Friday, February 6, 2026

 वृत्त क्र. 181

सोमवारी आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन  

नांदेड, दि. 6 फेब्रुवारी : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिघजी औद्योगिक संस्था, नांदेड यांच्यावतीने सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. आयटीआय पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आयटीपास उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के.अन्नपुर्णे यांनी केले आहे. 

या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमदेवार म्हणून भरती करण्यात येणार आहे.  मेकॅनिकल मोटर व्हेईकल, फिटर, टूल अँड डाय मेकर, पेंटर जनरल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,  इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल ट्रॅक्टर, वेल्डर, वेल्डर (जीएमएडब्ल्यू आणि जीटीएडब्ल्यू), शीट मेटल वर्कर आयसीटीएसएम, टर्नर , मशिनिस्ट ग्राइंडर ,वायरमन, मशिनिस्ट, फाउंड्रीमॅन इ. व्यवसायाचे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत. 

00000

वृत्त क्र. 180

धर्माबाद शहरात 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

कार्यवाहीत 13 हजार 600 रुपये दंड वसूल

नांदेड, दि. 6 फेब्रुवारी : धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 5 फेब्रुवारी रोजी धर्माबाद शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून  एकूण 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाही  13 हजार 600 रुपये दंड वसूल केला. 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ.संजीवनी जाधव, डेंटल सर्जन डॉ. म्याकलवर, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, एमजीवीएसचे मंगेश गायकवाड, समुपदेशक नितीन आडे व दंत सहायक रमेश जक्कावाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल एफ.ए.सय्यद व ए.एस. कदम उपस्थित होते. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 179

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत १ मेपर्यंत हमीभावाने तूर खरेदी

नांदेड, दि. ६ फेब्रुवारी : हंगाम २०२५–२६ मध्ये तूर पिकाची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ३ लाख ३७ हजार मेट्रिक टन तूर खरेदीस मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील ९० दिवसांसाठी, म्हणजेच १ मे २०२६ पर्यंत हमीभावाने तूर खरेदी सुरू ठेवण्याबाबत शासनाने कळविले आहे.

हमीभावाने तूर विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या अधिकृत खरेदी केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 178

नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शासनाच्या सुविधांचा लाभ घेऊन ‘लोकल टू ग्लोबल’चा मार्ग स्वीकारण्याचे उद्योजकांना आवाहन

नांदेड, दि. ६ फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यात उपलब्ध दळणवळणाच्या भक्कम पायाभूत सुविधा तसेच कृषीवर आधारित उत्पादन क्षमता पाहता निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. उद्योजकांनी बाजारपेठेचे भान ठेवून भविष्यातील धोके ओळखावेत व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून जिल्ह्यात निर्यातीस पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

निर्यात हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शासनाच्या विविध सुविधा व योजनांचा लाभ घेऊन नांदेड जिल्ह्याला ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज “महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, डाक विभागाचे अधिकारी अक्षय कुलकर्णी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे चांगदेव शेळके, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी पी. डी. मुळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. सोनकांबळे, ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक अमरजितसिंघ, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सौरभ कुमार, नांदेड जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष हर्षद शहा, आनंद बिडवई, निर्यातदार निलेश देशमुख तसेच निर्यातक्षम उद्योगांचे उद्योजक, नवउद्योजक व विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा निर्यात केंद्राची निर्मिती करणे व निर्यातीबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रास्ताविकात नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी केंद्र शासनाच्या डाक विभागामार्फत उपलब्ध असलेल्या डाक घर निर्यात केंद्र, डाक पोर्टल नोंदणी तसेच सुलभ व आधुनिक निर्यात प्रक्रियेबाबत अधिकारी अक्षय कुलकर्णी यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

उद्योग व व्यापार सुलभतेच्या दृष्टीने मैत्री कक्ष अंतर्गत उद्योगांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविण्याची व्यवस्था असल्याचे अधिकारी धनश्री जाधव व मनोज डोमाणे यांनी ऑनलाईन मार्गदर्शनातून स्पष्ट केले. उद्योग सुरू करण्यासाठी कर्जविषयक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ व उद्योजकांनी सकारात्मक मानसिकतेने पुढे येण्याची आवश्यकता बँक अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.

