Saturday, April 11, 2026

 भारतातील सर्वसमावेशक, शाश्वत आणि मूल्याधारित उद्योजकतेला चालना देणारी #MudraYojana महत्त्वाची शक्ती.



वृत्त क्रमांक  

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले 

नांदेड, दि. ११ एप्रिल:– जनगणना फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची जनगणना ही देशातील 16 वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे.

ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणारी पहिलीच जनगणना असून ती अधिक अचूक, वेगवान आणि पर्यावरणपूरक असेल. यामध्ये प्रथमच सामान्य नागरिकांना पोर्टलद्वारे स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जनगणना ही भारतीय संविधानात नमूद केलेली अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तिची भूमिका महत्त्वाची आहे. जनगणनेद्वारे गोळा होणारी माहिती ही राष्ट्रनिर्मितीचा आधार असून यावरच विकास योजना, धोरणनिर्मिती, कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांचे नियोजन ठरवले जाते.

त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मे आणि जून २०२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कर्डीले यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, महानगरपालिकेचे उपायुक्त अभिजित वायकोस, सहाय्यक आयुक्त श्रीमती मनीषा नरसाळे, तसेच जनगणना संपर्क अधिकारी नेहाल धुरंधरे उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून संजय सोळंकर, गिरीश सर्कलवाड आणि संघरत्न सोनसळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

000000








 वृत्त क्रमांक  

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

नांदेड, दि. ११ एप्रिल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला.

यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
००००००






वृत्त क्रमांक  

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान  

नांदेड दि. 11 एप्रिल :- आगामी काळात संपुर्ण नांदेड जिल्ह्यात 14 एप्रिल 2026 रोजी आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. त्यामुळे 14 एप्रिल 2026 रोजी तसेच त्यानंतर 15 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीतसुद्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत असते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे. 

12 एप्रिल 2026 चे 00:01 वाजता पासून ते 1 मे 2026 चे 24:00 वाजता पर्यत नांदेड जिल्ह्यातील सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "" ते "" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपल्या हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. 

रस्त्यावरील व रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रितीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चनेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेनेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. 

सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्यापुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शन पर आदेश देण्याबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबंधी. 

कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग, त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत. 

सदरचा आदेश लग्नाच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. सदरचा आदेश दिनांक 12 एप्रिल 2026 चे 00:01 वाजेपासून ते 1 मे 2026 रोजीचे 24:00 वाजेपर्यंत लागु राहिल. हा आदेश नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी 10 एप्रिल 2026 रोजी निर्गमीत केला आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

सामाजिक समता सप्ताहांतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

नांदेड,दि.११ एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत आज ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या महान कार्याची माहिती दिली. 

त्यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिमराव हाटकर (सामाजिक कार्यकर्ते), राज गोडबोले (सामाजिक कार्यकर्ते), संभाजी कांबळे (दै. सम्राट प्रतिनिधी) व गजानन नरवाडे (समाज कल्याण अधिकारी) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मुख्य वक्ते डॉ. भिमराव हाटकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पापंटवार (तालुका समन्वयक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

यानंतर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अशोक नगर, नांदेड येथील नवबौद्ध वस्तीत स्वच्छता अभियान राबविले.

०००००








वृत्त क्रमांक  

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के 

नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

नांदेड, दि.११ एप्रिल:- नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08:45 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. 

त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.45 Hrs. वाजता या धक्क्याची नोंद झाली असून या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 एवढी नोंदविण्यात आली असून, याचा केंद्रबिंदु हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला असल्याचे कळते. 

सदर धक्का हा सौम्य प्रकारचा आहे . तसेच या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत संबंधित तहसीलदार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. 

याबाबत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत  प्रशासनाशी आपण संपर्कात असून नागरिकांनी सतर्क राहावे,घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर नागरिकांनी सतर्क राहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे.

०००००



छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...