वृत्त क्रमांक 549
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातर्गंत तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 मे :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानअंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण याघटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हे. ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तुर, मुग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रु. किलोप्रमाणे अनुदान आहे. 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रु. किलोप्रमाणे अनुदान देय राहील.
तुर, मुग, उडीद यापिकांच्या अनुदानावरील बियाणांसाठी अर्जकरण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे 5 वर्षाच्या आतील वाण (फुले किमया) 100 टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 29 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिध्द होईल. अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने त्याच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःआधारकार्ड घेवून आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत पिक प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार आहे. पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ.व्दारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत असावा. पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था निवडही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस ) या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्याच्या संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करावयाची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे. शेतकरीगट/कंपनी/ संस्था यामधील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रिस्टॅक वर नोंदणी असणे व फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
तरी वरील सर्व बाबींचा लाभ घेणेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी/ शेतकरीगट/ कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 29 मे 2025 पर्यत अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment