Wednesday, April 8, 2026

वृत्त क्रमांक  

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन    

नांदेड दि. 8 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून अर्ज शुक्रवार 15 मे 2026 पर्यंत मागविण्यात आली आहेत. त्यासंबंधीची जाहिरात राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत स्वरुपात प्रसिद्ध केली आहे.  

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्यावत (QX World University Ranking) २०० च्या आतील परदेशात शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी ३० टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. 

सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज www.fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन करावी. त्याची प्रत समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे- ४११००१ येथे सादर करावा, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. 

याबाबतची www.maharashtra.gov.in/site/viewallnews किंवा www.maharashtra.gov.in/site/upload/pdf/fs-adv-२०२६-२७.pdf या शासनाच्या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक  

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड दि. 8 एप्रिल : जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जन औषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे "सर्वरोग निदान व उपचार शिबिर नांदेड तालुक्यात गोपाळचावडी येथे 7 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. 

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पदवीपूर्व (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅमेली ऑडॉप्शन प्रोग्राम हा भाग शैक्षणिक वर्षात समाविष्ट केला असल्याने ग्रामिण भागातील प्रत्यक्ष आरोग्य समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपपाययोजना करण्याची संधी मिळावी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, गृहभेटींचा अनुभव, आरोग्य जनजागृती व समुपदेशनामध्ये सक्रिय सहभाग घेता यावा त्यामुळे त्यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक भान अधिक वृध्दिंगत होण्यास मदत होणार असून भविष्यातील वैद्यकीय सेवेबाबत त्यांची दृष्टी अधिक व्यापक होईल, या हेतूने महाविद्यालयातील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने गोपाळचावडी गावाची निवड केलेली आहे. 

ग्रामिण भागातील नागरीकांना दर्जेदार, सुलभ व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित ग्रामस्थांची पुर्णपणे विनामुल्य तपासणीसोबतच औषधोपचार व रक्त चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या. 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त दरवर्षी आरोग्यविषयक महत्वाच्या मुद्यावर भर दिला जातो. यंदाच्या दिनाचे ब्रीदवाक्य "टुगेदर फॉर हेल्थ, स्टॅड विथ सायन्स" ( आरोग्यासाठी एकत्र येऊया, विज्ञानाच्या बाजूने उभे राहू या) या संकल्पनेवर आधारीत असून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, चुकीच्या समजुती दुर करणे व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा बळकट करणे हा मुख्य उद्देश होता. या अनुषंगाने शिबिरात नागरिकांना योग्य जीवनशैली, नियमित तपासणी व लवकर निदान यांचे महत्व समजावून सांगण्यात आले. 

या शिबिरात स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोग, कान-नाक-घसा शास्त्र शल्यचिकीत्साशास्त्र, त्वचारोगशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र अशा विविध विभागाच्या तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. एकाच छताखाली विविध तज्ञांची उपलब्धता असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला असून लहान मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रौढ यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला गेला. अनेक रुग्णांना प्रथमच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

हे शिबिर या रुग्णालयाचे मा. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदशनाखाली संपन्न झाले असून, शिबिराचे उद्घाटन मानसोपचारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. आय. एफ इनामदार प्राध्यापक व विभाग प्रमुख, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. चंदुलिया विभागप्रमुख औषधशास्त्र विभाग, डॉ. वंदना दुधमल विभागप्रमुख शरीरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. सलीम तांबे सहयोगी प्राध्यापक बालरोगशास्त्र विभाग, डॉ. आर. डी. गाडेकर सह. प्रा. जन औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. ज्योती भिसे, डॉ. कोमल वारकड सहा.प्राध्यापक ज. औ. शास्त्र विभाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये अशा उपक्रमाचे महत्व अधोरेखित करतांना भविष्यातही अधिक व्यापक स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली. 

शिबिरादरम्यान माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. पदविपुर्व विद्यार्थी व अंतरवासिता डॉक्टर यांनी तयार केलेले हस्तनिर्मीत पोस्टर प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती. या माध्यामातून विविध आजाराबाबत जनजागृती करण्यात आली तसेच योग्य आहार, व्यायाम स्वच्छता व नियमित तपासणी याचे महत्व अधोरेखित करण्यात आले. 

सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. महालॅबच्या माध्यमातून रक्ततपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत झाली. ग्रमिण भागात अशा सुविधा सहज उपलब्ध नसल्याने या सेवेचे विशेष कौतुक करण्यात आले. काही रुग्णामध्ये दिर्घकालीन आजाराचे लवकर निदान झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. 

हे शिबिर श्री जगद्गुरु पंचाचार्य हायस्कूल गोपाळचावडी येथे आयोजित करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी मनापासून सहकार्य केले. तसेच श्री. मुंडकर यांनीही शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. शाळेच्या परिसरात उकृष्ट नियोजन, नोंदणी व्यवस्था, तपासणी कक्ष व औषधवितरण कक्ष यांची प्रभावी मांडणी करण्यात आल्यामुळे शिबिर सुरळीत पार पाडले. शिबिरात विविध वयोगटातील रुग्णाची तपासणी करुन त्यांना आवश्यक त्या उपचाराचा लाभ देण्यात आला. महिलासाठी स्त्रीरोग तपासणी, गर्भवतीसाठी सल्ला, बालकांसाठी आरोग्य तपासणी व लसीकरणाविषयी मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सल्ला तसेच सामान्य आजारसाठी तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. अनेक नागरिकांनी शिबिरामुळे वेळ व खर्चाची बचत झाल्याचे नमुद केले. 

या शिबिरासाठी गोपाळचावडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहून शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी डॉ. श. च.शा.वै.म.व रुग्णालयाचे विशेष आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता समाजसेवा अधिक्षक संतोष मुंगल व देवेंद्र जोग यांनी समन्वयाची भूमिका पार पाडली. या प्रसंगी उद्घाटनपर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. महिमा व तेजल यांनी केले तर आभार समाजसेवा अधीक्षक श्री मुंगल यांनी मानले.

00000





वृत्त क्रमांक  

जिल्ह्यात 9 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन   

नांदेड दि. 8 एप्रिल :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नरेंद्र ब्रह्मे  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यातर्फे शनिवार 9 मे 2026 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे त्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅकांचे कर्ज वसुली प्रकरणे, थकीत पाणीबिल, ईत्यादी प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरूद्ध अपील नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशाप्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नरेंद्र ब्रह्मे यांनी केले आहे. तसेच सर्व पक्षकारांनी तडजोडीसाठी येताना आपले अधिकृत ओळखपत्र सोबत घेवून यावे. शनिवार 9 मे 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहचे उत्साहात उद्घाटन संपन्न

नांदेड दि. 8 एप्रिल :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 8 ते 14 एप्रिल 2026 कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन आज आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने  झाले. 

भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांच्या माध्यमातून भारतीय समजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये समाजातील दुर्बल घटक व वंचिताबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने नमूद केली आहे. भारतीय राज्यघटनेतील या तत्त्वांच्या अनुषंगाने या घटकातील सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी स्पष्ट केले. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना सर्वांना माहीत होण्यासाठी समाज माध्यम व वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी सामाजिक समता सप्ताह निमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती कार्य करण्यात येणार असल्याचे नमूद करुन विविध योजनांची प्रस्ताविकेत माहिती दिली. समाज भुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.  

याप्रसंगी पत्रकार परिषद घेऊन समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेला विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांचे तर समाज भुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांचे स्वागत समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी केले तर समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांचे स्वागत आनंद झपलवाड यांनी पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देवून केले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहीकरित्या वाचनही करण्यात आले. 

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळाचे व्यवस्थापक, ज्येष्ठ नागरीक, वसतिगृहाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले तर आभार समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी मानले.

00000






छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...