Sunday, July 5, 2026

 प्रेस नोट क्रमांक 112                                            दिनांक: 05  जुलै, 2026  

प्रति

माननीय संपादक / मिडिया प्रतिनिधी 

विषय: मिडिया निमंत्रण : 

06 जुलै, 2026  रोजी नांदेड – मुंबई आणि टनकपूर - नांदेड एक्सप्रेस गाड्यांना  

हिरवा झेंडी दाखवून शुभारंभ माध्यम प्रसिद्धीसाठी विनंती - बाबत.

आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, 06 जुलै, 2026  रोजी दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत, एक गाडी हुजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि दुसरी टनकपूर ते हुजूर साहिब. या गाड्यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी आणि माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री श्री रवनीत सिंह; केंद्रीय राज्यमंत्री श्री जितीन प्रसाद आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री अजय तामटा हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील.

याच अंतर्गत, माननीय मंत्री श्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे; खासदार श्री अशोकराव शंकरराव चव्हाण; हरिद्रा रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि  विधान परिषद सदस्य श्री हेमंत श्रीराम पाटील; महापौर, नांदेड - वाघाळा शहर, श्रीमती कविता संतोष मुळे; खासदार डॉ. अजित माधवराव गोपछडे; खासदार श्री रवींद्र वसंतराव चव्हाण; विधान परिषद सदस्य श्री विक्रम वसंतराव काळे; विधान परिषद सदस्य श्री सतीश भानुदासराव चव्हाण; विधान परिषद सदस्य श्री अमरनाथ अनंतराव राजूरकर; आमदार श्री बालाजी देविदासराव कल्याणकर आणि आमदार श्री आनंद शंकर तिडके हे 06 जुलै, 2026  रोजी सकाळी 09.15 वाजता हुजूर  साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दिनांक - 06 जुलै, 2026  (सोमवार) 

स्थळ -  हुजूर  साहिब नांदेड रेल्वे स्थानक

वेळ  -  सकाळी 09.15 वाजता 

हुजूर साहिब नांदेड – मुंबई एक्सप्रेस चे उद्घाटन हुजूर साहिब नांदेड येथून आणि  

टनकपूर - हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस चे उद्घाटन टनकपूर येथून करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाचे चित्रीकरण / प्रसिद्धी करण्यासाठी आपण छायाचित्रकार / टीव्ही कॅमेरा युनिटसह उपस्थित राहावे, अशी विनंती आहे.

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

000000

 

 वृत्त क्रमांक

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २०२६

तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी स्वतः गणनापत्र भरून केली मोहिमेची पाहणी

नांदेड दि. 05 जुलै:- भारतातील लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदाराचे गणनापत्र भरुन घेण्याची प्रक्रीया 30 जून पासून आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी राजापूर, येताळा  या गावात  भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मतदारांचे गणनापत्र (एन्युमरेशन फॉर्म) भरुन ॲपवर ऑनलाईन सादर केले.

यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना अचूक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.

३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत धर्माबाद तालुक्यातील एकूण75  हजार 837 इतक्या  एवढया मतदारांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी 87 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), 09 बीएलओ पर्यवेक्षक, 01 मतदार नोंदणी अधिकारी आणि 04 सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

🏡 बीएलओ आपल्या घरी आल्यावर काय करावे?

✅ अंशतः भरलेले गणनापत्र काळजीपूर्वक तपासा.

✅ आवश्यक दुरुस्त्या असल्यास त्या नोंदवा.

✅ दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करा.

✅ अद्ययावत छायाचित्रासह संबंधित बीएलओकडे गणनापत्र जमा करा.

✅ कोणतीही माहिती लपवू नका; अचूक माहिती द्या.

पूर्वतयारी केल्यास पडताळणी अधिक सोपी होईल

घरभेटीपूर्वी voters.eci.gov.in संकेतस्थळ किंवा ECINet App वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा मतदार तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक) तपासून ठेवा. त्यामुळे बीएलओकडील पडताळणी जलद आणि सुलभ होईल.

