Thursday, August 27, 2026

 विशेष वृत्त

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा

– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

पुढील टप्प्यातील कामांसाठी विभागाची यंत्रणा सज्ज! 

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्ज, सूचना व हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवावी. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांवर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व नागरिकाभिमुख ठेवावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. 

छत्रपती संभाजीनगर विभागातील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा श्री. चोक्कलिंगम यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित आठही जिल्ह्यांतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

श्री. चोक्कलिंगम म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाला गती देण्यासाठी मतदार यादीची पाने आणि नोटिसांची छपाई नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावी. यासाठी जिल्हानिहाय नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागातील आठही जिल्ह्यांतील छपाईची कामे, उपलब्ध यंत्रसामग्री, संबंधित संस्थांची क्षमता आणि कामाचे नियोजन यांचा त्यांनी आढावा घेतला. 

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणा सक्रिय ठेवावी. एखाद्या नागरिकाचे नाव प्रारूप यादीत आढळून न आल्यास त्याची सध्याची निवासस्थिती तपासून आवश्यकतेनुसार नमुना क्रमांक ६ भरून घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी. नागरिकांना प्रक्रिया व अर्जांबाबत स्पष्ट आणि सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

 प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांच्या शंका व सूचनांचे निराकरण करण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा. मतदार यादीतील नोंदींमध्ये झालेल्या बदलांबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी. तसेच नाव समाविष्ट करणे, आवश्यक दुरुस्ती करणे किंवा नियमानुसार वगळण्याच्या प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करावे. 

यावेळी एसआयआरच्या पुढील टप्प्यात पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील तसेच दावे व हरकतींची प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण होईल, यासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज ठेवावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. तसेच अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. 

नोटीस बजावणे, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पद्धत स्वीकारावी. पात्र मतदारांचे उपलब्ध मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्र तसेच इतर वैध ओळखपत्रांच्या माध्यमातून संपर्क व पडताळणीची प्रक्रिया सुलभ करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत इतर राज्यांमध्ये अवलंबिलेल्या चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करता येईल, असे त्यांनी सांगितले. 

नागरिकांचे दावे, हरकती तसेच तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधितांची आवश्यक कागदपत्रे पडताळावीत. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी सूचना करून प्रत्येक भारतीय नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात निवासी स्थितीची पडताळणी करण्यात आली असून, पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी, दावे-हरकती, सुनावणी आणि त्यावरील पुढील कार्यवाहीचे नियोजन आवश्यक आहे. नागरिकत्व असलेल्या नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यासाठी नव्याने पात्र झालेल्या युवकांच्या नोंदणीसाठी विशेष जनजागृती करावी. महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि मतदार साक्षरता मंचांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवावेत. निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

प्रारंभी सहाय्यक आयुक्त श्रीमती मिसकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव व नांदेड या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी निर्धारित कालावधीत एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याचे सांगितले.

यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाची माहिती दिली. हाऊस-टू-हाऊस सर्व्हे, एन्यूमरेशन फॉर्मचे वितरण व संकलन, मतदार नोंदींचे मॅपिंग व डिजिटलायझेशन तसेच अनमॅप्ड, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी याबाबत जिल्हानिहाय सद्यस्थिती त्यांनी सादर केली. पुढील टप्प्यातील नियोजनाची माहितीही त्यांनी दिली. 

३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी : 

एसआयआरच्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. दावे-हरकतींवरील नोटीस बजावण्याची व ते निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 

*******










वृत्त क्रमांक 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ३० ऑगस्ट रोजी नांदेड दौरा

नांदेड(जिमाका), दि. २७ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे.

रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी १२.१५ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील.

दुपारी ३.१५ वाजता पोलीस परेड मैदान, हेलिपॅड, परभणी येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी ३.४५ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

****

वृत्त क्रमांक 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 

नांदेड जिल्ह्यातील ५१,३३० शेतकऱ्यांना ३८१ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जमाफी

नांदेड(जिमाका), दि. २७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ३३० शेतकऱ्यांसाठी ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार ३८ रुपये इतकी कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील संबंधित बँकांमध्ये वर्ग करण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित बँकांकडून सुरू आहे.

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ५३५ कर्जदार शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ३६ लाख ९ हजार ७३१ रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी दिली आहे.

यापूर्वी योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील १२ हजार ९२९ पात्र शेतकऱ्यांसाठी १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपये इतकी रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून, सदर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यास पात्रता प्राप्त होते.

दरम्यान, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील ७३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप २३ हजार १०६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यापैकी १२ हजार २५७ शेतकऱ्यांकडे अद्याप ॲग्रीस्टॅक आयडी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आयडी नाही, त्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक आयडी काढून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

****

वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९  ऑगस्ट रोजी पदकप्राप्त खेळाडूंचा होणार सत्कार

नांदेड(जिमाका), दि. २७ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ असून ‘आदर, खेळ आणि हालचाल’ या प्रमुख स्तंभांवर आधारित विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन  येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने दि. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘डिजिटल डिस्ट्रिब्युट’, ‘२९ चॅलेंज’, ‘पास द बॉल’ आणि ‘स्पोर्ट बंधन’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘एक घंटा खेल के मैदान में’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार समारंभ होणार आहे.

सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या तसेच प्राविण्य प्राप्त केलेल्या नांदेड जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सत्कारासाठी दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर, नांदेड येथे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘संडेज् ऑन रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बास्केटबॉल मैदान येथून होऊन स्टेडियम कमान, कुसुम सभागृह, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा (आयटीआय चौक) मार्गे पुन्हा कुसुम सभागृह व स्टेडियम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

या रॅलीमध्ये जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, विविध क्रीडा पुरस्कारार्थी तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी तथा कार्यासन प्रमुख संजय बेतीवार यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी केले आहे. 

**

#शेतकरीकर्जमुक्ती




 मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.
थीम: Save Soil, Save Water, Secure Tomorrow
विषय: माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन – उद्याचे सुरक्षित भविष्य.
यातील कोणत्याही एका विषयावर रील करू शकता !
रील अपलोड कालावधी: १५ ते ३१ ऑगस्ट
रीलची वेळ: ३० ते ६० सेकंद
रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक.
रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी.
#SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे आणि विभागाच्या अधिकृत अकाउंट mahawalkathon2026 Tag करणे आवश्यक.
रील पोस्ट केल्यानंतर अधिकृत QR Code स्कॅन करून Registration Form भरावा आणि रीलची लिंक Submit करावी.
प्रत्येक जिल्ह्यातील बक्षिसे
प्रथम विजेता: २५,००० रुपये
द्वितीय विजेता: १५,००० रुपये
तृतीय विजेता: १०,००० रुपये
३६ जिल्ह्यातील युवकांच्या कल्पनेसाठी मोठं व्यासपीठ.
तुमची रील बनवा, माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश द्या आणि महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीत सहभागी व्हा.

 वृत्त क्रमांक 

व्यावसायिक आस्थापनांमध्ये केवळ व्यावसायिक एलपीजी गॅसचा वापर बंधनकारक

मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स व केटरिंग सेवांच्या ठिकाणी दर्शनी भागात सूचना फलक लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश

नांदेड(जिमाका), दि. २७ : नांदेड जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स तसेच केटरिंग सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांनी स्वयंपाकासाठी व अन्य कामांसाठी केवळ व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित आस्थापनांच्या स्वयंपाकघराच्या दर्शनी भागात व्यावसायिक गॅसच्या वापराबाबत स्पष्ट सूचना फलक लावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अन्वये दंडनीय अपराध आहे.

दर्शनी भागात सूचना फलक लावणे अनिवार्य

प्रत्येक मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल आणि केटरिंग सेवा पुरवठादाराने आपल्या स्वयंपाकघराच्या दर्शनी भागात “येथे केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर केला जाईल. घरगुती गॅसचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.” असा स्पष्ट आणि ठळक सूचना फलक लावणे आवश्यक आहे.

घरगुती गॅसच्या वापरावर पूर्णपणे बंदी

व्यावसायिक कारणांसाठी कोणत्याही परिस्थितीत घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर किंवा त्याचा अवैध साठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरची उपलब्धता व वापर याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.

विशेष तपासणी मोहीम

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पुरवठा विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान कोणत्याही व्यावसायिक आस्थापनामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा अवैध वापर अथवा साठा आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल्स, केटरिंग सेवा पुरवठादार तसेच इतर व्यावसायिक आस्थापना चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि तपासणी मोहिमेदरम्यान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

******

  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...