Monday, July 14, 2025

वृत्त क्र. 724

देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

नांदेड, दि. 14 जुलै : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृध्दीसाठी विद्यापीठं, शाळांनी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर द्यावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली. 

अभिनव भारत शिक्षण संस्थेच्यावतीने नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आज श्री. बागडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलाशचंद्र काला, सचिव ॲड. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय. कुलकर्णी आदी मान्यवरांसह  प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

श्री. बागडे म्हणाले की, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर होता. गुरुकुल परंपरेमुळे विद्यार्थी सर्व विषयात पारंगत होत असे. आज विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यावर अधिक भर द्यावा. तसेच  ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचविण्याबाबत दक्षता घ्यावी. याशिवाय खेळांवरही भर द्यावा. शाळांमध्ये मैदान हे अवश्य असावे. खेळांमधून मुलांची शारीरिक विकासासह बौध्दीक क्षमताही वाढते. आपला देशात जगात सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखला गेला पाहिजे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मनोगतही व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000










वृत्त क्र. 723

नोंदणीकृत उद्योजकासाठी आज जीईएम पोर्टल कार्यशाळा 

नांदेड, दि. 14 जुलै :-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे उद्या 15 जुलै 2025 रोजी जीइएम पोर्टल प्रशिक्षण आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमात जीइएम पोर्टल बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गवर्नमेट ई-मार्केटप्लस, नोंदणी, प्रोफाईल तयार करणे व अपडेट करणे, सेवा प्रभावीपणे सूचीबध्द करणे, जीइएम पोर्टलवरील श्रेणी आणि निविदा तयार करणे, शासकीय ठेकेदारी शासनाच्या जीइएम पोर्टल संदर्भातील माहिती बाबत तज्ञ मार्गदर्शका मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजना इतर शासकीय महामंडळातील योजनाची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. 

तरी प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक अक्षय ठोके, एमसीईडी, उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन एमसीईडी चे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.

0000

विशेष लेख

12 पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को या जागतिक संस्थेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनाची शिफारस झाल्याने महाराष्ट्राच्या गौरवात भर पडली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच सामान्य जनतेने देखील गड-किल्ल्यांवर जाऊन आपला आनंद व्यक्त केला. आपला इतिहास प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असतेच. या शिवाय इतिहासातून लढण्याची प्रेरणा मिळते. भविष्याची रणनीती ठरवण्याची दिशा मिळते. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांसह जुनी संस्कृती अभ्यासाता येते. त्यामुळे ऐतिहासिक दुर्ग आपले कायम प्रेरणास्त्रोत आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निर्माण झालेले हे दुर्ग महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे ठरते. सोबतच अल्प आयुष्यात सुद्धा जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही भीम पराक्रम जगापुढे ठेवू शकता. हजारो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करू शकता असा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांच्या या 12 किल्ल्यांनी महाराष्ट्राला, देशाला दिला होता. आता हा दूरदृष्टीचा वारसा यानिमित्ताने जागतिक झाला आहे.

युनेस्को ; कार्य आणि भूमिका

युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) या संस्थेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता व सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. युनेस्कोचा उद्देश म्हणजे जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचे जतन करणे, जपणे आणि जागतिक समुदायात त्यांची ओळख निर्माण करणे. यासाठी "World Heritage Convention, 1972" तयार करण्यात आले.

भारताने १९७७ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून अनेक स्थळांना या यादीत मान्यता मिळाली आहे. सध्या भारतात जवळपास ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत (२७ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र स्वरूपाची व इतर प्रस्तावित).यामध्ये राजस्थानच्या गडकिल्ल्यांचाही सहभाग होता. महाराष्ट्राचे गड किल्ले मात्र दुर्लक्षित होते. यानिमित्ताने त्याकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. भारतातील स्थळांची शिफारस केंद्र सरकार अंतर्गत भारतीय पुरातत्व विभाग करतो. राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र सरकार युनेस्कोला प्रस्ताव सादर करते.

पराक्रमाच्या 12 यशोगाथा

महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी नामनिर्देशन देण्यात आले आहे. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे जिवंत प्रतीक आहेत. स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला रायगड, शिवाजी महाराजांचा सर्वात प्रिय किल्ला राजगड, अफझलखानाचा वध ज्या ठिकाणी झाला तो प्रतापगड, महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा, महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी, भक्कम डोंगररांगेवर वसलेला आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा लोहगड, मराठ्यांनी पहिला मोठा विजय मिळवलेला किल्ला साल्हेर, सागरी संरक्षणासाठी बांधलेला दुर्ग सिंधुदुर्ग, सागरी दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा सुवर्णदुर्ग, सागरी लढायांचे केंद्र विजयदुर्ग आणि मुंबई किनाऱ्याजवळील सागरी संरक्षणकवच असलेला खांदेरी किल्ला. तर तामिळनाडू राज्यातील दक्षिणेकडील रणभूमीवर मराठ्यांनी ताबा मिळवलेला जिंजी किल्ल्याचा यात समावेश आहे.

तत्कालिन युद्धनीतीचे शिलालेख

महाराष्ट्रातील हे बारा किल्ले आपल्या शेकडो युद्धनीतीच्या प्रात्यक्षिकांसह उभे आहेत.हे वास्तुकलेचे प्रत्यक्ष दर्शन असले तरी जगाला आपल्या दगडांच्या कवितेतून तत्कालीन युद्धनीतीला सांगणारे उत्तम प्रतीचे जणू शिलालेख ही आहे.थोडक्यात, प्रत्येक किल्ल्याकडे आपली एक गाथा आहे.जगाला नवल वाटेल अशी रोचक प्रत्येकाची कथा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे किल्ले  राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अनमोल आहेत. प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य स्वयंपूर्ण असून जागतिक पर्यटकांना देखील तत्कालीन युद्धनीतीची माहिती देणारे आहे. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांवर आणि किनाऱ्यावर ही किल्ले बांधण्यात आली, ज्यामुळे शत्रुपासून संरक्षण अधिक प्रभावी झाले. मराठा स्थापत्यकलेतील माची एक वैशिष्ट्य – किल्ल्याच्या टोकाला किंवा बाहेरील भागात असलेले बुरुजयुक्त संरक्षण. अशा माच्या जगातील इतर कुठल्याही किल्ल्यांमध्ये दिसत नाहीत.

शत्रूला सहज लक्षात न येणारे वळणदार, सुरक्षित दरवाजे ही एक विलक्षण प्रवेशद्वारांची रचना आहे. गनिमी कावा अर्थात गुरीला युद्ध नीती मध्ये अशी रचना किती आवश्यक असते याचेही महत्त्व या रचनेवरून कळते. हे किल्ले केवळ लढायांचे ठिकाण नव्हते, तर स्वराज्य संकल्पनेचा प्रचार करणारी केंद्रेही होती. युनेस्को अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर आधारित स्थळांची निवड करते. यामध्ये ऐतिहासिक महत्त्व आणि वैभवशाली परंपरा, स्थापत्यशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण रचना, जगात अन्यत्र न आढळणारा अद्वितीय स्वरूप, मानवतेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाशी असलेली नाळ, संरक्षणाची अवस्था आणि व्यवस्थापन हे पाच गुणधर्म पाहिले जातात.या निकषांवर महाराष्ट्रातील किल्ले पूर्ण उतरतात, म्हणूनच यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे.

 शिवरायांचा प्रताप जगव्यापी

या मान्यतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगासमोर अधिक प्रभावीपणे मांडता येईल. त्यांच्या युद्धनीतीचा जागतिक स्तरावरील युद्धांच्या युद्धनीती सोबत अभ्यास होईल. जगाच्या पटलावर एका महान योद्धाच्या पराक्रमाचे चिंतन,मंथन होईल. हे फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या सन्मानाचे लक्षण आहे. जागतिक पर्यटक देखील या ठिकाणी आकर्षित होतील, ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही उभारी मिळेल. १२ पराक्रम स्थळांचे युनेस्कोच्या व्यासपीठावर आगमन होणे ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाची घटना आहे. हे फक्त वास्तुकलांचे प्रतिनिधी नसून, स्वातंत्र्याची, धैर्याची आणि एकीची अमूल्य प्रतीके आहेत. यामुळे शिवरायांचे विचार, त्यांचे शौर्य आणि त्यांची दूरदृष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, आणि जगातील इतिहासात भारताचे स्वाभिमानी पान अधिक उजळून निघेल.

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

9702858777







वृत्त क्र. 722

डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे आज लोकार्पण

नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास यावे - खा.अशोक चव्हाण

नांदेड, दि.13 जुलै : नांदेड शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असुन भविष्यात नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन खा.अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.

महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळा आज दुपारी १२ वाजता माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी खा.डॉ.अजित गोपछडे, खा.प्रा.रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके बोंढारकर, मा.आ.अमर राजुरकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, महापालिकेचे माजी महापौर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.   

प्रारंभी मंचावर माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण व इतर मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराज यांना पुष्प अर्पण करून व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रेक्षागृहाच्या नूतनीकरण करण्यासंदर्भात माहिती विशद करून शहरामध्ये महापालिकेमार्फत होत असलेल्या विविध विकास कामांचा धावता आढावा यावेळी त्यांनी सादर केला.

यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रेक्षागृहाचे काम अतिशय दर्जेदार झाले असून नांदेडकरांसाठी आता अत्याधुनिक सुविधा असलेले प्रेक्षागृह उपलब्ध असणार असल्याने महानगरपालिकेच्या कामासंदर्भात समाधान व्यक्त करून शहरातील वाढती लोकसंख्या व व्याप्ती विचारात घेऊन महापालिकेने किमान दोन अधिकची प्रेक्षागृहे विकसित करावीत अशी सुचना यावेळी मान्यवरांनी केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या विकासाबाबत कायम कटिबद्ध असून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी नांदेडच्या विकासासाठी एकरुपी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या विविध निधीतुन व आम्हा राजकीय नेत्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रेक्षागृह तयार झाले आहे, असे खासदार चव्हाण म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

चौकट

या प्रेक्षागृहाचे नुतनीकरण करतांना अंतर्गत कामासाठी 5.14 कोटी तर बाह्य कामासाठी 8.12 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत. 

अंतर्गत कामे :- प्रेक्षागृहातील आवाज नियंत्रित व अधिक आरामदायी आणि केंद्रित करण्यासाठी व प्रतिध्वनी व बाह्य आवाज कमी करणे या उपायोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ब्रिटिश अकॉस्टिक कंपनीची उच्च दर्जाची साऊंड सिस्टम बसविण्यात आली आहे. 800 आसन क्षमता त्यापैकी 180 चेअर या पुश बॅक प्रकारातील आहेत. 110 टन क्षमतेची डेक कंपनीची एअरकंडिशनिंग यंत्रणा. तसेच वुडन स्टेज फ्लोरिंग, अग्नि प्रतिबंधक उपाययोजना, स्टेजवरील प्रकाश योजना, व्हीआयपी रूम, कलाकारांची मेकअप रूम, पॅसेज, संपूर्ण फ्लोरिंग व टॉयलेट यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

बाह्य कामे:- फसार्ड क्लोडींग यामध्ये प्रेक्षागृहाचा दर्शनी भाग सौंदर्यपूर्ण दिसण्यासाठी झिंक कोटेड कंपोझिट पॅनल चा वापर करून कॅलीडिंग आली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षागृहासाठी लागणारी विद्युत निर्मिती करण्यासाठी 100kva क्षमतेचे सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच 500kva क्षमता असणारी डीडी सेट, मुख्य रस्ता ते प्रेक्षागृहाची कमान डेकोरेटिव्ह विद्युत पोल, संपूर्ण बाह्य परिसराचे नूतनीकरण त्यामध्ये संरक्षक भिंत, पेव्हर, लँड स्केपिंग, प्रवेश कमानी आणि अंडर ग्राउंड वॉटर टँकचा समावेश आहे. या नूतनीकरणाचे अंतर्गत बाबीचे काम सन्मान कन्स्ट्रक्शन, इंजिनिअर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नांदेड यांनी केले असुन तर बाह्य कामे मे.शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रा.लि. नांदेड यांनी केलेली आहेत.

याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधु,निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी रमेश चौरे, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा बेग, उपअभियंता सतीश ढवळे,प्रकाश कांबळे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, कनिष्ठ अभियंता ठाणेदार, राजकुमार बोडके, स्टेडियम विभागाचे कार्यालय अधिक्षक पुरुषोत्तम कामतगीकर, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे आदिंची उपस्थिती होती.

जनसंपर्क विभाग,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड






13.7.2025.

  वृत्त क्र. 721

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा दौरा

नांदेड दि.13 जुलै:- राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे 14 जुलै 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार 14 जुलै 2025 रोजी ता. महागाव जि.यवतमाळ येथून वाहनाने सकाळी 11.30 वा. नेताजी सुभाषचंद्र बोस आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, नांदेड येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.50 वा. शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम जवळ, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.55 वा. शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम जवळ, नांदेड येथे आगमन. दुपारी 4 वा. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार-2025 सोहळयास उपस्थिती. सायं. 6.05 वा.वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

12.7.2025

 महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा 

प्रति,

मा. संपादक / आवृत्ती प्रमुख/

विशेष प्रतिनिधी / जिल्हा प्रतिनिधी / इलेक्ट्रॉनिक मिडीया, नांदेड.  

विषय :- डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण, क्षमता वाढ व परिसर विकसित करणे या कामाचा लोकार्पण सोहळा

सन्माननीय महोदय,

महापालिकेच्या वतीने डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा  मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास अपारंपारिक उर्जा तथा पालकमंत्री श्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.श्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्थळ:- डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड येथे रविवार दिनांक 13 जुलै 2025  दुपारी 12.00 वा. तरी सदरील आयोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  

धन्यवाद !

आपला स्नेहाकिंत

 स्वा/-

गिरीश कदम,

अतिरिक्त आयुक्त,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड





  26 जुलै #कारगिल #विजयदिवस शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र #अभिवादन...!