ही कागदपत्रे तयार ठेवा

जर तुमचे किंवा तुमच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या विशेष सखोल पुनरीक्षणात नोंदलेले नसेल, तर जन्माचा दाखला, दहावीचे गुणपत्रक/शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, शासनाकडील जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक/टपाल/भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी जारी केलेले ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा.

विशेष पुनरीक्षणाचे वेळापत्रक

🟢 ३० जून ते २९ जुलै २०२६ – घराघरांत जाऊन माहिती संकलन व पडताळणी

🟢 ५ ऑगस्ट २०२६ – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

🟢 ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारणे

🟢 ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ – दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे

🟢 ७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

"अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची योग्य नोंद होणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती अचूक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्या आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करा."

आपल्या एका सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त होईल. चला, सक्षम लोकशाहीसाठी आपण सर्वजण जबाबदारीने सहभागी होऊया!

00000





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

कोण असतील अपात्र ?
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पात्रतेचे निकष काय आहेत, हे जाणून घ्या.
ही अधिकृत माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा.

वृत्त क्रमांक

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत तहसीलदारांची मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

नांदेड दि.५ जुलै:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक पात्र नागरिकाची नोंद सुनिश्चित करणे, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदारांच्या तपशीलांचे पडताळणीसह डिजिटायझेशन करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार तसेच डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने आज मनियार गल्ली, इतवारा परिसरात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षकांसमवेत प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपअभियंता, विष्णुपुरी प्रकल्प शेख गुलाम, बीएलओ पर्यवेक्षक वडजकर, बीएलओ पवार तसेच तलाठी महेश जोशी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार संजय वारकड यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचा तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचा गणना फॉर्म वेळेत भरून द्यावा, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि बीएलओमार्फत त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून घ्यावे, असे आवाहन केले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी कालावधी मर्यादित असल्याने बीएलओ आपल्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

पाहणीदरम्यान तहसीलदार वारकड यांनी मनियार गल्ली येथील खलील अहमद कुरेशी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा गणना फॉर्म स्वतः भरून घेतला तसेच मोबाईल ॲपद्वारे त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून प्रक्रियेची प्रत्यक्ष खात्री केली.

तहसीलदार वारकड यांनी यावेळी सांगितले की, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांचा पाया आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

00000





वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात गर्भवती महिलांचे ट्रॅकिंग सुरू; स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा 'ॲक्टिव्ह मोड'वर

 * पहिली किंवा दोन मुली असणाऱ्या गर्भवती महिलांवर राहणार विशेष 'वॉच'

 * आशा सेविका आणि अंगणवाडी ताईंवर सोपवली जबाबदारी

नांदेड दि. 5 जुलै :- गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या या सामाजिक कलंकाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची नांदेड जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. ज्या कुटुंबात पहिली किंवा दोन मुली आहेत, अशा गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत ट्रॅकिंग (नियमित देखरेख) करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या मोहिमेला आता चार महिने पूर्ण होत आले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे 'ॲक्टिव्ह मोड'वर आली आहे.

आशा आणि अंगणवाडी ताईंवर मुख्य जबाबदारी

या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील आशा सेविका आणि अंगणवाडी ताई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी झाल्यापासून तिच्या प्रसूतीपर्यंत प्रत्येक महिन्याला तिचा नियमित फॉलोअप घेतला जात आहे. विशेषतः पहिली किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांतील गर्भवती महिलांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

सोनोग्राफी केंद्रांची होणार बारकाईने तपासणी

केवळ कायदे करून स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे थांबलेली नसल्याचे समोर आल्यानंतर शासनाने हे थेट देखरेखीचे पाऊल उचलले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून छुप्या मार्गाने होणारे गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व सोनोोग्राफी केंद्रांचीही आता आरोग्य विभागाकडून अत्यंत बारकाईने तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवून कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातही आरोग्य अधिकारी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात सुधारणा होईल आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रवृत्तीला चाप बसेल, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

00000

वृत्त क्रमांक   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे देगलूर येथे आयोजन   नांदेड दि. 6 जुलै :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगा...