वृत्त क्रमांक 168
लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्यांची जबाबदारी : अभिजीत राऊत
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत तर अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ साजरा
नांदेड दि.१० : शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा विश्वास कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. खरे तर लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असते, असे प्रतिपादन वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भावनमध्ये आज नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत समारंभ व मावळते जिल्हाधिकारी तथा संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ महसूल व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन ही आपल्या प्रशासकीय सेवेची ओळख बनवा, असे आवाहन यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.
नांदेड जिल्ह्यातील आपले वास्तव्य आठवणीत राहणारे असून या काळात जलसंधारणापासून लेंडी प्रकल्पाला गती दिल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. दोन लोकसभा निवडणुका एक विधानसभा निवडणूक, तसेच मराठवाड्यात आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक आंदोलन सुरू असताना जिल्ह्यात शांतता ठेवता आली. कारण एक टीम म्हणून प्रत्येक जण काम करत होते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत देखील हीच टीम काम करणार असून नांदेडमध्ये आणखीन चांगले काम होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपण कायम शांततेत राहून काम करत असतो, असे अनेक जण म्हणतात. खरं म्हणजे शांत न राहता काम केल्यास अर्थात डोके गरम ठेऊन काम केल्यास चुका होतात. त्यामुळे जर तुम्हाला चुका करायच्या नसतील तर कोणी कितीही डिवचले तरी त्याला बळी न पडता काम करा. खरं म्हणजे प्रशासकीय पदांवर प्रमुख असणाऱ्या माणसाने शांततेनेच काम केले पाहिजे. कारण तुम्ही जर अस्वस्थ झालात तर अन्य कामावर त्यांचा परिणाम होतो.
नांदेड मध्ये गेल्या अडीच वर्षात अनेक चांगली कामे झाले. शासन आपल्या दारी, महासंस्कृती महोत्सव, लाडकी बहीण मेळावा अशी मोठ मोठे कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या टीमवर्कने पार पडले. नांदेडच्या या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे तयारी नसेल तरीही टीम भारी काम करून दाखवू शकते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा अशाच पद्धतीने कामे सुरू राहावी अशा शुभेच्छा ही त्यांनी व्यक्त केल्या.
नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी अभिजीत राऊत सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा कित्ता गिरवायला मिळणार याचा आनंद आहे .त्यांच्याकडून आपण नेहमीच मार्गदर्शन घेत होतो. प्रशासकीय स्तरावर ते कायम मार्गदर्शक राहिले आहे. आता त्यांचेच उत्तराधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यासारखे काम करणे ही जबाबदारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या निरोप समारंभाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आई-वडील व त्यांच्या पत्नी, त्यांचे आई-वडील उपस्थित होते. याशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजकुमार माने, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रमुख अनेक ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुगाजी काकडे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी संबोधित केले. तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ही मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन तहसीलदार नागमवाड यांनी केले.
000