पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
#शेतकरीकर्जमुक्ती
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेकरीकर्जमाफीयोजना
#mahadgipr
शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने अधिकृत पोर्टल उपलब्ध !
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का
विशेष वृत्त क्रमांक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध
आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन,
लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार
नांदेड दि. २५:- राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी दिली आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची व अग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही श्री. हिरे यांनी केले आहे.
या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा’ किंवा CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक व बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करून अंगठ्याचे प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, आधार संलग्नीकरण आणि प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची महत्त्वाची अट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातही ही प्रक्रिया अजून सुरु असून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, असेही श्री. हिरे यांनी स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय कर्जमुक्ती लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे
नांदेड तालुका, ८४ गावे , ६५८२ शेतकरी,
अर्धापूर तालुका, ५२ गावे, २४७९ शेतकरी,
मुदखेड तालुका , ५५ गावे, ३९२५ शेतकरी,
हदगाव तालुका , १५२ गावे, ६८३९ शेतकरी,
किनवट तालुका , १८१ गावे, ९०५९ शेतकरी,
माहूर तालुका, ८८ गावे, २४८१ शेतकरी,
हिमायतनगर तालुका, ७१ गावे, ३९१९ शेतकरी,
भोकर तालुका, ८२ गावे, ५९९७ शेतकरी,
उमरी तालुका, ६६ गावे, ४२६० शेतकरी,
धर्माबाद तालुका, ५६ गावे, ४१२६ शेतकरी,
बिलोली तालुका, ९० गावे, ६१७० शेतकरी,
नायगाव तालुका, ९१ गावे, ७२७५ शेतकरी,
देगलूर तालुका, ११० गावे, ८५१२ शेतकरी,
मुखेड तालुका, १५१ गावे, ७८८६ शेतकरी,
कंधार तालुका, ११८ गावे, ७३५४ शेतकरी,
लोहा तालुका, १३५ गावे, १००५६ शेतकरी,
असे जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १५८२ गावातील एकूण ९६,९२० शेतकऱ्यांची यादी शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
00000
वृत्त क्रमांक
27 जुलै रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 27 व्या कारगिल विजय दिवसाचे आयोजन
नांदेड दि. २५ जुलै :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २७ वा कारगिल विजय दिवस दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक, शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
शहीद सैनिकाच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे २७ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. समाजातील नागरिकांमध्ये तसेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांमध्ये कर्तव्य भावना व सैनिकांबद्दल अभिमान दीर्घकाळ जिवंत राहावा व आपल्या कर्तव्याची जाणीव समाजातील जनतेत सतत निर्माण व्हावी व देशभक्तीची ज्वलंत उर्जा कायम राहावी म्हणून संपूर्ण देशात दरवर्षी २६ जुलैला कारगिल विजय दिवस कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात येतो.
00000
वृत्त
क्रमांक
नांदेड जिल्ह्यात 122 रास्तभाव दुकानांच्या परवान्यांसाठी अर्ज भरण्यास 12 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत
नांदेड, दि. २५ जुलै : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या व पर्यायी व्यवस्थेत असलेल्या 122 रास्तभाव दुकानांच्या जागांवर नवीन परवान्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवार 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच प्राप्त अर्जांवर आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठीही मुदत शुक्रवार 31 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
शासन निर्णय 6 जुलै 2017 व 2 फेब्रुवारी 2022 मधील तरतुदींनुसार विविध कारणांमुळे (परवाना रद्द होणे, राजीनामा, मृत्यू, वैद्यकीय रजा आदी) रिक्त झालेल्या आणि सध्या पर्यायी व्यवस्थेत सुरू असलेल्या 122 रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता राहावी व सर्व पात्र संस्थांना पुरेशी संधी मिळावी या कारणास्तव अर्ज करण्याकरिता पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राहावी आणि सर्व पात्र संस्थांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच सदर जाहिरातीबाबत प्राप्त अर्जांवर आक्षेप किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक पात्र स्थानिक संस्थांनी, ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला बचत गट आदींनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून मुदतवाढीच्या कालावधीत अर्ज किंवा आक्षेप सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेकरीकर्जमाफीयोजना #mahadgipr