Monday, July 6, 2026

वृत्त क्रमांक 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे देगलूर येथे आयोजन 

नांदेड दि. 6 जुलै :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड अक्का महादेवी शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 8 जुलै 2026 रोजी अक्का महादेवी शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह / रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापना, हॉस्पिटल मध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 8 जुलै रोजी सकाळी 11 वा. पासून अक्का महादेवी शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगररोड बाबानगर नांदेड संपर्क ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com  दुरध्वनी क्रमांक संर्पक क्र. 02462-251674 येथे संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

फळ पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना मृग बहार सन 2026-27 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णय नुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना लिंबू, मोसंबी, सीताफळ, चिकू, पेरू, संत्रा आणि हळद या अधिसूचित पिकांकरिता अधिसूचित महसूल मंडळामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, स्टॉक एक्सचेंज टावर्स, विसावा मजला, दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई 400 023 मार्फत राबविण्यात येत आहे.






 

वृत्त क्रमांक 

जुलै अखेरीस ४० हजारांहून अधिक अपूर्ण घरकुले पूर्ण करा; 

सीईओ महेश पाटील यांचे निर्देश

नांदेड, दि. ६ :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत तिसरा हप्ता वितरित झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांचे काम जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच विविध राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, सर्व विभाग प्रमुख तसेच जिल्ह्यातील गट विकास अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तिसरा हप्ता प्राप्त झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांची ग्रामीण गृहनिर्माण अभियंता निहाय लाभार्थी यादी तयार करून प्रत्येक घरकुलाचे नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक लाभार्थ्याशी सातत्याने संपर्क ठेवून प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश देण्यात आले.

याशिवाय, प्रलंबित घरकुलांचे वर्गीकरण, पात्र लाभार्थ्यांना वेळेत निधी वितरण, पूर्ण झालेल्या घरकुलांना सौर ऊर्जेचा लाभ, रमाई, शबरी व मोदी आवास योजनांतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, मनरेगाच्या समन्वयातून घरकुलांची कामे पूर्ण करणे तसेच आवास प्लस सर्वे २०२४ आणि पीएम जनमन योजनेतील प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या.

00000





वृत्त क्रमांक 

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत विशेष अंमलबजावणी मोहि 

नांदेड दि. 6 जुलै :- भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देशभरात 19 जून ते 20 जुलै 2026 या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना ऑगस्ट 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, पिक काढणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. 

या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या कर्जावर 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जासाठी 3 टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पांमध्ये गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. 

पात्र लाभार्थी

वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट (SHGs), कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्था या आहेत. 

या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यात व्यापक जनजागृती, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका तसेच लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र शेतकरी व संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयीकृत/अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उद्योजक व इतर लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेऊन कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा व शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळाव आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक आत्‍मा नांदेड यांनी केले आहे.

0000000

 दक्षिण मध्य रेल्वे प्रेस नोट क्र. 226 

नांदेड – मुंबई व टनकपूर – नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा

टनकपूर – पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तार

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दि. ०६ जुलै २०२६ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई व टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तारही करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले.

या निमित्ताने नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. टनकपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, अजय टम्टा तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पिलीभीत येथे केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद व इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी नांदेड रेल्वे स्थानकावर खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. कविता संतोष मुळे, खासदार मा. डॉ. अजित माधवराव गोपछडे, खासदार मा. श्री. रवींद्र वसंतराव चव्हाण, खासदार मा. बळवंत बसवंत वानखेडे, विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ अनंतराव राजूरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. संजय कुमार श्रीवास्तव, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले तसेच इतर रेल्वे अधिकारीही या कार्यक्रमास उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसची सुरुवात ही जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या अपेक्षांची पूर्तता आहे. ही नवीन रेल्वे सेवा उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करेल तसेच नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाडा परिसरातील, विशेषतः वाशीम, हिंगोली आणि बसमत येथील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत भारतीय रेल्वेने केलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या कालावधीत 37,000 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून रेल्वे जाळ्याचे 99.6 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच समर्पित मालवाहतूक मार्ग (Dedicated Freight Corridors) वेगाने प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारा व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये सातत्याने नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी जून महिन्यापर्यंत उन्हाळी हंगामात 15,000 हून अधिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान सुमारे 12,000 विशेष गाड्या चालविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नवीन रेल्वे सेवांच्या प्रारंभाबद्दल जनतेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील विशेषतः बसमत,  हिंगोली, वाशीम, अकोला आणि नांदेड जिल्ह्यांतील प्रवाशांना मुंबईसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क उपलब्ध होईल. तसेच टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे उत्तराखंड व उत्तर प्रदेशातील भाविकांना नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वाराला जाणे अधिक सुलभ होईल.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे श्रद्धा, पर्यटन आणि विकासाला चालना मिळून उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. ही नवीन रेल्वे सेवा महत्त्वाच्या स्थळांमधील संपर्क अधिक सक्षम करेल, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून या नवीन रेल्वे सेवा सुरू केल्याबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड आणि नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील तसेच या भागातील जनतेला अधिक चांगली संपर्क सुविधा उपलब्ध होईल.

