Wednesday, March 19, 2025

वृत्त क्रमांक 313 

माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी 

नांदेड (माहूर) दि. 19 मार्च : श्री रेणुकामाता मंदिरामुळे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक धार्मिक तसेच वन पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या माहूरच्या विकासामध्ये कोणताही खोळंबा होता कामा नये. त्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर येथे उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज दुपारी माहूर गडावर पोहचले होते. त्यांनी यावेळी व्यापारी व स्थानिक नागरिकांशी सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा केली. स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणारा असून यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल वेळोवेळी करतांना स्थानिक नागरिकांचे म्हणणे लक्षात घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.  

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी विवेक कांडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, मंदिर विश्वस्त उपस्थित होते. या ठिकाणी उभारल्या जात असलेला लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाची पाहणी, गडावरील दुकानदारांच्या समस्या, रस्त्याचे विस्तारीकरण, सुशोभीकरण तसेच माहुरच्या विविध ठिकाणी भेटी देताना श्रद्धाळू व पर्यटकांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी, विश्वस्तांची चर्चा केली. 

प्राचीन ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या माहूरगड यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या परिसरातील अतिक्रमण, फेरीवाल्यांच्या समस्या आणि सर्व प्रलंबित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.

0000





 महत्त्वाचे वृत्त क्रमांक 312

समृद्ध ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी

प्रत्येक नांदेडकरांनी पुढे यावे : जिल्हाधिकारी कर्डिले  

•  जिल्हास्तरीय महा वारसा समितीची बैठक  

नांदेड दि. 19 मार्च : शिलालेखापासून किल्‍ल्यापर्यंत आणि मंदिरांपासून कलात्मक बावडीपर्यंत नांदेडकडे शतकानुशतकाचा इतिहास पर्यटनाच्या स्वरुपात उपलब्ध आहे. या वारस्याच्या रक्षणासाठी गावागावांमध्ये जनजागृती व्हावी तसेच यासाठी शासनासोबतच राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेलाही जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केली.  

महावारसा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, रूक्मिण रोडगे, डॉ. कामाजी डक, वास्तुविशारद स्मिता कासार पाटील हे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा वारसा समितीचे सदस्य उपस्थित होते.  

यावेळी जिल्ह्यातील प्रमुख स्मारकांच्या संदर्भात सुरू असलेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांबाबत चर्चा झाली. प्रामुख्याने होट्टल येथील प्राचीन शिल्प मंदिर, माहूर येथील किल्ला, कंधार येथील किल्ला या ठिकाणच्या पर्यटकांच्या सोई-सुविधांवर चर्चा झाली.  

या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यासाठी समिती गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंदगिरी किल्ला, बिलोली मशीद येथील अतिक्रमन हाटविणे, होट्टल येथे महोत्सव आयोजित करणे, नांदेड जिल्ह्यातील प्रस्तावित स्मारकांना राज्य संरक्षित करणे, निजाम शासनाकडून पुरातत्व विभागाकडे आलेल्या स्मारकाची मालकी सात/बारावर संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचा उल्लेख करणे, असंरक्षित स्मारकांची यादी अद्यावत करणे, भोकर येथील यादव कालीन शिवमंदिरासमोरील सभामंडप जमीनदोस्त झाल्याबाबत कार्यवाही करणे आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.  

समिती सदस्य सुरेश जोंधळे यांनी प्राचिन बांधकामाच्या सभोवताली पर्यावरण जपण्याबाबत सूचना मांडली. तर इतिहास तज्ज्ञ डॉ. अरविंद सोनटक्के यांनी आपल्या वारसा जतनामध्ये हयगय होऊ नये तसेच प्राचिन वास्तूला हानी पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी किल्लेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नंदगिरी किल्ल्या संदर्भातील समस्यांची मांडणी केली. यावेळी प्रामुख्याने माहूर, कंधार येथील किल्ल्यांवरही चर्चा झाली. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. 

00000






 वृत्त क्रमांक 311

शनिवारी सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांची कार्यशाळा                                                                                        

नांदेड दि. 19 मार्च :  धर्मादाय आयुक्त नांदेड धर्मादाय वकील संघ, पुरोगामी धर्मादाय वकील संघ व प्रगती महिला मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांची कार्यशाळा शनिवार 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता पाचलेगावकर महाराज आश्रमासमोर मगनपुरा, आनंदनगर नांदेड येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच धर्मादाय सह आयुक्त नांदेड श्रीमती हिरा का. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 

या कार्यशाळेत धर्मादाय रुग्णालयाची योजना, फेरफार अर्ज सादर करण्याबाबत कायदेशिर तरतुदी, विश्वस्तांना कर्ज घेण्याबाबतच्या कायदेशिर तरतुदी तसेच सार्वजनिक न्यासांचे लेखे ठेवण्याची पध्दत याविषयी सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांना धर्मादाय संघटनेतील अधिकारी, जेष्ठ विधीज्ञ तसेच सनदी लेखापाल मार्गदर्शन करणार आहेत. तरी संबंधितानी या कार्यशाळेस उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त हिरा का. शेळके यांनी केले आहे. 

0000

  वृत्त क्रमांक 310

आदिवासी विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

नांदेड दि. 19 मार्च :- आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल व खाजगी तथा मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा अंतर्गत इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयटीआय मधील अभ्यासक्रमांकना जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर शक्य होईल. 

यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 10 वी नंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपर आयुक्त नाशिक यांच्या शा.आ. शा.मुंढेबाव, बोपेगाव नाशिक प्रकल्पमध्ये इयत्ता 11 वीच्या 40 सीईटी, जेईइ व 40 नीटच्या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. अपर आयुक्त ठाणे यांच्या  एकलव्य शेंडेगाव शहापूर प्रकल्प आश्रमशाळेत सीईटी, जेईइ 40 व  नीटच्या  40 मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. अपर आयुक्त अमरावती च्या शा. आ. शा चिंचघाट पांढरकवडा प्रकल्पात सीईटी, जेईइ 40 व  नीटच्या 40 मुलांना तर नागपूर अपर आयुक्त कार्यालयाच्या शा.आ. शा. सिंधीविहार वर्धा प्रकल्पातील सीईटी व जेईइ 40 व  नीटच्या  40 च्या मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. 

अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा असावा. अनुसूचित जमातीच्या यादीतील असावा व त्यासाठी प्रवेशावेळी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 8 लाख रुपयेपेक्षा कमी असावे. या चाळणी परिक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात 10 वी उत्तीर्ण असणे आवाश्यक आहे. 

या प्रकल्प कार्यालया अंतर्गत सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा , एकलव्य निवासी शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे मार्च-2025 च्या दहावीच्या परिक्षेस बसलेले आहेत. त्यापैकी मागील वर्षी म्हणजेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इयत्ता 9 वी मध्ये गुणाक्रमे पहिले 5 आले असतील मुलींमध्ये गुणानुक्रमे पहिले 5 व मुलांमध्ये गुणाक्रमे पहिले 5 आलेले असे एकूण प्रत्येक शाळेतून 10 विद्यार्थी यांची निवड करण्यात येणार आहे. अशा प्रत्येक शाळेतून पहिले 5 मुले व पहिल्या 5 मुली यांची आवेदन पत्र विहित नमुन्यात व यादी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट या कार्यालयात 30 मार्च 2025 पूर्वी सादर करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे. 

विहित नमुन्यात माहिती सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा माहे मे 2025 मध्ये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एकूण प्राप्त आवेदनपत्रानुसार शासकीय आश्रमशाळेवर घेण्यात येणार आहे यांची नोंद घ्यावी. 

00000

 वृत्त क्रमांक 309

पाणी जपून वापरा ; पाण्याची बचत करा !

जलसंपदा विभागाद्वारे जलजागृती रॅलीचे आयोजन

नांदेड दि. १९ मार्च : पाणी हे अमूल्य आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजून त्याचा जबाबदारीने वापर करा. पाण्याचा माफक व योग्य वापर करा,असा संदेश देणारी जलजागृती रॅली मंगळवारी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

या जलजागृती रॅलीचे नेतृत्व केले ते नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ.आ.दाभाडे यांनी. आपल्या शेतात, आपल्या घरात आणि औद्योगिक उपयोगासाठी अत्यंत कमी दरात पाणी पोहोचविणारे जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या जलजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सर्व नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व कळावे यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.त्याप्रमाणे यावर्षीही नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड यांच्यामार्फत दिनांक 18 मार्च रोजी जलजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

सदरील रॅलीचा मार्ग जलसंपदा विभागीय कार्यालयीन परिसर चैतन्यनगर ते राजकॉर्नर, शेतकरी चौक मार्गे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृह, भगिरथनगर असा होता. या रॅलीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृह,भगिरथनगर येथील कार्यक्रमात सहभागी असलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ ऐवजी वृक्षांची रोपे देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जलप्रतिज्ञेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शेख एम.जी.,उपकार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर), नांदेड यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी जगातील विविध प्रमुख धर्मामध्ये व त्यांच्या धर्मग्रंथामध्ये पाण्याचे असलेले महत्व याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 

श्री.सी.आर.बनसोड, कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर), नांदेड यांनी पाण्याच्या अपव्यय न करता पाण्याचा जास्तीत जास्त पुर्नवापर करावा. याकरीता स्थानिक पातळीवर विविध उपाययाजेना राबवाव्यात असे मार्गदर्शन केले.

 त्यानंतर श्री.आ.शि.चौगले, कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण), नांदेड यांनी पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वातावरण बदल व अनिश्चित पर्जन्यमानामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक असून याबाबत जनसामान्यांत क्षेत्रीय अभियंता व कर्मचा-यांनी जनजागृती करावी, असे आवाहन करून सिंचनासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होईल असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता  अ.आ.दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्याची जलनिती व जलसंपदा विभागाने केलेली आजवरची कामगिरी याबद्दल माहिती दिली. 22 मार्च या जागतिक जलदिनाचे महत्व विषद केले. तसेच श्री.माधवराव चितळे, जागतिक जलतज्ञ यांनी पाण्याबाबत आजपर्यंत जागतिक स्तरावर केलेल्या कामांना उजाळा दिला. जलसंपदा विभागातील कर्मच-यांनी गावो-गावी जावून शेतक-यांमध्ये व पाणीवापरकर्त्यांमध्ये जलजागृती करावी. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी श्री.ए.बी.जगताप, कार्यकारी अभियंता व मंडळातील उपविभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री.शेख एम.जी.,उपकार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर), नांदेड यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए.एम.चापोले, आरेखक श्रेणी-2 यांनी केले.

0000





 वृत्त क्रमांक 308

नांदेडकर संगीतप्रेमींसाठी 22 मार्चला वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम 

वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन 

नांदेड, दि १९ मार्च :  चित्रपट कथा व पटकथाकार वसंत  सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक  २२ मार्च,   २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात येणार आहे. चित्रपट कथा व पटकथाकार वसंत  सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद नांदेडकरांना घेता येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार  यांची असून   मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.  

या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेणार आहेत.    संगीत संयोजन आनंदी विकास तर  संवाद निरजा आपटे, देविदास फुलारी यांचा असेल ख्यातनाम गायक गायिका सागर जाधव, शेफाली कुलकर्णी, विश्वास अंबेकर, मीना सोलापूरे, आसावरी रवंदे  या कलाकारांच्या कला सादरीकरणातून  तसेच मुर्तिकार व्यंकट पाटील यांच्या सादरीकरणातून चित्रपट कथा व पटकथाकार वसंत  सबनीस यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल 

रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या सांगितिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

0000



 वृत्त क्रमांक 307

दोन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव संपन्न

 50 लाख रुपयांपेक्षा अधिक शेत मालाची थेट विक्री 

                                                                                                                                                                      नांदेड दि. 19 मार्च :- महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त  विद्यमाने आयोजित 2 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 17 व 18 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे संपन्न झाला. या महोत्सवास नागरिक, ग्राहक उर्त्स्फूत प्रतिसाद दिला असून या दोन दिवसात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे.  

जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतातील आधुनिक तंत्रज्ञान हवामान बदल व शेती पुढील आव्हाने या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व आणि प्रक्रिया तसेच महिलांना उद्भवणारे आजार त्यावरील उपाय योजना याविषयी माहिती दिली. केळी संशोधन केंद्र नांदेड येथील प्रभारी अधिकारी   डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी केळी पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड व निर्यातक्षम केळी उत्पादन यावर सविस्तर मार्गदर्शन करून निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना याविषयी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाच्या आयोजन  करण्यात आले होते. 18 मार्च 2025 रोजी समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषी संचालक तथा रोटरी क्लब नांदेडचे सचिव सुरेश अंबुलगेकर  तर प्रमुख पाहुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी उपसंचालक हरिराम नागरगोजे, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड अनिल शिरफुले,  किनवटचे  राजकुमार रणवीर, देगलूरचे विठ्ठल गीते,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार संचालक एस. डी. मोरे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर माधुरी रेवनवार, केळी संशोधन केंद्र नांदेड येथील प्रभारी अधिकारी डॉक्टर शिवाजीराव शिंदे आदींची उपस्थिती होती.

महोत्सवामध्ये मालेगावचे शेतकरी भगवान इंगोले, चिखली बु. चे सत्यनारायण मंत्री , मनाठाचे संजय सूर्यवंशी, सुनिता कावळे,  दापशेडचे विश्वनाथ होळगे, वाडी बु चे व्यंकटराव पावडे आदींनी मनोगत व्यक्त केले व महोत्सव दरवर्षी व्हावा जेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रगतशील शेतकऱ्याचे गेटटुगेदर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

 महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये 83 स्टॉलधारक तसेच कृषी विभागातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महोत्सवामध्ये 83 स्टॉलमध्ये शेतकरी, महिला बचतगट, विविध कंपन्यांचे स्टॉल आदीं 117 विक्रेत्यांनी आपल्या शेतमाल व साहित्याची मांडणी करून विक्री केली. महोत्सवामध्ये विविध प्रकारचा शेतमाल जो शहरात सहजासहजी उपलब्ध होणार नाही जसे की हातसडीचे तांदूळ, काळे गहू, खपली गहू, डाळीमध्ये तुर, मुग, उडीद, मसूर,  ज्वारी, विविध प्रकारची फळे जसे की टेंबरे, विविध जातीची आंबे, नर्सरीची रोपे यांची 50 लक्ष रुपयांची विक्री झाली. कृषी विभागासह इतर विभागातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नांदेड शहरातील नागरिक यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महादेव पिंपळगाव तालुका अर्धापूर येथील शेतकरी मुगाजी कामाजी कल्याणकर यांच्या दुग्धजन्य पदार्थाची कुल्फी, खवा, कलाकंद, आदी पदार्थांची दोन दिवसांमध्ये 50 हजार रुपयांची विक्री झाली. कामठा बु. येथील महानंदा कल्याणकर यांचे सेंद्रिय टरबूज हे ग्राहकांचे खास पसंती ठरली. तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहा यांनी तयार केलेले पाणलोटाचे मॉडेल व नंदकिशोर गायकवाड भोसी तालुका भोकर येथील शेतकऱ्यांचा मियाझाकी या आंब्याचे प्रदर्शनामध्ये खास आकर्षण होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे तर आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी केले.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील तंत्र अधिकारी के एम जाधव, मेरगेवार, प्रमोद गायके, संदीप स्वामी, सर्व तालुका कृषी अधिकारी,  कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण हांडे, नितीन नाईक, आदींसह कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000
















माझी आवळा प्रक्रिया पदार्थाची रु. 2 लाखापेखा अधिक किमतीची विक्री झाली व महोत्सवातील सन्मानाचा छायाचित्र स्टेटसला ठेवल्याने चंद्रपूर जिल्ह्यातून 2.5 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली अशी प्रतिक्रीया मीराबाई महिला स्वयं सहाय्यता समूह मु.पो.रेणापूर ता.भोकर जि. नांदेड येथील सुनिता अशोक कावळे यांनी दिली. याबाबतची चित्रफित




 


  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...