Saturday, April 25, 2026

 वृत्त क्रमांक 

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा 

नांदेड दि. 25 एप्रिल :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 26 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.01 वा. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सामुहिक विवाह मेळावा येथे उपस्थिती. स्थळ- पंचशिल माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हदगाव. दुपारी 1.45 वा. हदगाव येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि. नांदेड येथे सदिच्छा भेट. स्थळ- तरोडा नाका पुर्णा रोड नांदेड. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 

खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी ‍जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी

नांदेड, २५ नांदेड:- खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवीन मोंढा, नांदेड येथील वसुंधरा फर्टीलायझर्स कृषी निविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देवून साठा केलेल्या खताची तपासणी केली तसेच  श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे अचानक भेट देऊन बाजारातील खते व बियाणे पुरवठा व विक्री संदर्भात माहिती घेतली. कृषी निविष्ठा विक्रेते यांचे परवाने, साठा रजिस्टर, इ-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्षात खताचा किती साठा आहे हे तपासले.

याबाबत कृषी निविष्ठा विक्रेते यांना इ-पॉस मशीन शिवाय खत विक्री करू नये तसेच खताची साठेबाजी करू नये अशा सूचना दिल्या. युरिया व डीएपीच्या विक्री बाबत जिल्ह्यातील सर्व कृषि क्रेंदाची खरीप हंगामपूर्व 100 टक्के तपासणी पूर्ण करण्याबाबत कृषि अधिकारी गुणनियत्रण तालुका नांदेड श्रीमती चातरमल यांना सुचना देण्यात आल्या. तसेच दर्शनी भागात फलक लावण्याबाबत सुचना दिल्या. ई-पॉस वरून खतांचा अहवाल काढून प्रत्यक्ष भौतीक साठ्यासोबत व साठा रजीस्टर सोबत जुळतो किंवा कसे याची पडताळणी केली. खत विक्रीच्या भौतीक बीलांची तपासणी केली व शेतकरी बांधवांनी प्रत्यक्षात ते खरेदी केल्याची खातरजमा केली. 

शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खत टंचाई, कृत्रीम साठेबाजी, लिकींग पद्धत व काळा बाजार होणार नाही यासाठी कडक सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, खतांचा साठा लपून किंवा कृत्रीम टंचाई निर्माण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. लिकींग पद्धतीने विक्री केल्यास व शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तात्काळ परवाने निलंबीत करण्यात येतील असे स्पष्ट निर्देश दिले. ज्यादा दराने खत विक्री केल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या निविष्टा विरूद्ध शून्य सहनशिलता धोरण राबवीण्याचे स्पष्ट केले. कृषी निविष्टा गुणवत्ता नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणेबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिल कुमार ऐतवाडे विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तालुका गुणनियंत्रण निरीक्षक श्रीमती पुनम चातरमल, आरसीएफ जिल्हा प्रतिनिधी श्री. कापसे व इफको जिल्हा प्रतिनिधी श्री. घाडगे हजर होते.

००००००




 वृत्त क्रमांक 

जागतिक हिवताप दिन नांदेड येथे साजरा 

नांदेड :- आज दि.२५ एप्रिल " जागतिक हिवताप दिन " निमित्त नांदेड येथे जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ श्री अमृत चव्हाण,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत रिठे,शहर क्षयरोग अधिकारी डॉ बद्दीओदीन सर यांच्या हस्ते " जागतिक हिवताप दिन " महात्मा गांधी पुतळा पासुन ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. 

यावेळी सहाय्यक अधिक्षक विजय चव्हाण,आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले,गंगाधर गनलेवार, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे,सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, बालाजी निलपत्रेवार,अरुण आळणे, सुरेश आरगूलवार, मनोहर खानसोळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास नाईक, सचिव दळवी,राजु शेट्टे, वैभव कौशल्ये,आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, गणेश भुसा, प्रभाकर मुंगल, व्यंकटी बकाल,भारत हांम्पले, उत्तम कराड, व्यंकट मोरे, अनिल सुर्यवंशी,यासीन शेख,चंद्रभान धोंडगे,सुनिल बगाटे, विष्णूदास गलपवाड, संजय कळसे,रणखांब,पवार, देविदास पेंढारकर,भिमराव राठोड, शेख खलील, कैलास कुंटुरवार,परमेश्वर स्वामी मठदेवरु, लिपिक पांडुरंग बोरकर, क्षेत्र कर्मचारी यांच्यासह असंख्य कर्मचारी रॅलीत सहभागी होते. व्यंकटेश पुलकंठवार यांनी डास निर्मुलन प्रतिज्ञा देऊन रॅलीचा समारोप केला.
00000

 वृत्त क्रमांक 

उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी

नांदेड दि. 25 एप्रिल :- सध्या वाढत्या तापमानामुळे (Heat Wave परिस्थिती) दुपारी 12 ते सायं. 4 या वेळेत उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच कारखान्यातील, दुकानातील, हॉटेल्स मधील, खाद्यागृहे, आय टी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, किरकोळ विक्रीची दुकाने, एमआयडीसी मधील उद्योगातील कामगार व इतर ठिकाणी काम करण्याऱ्या कामगारांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व आस्थापनांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना तात्काळ राबविणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.

दुपारी 12 ते 4 यावेळेत कामगारांकडून कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करून घेण्यात येऊ नयेत, यास्वरूपाच्या कामाच्या  वेळापत्रकात बदल करण्यात यावा किंवा अशी कामे बंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.  कामगारांसाठी सावली (Shade), विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा. कामाच्या ठिकाणी स्वच्छ थंड व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता संबंधी सूचना तसेच  आपत्कालीन नंबर स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावा. स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय ठेऊन उष्माघात सारखी प्रकरणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याची सोय करावी.