केळी उत्पादन घटकाच्या संशोधन व निर्यात अनुभवाबाबत माहिती देताना निर्यातदार निलेश देशमुख यांनी निर्यातीतील अडचणी, त्यावरील उपाय तसेच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल पुरविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यशाळेचे आभार प्रदर्शन व्यवस्थापक अनिल कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक सतीशकुमार चव्हाण, अरविंद भांडे, सोमेश आठवले, एमसीईडी संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यशाळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, निर्यातक्षम व नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, शेतकरी सहकारी संस्था, प्रक्रिया उद्योग केंद्र, निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, संशोधक तसेच बँका व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000







वृत्त क्र. 178

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील

नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संवाद’ यशस्वीपणे संपन्न

नांदेड, दि. 6 फेब्रुवारी :- ग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देत नवउद्योजक घडविण्यावर महाराष्ट्र शासनाचा विशेष भर असून स्टार्टअप परिसंस्था प्रत्येक जिल्हा व तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. 

स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकातील नव्या निर्णयांमुळे कृषी, ग्रामीण व डीप टेक क्षेत्रातील नवोपक्रमांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी  सांगितले. 

श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे ‘प्रादेशिक स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त डॉ. पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी श्री. गुरुगोविंदसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक महेश कोकरे यांच्यासह स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटक यांची उपस्थिती होती.

डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, “महाराष्ट्र स्टार्टअप धोरणाअंतर्गत राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला सर्वसमावेशक सहाय्य दिले जात आहे. स्टार्टअप परिसंस्था केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणे हे राज्याचे स्पष्ट धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले. याच अनुषंगाने, स्टार्टअप इंडियाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करताना केंद्र सरकारने स्टार्टअप मान्यतेची चौकट अधिक सक्षम व भविष्याभिमुख केल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले. नव्या अधिसूचनेनुसार स्टार्टअपसाठी उलाढाल मर्यादा २०० कोटीं रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, डीप टेक स्टार्टअपसाठी स्वतंत्र श्रेणी निर्माण करून त्यांची वयोमर्यादा २० वर्षे आणि उलाढाल मर्यादा ३०० कोटी रुपयांपर्यत निश्चित करण्यात आले आहे. तसेच सहकारी संस्थांनाही स्टार्टअप मान्यतेत समाविष्ट करून कृषी, ग्रामीण आणि समुदायाधारित नवोपक्रमांना नवे बळ देण्यात आले आहे. या धोरणामुळे येणाऱ्या काळात गाव समृध्द होणार असून, यासाठी प्रत्येक गावपातळीवरील नवकल्पना देशपातळीवर न्यायची आहे. यासाठी महाविद्यालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मत डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर 'इनोव्हेशन सिटी' विकसित करण्यात येत असून, ही जगातील एक अद्वितीय संकल्पना ठरणार आहे. स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांना एकाच परिसंस्थेत आणून नवकल्पनांना जागतिक स्तरावर नेण्याचा उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार आहे.”अशी माहिती यावेळी डॉ. पाटील यांनी दिली. 

संचालक डॉ. महेश कोकरे यांनी सर्वह इन्क्युबेशन फाऊंडेशन (SARVAH Incubation Foundation) बाबत स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित १०,००० चौ. फूटांच्या नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता क्षेत्र (Innovation & Entrepreneurship Space) ची माहिती देण्यात आली. या माध्यमातून नांदेड व मराठवाडा विभागात एक सक्षम स्टार्टअप व नाविन्यपूर्ण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे असे डॉ. कोकरे यांनी सांगितले. 

यावेळी विद्यार्थ्यांनी व स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे सादरीकरण, थेट संवाद सत्र आणि डेमो स्टॉल्सद्वारे पाहणी करण्यात आली. 

हा संवाद कार्यक्रम नाविन्यपूर्ण विकास, प्रादेशिक उद्योजकता आणि युवकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग असून, नांदेडसारख्या प्रादेशिक शहरांना स्टार्टअप नकाशावर अग्रस्थानी नेण्यास निश्चितच महत्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच प्रादेशिक नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

00000











Thursday, February 5, 2026

वृत्त क्र. 177

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना   

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे. 

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन तसेच निवास व्यवस्था व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनीनी यांनी जिल्हयामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्यत्तुर अभ्यासक्रमास असणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या वर्षांसाठी शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन पध्दतीने सदर अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 6 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ विहित केलेल्या वेबसाईटमध्ये ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 176

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार,

विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षाकरीता व्यक्ती आणि संस्था यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.  

इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्यामार्फत पुढील शासन निर्णय व शुध्दीपत्रकांन्वये विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडुन रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.  

अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरुपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयातील नमुद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपुर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.  

पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी शनिवार 21 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले.

00000

  वृत्त क्र.  181 सोमवारी आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन   नांदेड, दि. 6 फेब्रुवारी : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना के...