Friday, June 19, 2026

 वृत्त क्रमांक

एल निनोच्या पार्श्वभुमीवर पेरणी व पिक पध्दतीत बदल करावा - दत्तकुमार कळसाईत (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

सोयाबीन उत्पादन खर्चात बचतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

नांदेड दि.१९ जून:- खरीप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीचा उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

हवामानातील अनिश्चितता व वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांनी मुलस्थानी जलसंधारण उपाययोजना राबवून पावसाचे पाणी शेतातच अडवावे व जमिनीत मुरवावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

तसेच कमी कालावधीच्या सुधारित सोयाबीन वाणांची निवड केल्यास पिकावरील जोखीम कमी होऊन उत्पादनात स्थिरता मिळू शकते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होतात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करता येते.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार व पुरेशी ओल उपलब्ध झाल्यानंतरच पेरणी करावी. घाईघाईने केलेली पेरणी उगवण व उत्पादनावर विपरीत परिणाम करू शकते.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक असून त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. तसेच शिफारशीनुसार प्रक्रिया केलेले घरचे बियाणे वापरल्यास बियाणे खरेदीवरील खर्चात मोठी बचत होऊ शकते.

खरीप हंगामावर एल निनोचे गंभीर सावट निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, खंड पडणे, सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी विभागाचा वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. 

पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पीक पेरणीचा काटेकोर नियोजन करावे. कमी कालावधीत येणाऱ्या पिकाची लागवड करावे.

यावर्षी खरीप हंगामात पेरणी करताना नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय खरीप पिकाची पेरणी करू नये असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. पाण्याची योग्य नियोजन करूनच पेरणीच्या कामाला प्राथमिकता घेणे गरजेचे आहे.

पीक विमा काढा

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून जसे अतिवृष्टी, कमी पाऊस, पावसाचा खंड व कमी उत्पादन यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पिकांचा विमा उतरवणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी नियोजन करूनच पेरणी करावी

एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने यावेळी वर्तवली आहे. शेतकरी बांधवांची आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काटेकोर नियोजन करूनच खरीप हंगामाला सुरुवात करणे सोयीचे राहणार आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी घाई गडबड करू नये. मुख्य पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात (किमान ७५ ते १०० मिलिमीटर) पाऊस झाल्याशिवाय करू नये. पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने कमी कालावधीच्या पिकांची लागवड करणे सोयीचे होणार आहे.

आंतरपिक पद्धतीचा अवलंब करा

यावर्षीच्या खरीप हंगामात कमी दिवसात निघणारे आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीच्या बियाणांची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे. जोखीम कमी करण्यासाठी वारंवार एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरणार आहे. नांदेड जिल्हयातील जलशिवाराच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. पाणी आडवा धोरण शेतकऱ्यांनी अंगी करावे. शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनाचा शक्य तिथे वापर करणे हितावह ठरणार आहे.

पीक संरक्षण व खताचे व्यवस्थापन

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट राहणार आहे. संभाव्य नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीक संरक्षण व खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी खतांचा संतुलित वापर करावा. पावसाचा ताण असताना रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नये. शक्यतो सेंद्रिय खते, कंपोस्ट आणि निंबोळी पेंडीच्या वापर करणे फायदेशीर ठरणार आहे.

खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने, हवामानाचा अंदाज व कृषी विषयक मार्गदर्शनासाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी घ्यावे असे कृषी विभागाने कळविले आहे.

०००००

वृत्त क्रमांक

अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाला या प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धडक कारवाई

नांदेड दि. 19 जून :- अन्न व औषध  प्रशासन, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशान्वये गुटखा-पानमसाला  या प्रतिबंधित खाद्य पदार्थाची नांदेड शहरात गुप्त माहितीच्या आधारे शोध घेवून गुरुवार 18 जून 2026 रोजी मे. गोल्डन जर्दा स्टोअर्स, पैलवान टी हाऊस जवळ, इतवारा नांदेड या पेढीवर धाड टाकण्यात आली.  सदर धाडीमध्ये एकूण 34 प्रकारच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थाचा साठा ज्यामध्ये रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, राजनिवास सुगंधीत पानमसाला, सागर पानमसाला, मुसाफीस पानमसाला, गोवा 1000, आरएमडी पानमसाला, व्हीवन चेविंग टोबॅको, मिराज जाफरानी जर्दा, वजीर गुटखा, एम सेटेंड टोबॅको,सिंगनिचर पानमसाला इत्यादि 9 लाख 86 हजार 017 रूपये एवढया किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. 

विक्रेता व पुरवठादार अशा एकूण 02 व्यक्तींविरूध्द इतवारा पोलीस स्टेशन, नांदेड येथे प्रथम खबरी अहवाल क्रमांक  0209/2026 दि. 19 जून 2026 नोंदविण्यात आला असून सदरील पेढी सिल करण्यात आलेली असून पुढील तपास इतवारा पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.   

