Saturday, April 25, 2026

 वृत्त क्रमांक 

उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी

नांदेड दि. 25 एप्रिल :- सध्या वाढत्या तापमानामुळे (Heat Wave परिस्थिती) दुपारी 12 ते सायं. 4 या वेळेत उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच कारखान्यातील, दुकानातील, हॉटेल्स मधील, खाद्यागृहे, आय टी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, किरकोळ विक्रीची दुकाने, एमआयडीसी मधील उद्योगातील कामगार व इतर ठिकाणी काम करण्याऱ्या कामगारांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व आस्थापनांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना तात्काळ राबविणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.

दुपारी 12 ते 4 यावेळेत कामगारांकडून कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करून घेण्यात येऊ नयेत, यास्वरूपाच्या कामाच्या  वेळापत्रकात बदल करण्यात यावा किंवा अशी कामे बंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.  कामगारांसाठी सावली (Shade), विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा. कामाच्या ठिकाणी स्वच्छ थंड व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता संबंधी सूचना तसेच  आपत्कालीन नंबर स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावा. स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय ठेऊन उष्माघात सारखी प्रकरणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याची सोय करावी.

या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सहायक कामगार आयुक्त आशिष दिलीप ढवळे यांनी दिला आहे.

00000

Friday, April 24, 2026

 वृत्त क्रमांक 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी

 

नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

 

नांदेड दि. 24 एप्रिल :  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत ४,३४,८१९ शेतकऱ्यांनी ८,२९,७३७ विमा अर्ज दाखल केले असून ५,१३,९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता.  माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी रु.८१३.९३ कोटी रक्कम मंजूर झाली असून पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास दि.२१.०४.२०२६ पासून सुरुवात झाली आहे.

 

योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असून जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयबीन, मुग, उडीद, पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सोयबीन, मुग, उडीद, कापूस, तूर आणि ज्वारी पिके अधिसूचित असून खरीप हंगाम सन २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्नावर आधारित पिक विमा राबविण्यात येत आहे. सदर पिकांचे जिल्ह्यात ३३१२ पिक कापणी प्रयोग नियोजित होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर पिक नुकसान झाल्यामुळे श्री. राहुल कर्डिले मा.जिल्हाधिकारी, नांदेड व श्री. दत्तकुमार कळसाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पिक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन करून महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठक आयोजित करून सर्व पिक कापणी प्रयोग CCE मोबाईल app वर होतील व वस्तुनिष्ठ होतील याची खबरदारी घेतली.  पिक कापणी प्रयोगाचे काम सुरु असताना पिक विमा कंपनी कडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. सदर आक्षेपाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांचे अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने निराकरण केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुधारित पिक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटका अंतगर्त रु.८१३.९३ कोटी रक्कम सोयाबीन, मुग व उडीद पिकासाठी मंजूर झाला आहे.

 

पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून ऑनलाईन DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून सद्यस्थितीत मंजूर रु.८१३.९३ कोटी रकमेचे वितरण सुरु असून सर्व विमाधारक शेतकऱ्यांना योजनेच्या पोर्टलवर शेतकरी लॉगिन मध्ये आधार नंबर टाकून OTP प्रविष्ट केल्यावर आपली मंजूर रक्कम पाहता येईल.

0000000

 वृत्त क्रमांक 

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण ; सहकार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड दि. 24 एप्रिल :  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेडच्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. २४) मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना “मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूर्वजांनी उभी केलेली सहकार चळवळ महाराष्ट्राची ओळख जगभर पोहोचवणारी ठरली आहे. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळणे महत्त्वाचे असून, त्यासाठी बँकांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, बँकेचे उपाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, नरेंद्र चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संचालक कैलास गोरठेकर, गोविंदराव नागेलीकर, बाळासाहेब रावणगावकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपनिबंधक शंभूराज हिरे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक व विविध मान्यवर, शेतकरी, नागरीक आदींची उपस्थिती होती.

श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी पद्मश्री स्व. श्यामराव कदम व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र गीताने वातावरण भारावून गेले.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सहकारी बँका चालविताना अनेक अडचणी येतात. मात्र त्या अडचणींवर मात करून नांदेड जिल्हा बँकेने प्रगतीचा मार्ग धरला आहे. आगामी काळात बिंदूनामावलीनुसार पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत तंत्रज्ञान व खतांचा योग्य वापर करावा आणि इतर बँकांकडे न वळता जिल्हा बँकेशी व्यवहार वाढवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

बँकेच्या विकासात माझाही खारीचा वाटा : अशोकराव चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात जिल्हा बँकेच्या पुनरुत्थानाचा इतिहास उलगडला. जिल्हा बँक डबघाईस आली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बँक बंद करण्याच्या विचारात होते. मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मी बँकेला जिवंत ठेवण्याची विनंती केली आणि गॅरंटी घेतली. मुख्यमंत्री असताना १२५ कोटींच्या कर्जाचे रुपांतर अनुदानात केल्यामुळे बँक टिकली. त्यामुळे या बँकेच्या विकासात माझाही खारीचा वाटा आहे, असे ते म्हणाले.

भोकर बाजार समितीने बँकेच्या इमारतीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सभापती जगदीश पाटील व संचालक मंडळाचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी तर आभार प्रदर्शन संचालक रामचंद्र मुसळे यांनी केले. या नवीन वास्तूमुळे भोकर परिसरातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

00000











https://www.youtube.com/live/UHadR6B5aF0?si=FsVoGBfgOY5H19Xo

 वृत्त क्रमांक 

डंख छोटा धोका मोठा

हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी 

नांदेड दि. 24 एप्रिल : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Driven to End Malaria : Now We Can.Now We Must मराठी भाषांतर हिवताप दुरिकरणासाठी कटिबध्द : आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे असे असून भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, किटकजन्य आजार नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावे.  

मागील तीन वर्षात नांदेड जिल्हयातील हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2023 मध्ये 5,17, 519 तर मार्च 2024 मध्ये 5,90,936, सन 2025 मध्ये 6,44,884 तर मार्च 2026 अखेर 1,49,837 याप्रमाणे घेतलेले व तपासलेले रक्त नमुने आहेत. तर हिवताप आजारात मागील तीन वर्षात मृत्यू निरंक आहेत.   

हिवताप

हिवताप हा आजार "प्लाझमोडीअम" या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

डासांची उत्पत्ती

स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. 

हिवतापाचा प्रसार

हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

 हिवतापाची लक्षणे

थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतो, ताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

रोग निदान

प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.

 तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

औषधोपचार

कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

 हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना 

आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरूण घेवून झोपावे. संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) नये. 

घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. 

वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. 

वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

 00000

 वृत्त क्रमांक 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश 

नांदेड, दि. 24 एप्रिल :- अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2026-2027 या वर्षात इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 20 एप्रिल ते 15 मे 2025 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2026-27 मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिलीसाठी दिनांक 20 एप्रिल 2026 पासुन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट (माहिती सेतु सुविधा केंद्र) व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. येथुन अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्जच सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. 

अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचे एप्रिल 2026 नंतरचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे). 

इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी. 

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा दिनांक 20 एप्रिल 2026 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दिनांक 15 मे 2026 पर्यतच राहील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यास एकदा एका शाळेत प्रवेश निश्चीत झाल्यांनतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्व अटीची पूर्तता करत असलेल्या पालकांनीय अर्ज सादर करावेत. 

आवश्यक कागदपत्रे

अर्जदार विद्यार्थ्याचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला एप्रिल 2026 नंतरचे. अंगणवाडीचा दाखला (पहिली इयत्तेसाठी) / ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्याचा आधारकार्ड. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला/ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र.

याप्रमाणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयात व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळामध्ये अर्ज अचुक माहिती भरुन दिनांक 15 मे 2026 पर्यंत या कार्यालयात (माहिती सेतु सुविधा केंद्र) येथे सादर करण्यात यावे. 

या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन, वरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप,

स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन 

नांदेड दि. 24 एप्रिल :- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने इतर मागास बहूजन कल्याण विभागातंर्गत असलेले इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने नांदेड, लातुर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर नांदेड या सभागृहात गुरूवार 30 एप्रिल 2026 रोजी  सकाळी 10  वा. “कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती  व वनार्टी या योजनेतील पात्र ठरलेल्या/निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण, मा.अतुलजी सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे महोदयांचे  हस्ते करण्यात येणार आहे. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याकरीता तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी नारायण झुंझारे व इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  

जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, विमानतळ रस्ता नांदेड 431605 संपर्क क्र. 02462-220865, वेबसाईट. www.msobcfdc.org येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

अन्न व औषध प्रशासनाकडून 

मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

नांदेड दि. 24 एप्रिल:- देगलूर स्थित मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची 26 ऑगस्ट 2025 रोजी तपासणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने तपासणीमध्ये डॉक्टरांच्या चिठठीशिवाय औषधाची विक्री करणे, परवाने दर्शनीभागी प्रदर्शित न करणे,  Tramadol युक्त औषधांच्या संगणकामध्ये नमूद साठा व औषधी दुकानामध्ये असलेला प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळून येणे, भागीदारी संपुष्टात आल्याने नियमाप्रमाणे कार्यालयाकडे नवीन परवाने प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज न करणे यासारखे गंभीर मुददे आढळून आलेले होते. त्याअनुषंगाने पेढीस कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येवून पेढीचे परवाने 21 डिसेंबर 2025 पासून रदद करण्यात आले होते.

मे. डी. ॲण्ड जी. फार्मा, देगलूर ही औषधी पेढी भागीदारमध्ये असून शशिकांत माणिकराव गरूडकर व गजानन प्रकाश ढगे हे भागीदार आहेत.  त्यांनी परवाने रदद आदेशास मंत्री महोदय,अन्न व औषध प्रशासन, यांचेकडून स्थगिती आदेश प्राप्त करून घेतल्याने सदरचे औषधी दुकान पूर्ववत सुरू होते.  

या कार्यालयाकडे राजेश माणिकराव गरूडकर यांनी नगरपरिषद मालमत्ता क्र. 2-871 अनुक्रमांक 2192 यामध्ये ते भोगवटार असून सदरील जागेमध्ये मे. डी. ॲण्ड जी. फार्मा हे औषधी दुकान कार्यरत आहे. ही जागा रिकामी करून मिळणेबाबत या कार्यालयाकडे विनंती केलेली होती. त्याअनुषंगाने या कार्यालयाने पेढीचे उपरोक्त नमूद प्रमाणे दोन्ही भागीदारास पत्र पाठवून जागा ताब्यात असल्याबाबतची नव्याने कागदपत्रे सादर करण्याविषयी सुचित केले होते. सदरील जागेबाबत संभ्रम असल्याने मुख्याधिकारी, नगरपरिषद, देगलूर यांना पत्र देवून सदरील जागेच्या भोगवटादारबाबत या कार्यालयास माहिती उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती.  

मुख्याधिकारी, नगरपरिषद देगलूर यांनी राजेश माणिकराव गरूडकर यांची भोगवटादार म्हणून 24 फेब्रुवारी 2026 रोजी गाळयाची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना दुकान गाळा  रिकामा करण्याबाबत नोटीस तामील करण्याबाबत या कार्यालयास कळविले आहे. 

याबाबीवरून सदरची जागा सद्य: स्थितीमध्ये मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या औषधी पेढीचे भागीदार शशिकांत माणिकराव गरूडकर व गजानन प्रकाश ढगे तसेच राजेश माणिकराव गरूडकर यांच्या ताब्यात नसल्याचे स्पष्ट झाल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अन्वये मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या पेढीचे परवाने 21 एप्रिल 2026 पासून रदद करण्यात आलेले आहेत.  

मुख्याधिकारी, देगलूर यांना मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या पेढीचे परवाने 21 एप्रिल 2026 पासून रदद करण्यात आल्याचे कळवून, त्यांचेस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सांगितले आहे. 

दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मेडिकल परवाना रदद तरीही नियमबाहय औषधी विक्री या मथळयाखाली  वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिध्द झाली होती.  त्याअनुषंगाने या कार्यालयाचे सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी 23 एप्रिल  2026 रोजी प्रत्यक्ष भेट देवून मे. डी. ॲण्ड जी. फार्मा, या दुकानाकडे बोगस ग्राहक पाठवून खोकल्याचे औषधांची मागणी केली असता त्यांनी दुकान बंद झाले  असल्याचे सांगून औषधी ‍विक्री केलेली नाही.  सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी वरील घटनेनंतर मे. डी. ॲण्ड जी. फार्मा या दुकानामध्ये स्वत: ओळखपत्र दाखवून पंचासह प्रवेश करून तपास/चौकशी  असता त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा औषधी साठा आढळून आलेला नाही. परवाने रदद असतांनाही औषधी दुकान कशासाठी सुरू ठेवले आहे याबाबत विचारणा केली असता या जागेमध्ये जनरल स्टोअर्स हे दुकान सुरू करावयाचे असल्याने साफसफाईसाठी सुरू  ठेवलेली असल्याचे सांगितले.  

तसेच पेढीमधील हजर व्यक्ती अक्षय दिलीपराव गरूडकर यांना औषधी परवाने ऑनलाईन रदद करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. 22 एप्रिल 2026 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज पंचासमक्ष तपासण्यात आले असता त्याठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधी विक्री झाली नसल्याचे दिसून आले आहे. वरील सर्व घटनेचा  पंचनामा पंचासमक्ष करण्यात आलेला आहे. 23 एप्रिल 2026 रोजीचे तपासणीमध्ये मे. डी ॲण्ड जी फार्मा ही औषधी पेढीही 21 एप्रिल रोजी परवाने रदद झालेल्या दिनांकापासून बंद केलेली असून कसल्याही प्रकारची औषध खरेदी /विक्री करीत नसल्याचे स्पष्ट केले.

00000

  वृत्त क्रमांक   उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी नांदेड दि. 25 एप्रिल :- सध्या वाढत्या तापमानामुळे (H...