विशेष वृत्त क्रमांक
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या
हस्ते संपन्न
पीक नुकसानीची शासन दखल घेणार, शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही : पालकमंत्री अतुल सावे
·
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिलात सवलत
·
‘सेवा संकल्प अभियान’
अंतर्गत विविध उपक्रम
·
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण
·
रोजगार महाकुंभमध्ये युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
·
सीताखंडी घाटातील अपघाताबद्दल शोक व्यक्त
नांदेड (जिमाका), दि. 17 सप्टेंबर : जिल्ह्यात यंदा अल
निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या
परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात
येईल. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी बांधवांसाठी आवश्यक
उपाययोजना करण्याची शासनाच्यावतीने ग्वाही देतो, असे प्रतिपादन
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री
अतुल सावे यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त माता
गुजरीजी विसावा उद्यान येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय
ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी
पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या स्मृतिस्तंभास
पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने
धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. पालकमंत्र्यांनी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्यसभेचे सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार
डोईफोडे,
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, निवासी
उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, नागरिक व पत्रकार आदी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने जाहीर
केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची नांदेड
जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ४८७
शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदविण्यात आली असून, त्यापैकी ६४ हजार २७९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत ४८८ कोटी १९ लाख
रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र शेतकरी लाभापासून वंचित
राहू नयेत,
यासाठी कृषी क्षेत्रातील ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार
प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. कर्जमाफीचा लाभ
मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीचे ना-देय प्रमाणपत्र देण्यात येत असून, बँकांनी त्यांना तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच वीजबिलात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
शासनाने घेतला आहे. कर्जाचा भार कमी करणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वीज खर्चात
दिलासा देणे, हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे
आहे. या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे अभिनंदन करून नांदेड जिल्ह्यातील
शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्र्यांनी आभार मानले.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले
आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन योग्य ती कार्यवाही करणार
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ९६६ कोटी
रुपयांचे,
तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या
हप्त्यापोटी ७६ कोटी ५३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना
आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
शेतकरी,
सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासाला शासनाने विशेष प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्य शासनामार्फत
‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेवा सेतू शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे, इनोव्हेशन चॅलेंज, विकसित भारत संकल्प यात्रा, नमो सेवागाथा, जल-जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ आदी उपक्रम
राबविण्यात येणार आहेत.
“युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती” या संकल्पनेतून युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून
देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ
महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत एकाच
दिवशी राज्यभरात ५०० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून, नांदेड जिल्ह्यात २२ ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील
युवकांनी या रोजगार मेळाव्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची
क्षमता १०० खाटांवरून ५०० खाटांपर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच कंधार, बिलोली आणि हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये
श्रेणीवर्धन करण्यात येत असून, जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही नवीन
आरोग्य सुविधांची उभारणी सुरू आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ३७
अत्याधुनिक डायलिसिस यंत्रे, तीन सीटी स्कॅन यंत्रे, एमआरआय सेवा आणि सोनोग्राफी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री
वैद्यकीय सहायता निधी गरजू व पात्र रुग्णांसाठी आधार ठरत असून, जिल्ह्यातील १ हजार ९७४ रुग्णांना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात
आली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून नांदेड
जिल्ह्यातील २ हजार ६३१ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी बँकांमार्फत २०६ कोटी ३० लाख
रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांना सुमारे २२ कोटी ८४ लाख
रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ५१६
विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी मुखेड व
कंधार तालुक्यात संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत.
तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून झालेल्या
प्रकरणांतील २० मृत व्यक्तींच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रस्ते आणि शासकीय इमारतींची विविध विकासकामे वेगाने सुरू असून, ती पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२
अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५३२ गावांपैकी १ हजार ४५४ गावे हागणदारीमुक्त अधिक
(ओडीएफ प्लस) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच १ हजार ३६९ गावांमध्ये सांडपाणी
निचरा आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास
योजना टप्पा-२, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदी योजनांतर्गत
पात्र लाभार्थ्यांना निर्धारित उद्दिष्टानुसार लाभ देण्यात येत असल्याचे
पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात झालेल्या भीषण अपघातातील
जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या
कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून त्यांनी जखमींची प्रकृती लवकर
सुधारावी अशी प्रार्थना केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना
करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, दिवंगत माजी आमदार गंगाराम
ठक्करवाड,
दिवंगत माजी आमदार प्रदीप (नाईक) जाधव यांच्या शोक
प्रस्तावाचा कार्यवृत्तांत व स्मृतीपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते
त्यांच्या नातेवाईकांना प्रदान करण्यात आले. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या
लाभार्थ्यांना बॅंक कर्ज मंजुरीचे पत्र पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते
वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन रवींद्र पंडागळे व
श्रीमती अंजली नातू यांनी केले.
00000