Wednesday, May 28, 2025
वृत्त
तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी
नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता
--अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी
मुंबई, दि.२८ : - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने यासंबंधीच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्रीतुळजाभवानी देवीला महत्वं आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने आजचा हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेल्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबवण्यात येतात.
स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी याचा आराखडा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता धेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून ही कामे करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियोजन विभागाने तत्परतेने जारी केलेल्या या शासननिर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवीभक्तांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
---000000----
वृत्त क्रमांक 549
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातर्गंत तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 मे :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानअंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण याघटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हे. ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तुर, मुग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रु. किलोप्रमाणे अनुदान आहे. 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रु. किलोप्रमाणे अनुदान देय राहील.
तुर, मुग, उडीद यापिकांच्या अनुदानावरील बियाणांसाठी अर्जकरण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे 5 वर्षाच्या आतील वाण (फुले किमया) 100 टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 29 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिध्द होईल. अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने त्याच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःआधारकार्ड घेवून आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत पिक प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार आहे. पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ.व्दारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत असावा. पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था निवडही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस ) या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्याच्या संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करावयाची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे. शेतकरीगट/कंपनी/ संस्था यामधील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रिस्टॅक वर नोंदणी असणे व फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
तरी वरील सर्व बाबींचा लाभ घेणेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी/ शेतकरीगट/ कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 29 मे 2025 पर्यत अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.
00000
वृत्त क्रमांक 548
शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व पेरणी करु नये
नांदेड, दि. 28 मे :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाचे बियाणे विकत घेवू नये किंवा पेरणी करू नये. अधिकृत व प्रमाणित कंपन्यांचेच बी.टी. बियाणे खरेदी करावे. शंकास्पद बियाणे विक्रेत्यांची माहिती तात्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कळवावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
सध्या खरीप हंगाम 2025 ची लगबग सुरु आहे. ग्रामीण भागात कपाशी लागवडीसाठी बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. एचटीबीटी ही एक अनधिकृत जैवतंत्रज्ञान आधारित कापसाची जात आहे. जी अद्याप भारत सरकारकडून अधिकृतपणे मान्यता प्राप्त नाही. एचटीबीटी बियाण्यांचे उत्पादन, विक्री व पेरणी ही अनधिकृत व बेकायदेशीर आहे, असे केल्यास बी.टी. बीज कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, व अन्य संबंधित कायद्यानुसार गुन्हा ठरतो.
एचटीबीटी बियाण्यांची उत्पत्ती, कार्यक्षमता व परिणाम याबाबत कोणतीही खात्री नाही. रोगप्रतिकारक शक्ती, उत्पादन क्षमता आणि बाजारातील मागणी यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बोगस व बनावट बियाणे मिळण्याची शक्यता वाढते. राज्य शासन व कृषी विभाग यांच्याकडून याबाबत सातत्याने कारवाई सुरू आहे. अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यां विरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0000
वृत्त क्रमांक 547
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त
सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा
31 मे 2025 रोजी सायं. 5 वाजता, कुसुम सभागृह, नांदेड या ठिकाणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
नांदेड, दि. 28 मे :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार 31 मे 2025 रोजी सायं. 5 वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंतीवर्षा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतीक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचे लाभले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजाहित दक्ष होत्या. त्यांनी अनेक घाट, मंदिरे जीर्णोद्धार, पाणपोई, धर्मशाळा इ. कामे केली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 31 मे रोजी नांदेड येथील कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध लोककलाकार असतील.
००००००
वृत्त क्र. 645 पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनां चे वितरण नांदेड 20 जून - न...

-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...