नांदेड रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात खासदार अशोकराव शंकरराव चव्हाण यांनी सांगितले की, या दोन नवीन रेल्वे सेवांमुळे नांदेड आणि मराठवाड्याचा देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. गेल्या काही वर्षांत लोकांच्या सहकार्यामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे नांदेड परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी सांगितले की, नांदेड–मुंबई एक्सप्रेस विद्यार्थी, भाविक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील प्रवाशांसाठी विशेषतः लाभदायक ठरेल. या नवीन रेल्वे सेवांमुळे परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. अजित माधवराव गोपछडे यांनी मा. पंतप्रधान आणि मा. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे नांदेड–मुंबई व टनकपूर–नांदेड या नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू केल्याबद्दल आभार मानले. या गाड्यांमुळे नांदेडचा महाराष्ट्रातील तसेच उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांशी संपर्क अधिक सुदृढ होईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी सांगितले की, नांदेड–मुंबई आणि नांदेड–टनकपूर एक्सप्रेसमुळे नांदेडचा संपर्क आणि पर्यटनाला अधिक चालना मिळेल. नांदेड हे हैदराबाद, मुंबई आणि नागपूर यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी रेल्वे सेवा सुरू करण्याची त्यांनी मागणी केली.

यापूर्वी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी स्वागतपर भाषण केले.

0000









वृत्त क्रमांक 

मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR ) 

राष्ट्रीय कार्यात रायवाडी गावाची आघाडी

नांदेड दि. 6 जुलै :- मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) चे राष्ट्रीय काम जलदगतीने व्हावे, मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बिएलओ) यांना मदत व्हावी आणि जि.प. रायवाडीची शाळा व्यवस्थित चालावी म्हणून गावचे पोलीस पाटील वैजनाथ पांचाळ यांच्या संकल्पनेतून रायवाडी ता. लोहा येथे यशस्वी उपक्रम राबवण्यात आला.                            

जिल्‍हाधिकारी यांनी घेतली रायवाडीच्‍या कामाची दखल 

मौ.रायवाडी ता लोहा येथे 3 जुलै रोजी विशेष कॅम्‍प आयोजित करून मतदार याद्याच्‍या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कामाचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सबंधीत सर्व यंत्रणेचे कौतुक केले आहे. तसेच जिल्‍हाधिकारी यांनी नांदेड जिल्‍ह्यातील सर्व मतदार केंद्रस्‍तरीय अधिकारी (बिएलओ) शाळा मुख्‍याध्‍यापक, शाळा व्यवस्‍थापन समिती यांना आवाहान केले आहे कि, रायवाडी गावाप्रमाणे शाळा सुरू होण्‍यापुर्वी सर्व मतदारांनी बिएलओ यांचे कडुन गणना फॉर्म घेवून शाळा सुटल्‍यानंतर गणना फॉर्म भरून परत करावे. अशा प्रकारे शाळाच्‍या कामकाजात व्‍यत्‍यय येणार नाही व मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे काम ही सुरळीत होईल.

दिनांक 2 जुलै रोजी गावात दवंडी देवून ग्रा.प. कार्यालयात  तहसीलदार लोहा यांच्या उपस्थितीत नोंदणी कॅम्प घेण्यात येत असल्याचे कळविण्यात आले. त्‍यानुसार हनुमान मंदिर, मज्जीद आणि शाळेच्या ध्वनीक्षेपकावरून प्रसिध्‍दी देण्‍यात आली.  विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून शिक्षकांनी नागरिकांना राष्ट्रीय कार्यात त्वरित सह‌भागी होण्याचे आवाहन केले.

3 जुलै रोजी ग्रा.प. कार्यालय रायवाडी येथे मतदार यादीतील मतदारांच्या ओळखी करून सकाळी  06.30 वाजता त्यांना गणना प्रपत्र देण्यात आले. त्यांना वैयक्तीक माहिती भरण्यास बिएलओ यांनी मार्गदर्शन केले. तसेच सायंकाळी मौ. रायवाडी येथे दोन मतदान केंद्र असून एकूण -1433 मतदार आहेत.  900 मतदारांना गणना प्रपत्र वाटप करून प्रपत्र सायंकाळी 4 (चार) वाजता परत घेण्यात आले. सदरील कामास सर्व राजकीय पक्ष, गावकरी यांचे सहकार्य लाभले. 

या कार्याची दखल घेऊन तहसीलदार लोहा विठ्ठल परळीकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) व्यवहारे यांनी "टीम रायवाडीचे" अभिनंदन केले. शिल्लक मतदारांनी या राष्ट्रीय कार्यात सह‌भागी होण्याचे अवाहन केले.

0000

कर्जमुक्ती बाबत शेतकऱ्यांना पडणारे काही प्रश्न आणि उत्तरे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ :

वृत्त क्रमांक   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे देगलूर येथे आयोजन   नांदेड दि. 6 जुलै :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगा...