Saturday, March 8, 2025

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आनंद पाटील बोंढारकर यांनी यावेळी भाविकांना शुभेच्छा दिल्या.




वृत्त क्रमांक 273

अंध सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींना

आमदार निधीतून देणार लॅपटॉप : आमदार हेमंत पाटील 

•  दिव्यांग महिला कला क्रिडा महोत्सवाचे आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन संपन्न    

नांदेड, दि. 8 मार्च :- बियाँड़ व्हिजन फाउंडेशन संस्थेने समदृष्टी प्रतिष्ठान मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने श्री गोविंदसिंघजी स्टेडिअम नांदेड येथे आज दिव्यांग महिला कला क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना दिल्या. दिव्यांग व्यक्तीचे स्वाभिमानाने जीवन जगण्याचे त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर परिसरातील द्वाटरी दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे (लॅपटॉप) उपलब्ध करून देण्यासाठी 20 लाख रूपये आर्थिक सहाय्य देणार असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी घोषीत केले.   

जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधुन क्रीडा संकुल परिसर नांदेड येथे या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून 150 हुन अधिक दृष्टीहीन दिव्यांग महिला सहभागी झाल्या आहेत. महोत्सवाचे स्वरूप अंध मुलींचे प्रदर्शनीय क्रिकेट सामने, राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा, गुणवंत महिलांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन, भेटवस्तुचे वितरण असे आहे. 

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा समाज कल्याण सतेंद्र आऊलवार, पदाधिकारी सचिन किसने, संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मशाळा सलग्न वसतिगृह अधीक्षक, गृहपाल महासंघ संदिप चोपडे, महासचिव बियाँड व्हिजन फाऊंडेशन सौ मीरा चोपडे, प्रकल्प प्रमुख तथा कोषाध्यक्षा वी. व्ही. गणेश साकळे, समदृष्टी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश साकले, समदृष्टी प्रतिष्ठानचे सचिव देवेन सोनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊ‌लवार यांनीही आयोजनाचे कौतुक केले व शासन आपल्या सोबत आहे असे सांगून. महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधव गोरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार स्वागताध्यक्ष सचिन किसवे यांनी मानले तर सुत्रसंचलन देवेन सोनार यांनी केले. 

याप्रसंगी सौ. मिरा चोपडे, शहनाज शेख, नयना  पाटणकर या दिव्यांग महिलांचा व  गणेश साकळे यांचा राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारत या संस्थेत राष्ट्रीय युवा सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर श्री गोविंदसिंघजी क्रीडांगणावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सचिन किसवे यांच्या हस्ते मुलीच्या क्रिकेट सामन्याचे नाणेफेक करून उदघाटन करण्यात आले.

0000

समाज कल्याण संस्थांना अनुदान

 




जागतिक महिला दिन

 






भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 




मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह

 




 महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद


महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

    मुंबई, दि. 8 : महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिला प्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान  दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यावेळी केले. राज्यमंत्री पंकज भोयर सुद्धा यावेळी उपस्थित होते.

महिला आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने
मुख्यमंत्र्यांनी माध्यम क्षेत्रातील महिलांसमोरच्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, "महिलांना मल्टीटास्किंग काम करत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. माध्यम क्षेत्रातील महिलांना तर 24 तास दक्ष राहावे लागते. व्यवसाय, घर आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना प्रत्येक टप्प्यावर अनेक संघर्ष करावे लागतात.

महिला उद्योजकतेला चालना
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध क्लस्टर्समध्ये महिला उद्योजकांसाठी खास संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच, मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने 10 हजार महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचे अभियान हाती घेतले आहे.
भविष्यातील नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित असतील आणि महिलांनी त्यात आघाडीवर राहावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मीडिया मॉनिटरिंग
मॉनिटरिंगचा अर्थ असा आहे की, एक सिस्टम आम्ही उभी करतो ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या बातम्या आहेत त्याचे विभागीकरण होणार आहे. त्यातल्या ज्या बातम्या नकारात्मक असतील त्याच जे खरे उत्तर आहे किंवा त्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या ज्यांनी हे दिल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंगचे प्रयोजन आहे. माध्यमांवरील तो अंकुश अजिबात नाही.

महिला अधिकाऱ्यांचे कौतुक
 प्रशासनात काम करणाऱ्या महिला अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्यात चोखपणे पार पाडत असून या या कामात त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. राज्याच्या मुख्य सचिव पासून प्रशासनातील विविध विभागात मुख्य पदावर महिला अधिकारी आहेत.

महिला सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुविधा
महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 50 किमी अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, त्यांचे दीर्घकालीन व्यवस्थापन आणि देखभाल करण्यासाठी ठोस योजना आखण्यात आली आहे.

 लैंगिक समानता
शालेय जीवनापासून जेंडर इक्वलिटी त्यांच्यावर बिंबवली पाहिजे. स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे या बाबी लहान वयातच रुजवल्या पाहिजेत. ही जबाबदारी त्यांची शाळा, परिवार आणि समाजाची देखील आहे.

 स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ति म्हणून जगण्याचा अधिकार
सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या विचारांना मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मात्र, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. हे दुर्भाग्य आहे. तरीही काही स्त्रिया आपल्या मतांवर ठाम राहतात आणि त्याचा सामना करतात.

लव्ह जिहादविरोधात कठोर भूमिका
लव्ह जिहाद प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, "सुरुवातीला अशा घटना एक-दोन अपवाद म्हणून वाटत होत्या, पण तपासानंतर लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणावर चाललेला प्रकार आहे. अनेक मुली फसवल्या जात असून, त्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांची विशेष समिती तयार केली असून, त्यांना या प्रकरणांचे सखोल विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनेकांना माझ्या राजकीय वारसदारांची चिंता असते, पण मी माझ्या घराण्यातला शेवटचा राजकारणी असेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, संचालक किशोर गांगुर्डे आणि संचालक दयानंद कांबळे उपस्थित होते.
***






 वृत्त क्रमांक 272

जिल्हा रुग्णालयात महिला दिनानिमित्ताने जनजागृतीपर कार्यकम

नांदेड, दि. ८ मार्च :- आज जागतिक महिला दिनानिमित्त श्री गुरुगोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज अवयव दान जनजागृती व जागतिक श्रवण दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अवयवदान कसे केले जाते याबद्दलची पूर्ण प्रक्रिया डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण विभाग प्रमुख डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच जागतिक श्रवण दिनाबद्दल श्रवणदोष का येते व काळजी काय घ्यायची याबद्दलची मार्गदर्शन डॉ. अश्विन लव्हेकर कान नाक घसा तज्ञ यांनी केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पेरके ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत पाटील डॉ. साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड तसेच मेट्रन श्रीमती राठोड सर्व विभागाच्या इन्चार्ज सिस्टर, परिचर्या प्रशिक्षण केंद्र रुग्णालय नांदेड येथील प्राचार्य श्रीमती बोथीकर व सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व महिला सफाई कर्मचारी हे सर्व उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल उदगीरकर व ज्योती पिंपळे यांनी केले. 

महिला दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी मनोगत व्यक्त  करून उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. श्रीमती हळदेकर व श्रीमती विद्या बापते यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

०००००






 








 

वृत्त क्रमांक 271

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील

लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना 

•   पालकमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती 

•  लोकप्रतिनिधींनी दिल्या भाविकांना शुभेच्छा  

नांदेड दि. 8 मार्च  :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे  शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे भाविकांना घेऊन रवाना झाली आहे. या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले. 

या रेल्वेला राज्याचे  इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तर रेल्वे स्थानकावर बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती.  

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून, मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक, जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्राना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झाली आहे.  

आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर सकाळपासून आयोध्याला जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती. सर्व प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या बसण्याच्या ठिकाणासह त्यावर बोगी नंबर लिहिला होता. सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांच्या पूर्ण प्रवाशात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक वैद्यकिय टिमसोबत आहे. तसेच सोबत 15 कर्मचारी असणार आहेत. आज रेल्वेस्थानकावर शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाला बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती. 

00000















वृत्त क्रमांक 270

मानसिकता बदलविण्यासाठी

महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

 •  बालिका पंचायत 2.0 चा जिल्ह्यात शानदार शुभारंभ 

नांदेड दि. 8 मार्च :- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे. या उपक्रमाला सुरूवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचे स्वागत केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अनेक गावांचा आम्ही समावेश केला असून या माध्यमातून महिला सबळीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी महिलांच्या या उपक्रमाला घराघरातील महिलांचा पाठिंबा वाढणे आवश्यक असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.  

जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व स्वच्छता विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.  

याप्रसंगी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची मंचावर उपस्थित होती.  

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बालिका पंचायत उपक्रमाच्या दुसऱ्या टप्पाचा शुभारंभ करण्यात आला. यात नव्याने 211 गावांमधून बालिका पंचायत उपक्रम राबवला जाणार आहे. 

यापूर्वी जिल्हा परिषदेने या उपक्रमामार्फत गावागावात स्वच्छता मोहीम, दारूबंदी, वृक्षारोपन, शाळांचे बळकटीकरण, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, ग्रामपंचायत प्रशासनात मदत अशा अनेक उपक्रमांना राबविले आहे. आज बालिका पंचायत 1.0 मध्ये काम केलेल्या मुलींनी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तसेच याठिकाणी अनेक गावांचे सरपंच या उपक्रमात सहभागी, गावातील शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष म्हणजे महिला सरपंचही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

काय आहे बालिका पंचायत

केंद्र शासनाने महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापूर्वीच महिलांना आरक्षण आहे. मात्र हे प्रतिनिधित्व करत असतांना महिलांमध्ये आपल्या पंचायतराज समितीच्या कारभाराची माहिती असावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते संसद सभागृहापर्यंत महिला प्रतिनिधित्व व त्याचे दायित्व याबद्दलची माहिती मिळावी. गावातील प्रशासन व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढावा. त्यांच्या नेतृत्व गुणात वाढ व्हावी, महिला नेतृत्वाला पुढाकार मिळावा यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. सिईओ मिनल करनवाल यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून नांदेड जिल्ह्यात त्याला गेल्यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

00000