या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सहायक कामगार आयुक्त आशिष दिलीप ढवळे यांनी दिला आहे.

00000

Friday, April 24, 2026

 वृत्त क्रमांक 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी

 

नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

 

नांदेड दि. 24 एप्रिल :  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत ४,३४,८१९ शेतकऱ्यांनी ८,२९,७३७ विमा अर्ज दाखल केले असून ५,१३,९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता.  माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी रु.८१३.९३ कोटी रक्कम मंजूर झाली असून पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास दि.२१.०४.२०२६ पासून सुरुवात झाली आहे.

 

योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असून जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयबीन, मुग, उडीद, पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सोयबीन, मुग, उडीद, कापूस, तूर आणि ज्वारी पिके अधिसूचित असून खरीप हंगाम सन २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्नावर आधारित पिक विमा राबविण्यात येत आहे. सदर पिकांचे जिल्ह्यात ३३१२ पिक कापणी प्रयोग नियोजित होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर पिक नुकसान झाल्यामुळे श्री. राहुल कर्डिले मा.जिल्हाधिकारी, नांदेड व श्री. दत्तकुमार कळसाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पिक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन करून महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठक आयोजित करून सर्व पिक कापणी प्रयोग CCE मोबाईल app वर होतील व वस्तुनिष्ठ होतील याची खबरदारी घेतली.  पिक कापणी प्रयोगाचे काम सुरु असताना पिक विमा कंपनी कडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. सदर आक्षेपाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांचे अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने निराकरण केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुधारित पिक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटका अंतगर्त रु.८१३.९३ कोटी रक्कम सोयाबीन, मुग व उडीद पिकासाठी मंजूर झाला आहे.

 

पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून ऑनलाईन DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून सद्यस्थितीत मंजूर रु.८१३.९३ कोटी रकमेचे वितरण सुरु असून सर्व विमाधारक शेतकऱ्यांना योजनेच्या पोर्टलवर शेतकरी लॉगिन मध्ये आधार नंबर टाकून OTP प्रविष्ट केल्यावर आपली मंजूर रक्कम पाहता येईल.

0000000

 वृत्त क्रमांक 

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण ; सहकार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड दि. 24 एप्रिल :  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेडच्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. २४) मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना “मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूर्वजांनी उभी केलेली सहकार चळवळ महाराष्ट्राची ओळख जगभर पोहोचवणारी ठरली आहे. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळणे महत्त्वाचे असून, त्यासाठी बँकांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, बँकेचे उपाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, नरेंद्र चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संचालक कैलास गोरठेकर, गोविंदराव नागेलीकर, बाळासाहेब रावणगावकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपनिबंधक शंभूराज हिरे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक व विविध मान्यवर, शेतकरी, नागरीक आदींची उपस्थिती होती.

श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी पद्मश्री स्व. श्यामराव कदम व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र गीताने वातावरण भारावून गेले.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सहकारी बँका चालविताना अनेक अडचणी येतात. मात्र त्या अडचणींवर मात करून नांदेड जिल्हा बँकेने प्रगतीचा मार्ग धरला आहे. आगामी काळात बिंदूनामावलीनुसार पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत तंत्रज्ञान व खतांचा योग्य वापर करावा आणि इतर बँकांकडे न वळता जिल्हा बँकेशी व्यवहार वाढवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

बँकेच्या विकासात माझाही खारीचा वाटा : अशोकराव चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात जिल्हा बँकेच्या पुनरुत्थानाचा इतिहास उलगडला. जिल्हा बँक डबघाईस आली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बँक बंद करण्याच्या विचारात होते. मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मी बँकेला जिवंत ठेवण्याची विनंती केली आणि गॅरंटी घेतली. मुख्यमंत्री असताना १२५ कोटींच्या कर्जाचे रुपांतर अनुदानात केल्यामुळे बँक टिकली. त्यामुळे या बँकेच्या विकासात माझाही खारीचा वाटा आहे, असे ते म्हणाले.

भोकर बाजार समितीने बँकेच्या इमारतीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सभापती जगदीश पाटील व संचालक मंडळाचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी तर आभार प्रदर्शन संचालक रामचंद्र मुसळे यांनी केले. या नवीन वास्तूमुळे भोकर परिसरातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

00000











https://www.youtube.com/live/UHadR6B5aF0?si=FsVoGBfgOY5H19Xo

 वृत्त क्रमांक 

डंख छोटा धोका मोठा

हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी 

नांदेड दि. 24 एप्रिल : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Driven to End Malaria : Now We Can.Now We Must मराठी भाषांतर हिवताप दुरिकरणासाठी कटिबध्द : आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे असे असून भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, किटकजन्य आजार नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावे.  

मागील तीन वर्षात नांदेड जिल्हयातील हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2023 मध्ये 5,17, 519 तर मार्च 2024 मध्ये 5,90,936, सन 2025 मध्ये 6,44,884 तर मार्च 2026 अखेर 1,49,837 याप्रमाणे घेतलेले व तपासलेले रक्त नमुने आहेत. तर हिवताप आजारात मागील तीन वर्षात मृत्यू निरंक आहेत.   

हिवताप

हिवताप हा आजार "प्लाझमोडीअम" या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

डासांची उत्पत्ती

स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. 

हिवतापाचा प्रसार

हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

 हिवतापाची लक्षणे

थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतो, ताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

रोग निदान

प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.

 तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

औषधोपचार

कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

 हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना 

आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरूण घेवून झोपावे. संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) नये. 

घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. 

वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. 

वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

 00000

  वृत्त क्रमांक   उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा   नांदेड दि. 25 एप्रिल :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उद...