Thursday, May 7, 2026

वृत्त क्रमांक

रस्तासुरक्षा सरप्राईज गिफ्ट्सचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण

नांदेड दि. 7 मे :- वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि 'सेफर इंडियन रोड्स' (Safer Indian Roads) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते उदात्त कार्यक्रमाचा शुभारंभ आज महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर आयटीआय चौक येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज, वाहतूक पोलीस इन्स्पेक्टर भागवत नागरगोजे हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट घालून वाहतुकीचे नियम व कायदे पाळणाऱ्या नागरिकांना रस्ते सुरक्षा सरप्राईज भेटवस्तू आणि रस्ते चिन्हांचा तक्ता देऊन सन्मानित केले. नागरिकांशी बोलताना, त्यांनी रस्ते चिन्हांच्या तक्त्याचे प्रकाशन केले. जो शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि शाळांना दिला जाईल. ते म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक रस्ता वापरकर्त्याने वाहतुकीचे नियम व चिन्हे यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसेच त्यांनी इतर रस्ता वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, मोटार आणि मानवी लोकसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे धोकादायक #रस्ता वापरकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे आणि जीवघेणे रस्ते अपघात थांबवण्यासाठी प्रत्येक रस्ता वापरकर्त्याने आदराने रस्ते सुरक्षेचे पालन केले पाहिजे.

कार्यक्रमात पोलीस वाहतूक नांदेडचे संतोष तिडके, श्रीमती शिवकांथा जयलवालजी, घनशाम ओझा, परीक्षित ओझा, महेश तिवारी, भास्कर थेटे, सोनू उपाध्याय, तरुण तिवारी, विवेक तिवारी, वरुण तिवारी, श्रीमती ओझा, श्रीमती ओझा, श्रीमती स्वाती उपाध्याय, श्रीमती अनमोल पंडित, कु.नेतल तिवारी, कु.सृष्टी उपाध्याय, बेबी प्रमुघडा सहभागी झाले होते.

00000



















 वृत्त क्रमांक 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये विलंब 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले महसूल सहायकाला निलंबित  

नांदेड दि. 7 मे :- कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील कु. गजेश्री व्यंकटराव गोरे यांची आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कनिष्ठ सहायक या पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS Certificate) प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करुन घेवून त्यांना 10 मार्च 2026 पर्यंत नियुक्ती द्यावयाची होती. संबंधित महसुल सहायक माधव हरी फुलवळे यांनी 23 मार्च 2026 रोजी मुदत संपल्यावर पडताळणी अहवाल सादर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महसूल सहायक माधव हरी फुलवळे यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद नांदेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो पडताळणीसाठी 23 सप्टेंबर 2025 रोजी कंधार तहसिलदार यांना पाठविण्यात आला होता. या तहसिल कार्यालयातील महसुल सहायक माधव हरी फुलवळे यांनी 23 मार्च 2026 रोजी तो पडताळणी अहवाल सादर केला.

परंतू या उमेदवाराच्या भरती प्रक्रियेची मुदत ही 10 मार्च 2026 रोजी संपुष्टात आल्यामुळे कु. गजेश्री गोरे यांना शासकिय नोकरी मिळण्यास अडचण निर्माण झाली. ही बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेत संबंधित महसूल सहायक माधव हरी फुलवळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांना शासन सेवेतून निलंबित केले.

00000

 वृत्त क्रमांक 

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा

नांदेड, दि. 7 मे : यंदाच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केल्याने संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या निर्देशानुसार हा आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

आराखड्यानुसार धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात तसेच नदीकाठच्या जमिनींवर विशेष चारा लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता राहावी यासाठी मुरघास प्रकल्पांना गती दिली जाणार असून, भविष्यात चारा छावण्यांची वेळ येऊ नये यासाठी चारा साठवणुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच चारा साक्षरता अभियान राबवून पशुपालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

पशुपालकांनी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करून चाऱ्याची बचत व योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत दुग्ध उत्पादक पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. बाहेरील जिल्ह्यात चारा वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे. 

राज्यात सध्या हिरव्या चाऱ्याची ४३.९८ टक्के आणि सुक्या चाऱ्याची २५.१२ टक्के तूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एल-निनोमुळे पावसात घट झाल्यास ही तूट आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत पहिल्या टप्प्यात १०० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, चारा बियाणे खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) अकोला यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. बियाणे वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Wednesday, May 6, 2026

 वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा* 

18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी

'एक जिल्हा एक नोंदणी'व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड दि. 6 मे :- प्रशासकीय पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे नांदेड जिल्हातील नोंदणी व मुद्रांक विभागाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात लक्षणीय टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील 18 सह दुय्यम निबंधक कार्यालयांच्या माध्यमातून तब्बल 65 हजार 674 दस्तांची नोंदणी झाली आहे. याद्वारे शासनाला 221 कोटी 43 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे याच काळात 344 विशेष विवाहाची नोंद देखील यशस्वीरित्या झाली आहे. 

जनतेच्या सुविधेसाठी प्रशासन सदैव तत्पर

सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विभागाच्या कामकाजाबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी कार्यालयात एक विशेष कक्ष तयार केला आहे. त्यामाध्यमातुन नागरिकांना महाराष्ट्र शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि योजनांची माहिती दिली जात आहे. तसेच त्यासंबंधी सर्व सह दुय्यम कार्यालयातील दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत.  जनतेच्या सोयी साठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणीचे काम सुरु असून,  दस्त नोंदणीसाठी नागरिकांना वेळ मिळावा यासाठी दर शनिवारी आणि रविवारी देखील जिल्ह्यातील एक सह दुय्य्म  निबंधक कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. 'एक जिल्हा एक नोंदणी' (One District One Registration) या संकल्पनेमुळे आता पक्षकार आपल्या सोयीनुसार जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात दस्त नोंदणी करू शकतात. यामुळे पक्षकार यांना जवळ असलेल्या कार्यालयात जावून दस्ताची नोंदणी शक्य झाली असून, त्यांना लांबवरचा प्रवास टाळता येतो. महिलांच्या नावे निवासी मिळकत खरेदी होत असेल तर शासनाने महिलांना मुद्रांक शुल्क मध्ये 1 टक्के सवलत दिली आहे. 

जमीन महसूल संहिता 1966 यांच्या कलम 85 अन्वये सहधारकांनी निष्पादीत केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखावर तसेच वडिलोपार्जीत शेतजमीनी बाबत वारसाने हक्क प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी निष्पादित केलेल्या वाटणीपत्रास नाममात्र नोंदणी फी 100 रुपये इतकी केली आहे. 

शेतजमीनीच्या वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आणि ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या योजने अतंर्गत वादातील असलेल्या शेत जमीनीचे अदलाबदल अत्यल्प मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये व नोंदणी फी 1 हजार रुपये इतके कमी करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या इतर योजनांची माहिती देण्यात आलेली आहे. नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देताना मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की, "दस्त नोंदणी ही एक कायदेशीर आणि सोपी प्रक्रिया आहे. नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थाच्या (एजंट) आमिषाला बळी न पडता थेट सह दुय्यम निबंधक कार्यालयात यावे. तेथील अधिकाऱ्यांकडून दस्त नोंदणीची प्रक्रिया समजून घ्यावी आणि स्वतःहून दस्त नोंदणी व इतर कामे करुन घ्यावीत. 

तसेच अधिक माहिती साठी विभागाचे IGRMAHARASHTRA या संकेतस्थळावर भेट दयावी. नोंदणी व मुद्रांक विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे आणि “पारदर्शक व्यवहार हाच नागरिकांचा हक्क आहे," असे त्यांनी सांगितले.

00000

वृत्त क्रमांक 

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित

सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत

नांदेड, दि. 6 मे :- नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानाची तीव्रता लक्षात घेवून उष्मालाटेमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थीती उद्भवू नये व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी राहुल कर्डिले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30 अन्वये नांदेड जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व खाजगी क्लासेसबाबत आदेश निर्गमित केले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी क्लासेसनी सकाळी-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईन-डिजीटल माध्यमातून क्लासेस घेण्यात यावेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत कुठल्याही खाजगी क्लासेस संस्थानी व्यक्तीश: विद्यार्थ्यांना बोलावून क्लासेस घेवू नयेत. याबाबत वेळोवेळी हवामान खात्यामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या हवामान इशाऱ्याची देखील नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जसे की, पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था, आरोग्यविषयक सूचना इ. कराव्यात. पालकांना याबाबत योग्य मार्गदर्शन करावे. हा आदेश 31 मे 2026 पर्यंत वैध राहील. या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यातील युवकांना इस्रायलमध्ये 

३ हजार ५०० 'होम बेस्ड केअरगिव्हर' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

'महाराष्ट्र इंटरनॅशनल' पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 6 मे : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये 'घरगुती केअरगिव्हर' (Home Based Caregiver) या पदासाठी ३ हजार ५०० उमेदवारांची मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आरोग्य आणि सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, यासाठी 'महाराष्ट्र इंटरनॅशनल' https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

भरतीचे मुख्य तपशील आणि पात्रता:

या भरती प्रक्रियेत ९० टक्के महिला आणि १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्जदाराचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि किमान १० वी उत्तीर्ण पात्रता अनिवार्य आहे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर आणि वजन ४५ किलो किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील (Intermediate) ज्ञान असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता:

उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये किमान ९९० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरी यापैकी मान्यताप्राप्त संस्थेचा डिप्लोमा किंवा पदवी (GDA/ANM/GNM/BSc Nursing) धारण केलेली असावी.

वेतन आणि इतर सवलती:

निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ६४४३.८५ Israeli New Shekel (NIS) म्हणजेच अंदाजे १ लाख ९९ हजार ७७० रुपये इतके आकर्षक वेतन मिळेल. याशिवाय नियोक्त्याकडून राहण्याची सोय, भोजन आणि वैद्यकीय विम्याची सुविधा पुरवली जाणार आहे.

नोंदणी प्रक्रिया:

इच्छुक पात्र उमेदवारांनी आपली माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 'महाराष्ट्र इंटरनॅशनल' https://maharashtrainternational.com या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीनंतर पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन आणि व्हिडिओ मुलाखतीद्वारे पार पडेल.

महत्वाच्या अटी:

उमेदवाराने यापूर्वी कधीही इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, पालक किंवा मुले) सध्या इस्रायलमध्ये कार्यरत नसावेत. निवड प्रक्रियेसाठी पोलीस पडताळणी अहवाल (PCC) आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी उमेदवारांनी त्वरीत अधिकृत पोर्टलला भेट द्यावी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात 7 मे रोजी यलो अलर्ट जारी

विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड, दि. 6 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 06 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 7 मे 2026 या एक दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच  झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक रस्तासुरक्षा सरप्राईज गिफ्ट्सचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण नांदेड दि. 7 मे :- वाहतूक पोलीस, परिवहन विभा...