Friday, June 6, 2025

 वृत्त क्रमांक 587 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा  

 

नांदेड दि. 6 जून :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकासशाळा अंतर्गत राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा जिल्हा अंमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) स्मार्ट प्रकल्पाच्यावतीने स्मार्ट प्रकल्पचे नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या राज्याबाहेरील दौऱ्या 31 मे रोजी श्री. शिरफुले यांनी हिरवा झेंडा दाखवुन दौऱ्यास मान्यता दिली. यावेळी समुदाय आधारीत संस्थेचे संचालक व प्रशिक्षणार्थी, इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

या अभ्यास दौरा हा कृषि विज्ञान केंद्र भरमपूर, IIPR (Under ICAR) Research Center Phanda, sihore भोपाळ मध्यप्रदेश, कृषि विज्ञान केंद्र उज्जैन मध्यप्रदेश राज्य येथे रवाना करण्यात आला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजुर उपप्रकल्प समुदाय आधारित संस्था बिलोली तालुक्यातील चंद्रगुप्त मौर्य फार्मर प्रो. कं. लि. गागलेगाव व शिवलिंग बादशाह फा. प्रो. कं. लि. डोणगाव (बु.) या कंपनी मधील प्रत्येकी 5 प्रशिक्षणार्थींना या अभ्यास दौऱ्यामध्ये पाठविण्यात आले. सदरचे प्रशिक्षणार्थी IIPR (Under ICAR) Research Center Phanda, sihore भोपाळ मध्यप्रदेश येथील हरभरा संशोधन केंद्र येथे भेट देवुन तेथील उपक्रम व प्रक्रिया केंद्र पाहून प्रशिक्षत होणार आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 586 

विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करून घ्यावी

 

·   शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

नांदेड दि. 6 जून :- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 साठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असल्याने सन 2024-25 मधील स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केलेल्या व अर्जात त्रुटी असल्याने Revert back केले आहेत. बराच प्रदीर्घ कालावधी होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी Revert back केलेले अर्ज अजून फेरसादर केली नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्वाधार अर्जातील त्रुटी पुर्तता करण्यासाठी मंगळवार 10 जून 2025 ही अंतीम मुदत देण्यात आली आहे.तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनेचा  लाभ घेवू इच्छिणाऱ्या गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून सन 2025-26 करिता नांदेड जिल्ह्यातील एकूण-16 वसतिगृहांकरिता बुधवार 11 जून2025 पासून अर्ज मागविण्यात आली आहेत.

 

सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह योजना राबविली जाते. सन 2024-25 मधील इयत्ता 7 वी, 10 वी 12 वीचे निकाल जाहिर झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता ऑनलाईन करून घ्यावी. 10 जून 2025 पर्यंत त्रुटी पुर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत विद्यार्थ्याची राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.

 

गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज URL:https://hmasscrutinyworkflow.mahait.org/ या पोर्टलवर ऑनलाईन भरावे व त्याची प्रींट आऊट घेवून सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जाडून अर्जाची एक प्रत संबंधित जिल्ह्याचे ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करावेत.

 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योगजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी देखील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचा अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रत सर्व कागदपत्रे सोबत जोडून संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज न भरल्यास त्यांना स्वाधार योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

 

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येते. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पध्दतीने शासकीय वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे  यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 585 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 6 जून :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 जून 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 584 

संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

 

·         जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी  

नांदेड दि. 6 जून :- संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख कॉम्पलेक्स नवीन मोंढा नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.  

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 14 मे 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे.  

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 9 संचालक निवडुन द्यावयाचे असुन त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 6, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून 1 आणि महिला राखीव मतदारसंघातून 2 संचालकाची निवड करावयाची आहे. 

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 9 जून 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 10 ते 15 जून 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 16 ते 19 जून 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. 19 जून 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

20 ते 24 जून 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 24 जून 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 1 जुलै 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी 1 जुलै 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. दिनांक 7 जुलै 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी 7 जुलै 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 13 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 13 जुलै 2025 रोजी मतदान संपल्यानंतर लगेच करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 16 जुलै 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. 

संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख, कॉम्पलेक्स् नविन मोंढा नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन संगम अर्बन मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख कॉम्पलेक्स् नविन मोंढा नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अधिक माहिती संस्थेचे देशमुख, कॉम्पलेक्स, नविन मोंढा, नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000 




 

 वृत्त क्रमांक 583 

शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम  

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न

 

·         नाविन्यता प्रदर्शन पंचपरीवर्तन व्याख्यानाचे आयोजन 

नांदेड दि. 6 जून :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झाले असल्याने आज 6 जून रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या सर्व ‘आयटीआय’ मध्ये सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 

राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन पंचपरीवर्तन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

नांदेड येथील या सोहळया प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संजय तुंगार उपस्थित होते.  अध्यक्षस्थानी आयएमसी सदस्य आयटीआय नांदेडचे हर्षदभाई शहा होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नागेश कल्याणकर व प्रा. प्रभाकर जाधव उपस्थित होते. आयएमसीचे सदस्य अभिजीत रेणापूरकर, रुणजी फाजगे, प्रेमानंद शिंदे, धीरज बिडवे, उपअभियंता काकडे, पदमजा मोटर्सचे शशिकांत वाडेवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इ.स. 1674 साली रायगड किल्ल्यावर संपन्न झाला त्यांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकास 350 वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यांचे प्रेरणादायी जीवन आजही समाजाला प्रेरणा देते. त्यांच्या हूशार निर्णयाने आणि कणखर नेतत्वावाने भारतातील महान राजांपैकी एक महान व्यक्तिमत्व बनवले ज्यांनी धैर्य प्रामाणिकपणा आणि देशभक्ती शिकवली. 

व्यक्तीच्या अधिकाराची जपवणूक करणे म्हणजे स्वराज्य ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी राबविली असे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संजय तुंगार यांनी नमूद केले. हरवलेला इतिहास, शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि आजचा समाज यावर अत्यंक मार्मिक शब्दात आपले विचार हर्षदभाई शहा यांनी  व्यक्त केले. समर्थ रामदास यांच्यासारखे थोर पुरुषांच्या उपदेशाची आज गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. 

आजचा युवक कोणाला आदर्श मानतो यावर राष्ट्राचे भविष्य अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माँ साहेबांनी महापुरूषांच्या कथा सांगत घडवले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकतरी गुण आजच्या युवकांनी अंगीकृत करावा. शिवजयंती स्वराज्याची शपथ म्हणून साजरी केली पाहिजे, असे संस्थेचे प्राचार्य  सचिन सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात नमूद केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. राका यांनी केले तर आभार  राष्ट्री सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी  केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

00000



 वृत्त क्रमांक 582 

आता फळपिक विमा योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य 

नांदेड दि. 6 जून:- प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन 2024-252025-26 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी सद्यस्थितीत सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) अनिवार्य असल्‍याचे परिपत्रक राज्‍याच्‍या कृषी विभागाने नुकतेच निर्गमीत केले आहे. 

11 एप्रिल, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आइडी यापूर्वीच  (15 एप्रिल 2025 पासून ) अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्‍यानंतर आता  पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) बंधनकारक करण्‍यात आला आहे. शेती आणि शेती विकासाच्‍या विविध योजनांचा लाभ आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.). असल्‍याशिवाय मिळणार नाही. त्‍यामुळे जिल्‍हयातील सर्व शेतक-यांनी जवळच्‍या सीएससी , आपले सरकार केंद्रावर जावून अॅग्रीस्‍टॅक योजनेंतर्गत नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) प्राप्‍त करुन घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

०००००

वृत्त क्रमांक 581 

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

नांदेड, दि. ६ जून :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 06 जून 2025 रोजी दुपारी 12:46 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 06, 0809 जून 2025 या तीन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000


 वृत्त क्रमांक 580 

जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात

 राज्य-जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेतील अर्जाचे रॅडमायजेशन 

नांदेड, 6 जून :- राज्य व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना सन 2025-26 अंतर्गत प्राप्त अर्जाचे रॅडमायजेशन प्रक्रिया शनिवार 7 जून 2025 रोजी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.  

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दुधाळगट, शेळीगट व एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा निवड समितीचे सदस्य सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक 579 

मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतिगृहात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 10 जून पासून सुरू  

नांदेड, 6 जून :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतिगृह तथागतनगर मालेगाव रोड नांदेड येथे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वसतिगृहात माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदवीत्तर या विद्यार्थ्याचे पुनर / नूतन प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आली आहेत. या वसतिगृहात प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख बुधवार 25 जून 2025 असून मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. 

या अर्जासोबत शेवटी दिलेल्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रक, सन 2024-25 या वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी अदा केलेले आसावे) व चालू वर्षात (2025-26 साठी ) प्रवेश घेतलेले बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, यांच्या सत्यप्रति संक्षांकित करुण प्रवेशा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली या कार्यालयात 10 ते 25 जून 2025 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील. तसेच याच कालावधीत संपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्वीकारले जातील. 

विद्यार्थी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतिगृह नियमित सुरु होईल. सदरील वसतिगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची संपूर्ण व्यवस्था विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याना गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो. मागवर्गीय विद्यार्थ्याना 20 टक्के जागा राखीव आहेत. चूक किंवा अपूर्ण माहितीचे आर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता न केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कृपया विद्यार्थ्यानी अथवा पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन येथील मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 578 

भविष्यातील शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच शक्य 

विकसित कृषि संकल्प अभियानाचा आठवा दिवस 

नांदेड, 6 जून :- विकसित कृषि संकल्प अभियानाच्या 5 जून रोजी आठव्या दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, कापूस लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असून, त्याद्वारे उत्पादनवाढ, मातीची गुणवत्ता सुधारणा आणि कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते. काल 5 जूनचे कार्यक्रम देगलूर तालुक्यातील येरगी, शिवणी, देवापुर व धर्माबाद तालुक्यातील बेलूर, करखेली, बाभुळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या गावांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान, अचूक सिंचन प्रणाली, संकरीत बियाणे आणि कीड व्यवस्थापनासाठी सटीक उपाय यासारख्या आधुनिक संकल्पनांवर सखोल चर्चा झाली. 

विशेषतः कापूस शेतीसाठी रोपसंपादन, स्मार्ट सिंचन पद्धती, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कापूस लागवडीसाठी संकरीत बियाणे, जलसंवर्धन तंत्रज्ञान आणि कीड नियंत्रणासाठी जैविक उपायांचा अवलंब केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढू शकते. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. 

या वेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे, शास्त्रज्ञ श्री. डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कपिल इंगळे, डॉ. प्रियंका खोले, श्री. वेंकट शिंदे यांची उपस्थिती लाभली. कृषी विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर श्री. विठ्ठल गीते, मंडळ कृषी अधिकारी धर्माबाद श्री. व्ही. बी. चंदापुरे आणि बीटीएम धर्माबाद श्री. एस. एस. गुंडावार यांनीही सहभाग घेतला.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. अभियानाचे आयोजक यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अधिक माहिती देण्यासाठी पुढील मार्गदर्शन सत्राचे निमंत्रण दिले आहे.

00000




मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना












हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे लोकार्पण - इगतपुरी ते आमणे 🗓️गुरुवार, दिनांक ५ जून २०२५, दु. १२.०० वाजता 📍समृद्धी महामार्ग, इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार संपन्न



 

 ‘समृद्धी महामार्ग’ वाढवण बंदराशी जोडणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण 

नाशिक, दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

 समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटरवर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटनस्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदूषणास आळा बसणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल,  त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या महामार्गावर वाहन चालकांनी वेग मर्यादेचे व वाहतूक निमयांचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

अन्य प्रकल्पांनाही गती

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

0000







 वृत्त क्रमांक 577 

शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी : पालकमंत्री अतुल सावे 

शिवस्वराज्य दिन जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा 

नांदेड, 6 जून :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिन हे नव्या पिढीला प्रेरणा व नवचैतन्य देणारे स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात सांगितले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली, शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सुशासनाचा आदर्श आजही प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी दिशादर्शक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श घेत जिल्हा परिषद ग्रामीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. 

या प्रसंगी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्रांगणात उभारलेल्या दोन गाळ्यांची चावी तिरंगा महिला प्रभाग संघाकडे सुपूर्द करण्यात आली. या गाळ्यांमध्ये महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून दुसऱ्या गाळ्यात कॅन्टीन चालवले जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने खिचडी, मसाला दूध व जिलेबीचे वाटप करण्यात आले. शाहीर रमेश गिरी व त्यांच्या संचाने शिवचरित्रावर आधारित पोवाडा व गीत सादर करून वातावरण शिवमय केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी केले. 

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000









  वृत्त     नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी 1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा   नांदेड, दि. 18 :   नोंदणी व मुद्रांक विभा...