Tuesday, February 25, 2025

 वृत्त क्रमांक 230

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत

अवसायकांची नामतालिका (पॅनल) साठी मागविण्यात आले अर्ज  

नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आली आहेत, असे आवाहन लातूर सहकारी संस्था  विभागीय सहाय्यक निबंधक, अधिन विभागीय सहनिबंधक अरुण शेंदारकर यांनी केले आहे. 

याबाबत अर्जाचा विहित नमुना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर विभाग, लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लातूर यांच्या कार्यालयात 25 फेब्रुवारी  ते 14 मार्च 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 मार्च 2025 पर्यंत आहे. प्राप्त अर्जाची छाननी  20 मार्च 2025 रोजी पूर्ण करून 21 मार्च 2025 पर्यंत प्रारुप नामतालिका प्रसिद्ध करणे व 25 मार्च 2025 रोजी हरकती मागवणे व 27 मार्च 2025 रोजी हरकतीचा निर्णय करून 28 मार्च 2025 रोजी अंतिम नामतालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

अर्ज कोणाला करता येणार 

न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग अॅडव्हॉटस्, चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टर, कंपनी सेक्रेटरी, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांच्या सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत अधिकारी, सहकार विभागातील सेवानिवृत वर्ग-1, वर्ग-2 चे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी,महसूल विभागातील सेवानिवृत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 5 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक हे व्यक्ती अर्ज करू शकतील. 

अर्जदाराची अर्हता  

अर्ज करणाऱ्या सदर व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी. व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टसिंग ॲडव्होकेटस व चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा 5 वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा. (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलेला नसावा. सदर व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. जसे लातूर, धाराशीव, बीड व नांदेड जिल्ह्यातील. सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करू शकेल.

याबाबतची जाहीर सूचना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन लातूर सहकारी संस्थाचे  विभागीय सहाय्यक निबंधक, अधिन विभागीय सहनिबंधक अरुण शेंदारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 229

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

नांदेड, दि. 25 :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व जतन व संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावाअसेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

  वृत्त क्रमांक 228

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी

आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपर्यत सादर करावेत

नांदेडदि. 25 फेब्रुवारी :- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रति हेक्टर हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य कमाल हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येत आहे. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांनी आपले आधार संमती वसामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित कृषि सहाय्यकांकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषिअधिकारी/ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 


यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूससोयाबीन उत्पादक शेतकरीतसेच

ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिकपहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या सातबाराउताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे खातेदारखरीप 2023 कापूससोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व कापूस/सोयाबीनउत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत.

पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असलेबाबत खातरजमा www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडून करुन घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023  मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या सातबाराउताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहेअशा शेतकऱ्यांनीआपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा. खरीप 2023 कापूस / सोयाबीनउत्पादक वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसिल/ जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 227

आता उत्कृष्ट लोकसेवा देणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राचा होणार सन्मान  

नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवा केंद्रांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने घोषित केला आहे यासाठी सर्व सेवा केंद्रांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

 ग्रामपंचायत स्‍तरावरील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करण्‍यासाठी तसेच गावस्‍तरावरील नागरीकांना स्‍वतःच्‍या गावातच आवश्‍यक असलेली सर्व प्रमाणपत्रे व इतर सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात या हेतूने जिल्‍हयातील ग्रामपंचायत स्‍तरावरील आपले सरकार सेवा केंद्र स्थापन कर करण्यात आले आहे. या सर्व सेवा केंद्रा मध्ये उत्कृष्ट सेवा देण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

 २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीतील उत्कृष्ट कामाच्यावर आधारित स्‍पर्धा घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील आपले सेवा सरकार केंद्रानी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 

हा एक आगळा वेगळा उपक्रम मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या संकल्‍पनेतुन पुढे आलेला आहे.  २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत स्‍तरावरील आपले सरकार सेवा केंद्र हे आदर्श करण्‍यात येणार आहेत. या कालावधीत जे केंद्र सर्वात जास्‍त लोकसेवा नागरीकांना देईल व ग्रामपंचायत विभागाचे पत्र २४ फेब्रुवारी २०२५ मध्‍ये नमुद केलेल्‍याप्रमाणे सर्व सोई सुविधा आपले सरकार सेवा केंद्रात उपलब्‍ध करून देईल व ग्रामपंचायतीच्‍या उत्‍पन्‍नात वाढ करेल त्‍या आपले सरकार सेवा केंद्राच्‍या केंद्रचालक, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्‍य यांचा सत्‍कार ३ मार्च २०२५ रोजी कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह जिल्‍हा परिषद, नांदेड येथे करण्‍यात येणार आहे.  

महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी (पं.) मंजुषा जाधव (कापसे) यांच्‍या उपस्थितीत नुकतीच जिल्‍हास्‍तरावर ग्रामपंचायत अधिकारी, केंद्र चालक व विस्‍तार अधिकारी (पं.) यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत ग्राम विकास विभाग शासन निर्णय २८ जानेवारी २०२५ मध्‍ये दिलेल्‍या सुचनेनुसार ग्रामपंचायत स्‍तरावरील “आपले सरकार सेवा केंद्र”यांच्‍या मार्फत राज्‍य शासनाच्‍या ग्राम विकास विभागाच्‍या ७ सेवांसह इतर विविध प्रशासकीय विभागांनी अधिसूचीत केलेल्‍या ५३६ ऑनलाईन लोकसेवा नागरीकांना उपलब्‍ध करून देण्‍याबाबत मार्गदर्शन केले. 

 स्‍पर्धा कालावधीत करावयाची कामे  

आपले सरकार सेवा केंद्रासाठी स्‍वतंत्र कॅबीन असावे. आपले सरकार सेवा केंद्र स्‍वच्‍छ व रंगरंगोटी केलेले असावे.  ASSK केंद्रात किमान १०० mbps इंटरनेट सुविधा असावी. ASSK केंद्रात संगणक, प्रिंटर, स्‍कॅनर, वेब कॅमेरा, बायोमॅटरीक मशिन, लॅमिनेशन मशिन, तक्रार पेटी, केंद्राचा रबरी शिक्‍का, पीण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा, वेटींग हॉल किंवा रूम, अभिप्राय नोंदवही, इ. सुविधा उपलब्‍ध असाव्‍यात. ग्रामपंचायती मार्फत दिल्‍या जाणा-या सेवा व इतर विभागा मार्फत दिल्‍या जाना-या सेवा यांचे डिजीटल बोर्ड लावणे. महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियमाची माहिती देणारे डिजीटल / QR कोड असलेले बोर्ड लावण्‍यात यावेत. “या केंद्रावर विहित कालावधीत सेवा न मिळाल्‍यास मोफत ऑनलाईन अपील करण्‍याची सुविधा आहे”असा मजकुर असलेला सुचना फलक तयार करुन लावण्‍यात यावा. प्रथम अपिलीय प्राधिकारी व व्दितीय अपिलीय प्राधिकारी यांच्‍या नावाचे बोर्ड लावणे. ASSK केंद्रा मार्फत दिल्‍या जाना-या प्रमाणपत्रावर आयोगाचा “लोगो” व “आपली सेवा आमचे कर्तव्‍य” हे ब्रिदवाक्‍य छापलेले असावे. आपले सरकार सेवा केंद्रातील वातावरण प्रसन्‍न राहण्‍यासाठी Flower Pots ठेवलेले असावेत. आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामपंचायत स्‍तरावरील ७ सेवा व इतर विभागांच्‍या अधिसुचीत (५३६ सेवा) ऑनलाईन सेवा उपलब्‍ध करून देणे.  (नागरीकांना सर्वात जास्‍त सेवा उपलब्‍ध करून देवून जास्‍तीत जास्‍त महसुल जमा करणे) इ. 

प्रत्‍येक तालुक्‍यातुन चांगले काम करणाऱ्या एका आपले सरकार सेवा केंद्रास ३ मार्च २०२५ रोजी जिल्‍हा परिषद स्‍तरावर उपरोक्‍त नमुद मुद्याच्‍या अनुषंगाने सादरीकरण करण्‍याची संधी देण्‍यात येईल.  परिक्षकांनी निवड केलेल्‍या गावातील एका आपले सरकार सेवा केंद्रास जिल्‍हयातील उत्‍कृष्‍ट आपले सरकार सेवा केंद्र म्‍हणून गौरविण्‍यात येईल.

000000

वृत्त क्रमांक 226

२८ फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन 

 यशवंत महाविद्यालयात आयोजन  

नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- मिळेल ती नोकरी घेऊन सुरुवात करा. एक छोटीशी सुरुवात आपलं करिअर घडू शकते, या संदेशासह जिल्ह्यातील तमाम बेरोजगारांना कौशल्य विकास विभागाने शुक्रवारी होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी आमंत्रित केले आहे.

 नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10  वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक व इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10  वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000




वृत्त क्रमांक 225

आज महाशिवरात्री ! भगर सेवन करताना काळजी घ्या !! 

भगरीमुळे विषबाधेची शक्यता अधिक ; काळजी घेण्याचा इशारा 

नांदेड दि.२५ फेब्रुवारी : उद्या महाशिवरात्रीचा उपवास. घराघरात व भंडाऱ्यामध्ये भगरीचा महाप्रसाद केला जातो. मात्र भगरीमुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी सावध राहावे, भगरीचे सेवन टाळावे, काळजी घ्यावी, असा इशारा आरोग्य प्रशासनाने दिला आहे.

गेल्या वर्षी भगर खाल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली होती. दोन हजारावर लोकांना भगरीच्या विष बाधेने संकटात आणले होते. त्यामुळे उद्या महाशिवरात्रीला भगवान शंकराचे पूजन करताना उपवासासाठी अन्य पदार्थ वापरावे. भगर खाणे उपवासासाठी टाळावे,अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

 या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक आवाहन जनतेला केले आहे. गेल्यावर्षी लोहा व अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषबाध्येच्या घटना भगरी मुळे झाल्या होत्या.

भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्परलिस जातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे 

फ्युनिगाक्लेविन यासारखी विष द्रव्य (टॉक्सिन ) तयार होतात.ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्या, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

भगर खाणे टाळणे शक्य नसेल तर काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. सुटी भगर दुकानातून घेऊ नका, भगर घरी आणली असेल तर कोरड्या ठिकाणी झाकण बंद डब्यात ठेवा. वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो भगरीचे पीठ विकतच आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते.त्यामुळे या पिठाला बुरशीची लागन होते. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिन युक्त पदार्थ आहेत. दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ऍसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचन शक्तीनुसार मर्यादितच करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

विक्रेतांनाही कडक सूचना...

विक्रेत्यांनी पॅक बंद भगरचीच विक्री करावी भगर करीत खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी भगरीचे पॅकेट पोत्यावर उत्पादकांचा पत्ता परवाना क्रमांक पॅकिंग दिनांक अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्यावी मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये अशा पद्धतीची नियमबाह्य विक्री करणारे आढळल्यास त्यांच्यावर अन्नसुरक्षा का व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

00000

 विशेष लेख 

विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या !

१० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !!

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. काहींच्या परीक्षा मध्यात आल्या आहेत. दोन ते तीन पेपर होऊन गेलेले आहेत. मात्र कुठून तरी निराशा जनक बातम्या येत राहतात. अशावेळी विद्यार्थ्यांना सांगणे आहे की, विद्यार्थ्यांनो दहावी,बारावी इतर आयुष्याची सुरुवात आहे.या परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. या परीक्षेला कोणतीही निराशा, दुःख, नैराश्य न बाळगता पुढे जा... एखाद्या वर्षी एखादी परीक्षा देता आली नाही किंवा अपयश आले म्हणजे सर्वच संपत नाही जीवन हे सुरूच असते....

 अनेक वेळा काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे पेपर बरोबर जात नाहीत. किंवा अपेक्षित त्याला लिहिता येत नाही. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा पेपरही देता येत नाही. अशावेळी निराश होऊ नये. एखादी परीक्षा तुमच्या यशा अपयशाचे सूत्र ठरू शकत नाही... आज ज्यांना यशस्वी म्हणून तुम्ही बघता त्यांनाही कधी काळी दहावी बारावी मध्ये अपयश आले होते.... त्यामुळे या परीक्षेशिवाय मोठी लढाई आयुष्यात असून भयमुक्त व तणाव मुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाणे हेच महत्त्वपूर्ण आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी तणावाची असते, अनेक ठिकाणी पालकांसाठीही पालकांनी बनवलेली ही परिस्थिती असते. अनेक प्रश्न डोक्यात असतात – पेपर कठीण जाईल का? चांगले गुण मिळतील का? अपयश आल्यास काय करायचे? मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की अपयश हा शेवट नसतो, तर यशाकडे नेणारा एक टप्पा असतो.

आकाश शिंदेचे उदाहरण पुढे ठेवा

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुंटूर गावच्या आकाश शिंदेची कथा आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. बारावीच्या परीक्षेत तो तब्बल चार वेळा नापास झाला. त्याला अनेकांनी हिणवले, जवळच्याही मंडळीने त्याच्यावर टीका केली. मात्र, त्याने हार मानली नाही. अष्टपैलू मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर त्याने आठ वर्षे संघर्ष केला आणि अखेर MPSC परीक्षेत यश मिळवून महसूल सहाय्यक अधिकारी बनला.

आकाशची ही कहाणी स्पष्ट सांगते की, एक-दोन अपयशांनी आयुष्य थांबत नाही. अपयश आपल्याला अधिक परिपक्व आणि यशासाठी सज्ज करते. त्यामुळे एक-दोन पेपर कठीण गेल्याने निराश होण्याची गरज नाही. अपयश हे यशाचे पहिले पाऊल असते.

 अपयशातून शिकण्याचे धडे 

अपयश आले तर त्यावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकले पाहिजे. थॉमस एडिसन यांनी बल्ब शोधण्यासाठी हजारो वेळा अपयश अनुभवले. जेव्हा लोकांनी त्यांना विचारले, "तुम्ही हजार वेळा अपयशी झालात?" तेव्हा ते हसून म्हणाले,

"मी हजार वेळा अपयशी झालो नाही, तर मी हजार मार्ग शोधले जे चुकीचे होते."

त्याचप्रमाणे, बारावी किंवा दहावीच्या परीक्षेत अपयश आले तर त्याचा अर्थ तुमची क्षमता कमी आहे असे नाही, तर तुमची तयारी अजून सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे आई - वडील, नातेवाईकांनी, स्नेहींनी तुमच्या भल्यापोटी काही बोलले असेल तर ते मनाला लावून घेऊ नका. जितके इनपुट तुम्ही तयार केले आहे. तितके आऊटपुट दिले जाईल. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे या परीक्षा देताना आलेल्या आकस्मिक गोष्टींना मनाला न लावून घेता पुढे चालणे सुरू ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे संदेश

१. अपयशाने खचून जाऊ नका – अपयश म्हणजे पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे.

२. सकारात्मक मानसिकता ठेवा – "मी करू शकतो" हा विचार कायम ठेवा.

3. स्वतःच्या चुका ओळखा आणि सुधारणा करा – चुका ओळखून पुढच्या वेळी योग्य रणनीती आखा.

4. स्मार्ट स्टडी करा – पाठांतर न करता संकल्पनांची नीट समजूत करून अभ्यास करा.

5. निरोगी दिनक्रम ठेवा – योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक स्थिरता याला महत्त्व द्या.

6. योग्य मार्गदर्शन घ्या – शिक्षक, पालक आणि समुपदेशक यांच्याकडून मदत घ्या.

धैर्य आणि आत्मविश्वास महत्त्वाचा

"आयुष्यात न थांबणाऱ्या प्रवाहासारखे रहा. काहीही झाले तरी प्रवास सुरू ठेवा."

जेव्हा तुम्ही हार मानता, तेव्हा प्रत्यक्षात तुमच्या यशाच्या संधीही संपतात. पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात, तर तुमच्या यशाची शक्यता वाढत जाते.

 समुपदेशनाचा लाभ घ्या 

सध्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हाला एखादा पेपर कठीण गेला असेल, किंवा तुम्हाला नैराश्य वाटत असेल, तर घाबरून न जाता समुपदेशन केंद्रांशी संपर्क साधा. दरवर्षी परीक्षा येतात. संधी पुन्हा मिळते. त्यामुळे तणाव टाळा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

अंतिम विचार: यशाची गुरुकिल्ली 

"एक यशस्वी व्यक्ती आणि एक अपयशी व्यक्ती यांच्यात फक्त एकच फरक असतो – जो व्यक्ती अयशस्वी होतो, तो अपयश स्वीकारूनही जिद्द ठेऊन पुढे चालतो. आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो!त्यामुळे यशस्वी होतो". त्यामुळे प्रयत्न करणारा आज ना उद्या यशस्वी होणारच आहे.

आजचा पराभव उद्याच्या विजयासाठी आवश्यक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भयमुक्त होऊन परीक्षांना सामोरे जावे, अपयशाने खचून जाऊ नये आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी. यश तुमच्या हाती आहे – फक्त प्रयत्न सुरू ठेवा !

तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  लातूर विभागीय मंडळस्तरावर 10 वी साठी 02382-251633 तर  12 वीसाठी 02382-251733 हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. मनात कोणताही ताणतणाव आल्यास या क्रमांकावर आपल्याला दूरध्वनी करता येईल.

 १० वी साठी हेल्पलाईन क्रमांक 

या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव)  मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावी साठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.  

माध्यमिक (दहावी) साठी  मो.नं. 9420436482, 9405486455, 7620166354 हे भ्रमणध्वनी आहेत. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा. तर १२ वी साठी 9371261500, 9860912898,. 9860286857, 9767722071 असे मोबाईल नंबर असून त्याचा पालकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 

प्रवीण टाके,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 

०००००





  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...