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अमृता दुधाटे, अरूण तम्मडवार, अ. नं. ‍गिरी, श्रीमती  शिल्पा श्रीरामे, तुषार घोपे, कृष्णा मुळे व वैभव ढोंबरे यांच्या पथकाने सहायक आयुक्त  रा. मा.भरकड व अनंत चौधरी यांचे व छत्रपती संभाजीनगर  विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांचे मार्गदर्शखाली पार पाडण्यात आली. 

00000




 वृत्त क्रमांक

23 जुन रोजी “जागतिक ऑलिम्पिक डे” रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन  

नांदेड दि. 19 जून :- जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिकची स्थापना ग्रीस येथे बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी केली. “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) स्थापना 23 जून, 1894 साली झाली. पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात 06 एप्रिल, 1896 रोजी झाली. जगातील सुमारे 200 पेक्षा अधिक देशाचे ऑलिम्पिक संघ हे जागतिक ऑलिम्पिक समिती स्थापनेचा दिवस म्हणुन 23 जून रोजी ऑलिम्पिक डे साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे “भारतीय ऑलिम्पिक संघ” व राज्याचे “महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन” हे सन 1952 सालापासून “ऑलिम्पिक डे” व ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत आहे.

त्यानुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना (सर्व) यांच्या संयुक्त विदयमाने नांदेड जिल्हयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन पुढीलप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.

जागतीक " ऑलिम्पिक डे रॅली" आयोजन 23 जुन, 2026 सकाळी 7 वा. उपस्थिती स.6.30 वा. (आयटीआय चौक,नांदेड) रॅली मार्ग - महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आयटीआय चौक येथून सुरुवात – शिवाजी नगर मार्गे- बसस्टँड- कला मंदीर- वजिराबाद चौक- छ. शिवाजी महाराज पुतळा – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समारोप होणार आहे. जागतीक ऑल्मिपिक डे रॅलीस मान्यवरांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे.

याकरीता नांदेड जिल्हयातील सर्व शाळेतील  खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विविध कार्यालयातील शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच सर्व नागरीकांना या रॅलीमध्ये उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

तसेच नांदेड जिल्हयातील सर्व शाळा/ क.महाविदयालयामध्ये 23 जुन,2026 रोजी आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक दिन निमीत्त चर्चा सत्र, परिसंवाद, कार्यशाळा तसेच विविध गुणवंत खेळाडूंचा सत्कार व शाळास्तरावर विविध खेळाचे आयोजन करुन साजरा करावा असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने 'आंतरराष्ट्रीय योग दिन' विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 19 जून:- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड  आणि योग विद्याधाम  नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, शारिरीक आरोग्य असो की मानसिक आरोग्य तसेच तनावपूर्ण जीवनात आनंद मिळवण्यासाठी निरंतर योग अभ्यास करणे, तसेच  संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून  देण्यासाठी 21 जून हा दिन जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  आंतराष्ट्रीय योग दिन 2026 चे ब्रि‍दवाक्य  "Yoga for Healthy Ageing."  हे असून या दिनाचे महत्व लक्षात घेऊन योग अभ्यास व विविध कार्यक्रमांनी हा साजरा करण्यात येणार आहे. 

शहरातील विमानतळरोडवरील शिव मंदिर येथील सभागृहात 21 जून रोजी सकाळी ठीक 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमात योग साधकांना आणि नागरिकांना योगाचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या विशेष कार्यक्रमात योग विद्याधामचे प्रसिद्ध योगाध्यापक त्र्यंबक गायकवाड आणि सहशिक्षक प्रभाकर रेनगुंटवार उपस्थितांना योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर  सामाजिक कार्यकर्ते आनंद कल्याणकर यांचे ‘आरोग्य आणि जीवनशैली’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला विश्वनाथ रेनेवाड, श्रीमती शंकुतला कलंबरकर, श्रीमती मंगला जोंधळे श्रीमती कविता आष्टुरकर आदी  योग अभ्याणसकांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. 

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी परिसरातील नागरिक, तसेच युवकांनी  या योग शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूतरोचे प्रसिध्दी प्रमुख  सुमीत दोडल तर योग विदयाधामचे प्रमुख नागोराव पोलादवार यांनी केले आहे.

00000




 वृत्त क्रमांक

औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरु

दिनांक दि. 19 जून :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट-2026 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रीया 21 मे 2026 पासुन  आयटीआय Admission Portal: https://admission.dvet.gov.in या  संकेतस्थळावर सुरु करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हयातील युवक व युवती ( उमेदवारांनी ) यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज व निश्चितीकरण करण्याचे आवाहन श्री. गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्तीर्ण इच्छुक विद्यार्थी अर्ज करु शकतात असेही कळविले आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती व माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर Download Section मध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रकियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकुण 83  प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात असुन त्यांची एकुण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष ऐवढी आहे. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधिकचे तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासाच्या तुकडया समाविष्ठ करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधुनिकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गात उमेदवारासाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्वी योजनाही लागु करण्यात आलेली आहे. दहावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता  करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. 

दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आयटीआय मधुन व्यवसायिक शिक्षण पुर्ण करुण त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

श्री. गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड, येथे प्रवेश सत्र ऑगस्ट - 2026 करीता एकुण - 23 व्यवसायाच्या 38 तुकडया अंतर्गत 816 जागा करीता प्रवेश उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 8 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण / अनुउत्तीर्ण पात्रतेवर तर 15 व्यवसाय 10 उत्तीर्ण पात्रतेवर प्रवेशासाठी उपलब्ध आहे. प्रवेच्छुक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने अर्ज व प्रवेश शुल्क भरावे व नंतर नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज निश्चीत करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चीतीकरण केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसायाची निवड करता येणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम;

स्थलांतरित मजुरांसाठी 'आरोग्य साथी' प्रशिक्षण संपन्न

नांदेड नांदेड दि. 19 जून : नांदेड जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी आपल्या कुटुंबासह ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. या स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना फडावरच तातडीने प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आरोग्य साथी' हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

नुकतेच नांदेड येथे 'आरोग्य साथी प्रशिक्षण पुस्तिका' आणि नियोजित आराखड्यानुसार 'आरोग्य साथी' प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

या विशेष आरोग्य शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी उपस्थित होत्या. प्रशिक्षण सत्रादरम्यान डॉ. सलमा हिराणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना 'आरोग्य साथी' उपक्रमाची गरज आणि मजुरांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली. स्थलांतरादरम्यान मजुरांना भेडसावणारे विविध आजार, लहान मुलांचे व महिलांचे आरोग्य, कुपोषण, तसेच फडावरच द्यावयाचे प्राथमिक उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला श्रीमती बेरलीकर (PHN - पब्लिक हेल्थ नर्स) व रफिक शेख (HA - हेल्थ असिस्टंट) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आरोग्य साथींना तांत्रिक व व्यावहारिक कामांविषयी मोलाचे धडे दिले.

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील हदगाव, मुखेड आणि तुपा या भागांतून मोठ्या संख्येने 'आरोग्य साथी' (आरोग्य स्वयंसेवक) उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान 7 सर्व आरोग्य साथींना आरोग्याची काळजी घेणे, प्रथमोपचार किटचा वापर करणे आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात रेफरल सेवा कशी उपलब्ध करून द्यायची, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा परिषद नांदेडच्या आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या विशेष उपक्रमामुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्य सुविधेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

00000



वृत्त क्रमांक

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन 

नांदेड दि. 19 जून:-  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घरचे अथवा बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

यंदा अलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने उपलब्ध बियाण्यांची गुणवत्ता व उगवण क्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

उगवण क्षमता चाचणीमुळे बियाण्याच्या दर्जाबाबत खात्री मिळते. तसेच संबंधित बियाणे पेरणीयोग्य आहे की नाही, हेही समजते. त्यामुळे आवश्यक बियाण्याचे प्रमाण निश्चित करता येते आणि प्रती एकर आवश्यक रोपसंख्या राखणे शक्य होते, असे जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले. उगवण क्षमता आधीच तपासल्यामुळे निकृष्ट अथवा कमी उगवण असलेले बियाणे ओळखता येते. त्यामुळे नवीन बियाण्याची वेळेत व्यवस्था करून संभाव्य नुकसान टाळता येते. तसेच बियाण्यावर होणारा अनावश्यक खर्च वाचतो आणि दुबार पेरणीची वेळ येत नाही. चांगली उगवण झाल्यास शेतातील सर्व रोपे जवळपास एकाच वेळी उगवतात. परिणामी पिकाची वाढ, फुलोरा व परिपक्वता एकसमान होऊन पिकाची जोमदार वाढ होते.

अशी करा गोणपाट पद्धतीने उगवण क्षमता चाचणी

बियाण्यातून १०० दाण्यांचा नमुना निवडा. हे दाणे ओल्या गोणपाटामध्ये व्यवस्थित गुंडाळा. गोणपाट सावलीत किंवा उबदार ठिकाणी ठेवा. 4.6 ते 7 दिवस गोणपाट ओलसर राहील याची काळजी घ्या व अधूनमधून पाणी शिंपडा. निर्धारित कालावधीनंतर रुजलेल्या बियांची संख्या मोजा. ७० किंवा त्यापेक्षा अधिक बिया उगवल्यास संबंधित बियाणे पेरणीसाठी योग्य व दर्जेदार समजले जाते.

उगवण क्षमता तपासणीचे फायदे

निकृष्ट व कमी उगवणक्षम बियाणे ओळखता येते. पर्यायी बियाण्याची वेळेत व्यवस्था करता येते. दुबार पेरणी व आर्थिक नुकसान टाळता येते. आवश्यक रोप संख्या राखणे शक्य होते.

पिकाची वाढ, फुलोरा व परिपक्वता एकसमान होते. उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. बियाण्यावरील अनावश्यक खर्च टाळता येतो.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह बियाणे खरेदी करून पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करावी” असे आवाहन दतकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक एल निनोच्या पार्श्वभुमीवर पेरणी व पिक पध्दतीत बदल करावा  - दत्तकुमार कळसाईत (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोयाबीन उत्पादन खर्...