वृत्त क्रमांक
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना
महाराष्ट् शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
वृत्त क्रमांक
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना
वृत्त क्रमांक
मध्यपूर्व देशात अडकलेल्या नांदेडकरांसाठी प्रशासनाचा पाठपुरावा;
घाबरू नये, सुरक्षित परतीसाठी प्राधान्य
पालकमंत्री अतुल सावे जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना
नांदेड, दि.४ मार्च:- आज 04 मार्च 2026 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील एकूण 54 नागरिक हे दुबई, शारजाह, कतार, बहरीन, सौदी अरेबिया या ठिकाणी असून ते सर्व सुरक्षित असल्याबाबतची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.
पालकमंत्री अतुलजी सावे हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार व राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र, मंत्रालय, मुंबई यांच्याशी सतत संपर्कात आहेत. या परिस्थितीबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा केली व आवश्यक सुचना दिल्या आहे.
नांदेड जिल्हयातील जे 54 नागरीक मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये अडकून पडले आहेत अशा नागरीकांशी व त्यांच्या नातेवाईकांशी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र हे प्रत्यक्ष संपर्क ठेवून असून मध्यपूर्व मध्ये अडकलेल्या नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन व केंद्र शासन यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करण्यासाठी सतर्क व सज्ज राहण्याच्याही सुचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या नांदेड जिल्हयातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र हे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मध्यपुर्व देशांमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्हयातील नागरिकांसाठी आवश्यक सूचनाः
सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.
भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
आपले लोकेशन व स्थिती कुटुंबीयांना सतत कळवावी.
मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.
सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.
दूतावासाकडे नोंदणी (Registration) करणे अत्यावश्यक.
महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (MEA) एकत्रितपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर 24x07 लक्ष ठेवून आहेत. नागरिकांचे संरक्षण, माहिती समन्वय, आवश्यक ती मदत आणि परिस्थितीनुसार स्थलांतरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
तरी नांदेड जिल्हयातील जे कोणी नागरीक हे कतार, संयुक्त अरब अमिरात, बहरीन या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत व ज्यांनी अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनास संपर्क साधला नसेल अशा नागरिकांनी व तसेच जे कोणी नागरिक हे त्याभागातून परतून घरी आलेले असतील त्यांनी, ते परत आल्याबाबतची माहिती संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील हेल्पलाईन (02462) 235077 वर संपर्क साधून दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राहुल कर्डिले यांनी केले आहे.
००००००
वृत्त क्रमांक
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत
नांदेड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची ७ मार्च रोजी कार्यशाळा
नांदेड दि.४ मार्च :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून तक्रारींचा सत्वर निपटारा करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांची कार्यशाळा शनिवार 07 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच सहकार विभागाशी संबंधित कायदे, नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गृहनिर्माण संस्थांची निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या उपविधीनुसार अध्यक्ष/सचिवांकडून भागधारकांना प्लॉट/सदनिका वाटप केले जाते. त्यानंतर होणारे पुनःहस्तांतरण संस्थेमार्फत केले जाते व त्यासंबंधी वाटपपत्र तसेच भागीदारी प्रमाणपत्र निर्गमित केले जाते. सदर वाटपपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करून त्यावरील मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे.
Maharashtra Stamp Act, 1958 अन्वये गृहनिर्माण संस्थेकडील मूळ वाटपपत्रावर (मूळ सभासद) देय मुद्रांक शुल्क रक्कम 500 रुपये असून विलंब झाल्यास प्रति महिना 2 टक्के दराने कमाल 2 हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो.
तसेच पुनःहस्तांतरणाच्या प्रकरणात प्रचलित बाजारमूल्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. वेळेत भरणा न केल्यास प्रति महिना 2 टक्के दराने दंड तसेच कमाल चारपट दंड लागू होऊ शकतो. पुनःहस्तांतरणाचे वाटपपत्र नोंदणीकृत/मुद्रांकित न केल्यास ते महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 34 नुसार कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य राहत नाही. त्यामुळे भागधारकांना भविष्यात विक्री, हस्तांतरण, गहाणखत किंवा कर्जप्रकरणी अडचणी निर्माण होऊ शकतात.
या बाबींबाबत गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव व भागधारक यांच्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने मुद्रांक जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.
०००००
वृत्त क्रमांक
नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’
टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू
नांदेड दि. ४ मार्च: नागरिकांना महसूल, सामाजिक सुरक्षा योजना, मोजणी, इतर शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे.
मार्च ते मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा केला जाणार आहे.
या अभियानाअंतर्गत महसूल विभागासोबत ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच पोलीस विभाग यांचा समन्वय साधून बहुविभागीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ व ‘सिंगल विंडो प्रणाली’चा अवलंब करून अर्ज स्वीकृती, पडताळणी व सेवा वितरणाची कार्यवाही करण्यात येईल.
अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट
लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी
नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे तत्काळ निराकरण
डिजिटल सातबारा, ८-अ उतारे व इतर सेवांचा जलद पुरवठा
एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ
शिबिरात उपलब्ध सेवा
महसूल दस्तऐवज :
प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८-अ उतारा वितरण, ई-मोजणी अर्ज, घरकुल प्रकरणे, अतिक्रमण विषयक कार्यवाही इत्यादी.
प्रमाणपत्र सेवा :
उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे.
शेती व सामाजिक योजना :
पीएम किसान, संजय गांधी निराधार योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना आदींबाबत मार्गदर्शन व लाभ.
इतर विभागीय सेवा :
ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायत विषयक प्रकरणे
महिला व बालकल्याण विभागाच्या योजना
सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती व अनुदान योजना
पशुसंवर्धन विभागाच्या सेवा
दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन
पोलीस विभागाकडून आवश्यक कागदपत्रांबाबत सहाय्य
मंडळनिहाय वेळापत्रक
तालुक्यातील विविध मंडळांमध्ये खालीलप्रमाणे शिबिरे होणार आहेत
७ मार्च २०२६ – मंडळ तुप्पा
१४ मार्च २०२६ – मंडळ लिंबगाव
१० एप्रिल २०२६ – मंडळ विष्णुपुरी
१७ एप्रिल २०२६ – मंडळ नाळेश्वर
२४ एप्रिल २०२६ – मंडळ नांदेड ग्रामीण
३० एप्रिल २०२६ – मंडळ वाजेगाव
८ मे २०२६ – मंडळ तरोडा (बु.)
१२ मे २०२६ – मंडळ वसरणी
१५ मे २०२६ – मंडळ नांदेड शहर
प्रशासनाची तयारी
अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार संजय वारकड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 मार्च रोजी बैठक घेण्यात आली . सदर बैठकीला ग्रामविकास विभाग ,कृषी विभाग , पशुसंवर्धन विभाग , भूमी अभिलेख विभाग ,पाणीपुरवठा ,महावितरण, पुरवठा विभाग तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रकरणे शिबिराच्या दिवशीच निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रलंबित अर्जांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाचा हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश दिले आहेत.
नांदेड तालुक्यातील नागरिकांसाठी ही शिबिरे ‘एकाच दिवशी, एकाच ठिकाणी’ विविध शासकीय सेवा मिळविण्याची सुवर्णसंधी ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बैठकीस बळवंत मस्के उपाधीक्षक भुमिअभिलेख, स्वप्निल दिगलवार, रविंद्र राठोड, सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी हजर होते.
00000
वृत्त क्रमांक
पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत
असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
नांदेड, ४ मार्च:-सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की
पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही तसेच इंधनदर वाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त नाही. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नांदेड जिल्ह्यात इंधन साठा सुरळीत असून पुरवठा नियमित पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल/डिझेल भरण्यासाठी घाईगडबड करून गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही.
जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
कोणत्याही प्रकारच्या अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
अधिकृत माहिती फक्त शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमांतूनच स्वीकारावी.
पेट्रोल पंपांवर शिस्त राखावी व अनावश्यक रांगा टाळाव्यात.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी भीती न बाळगता व अफवांना बळी न पडता दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवावेत.
०००००
वृत्त क्रमांक
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पत्रकार परिषदेत माहिती
नांदेड दि. 4 मार्च :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्यामध्ये शासनाच्या सुचनेप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व मंडळस्तर व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार प्रमाणपत्रांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिराचे आयोजन शनिवार 7 व 14 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे. तसेच एप्रिल महिन्यात तालुक्यातील मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन शुक्रवार 10,17,24 एप्रिल व गुरूवार 30 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले आहे. नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन शुक्रवार 8 मे, मंगळवार 12 मे तर शुक्रवार 15 मे 2026 रोजी करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत सर्वसामान्य जनतेला विविध सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात महसूल विषयक प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. अभिलेख दुरूस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायदा- तात्काळ सेवा, अकृषिक तरतुदी संदर्भातील सुधारणांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत केले जाणार आहे. Ease of Doing Business सुधारणा व नागरी सुविधा एक खिडकी व्यवस्था तसेच ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पी.एम. किसान, तक्रार निवारण यासह इतर सेवा या शिबिरात उपलब्ध आहेत.
या अभियानांतर्गत पूर्व तयारीच्या अनुषंगाने शाासन निर्णयातील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग दोन जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये परावर्तीत करण्यात आल्या किंवा नाहीत याची तपासणी मंडळ स्तरावर करुन अशा काही जमिनी वर्ग एक मध्ये परावर्तीत करणे बाकी असल्यास त्याबाबत वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
जिवंत सात/बारा मोहिमेंतर्गत शासनामार्फत सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व गावांमध्ये सात/बारा वाचन पूर्ण करुन प्रलंबित नोंदीच्या याद्या तयार करून त्याअनुषंगाने दुरूस्तीबाबत कार्यवाही शिबिरापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबिरापूर्वी भरून समितीच्या बैठकीचे आयोजन करुन लाभ मंजूर करुन घेणे.
तुकडेबंदी कायद्याविरुद्ध 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व हस्तांतरणाबाबत गावनिहाय यादी तयार करणे.
नोंदणीकृत दस्ताच्या आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे सात/बारा मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव, इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे, अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गावनिहाय माहिती गोळा करुन नोंदणीसाठी नोंदणी विभागाकडे पाठविणे, सात/बारा अद्यावत करुन शिबिराच्या दिवशी अद्यावत सात/बाराचे वाटप करण्यात येणार आहे.
मंडळ स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करुन शाळेमध्येच विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. शिबिराच्या दिवशी त्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार उपविभागीय स्तरीय समितीने शिबीर आयोजित करुन मंडळातील पाणंद रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करुन द्यावे. मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करुन तसेच संबंधीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वतयारीच्या कालावधी प्रक्रिया पूर्ण करावी व शिबिरात पट्टे वाटप करावे आदी मार्गदर्शक सुचना शिबिराच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने निर्गमीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
00000
आज पत्रकार परिषद
सर्व सन्माननीय संपादक,पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी, छायाचित्रकार
महोदय,
आज बुधवार दि. ४ मार्च रोजी दुपारी ४ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१) संदर्भात पत्रकारांना माहिती देणार आहेत. त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
पत्रकार परिषद
वेळ :आज दुपारी ४ वा
ठिकाण :जिल्हाधिकारी बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
00000
https://meet.google.com/hpw-sgmb-qsv
पत्रकार बैठक करिता लिंक
जे माध्यम प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही लिंक...
वृत्त क्रमांक महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ...