Wednesday, February 19, 2025

प्रति,

मा. संपादक/आवृत्ती प्रमुख/विशेष प्रतिनिधी/

जिल्हा प्रतिनिधी/इलेक्ट्रॉनिक मिडीया,

नांदेड

मा. महोदय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांची ही निमंत्रण पत्रिका आपल्याला अगत्यपूर्ण संदर्भासाठी पाठवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यासाठी व छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ही बाब अतिशय गौरवाची असून या संपूर्ण कार्यक्रमाचे कव्हरेज करण्याची विनंती आपणास करण्यात येत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्यामुळे राज्यभर स्पर्धे संदर्भातील माहिती प्रसारित होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती 🙏🏻










लक्षवेध

प्रति,

मा. संपादक/आवृत्ती प्रमुख/विशेष प्रतिनिधी/

जिल्हा प्रतिनिधी/इलेक्ट्रॉनिक मिडीया,

नांदेड 


पत्रकार परिषदेचे निमंत्रण

राज्याच्या महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन दि. २१,२२ व २३ फेब्रुवारीला नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत होत आहे. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून या संदर्भातील माहिती देण्यासाठी उद्या ११ वाजता श्री. गुरु गोविंद सिंह जी क्रीडा संकुलामध्ये ( क्रिकेट मैदानावर उभारलेल्या स्टेजवर ) कार्यक्रम स्थळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यावेळेस पत्रकारांशी संवाद साधतील. कृपया आपण किंवा आपल्या प्रतिनिधीने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

स्थळ : श्री. गुरु गोविंद सिंह जी क्रीडा संकुल
वेळ : सकाळी ११ वाजता दि. २० फेबुवारी २o२५

वृत्त क्रमांक 200

 नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धाची जय्यत तयारी 

 मैदानी खेळासाठी मैदाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर 

 नांदेड जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांचा होणार गौरव 

नांदेड, दि. 19 फेब्रुवारी :- नांदेड येथे 21,22 व 23 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने नांदेड येथे छत्रपती संभाजी नगर, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, नोंदणी व मुद्रांक विभाग, भूमि अभिलेख विभाग या विभागातील जवळपास अडीच ते ३ हजार अधिकारी व कर्मचारी खेळाडू नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.

 राज्यातील सर्व, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय महसूली क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, फुटबॉल, बॅडमिटन, कॅरम, टेबल टेनिस, बुध्दीबळ, कबडी, खो-खो, किक्रेट इत्यादी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. यात मैदानी खेळ पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत. मैदानी खेळासाठी मैदाने सुरळीत  करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असून संबंधित अधिकारी कर्मचारी त्यासंबंधी पाहणी करीत आहेत. तसेच जी मैदान खेळासाठी तयार आहेत अशा मैदानावर खेळांचे सराव सुरु आहेत.

नांदेड शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथील मैदानावर क्रिकेट तर स्टेडियमच्या बाजूला असलेले इंदिरा गांधी मैदानावर कबडी, खो-खो आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये महिला व पुरुषांचे बॅडमिंटन, कॅरम, टेबलटेनिस, बुध्दीबळ इत्यादी खेळ होणार आहेत. पिपल्स कॉलेजच्या मैदानावर फुटबॉल तर सायन्स कॉलेजच्या मैदानावर व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, महिलांचे रिंग टेनिस हे खेळ होणार आहेत. हे खेळ सकाळ, दुपार, सत्रात होणार आहेत. नांदेड येथे इतर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांचे आगमन सुरु असून त्यांच्या खानपानाची व निवासाची सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यासाठी विविध समित्यांची नियुक्त करण्यात आली आहे.

 तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांचा होणार गौरव 

नांदेड येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या यापूर्वीच्या जिल्हाधिकांऱ्यांचा अविरत महसूल सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. यात डॉ. श्रीकर परदेशी, तानाजी सत्रे, सुरेश काकाणी, राधेश्याम मोपलवार, धीरज कुमार, अरुण डोंगरे, डॉ. विपीन इटनकर, अभिजीत राऊत यांचा अविरत महसूल विशेष योगदान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विभागाचे विभागीय आयुक्त या तीन दिवशीय स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.

000000







 विशेष लेख /

 बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी 

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे.या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

 बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान 

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, "दर बारा कोसांवर भाषा बदलते," हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी मराठीला अधिक व्यापक आणि जिवंत बनवले आहे. या बोलीभाषा मधील काही शब्दांना अर्थ आहे. हजारो उखाणे या बोली भाषांमध्ये आहे. शेकडो वाक्प्रचार या भाषेत आढळतात, विविध शब्दांसाठी एक शब्द म्हणून आशयघनता असणारे अनेक शब्द बोली भाषेत आहे. प्रेम, राग, व्देष, आनंद व्यक्त करणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द या बोलीभाषांचे महत्व सांगते.

 वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य 

वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.

 वऱ्हाडी भाषेचे महत्त्व

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलिकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे. कर्मयोगी गाडगेबाबांचे प्रवचनदेखील अस्सल वऱ्हाडी भाषेत असायचे. पुरुषोत्तम बोरकर यांची मेड इन इंडिया, उद्धव शेळके यांची धग कादंबरी त्यातील वऱ्हाडी भाषा यांनी अनेक पिढ्यांना वेड लावले आहे. अनेक अशा अशा कादंबऱ्या, कथा मान्यवर लेखकांनी मराठी वाचकांना दिल्या आहेत.

वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान 

वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. अनेक लेखक आणि साहित्यिकांनी वऱ्हाडी भाषेत उत्कृष्ट लेखन केले आहे. वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल,कॉमेडी शो आणि चित्रपटात या बोली भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हिंदी भाषेनंतर हास्य कवी संमेलनाची संस्कृती वऱ्हाडी भाषेने सर्वाधिक जोपासली आहे. माध्यमांमुळे या बोलीभाषा आता आपल्या सीमा भेदून सार्वत्रिक होत आहे.

प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग,शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर,शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कवीश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे,सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे,आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.

वऱ्हाडी भाषेतील नाटक आणि गझलसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत गझल लेखन केले, पण खासगी संभाषणात ते अस्सल वऱ्हाडीच वापरत. वऱ्हाडी भाषेतील सहज संवाद साधण्याची शैली, विनोदी प्रकृती, आणि लयदार उच्चार हा एक वेगळाच अनुभव देतात.

 विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या सीमावरती भागात, तसेच मध्य प्रदेशातील तेलंगाना व आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वऱ्हाडी भाषा बोलली जाते. अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने तर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये थोडा बदल होऊन भाषा बोलली जाते. नागपूर शहरातील बोलली जाणारी भाषा ही देखील एक वेगळी वऱ्हाडी शैली आहे. नागपूर मेट्रोने तर खास नागपुरी शब्दांच्या जाहिराती केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या त्या भागातील नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर या शब्दांचा भरपूर वापर करतात. भाषिक जवळीकता साधण्यासाठी हे शब्द ओळखीचे काम करते. पुढे हीच भाषा भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये वेगळा हेल घेते. तिचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जाते. मात्र हजारोंनी या भाषेचे संवर्धन केले आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा विचार करताना मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, त्यांचे संवर्धन आणि त्याचा अभ्यास करण्याचे व्यासपीठ अशी मोठी संमेलन असतात. दिल्लीच्या व्यासपीठावर अभिजात भाषेचा गुणगौरव होताना बोलीभाषेच्या सुप्त प्रवाहावरही चर्चा करावी लागणार आहे. बोलीचे वैभव,भाषेची संपन्नता वाढवणारे आहे. 

 मराठीची अस्मिता आणि बोलीभाषांचे स्थान 

पु. ल. देशपांडे यांना वऱ्हाडी भाषेच्या विनोदी बाजाचे फार आकर्षण होते. सुरेश भट लतादीदी ,आशा भोसले आणि मंगेशकर घराण्यातील व्यक्तीशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधायचे. त्यांच्या वऱ्हाडी संवादाचे मैफिलीमध्ये खास आकर्षण असायचे. खरे तर भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती तिच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग असते. उर्दूची अदब, गुजरातीची गोडी, आणि वऱ्हाडीची मिश्किलता, विनोदी शैली हे वैशीष्टय आहे.

म्हणूनच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना जपणे हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात बोलीभाषांनी जो भाषिक गोतावळा तयार केला आहे, त्याने मराठीला अधिक समृद्ध केले आहे. मराठीने आपल्या अंगाखांद्यावर या उपभाषांना वाढवले, संगोपन केले आणि त्यांना भाषिक अस्मिता बहाल केली.

आजच्या काळातही बोलीभाषांचे संवर्धन हे मराठीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. आई जी भाषा बोलते तीच मुलाची भाषा होते आणि तीच त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

मराठी भाषा ही केवळ एक संवादमाध्यम नसून एक संस्कृती आहे. बोलीभाषा ही तिच्या समृद्धीचा गाभा आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी यासारख्या अनेक उपभाषांनी मराठीच्या प्रवाहाला अधिक खोल आणि विस्तारलेले स्वरूप दिले आहे.

आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ बोलीभाषांच्या आधाराने अधिकाधिक समृद्ध होत राहील. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मायमराठीच्या या उपभाषांच्या संवर्धनासंदर्भातही वैचारिक मंथन अपेक्षित आहे.मराठी भाषा ही समुद्र आहेत तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नदयांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये. थोडक्यात वऱ्हाडी शब्दांचा वापर करून सांगायचे झाल्यास असा 'बैताडपणा, छपरीपणा, इचकपणा, नंबरीपणा, उपटपणा, घरावर गोटे आणण्याचे धंदे अन् ' जांगडबुत्ता ' मराठी भाषेवर चिंतन करताना होऊ नये ,एवढीच अपेक्षा आहे.

प्रवीण टाके, 

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

९७०२८५८७७७

00000



 वृत्त क्रमांक 199

नांदेडमध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे भव्य आयोजन 

संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन 

                                                                                                                                                                        नांदेड, दि. 19 फेब्रुवारी 2025 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आले. 

 जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणुन शिवकालीन प्रशासनातल्या बाबीचा आढावा घेवून उपस्थित सर्व खेळाडू, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करुन संविधानाप्रती व छ.शिवाजी महाराज यांच्याप्रती सन्मान व गौरवउल्लेख केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी,2025 निमीत्त "जय शिवाजी- जय भारत पदयात्रा" चे आयोजन केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

                                                                                                                                                                        ही पदयात्रा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र, युवा भारत नांदेडच्या वतीने व जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, उपायुक्त गिरीश कदम, अजितपालसिंग संधू, क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी पांचगे, व्यंकटेश चौधरी, नेहरु युवा केंद्राच्या चंदा रावळकर यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

                                                                                                                                                                        तसेच नांदेड जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या पदयात्रेस प्रारंभ झाला. चिखलवाडी कॉर्नर, तहसील कार्यालय, अण्णाभाऊ साठे पुतळा, आयटीआय चौक, शिवाजीनगर आणि वजिराबाद चौक या मार्गाने ही यात्रा पार पडली. समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव म्हणुन घोषणा देण्यात आल्या.

जय शिवाजी जय भारत" या पदयात्रेमध्ये खेलो इंडिया टेबलटेनिस सेंटर, एन.एसी.सी. विभाग, एन.एस.एस.(राष्ट्रीय सेवा योजना), राजर्षी शाहु विद्यालय शिवाजी हायस्कुल, माणिकनगर, महिला महाविदयालय, एकनाथ अकॅडमी, आर्चरी अकॅडमी, नांदेड जिल्हा वुशू असो., विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी, महानगरपालिका व विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व विदयार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरीक यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत बिस्कीट व पाणीची व्यवस्था करण्यात आली होती. या रॅलीस नांदेडकरांनी भरभरुन व उत्सफुर्त प्रतिसाद दिला असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

"जय शिवाजी जय भारत" पदयात्रा यशस्वी करणेसाठी जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, डॉ. राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, वैभव दोमकोंडवार, आकाश भोरे, ज्ञानेश्वर सोनसळे, सुशिल कुरुडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे आदीनी यशस्वी करण्यास सहकार्य केले.

00000
















#छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…


 


साहित्य संमेलनात ऐतिहासिक क्षण !
मराठीच्या अभिजाततेला सलाम करत दिल्ली साक्षीदार होतेय एका नव्या पर्वाची ! २१-२३ फेब्रुवारीला चला #साहित्य संमेलनात! 🎊✨


 

 अनुसूचित जातीच्या मुलांसाठीच्या #शैक्षणिकयोजना !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…




 

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...