरचे प्राप्त झालेले अर्ज एकत्रीत करून, यादी तयार करून प्रमाणित करून आपल्या कव्हरींग लेटरसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर,नमस्कार चौक,नांदेड येथील कार्यालयात दाखल करणे बंधनकारक आहे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 करिता नविन अर्ज करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशास पात्र असुन त्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.बीसीएच 2016/प्र.क्र.293/शिक्षण/2 दि.26.12.2024 च्या शासन निर्णयामध्ये नमुद 2 अ मधील 11 मध्ये स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीतजास्त 30 नोव्हेंबर पर्यंत राहील असे नमुद आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सदर योजनेचा लाभ घेवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे अर्ज करावयाचे आहेत.
लाभाचे स्वरूप
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे.
खर्चाची बाब, नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी.परिसरातील महाविद्यालये/ शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम, तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम क्रमवारी पुढीलप्रमाणे राहील.
भोजन भत्ता- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 25 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 23 हजार. निवास भत्ता- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 12 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 10 हजार. निर्वाह भत्ता- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 6 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 5 हजार. प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम- मनपा क्षेत्र व मनपा हद्दीपासून 5 किमी परिसरात 43 हजार, तालुक्याच्या ठिकाणी 38 हजार रुपये राहील.
या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. (वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल).
योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष
विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्याने मागील वर्षात किमान ५० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४०% असेल. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. तालुक्याच्या ठिकाणी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्राच्या ह्द्दीत असलेली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. उर्वरित अटी व शर्ती वेळोवेळी शासनाद्वार निर्गमीत करण्यात आलेल्या/येणाऱ्या शासन निर्णयानुसार लागू राहतील.
सूचना
विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची १२% व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र,त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.
000000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...