Tuesday, April 28, 2026

वृत्त क्रमांक 

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मंत्री अतुल सावे 

नांदेड दि. 28 एप्रिल महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्यावतीने लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील लाभार्थींसाठी कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे दि.30 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे, तरी या मेळाव्यात लाभार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने लातुर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील लाभार्थ्याकरीता श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर, नांदेड या सभागृहात दि.30 एप्रिल 2026 रोजी  सकाळी 10.00 वाजता “कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या योजनेतील पात्र, निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण करण्यात येणार आहे. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी, लाभार्थींना तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी केले आहे.

अधिक माहितीस्तव संपर्क –

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय यांचे संकेतस्थळ :- obcbahujankalyan.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,

प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,

चेंबूर, मुंबई – 400 071 

संकेतस्थळ :- www.msobcfdc.org

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,

पहिला मजला, जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर,

गुलमोहर क्रॉस रोड न.09,

जे.व्ही.पी.डी., विलेपार्ले (पश्चिम), मुंबई 400 049 

संकेतस्थळ :-  www.vnvjntdc.org

000000

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई  

ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 28 एप्रिल :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिक चे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

वृत्त क्रमांक  ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -  मंत्री अतुल सावे  नांद...