Tuesday, September 17, 2024

 वृत्त क्र. 843

 स्वच्छता ही सेवा अभियानात नागरिकांचा सहभाग आवश्यक : गिरीश महाजन


• पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ

नांदेड दि. 17 सप्टेंबर : शहरातील मोठया प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे. या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग, स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख,देशातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी वचनबध्दतेची पुष्टी करणे हे या अभियानाचे उदिष्ट आहे. या स्वच्छता ही सेवा अभियानात सर्वाचा सहभाग आवश्यक असल्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन  यांनी केले. त्यांच्या हस्ते आज स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

आज माता गुजरीजी विसावा उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार भिमराव केराम, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, दिलीप कंदकुर्ते,  संतुकराव हंबर्डे आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजीना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी सन 2017 पासून वार्षिक स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. दिनांक 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता -संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात नागरिकांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घ्यावा, असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
00000



 वृत्त क्र. 842

शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन

 

•       मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन थाटात संपन्न 

•       जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई 

•       जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पाला गती देणार 

•       राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा सत्कार 

•       स्वातंत्र्यसैनिकांशी पालकमंत्र्यांचे हितगुज

 

नांदेड दि. 17 सप्टेंबर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

 

 नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील स्मृतीस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी मधील सर्व नुकसाना संदर्भातील पंचनामे अंतिम टप्प्यात असून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचा गौरवशाली इतिहासाला यावेळी त्यांनी उजाळा दिला. स्वातंत्र्य सैनिकांचा लढाऊ बाणा आमच्यासाठी प्रेरणादायी असून नांदेडसह मराठवाड्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

आज सकाळी बरोबर 8.40 मिनिटानी मराठवाडा मुक्तिदिन समारंभात  माता गुजरीजी विसावा उद्यान  येथे  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते  मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, रेल्वेच्या विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींची उपस्थिती होती.

 

 अतिवृष्टी नुकसानासाठी लवकरच मदत 

यावेळी पालकमंत्र्यांनी  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या परिस्थितीत प्रशासनाच्यावतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानाची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

 

शासनाकडून आतापर्यंत भरीव मदत 

राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी कधीही वेळ लावला नाही. समस्या, आपत्ती, संकट कोणतेही असू दे. तातडीची मदत आणि मानवी संवेदना जोपासून सहाय्य केले आहे.  तसेच सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 446 कोटी रुपये वाटप यापूर्वी करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

         

 विविध योजनांतून महिला सक्षमीकरण 

महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सध्या संपूर्ण भारतात चर्चेत आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात दीड कोटींवर महिलांना लाभ मिळाला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 8 लक्ष महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. पहिल्या दोन महिन्यांचा 3 हजाराचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून आर्थिक स्वावलंबनाचा मोठा इतिहास महाराष्ट्राने रचला आहे.

 

राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसोबतच काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या असून यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. युवक युवतींना 6 हजार ते 10 हजार रुपये महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणासोबतच मानधन दिले जाणार आहे. युवकांना या माध्यमातून अनेक आस्थापनांवर काम करायचा अनुभव मिळणार आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या डोळ्यात स्वयंपाकाचा धूर जाणार नाही अशी घोषणा 2014 मध्ये केली होती. त्याअंतर्गत घराघरात  उज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर दिले जात आहेत. आता महाराष्ट्र शासनाने आणखी यामध्ये भर घातली आहे. महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे.

 

मुलगी शिकली की घर शिक्षित होते. मात्र मुलींच्या शिक्षणाला कोणताच अडथळा राहू नये यासाठी उच्च शिक्षणामध्ये मुलींची संख्या वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. मोफत उच्च शिक्षणाची संधी देणारी मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजनेने सध्या अनेक मुलींना उच्च शिक्षणाची दारे उघडली आहेत. सर्व समाजातील गरीब मुलींना याचा फायदा होणार आहे. एसटीमध्ये 50 टक्के मोफत प्रवास आमच्या भगीणींसाठी सुरू केला.

 

 मोफत वीज योजना क्रांतीकारक 

शेतकऱ्यांना सिंचनाचा राजमार्ग दाखविणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी ठरत आहे. 7.5 एचपीच्या कृषी पंपांना मोफत वीज यामार्फत दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयामध्ये आवश्यक असणाऱ्या सहाय्यभूत आरोग्यदायी वस्तूंच्या खरेदीसाठी असणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना, तसेच महाराष्ट्रासह देशभरातील तीर्थ क्षेत्राला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आयुष्याचा कायापालट करण्याचा प्रयत्नम राज्य शासनामार्फत केला जात आहे. आरोग्यासाठी आता महात्मा जोतिबा फुले योजनेतून गरीबांना सर्व प्रकारच्या मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

 

जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पांना गती 

गेल्यावर्षीच्या संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पासाठी 7 हजार 655 कोटी किंमतीच्या सुधारित प्रशासकिय प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्प, जिल्हयातील उनकेश्वर येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्प, मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासंदर्भात शासन सकारात्मक असून जुन्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेवून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 

 

 मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक 

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे. जिल्ह्यातील मराठा युवकांनी या प्रकरणी संयम बाळगावा असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करतांना प्रत्येक ग्रामपंचायतला हक्काची इमारत देण्याचा संकल्प असून नांदेड जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून आता ग्रामपंचायत इमारतीचे कामे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यात यापूर्वी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत तांडा विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 एकात्मिक ग्राम विकास हेच सूत्र

 

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राचा व यात्रास्थळांचा विकास करण्याचा प्रयत्न असून यामध्ये पर्यटनमंत्री म्हणून जिल्ह्यातील माहूरगड, नांदेड येथील गुरूद्वारा व अन्य तीर्थ व पर्यटन स्थळांच्या विकासालाही गती दिली जाईल. यासोबतच महिला सक्षमीकरणावर आमचा भर आहे. त्यामुळे महिला बचतगटांचे बळकटीकरण केले जाईल. बचतगटांचे भाग भांडवल प्रत्येकी 15 हजार रुपयांवरून 30 हजार रुपये करण्यात आले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील महिला बचतगटांना नक्कीच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

प्रधानमंत्री आवास योजनेतूनही विविध गटातील कुटुंबांना हक्काचे घर दिले जाणार आहे. आवास योजनेतून ओबीसी बांधव सुटले होते त्यांच्यासाठी या शासनाने मोदी आवास योजना सुरू केली. सर्व घटकांसोबतच आता ओबीसींसाठी मोदी आवास योजनेतून घरांची सुविधा दिली जात आहे. ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाचे जाळे असते. राज्यात 40 हजार किलोमीटरचे जाळे ग्रामविकास विभागामार्फत तयार होत आहे. जिल्ह्यालाही या योजनेचा भरघोस लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. 

 

 

 राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूचा सन्मान 

नुकत्याच झालेल्या पॅरीस येथील पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील क्रीडापटूंनी जिल्ह्याचे नावलौकीक जागतिक पातळीवर झळकवले आहे. ॲथलेटिक्ससाठी श्रीमती भाग्यश्री जाधव, बॅडमिंटनसाठी लताताई उमरेकर, धनुर्विद्येच्या विविध क्रीडा स्पर्धेत तेजवीरसिंग जहागिरदार, श्रृष्टी बालाजी जोगदंड, ज्ञानेश बालाजी चेरले तर किकबॉक्सिंग स्पर्धेत दिपा गवळी, ऋतिक बंडेवार, कार्तीक राठोड यांनी दिलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील योगदानाबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खेळाडूंचे कौतुक केले व यावेळी त्यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. 

 

याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. त्यानंतर स्वच्छ नागरी विकास अभियानातर्गंत स्वच्छता ही सेवा 2024 अभियानाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी स्वत: स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

 

यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी आणि अक्षय ढोके यांनी केले.

0000

























  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...