Tuesday, August 13, 2024

 वृत्त क्र. 713

#फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ?

गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ?

ऑन द फिल्ड कार्यशाळेचे फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण

#नांदेड दि. 13 ऑगस्ट :- कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्ह वरून मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गुलाबी बोंडअळीची जीवन साखळी तोडल्याशिवाय त्यावर पुर्णत: नियंत्रण मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषि विभाग तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी शिफारस केलेल्या औषधाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. नांदुसा येथे संजय कोंडीबा जनकवाडे यांच्या शेतात किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली.

हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या कृषि विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हा कार्यक्रम घरी बसून पाहता आला.

याकार्यक्रमात किटकनाशके खरेदी करण्यापासून त्याचे मिश्रण तयार करणे, प्रत्यक्ष शेतावर फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. किटकनाशकाचे धोके तसेच विषबाधा झाल्यास प्रथमोपचार काय करावेत याबाबत कृषी विद्यापिठ परभणीचे अंतर्गत कापूस संशोधन केंद्राचे अरविंद पांडागळे यांनी माहिती दिली. तसेच शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी कापूस पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मीक किड नियंत्रण तसेच रासायनिक किटकनाशक वापरुन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. त्यानंतर पोखर्णी येथील शास्त्रज्ञ देविकांत देशमुख यांनी सुध्दा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना फवारणी करताना वापरावयाच्या सेफ्टी किटचे तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅपचे वाटप करण्यात आहे.

किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत कृषी विभागामार्फत जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणाऱ्या मोबाईल डिजीटल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी धानुका कंपनीमार्फत सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी श्री. कळसाईत, मोहिम अधिकारी सचिन कपाळे, गट विकास अधिकारी पी.के.नारवटकर, तालुका कृषि अधिकारी सिध्दार्थ मोकले, नांदुसा गावच्या सरपंच श्रीमती पुजा जनकवाडे, पोलीस पाटील गजानन जनकवाडे तसेच गावातील शेतकरी, नागरिक, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि सहायक जारीकोटे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील लक्ष्मण जनकवाडे यांनी केले.
00000









मोट ही संसाराची, अन्नपूर्णेची सावली...
संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली...
राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ शासनाची #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजना...



 वृत्त क्र. 712

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळानी सहभागी होण्याचे आवाहन

·  स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

·  राज्यातून एकूण 44 सार्वजनिक गणेश मंडळाची होणार निवड

· प्रथम क्रमांकास 5 लाख रुपयांचे पारितोषिक

नांदेड दि. 13 ऑगस्ट :-  महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे यासाठी सन 2023 मध्ये राज्यातील सार्वजनिक मंडळाना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असून जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. यावर्षी 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोकृष्ट सार्वजनिक मंडळाना पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोकृष्ट सार्वजनिक गणेश मंडळास 5 लक्ष रुपये , द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 1 लक्ष रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित 41 जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषीक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयासोबत स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या  Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर 31 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज सादर करावेत, असेही पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000




वृत्त क्र. 711

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी

विद्यार्थ्यांना  नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

·         विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. 

 

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.  

 

विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.  विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यत नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत ऑनलाईन शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीचे प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे.  तर 1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क  ऑनलाईन भरून अर्जाची प्रत नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी व 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावेत. त्यामुळे कोणतेही ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

वृत्त क्र. 710

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.  

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे,  सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

 

दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

00000 

वृत्त क्र. 709

होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- नांदेड जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेला होमगार्ड अनुषेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे केले होते. कार्यालयाच्या प्रशासकीय कारणास्तव या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

 

कागदपत्रे पडताळणी व शारीरीक क्षमता चाचणीसाठी अर्ज क्रमांकानुसार उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथे बोलाविण्याचे सुधारित वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१php या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. के.ए.धरणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

 विशेष लेख :                                             

महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना


फार पूर्वीपासून चुलीवर स्वयंपाक करण्याची पध्दत होती व अजूनही काही ठिकाणी आहे. यासाठी जंगलातीलरानातील लाकूड-फाटा गोळा करुन किंवा वृक्षतोड करुन इंधनाची व्यवस्था केली जाते. यातून महिलांना धुरांचा खूप त्रास होवून अनेक आरोग्याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांपासून महिलांची सुटका व्हावी. तसेच इंधनासाठी त्यांना वणवण भटकावे लागू नये यासाठी शासनाने यापूर्वीही अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा होऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 पासून सुरु केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र कुटूंबाना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सुरू आहे.

 

महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी घेतलेले तसेचया योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्टया शक्य होत नाही. तसेच एक सिंलेडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यत स्वयंपाकासाठी साधन उपलब्ध नसल्यामुळे वृक्षतोड करून पर्यावरणाला हानी पोहोचण्यात येते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा 30 जुलै 2024 रोजी केली. या योजनेत राज्यातील केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेणे बंधनकारक आहे. विषेशत: उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी  करुन घ्यावी. त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी गावात येऊन ई-केवायसी करुन घेतील किंवा लाभार्थ्यांनी शक्य असल्यास संबंधित ऑईल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा मिळणार नाही. यामुळे शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

 

लाभार्थ्यांची पात्रता:- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटूंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र राहील. हा लाभ केवळ 14.2 कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असणार आहे.

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपध्दती  

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या मार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल. सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडरइतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्या त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करतील. तसेचलाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करुन देतील. या योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. जिल्हानिहाय सिलिंडरच्या किंमतीत फरक आहे. अंतिमत: तेल कंपन्याकडून वितरीत करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किंमतीच्या आधारावरतसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किंमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल.

 

मुख्यमंत्री माझी-लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपध्दती

 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. तसेच या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर एक समिती गठीत केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी  असणार आहेत.

 

अलका पाटील,

उपसंपादकजिल्हा माहिती कार्यालयनांदेड

00000




 वृत्त क्र. 708

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई 

·  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

 सार्वजनिक #गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024



  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...