Tuesday, September 3, 2024

वृत्त क्र. 801

मध्यप्रदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री
प्रल्हादसिंग पटेल यांचा दौरा
 
नांदेड दि. 3 सप्टेंबर : मध्‍य प्रदेश राज्‍याचे ग्रामविकास, पंचायत आणि कामगार मंत्री प्रल्‍हादसिंग पटेल हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी उमरखेड येथून मोटारीने दुपारी 1 वा. श्री रेणुकामाता मंदिर माहूरगड येथे आगमन व दर्शन आणि राखीव. दुपारी 2.15 वा. मोटारीने आर्णी जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.
0000

 वृत्त क्र. 800

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 3 :- नांदेड जिल्ह्यात 4 सप्टेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 4 सप्टेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000


 वृत्त क्र. 799

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देऊन आज घेणार दर्शन 

 

 नांदेड, दि. 3 सप्टेंबर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवार 4 सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. सायं 5.15 वा. नांदेड येथील सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेणार आहेत.

 

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 

उदगीर येथील कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.35 वाजता राष्ट्रपती महोदयांचे नांदेड विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी 4.45 वाजता नांदेड विमानतळ येथून वाहनाने गुरुद्वारा रोड, यात्री निवास रोड नांदेड येथे आगमन. सायं 5 ते 5.05 वाजेपर्यत टीबीसी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.5 ते 5.15 राखीव. सायंकाळी 5.15 ते 5.40 पर्यत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे भेट.  सायं. 5.40 वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे वाहनाने प्रयाण. सायं. 5.55 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. त्यानंतर सायंकाळी 6.05 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 798

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी

अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

 

नांदेड दि. 3 सप्टेंबर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या काही ठिकाणांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनी नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सुनेगाव शिवारामध्ये भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

 

नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. रविवारी जिल्हयातील 93 मंडळापैकी 68 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे.

 

दरम्यान महसूल यंत्रणा कामी लागली असून जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची नेमकी अंदाजित आकडेवारी उद्यापर्यंत पुढे येण्याची शक्यता आहे.

 

आज पाहणी करताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सोबतच जिल्ह्यातील कृषी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पालकमंत्र्यांसोबत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार एक-दोन दिवसात उघाड मिळेल. त्यानंतर पंचनामे मात्र गतीने झाले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्ह्यातील प्रकल्पांचा देखील त्यांनी आढावा घेतला. गोदावरील काठावर झालेले नुकसान तसेच शहरात झालेले नुकसान या संदर्भातील पंचनामे लवकरात लवकर करावे.शहरातील नुकसानासाठी तातडीची उपाययोजना शासनाने केली आहे. नगदी रक्कम देऊन ही मदत करण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

0000



  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...