Monday, August 31, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार यादीसोबत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदार यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत https://nanded.nic.in या संकेतस्थळावर⁠ प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची तारीख 31 ऑगस्ट 2026 असून, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 असा आहे. दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी यादीतील नाव तपासावे

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. मतदारांना आपले नाव भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर⁠ किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://voters.eci.gov.in  किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर⁠ ऑनलाइन तपासता येईल. तसेच संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसील कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही मतदार यादीची पाहणी करता येईल.

नवमतदारांसाठी विशेष संधी

ज्या नागरिकांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण होत आहे, ते नवमतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. पात्र नागरिकांनी नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

मतदारांसाठी विविध नमुना अर्जांची तरतूद करण्यात आली आहे. नमुना 6 नवीन मतदार नोंदणीसाठी, नमुना 6A परदेशस्थित भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी, नमुना 7 मतदार यादीतील नावाला हरकत घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी, तर नमुना 8 नाव, वय, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती, अपंगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदाराचे नाव स्थलांतरित करण्यासाठी वापरता येईल.

नोटीस प्राप्त मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहावे

मतदार यादीतील नाव, वय, इतर तपशीलातील विसंगती किंवा अनमॅपिंगच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीस उपस्थित राहताना जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.

1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे आवश्यक कागदपत्र सादर करावे. 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील किंवा आई यांची जन्मतारीख आणि जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 2 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील व आई यांची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करणे आवश्यक आहे. भारताबाहेर जन्म झाल्यास विदेशस्थित भारतीय दूतावास किंवा मिशनने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत, तर नोंदणीकरण अथवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.

मान्य कागदपत्रांमध्ये विविध पुराव्यांचा समावेश

जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी सूचक व सर्वसमावेशक नसलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये केंद्र व राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांना दिलेले ओळखपत्र अथवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश, शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, बँका, टपाल विभाग, एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांनी भारतात निर्गमित केलेले दिनांक 1 जुलै 1987 पूर्वीचे ओळखपत्र अथवा दस्तऐवज, सक्षम प्राधिकरणाचे जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मान्यताप्राप्त मंडळ अथवा विद्यापीठाचे मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र, लागू ठिकाणी राष्ट्रीय नागरिक नोंदवही, शासकीय अधिकाऱ्यांनी जतन केलेली कौटुंबिक नोंदवही तसेच शासनाकडून निर्गमित जमीन/घर वाटप प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे.

आधारबाबत भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 23/2025-ERS/Vol. II दिनांक 9 सप्टेंबर 2025 (परिशिष्ट-II) अन्वये निर्गमित निर्देश लागू राहतील.

पात्र नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा

“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुण नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील व परिसरातील सर्व पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. नजरचुकीने एखादा पात्र मतदार वगळला गेला असल्यास नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. कोणतीही त्रुटी अथवा नाव वगळले असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी संबंधित बीएलओ किंवा पोर्टलवर दावे व हरकती नोंदवाव्यात.”

मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

****



वृत्त क्रमांक 

भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्रांचे विशेष शिबिर

हस्सापूर येथील आश्रमशाळेत भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

नांदेड(जिमाका), दि.31 : भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हस्सापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 31 ऑगस्ट हा भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड उपस्थित होते.

याप्रसंगी प्राध्यापक, लेखक व कवी अशोक कुबडे यांनी भटके-विमुक्त जमातीचा इतिहास, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक प्रगती तसेच विद्यार्थ्यांसमोरील विविध संधी व आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह आवश्यक विविध शासकीय प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे चालक गणेश मॅकल यांच्या माध्यमातून आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रे काढताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होऊन शासकीय प्रक्रियेत सुलभता निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. एल. गायकवाड तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. कदम यांचे सहकार्य लाभले. श्रीमती एस. एस. शेळके यांनी स्वागतगीत सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. आर. कळसे यांनी केले.

या विशेष शिबिरामुळे भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासाला या उपक्रमाचा निश्चितच लाभ होणार आहे.

***





 वृत्त क्रमांक 

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्यासह ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग

नांदेड(जिमाका), दि. ३१ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय क्रीडायोगदानाची स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळ व क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन नांदेड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन तसेच विविध एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “मैदान आपली वाट पाहत आहे. तुमची मेहनत आणि जिद्द दाखवा. जिंकलात तर विनम्र राहा आणि हरलात तर अधिक शिकून पुन्हा मैदानावर उतरा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच कुटुंबीय व मित्रांना दररोज एक तास खेळ आणि फिटनेस उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नांदेड कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, उपाध्यक्ष विनोद गोस्वामी, सचिव रवी बकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, चंद्रकांत पुलकंटवार, विजय गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाठ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, एकनाथ पाटील अकॅडमीचे प्रतिनिधी व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्याने सामुदायिक रॅली
राष्ट्रीय क्रीडा दिन सप्ताहाच्या अनुषंगाने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक तसेच एकनाथ पाटील अकॅडमीचे खेळाडू आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी अशा सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या घोषवाक्याने रॅली उत्साहात संपन्न झाली.

संपूर्ण कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमप्रमुख क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, संजय चव्हाण, हनमंत नरवाडे, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. 
**




वृत्त  आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची ...