Tuesday, July 21, 2026

 शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत नव्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ.

बळीराजाला दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ₹३६,५८५ कोटींची कर्जमाफी; ५६ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना लाभ. प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांना निर्देश व पारदर्शकतेसाठी विशेष नोडल यंत्रणा कार्यरत.

 शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ₹३६,५८५ कोटींचा दिलासा. अंमलबजावणीसाठी बँकांना युद्धपातळीवर कामाच्या सूचना व पारदर्शकतेसाठी विशेष समन्वय यंत्रणा कार्यरत.

शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; ₹३६,५८५ कोटींची कर्जमाफी. अंमलबजावणीसाठी बँकांना युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना व पारदर्शकतेसाठी विशेष यंत्रणा कार्यरत.

 #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मा. श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) G.Sreekanth, IAS यांनी भारत निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेत सक्रिय सहभाग घेत नागरिकांना #मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक #मतदारयादी तयार करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या परिसरातील BLO यांच्या माध्यमातून आवश्यक #माहिती अद्ययावत करावी.
सक्षम, पारदर्शक आणि बळकट लोकशाहीसाठी प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
चला, अचूक मतदार यादीसाठी आपला सहभाग नोंदवू या – #विभागीय #आयुक्त कार्यालय, #छत्रपतीसंभाजीनगर विभाग

 वृत्त क्रमांक 

22 ते 28 जुलै दरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात महाआरोग्य शिबिर 

रक्तदानासह विविध मोफत आरोग्य तपासणी ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 21 जुलै :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त राज्यव्यापी रक्तदान व महाआरोग्य शिबिर अभियान 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत  आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मुंबईचे आयुक्त व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी ) येथे पुढील प्रमाणे विविध आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.

 

रक्तदान शिबिर 22 ते 28 जुलै कालावधीत रक्तपेढी (Blood Bank) येथे तर स्तन कर्करोग तपासणी शिबिर 22 ते 24 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-123 येथे, गर्भाशयमुख (Cervical) कर्करोग तपासणी शिबिर 25 ते 27 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-118. बोन मिनरल डेन्सिटी (BMD) व हाडांची तपासणी शिबिर 22 ते 24 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-115. नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 22 ते 24 जुलै कालावधीत ओ.पी.डी.क्र.-121 येथे आयोजित करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध आरोग्यसेवा व तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून होणार सुरुवात

आयव्हीबीपी संस्थेकडून १ कोटी लसींचे वितरण  

नांदेड, दि. 21 जुलै : लाळखुरकूत या घातक विषाणूजन्य रोगापासून राज्यातील पशूधनाचे रक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे 'लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९' चे आयोजन करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहीम येत्या १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभरात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रा  पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये शीत साखळी ठेवून सुरक्षितपणे वितरण करण्यात येत आहेत.

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभरात वेळेत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांपर्यंत लस साठा पोहोचणे आवश्यक आहे. उपलब्ध झालेला १ कोटी लसींचा पुरवठा राज्यातील सर्व जिल्ह्यांना शीत साखळीची खबरदारी घेऊन वितरित (वाटप) करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या लस वाटप प्रक्रियेचा सविस्तर जिल्हावार अहवाल मुख्य कार्यालयास तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे राज्यातील कोट्यवधी पशूधनाला लाळखुरकत रोगापासून संरक्षण मिळणार असून, पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

परिणामकारक लसीकरण् होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाचे जंतनिर्मुलन करण्यात येत असून, आवश्यक औषधींचा पुरवठा सर्व संस्थांना करण्यात आला आहे. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत पशुधनाला एफएमडी लसीकरण करून त्याची नोंद NDLM वर घेतल्यास प्रती पशुधन रु. ५/- प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

"राज्यातील पशुधन रोगांपासून सुरक्षित ठेवणे व पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळणे यासाठी 'लाळखुरकत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९' अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ ऑगस्टपासून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाईल. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे १००% लसीकरण करून घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा."-  डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य

पशुवैद्यकीय सेवांसाठी कॉल करा  १९६२,      

व्हॉट्स अप चॅटबॉट सेवेसाठी ९०६३१४२२९९

000000



वृत्त क्रमांक 

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – 

तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांचे आवाहन

नांदेड दि. 21 जुलै :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता वगळता कोणतेही अतिरिक्त शुल्क ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना देऊ नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे.

पीक विमा अर्ज भरण्याची सुविधा ग्राहक सेवा केंद्रामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून प्रत्येक अर्जामागे सुमारे 100 रुपये नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या सुविधेसाठी अतिरिक्त रक्कम आकारणे अयोग्य असून, शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही मागणीस बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पीक विमा अर्ज भरण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य आहे.

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागात समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाने पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, त्याचा परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम दिवसाची प्रतीक्षा न करता तातडीने पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

पशुपालकांसाठी जंतनाशक, वंध्यत्व निवारण शिबिरे व तांत्रिक मार्गदर्शन चर्चासत्रांचे वेळापत्रक जाहीर

नांदेड, दि. 21 जुलै : महान समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीला २०२७ मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार वर्ष २०२७ हे 'महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष' म्हणून साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभरात विविध शेतकरी-हितोपयोगी उपक्रम राबवले जाणार असून, याबाबतचे सविस्तर वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागातर्फे या उपक्रमातंर्गत जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांचे आयोजन केले जाईल. जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान गायी व म्हशींमधील वंध्यत्व निवारणासाठी विशेष तपासणी व उपचार शिबिरे घेतली जातील. मार्च २०२७ ते एप्रिल २०२७ या काळात पशुसंवर्धनविषयक आधुनिक तांत्रिक माहिती व मार्गदर्शनासाठी चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल.

उपक्रमांचे वैशिष्ट्ये व महत्व:

* जंतनिर्मूलन मोहीम: जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे वजन घटणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे व विविध आजारांमुळे पशुधन मृत्युमुखी पडण्याचा धोका असतो. यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांतील औषधांचा वापर करून प्रत्येक गावात जंतनाशक शिबिरांद्वारे नियमित जंतनिर्मूलन केले जाणार आहे.

* वंध्यत्व निवारण शिबिरे: दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी जनावरांचे नियमित वेत होणे आवश्यक असते. जनावरांमध्ये वंध्यत्व आल्यास प्रतिवर्षी वेत न मिळाल्याने संगोपनाचा खर्च वाढून पशुपालक तोट्यात जातात. यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन करून गायी व म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार केले जातील.

* तांत्रिक चर्चासत्रे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन: पशुपालकांना आधुनिक पशुसंवर्धनाची माहिती मिळावी यासाठी कृषी विज्ञान केंद्र आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना निमंत्रित करून प्रत्येक गावात तांत्रिक चर्चासत्रे आयोजित केली जातील.

पशुवैद्यकीय सेवांसाठी कॉल करा  १९६२,     

व्हॉट्स अप चॅटबॉट सेवेसाठी ९०६३१४२२९९.

पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरवण्यात आलेल्या औषधांमधून हे उपक्रम राबवले जाणार असून, सर्व प्रादेशिक कार्यालयांना या उपक्रमांचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. या उपक्रमांमुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून पशुधनाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.

"महान समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभरात विशेष उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे, जनावरांचे आरोग्य सुधारणे व दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जंतनिर्मूलन, वंध्यत्व निवारण व तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावातील पशुधनापर्यंत पोहोचण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. राज्यातील सर्व पशुपालकांनी या शिबिरांचा व उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मी करतो."- डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य.

000000




  शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत नव्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्ती...