Wednesday, June 3, 2026

 वृत्त क्रमांक 

शेतमालामध्ये भेसळ व रासायनिक प्रक्रिया करण्यास प्रतिबंध 

नांदेड दि. 3 जून :- बाजार क्षेत्रात शेतीच्या व इतर विवक्षित उत्पन्नाच्या खरेदी-विक्रीचे नियमन आणि त्यासाठी स्थापन करावयाच्या बाजाराचे नियमन करणे, शा बाजाराशी संबंधित असलेल्या प्रयोजनासाठी कार्य करणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समिती, थेट पणन परवाना धारक, खाजगी बाजार यांना शक्ती प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये तरतुदी नमुद आहे. शेती उत्पादकाचा माल योग्य रितीने विकला जावा, तो फसविला जाऊ नये तसेच खरेदीदाराला एकत्रित माल मिळुन सरस नीरस प्रत ठरविणे सोयीचे व्हावे, चांगल्या दर्जाचे शेतीमालाचे उत्पादन होण्यास उत्तेजन मिळावे इत्यादीसाठी नियंत्रित बाजार क्षेत्रांची स्थापन करण्यात आले आहे. या अधिनियमातील कलम 5 ड अन्वये थेट पणन परवाना, खाजगी बाजार, शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करण्यासाठी, शेतमाल खरेदी-विक्रीसाठी तसेच त्या अनुषंगाने प्रक्रिया व इतर बाबींसाठी परवाना घेऊन व्यवहार करता येतील. 

बाजार समित्यांनी त्यांच्या बाजार क्षेत्रात खरेदी-विक्री होणाऱ्या शेतमालाच्या व्यवहाराच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत कलम 29 मध्ये तरतुदी नमुद आहेत. बाजार क्षेत्रातील शेतमाला खरेदी-विक्री संबंधाने भेसळ टाळण्यासाठी वजन-मापे याबाबत तक्रारी उद्भवल्यास त्याचे निराकारण करण्यासाठी वाचावे क्र. 2 मध्ये नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. 

कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार व थेट पणन परवानाधारक यांना या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, त्यांच्या संबंधित बाजार क्षेत्रात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारामध्ये फळे कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी आणि त्यांची गोडी वाढविण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर करणे, फळे-भाजीपाला व अन्नधान्य यांना कृत्रिमरित्या रंगविणे, फळे-भाजीपाला व इतर शेतीमाल दिर्घकाळ टिकविण्यासाठी तसेच आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणे इत्यादी बाबी टाळण्यासाठी वेळोवेळी परवाना धारक व्यापारांची काटेकोरपणे तपासणी करुन आवश्यक उपाययोजना करावी. 

दैनंदिन भाजीपाला, फळे, फुले यांची विक्री, वाहतुक, साठवण, यासाठी विहीत जाडीपेक्षा कमी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून पर्यावरणपुरक साहित्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अन्नधान्यामध्ये आणि फळे-भाजीपाला यामध्ये भेसळ, घातक रसायनांचा वापर केला असल्याचा संशय असल्यास अशा शेतमालाच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून दोषी व्यक्तीविरुध्द अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अन्वये कारवाई प्रस्तावित करावी. 

अन्न भेसळ करण्याऱ्या परवानाधारकांचा परवाना रद्द करण्याची व त्या परवाना धारकास उपलब्ध करुन दिलेल्या सोयी-सुविधा काढून घेण्याबाबतची कार्यवाही त्या-त्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत तात्काळ होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पणन संचालक यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे.

000000

वृत्त क्रमांक 

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावे

ॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. ३ जून :- केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲप (BSA) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या हयात प्रमाणपत्र सादर करता येणार असून वेळेची बचत होण्यासोबतच कार्यालयीन हेलपाट्यांपासूनही दिलासा मिळणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, जेणेकरून त्यांचे अनुदान बंद होणार नाही, असे आवाहन तहसिलदार, संगायो (शहर) डि . एन गायकवाड यांनी केले आहे.

राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणारे वृद्ध, विधवा, निराधार पुरुष-महिला तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती यांना यापूर्वी बँक, पोस्ट ऑफिस किंवा तहसील कार्यालयात जाऊन हयात प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागत होते. अनेकदा विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्याने लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागत होते.

या अडचणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी बेनिफिशरी सत्यापन ॲप (BSA) द्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्यास मान्यता दिली आहे.

लाभार्थ्यांकडे स्वतःचा मोबाईल उपलब्ध असल्यास ते स्वतः किंवा नातेवाईकांच्या मदतीने हयात प्रमाणपत्र सादर करू शकतात. तसेच ग्राम महसूल अधिकारी, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र आदींच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

विशेष सहाय्य योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत हयात प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई

शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

नांदेड, दि. ३ जून : राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७ अंतर्गत आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही व्यापाऱ्याने, संस्थेने, शेतकरी उत्पादक कंपनीने अथवा शेतमाल व्यापाराशी संबंधित इतर घटकांनी आवश्यक परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे पणन संचालक शरद जरे यांनी दिला आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये अनेक व्यापारी, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतमालाची खरेदी-विक्री विनापरवाना होत असल्याच्या तक्रारी पणन संचालनालयाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या असतानाही काही व्यापारी व संस्था परवान्याविना शेतमाल व्यापार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. ५ जुलै २०१६ रोजी अध्यादेश क्रमांक १५ राजपत्रात प्रसिद्ध केला असून, त्याच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचना ८ जुलै २०१६ रोजी निर्गमित करण्यात आल्या होत्या. तसेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार मुख्य अधिनियमाच्या कलम ६ (२) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार कलम ५ (ड) अंतर्गत परवाना घेणे आवश्यक राहील; मात्र अशा परवानाधारकांकडून बाजार समितीला कोणतेही बाजार शुल्क आकारता येणार नाही. कायद्यातील कलम ५ (ड) नुसार थेट पणन, खाजगी बाजार शेतकरी-ग्राहक बाजार आणि ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म या प्रयोजनांसाठी परवाने देण्यात येतात.

त्यामुळे शेतमाल व्यापार करणाऱ्या सर्व व्यापारी, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व अन्य संबंधित घटकांनी कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा. अन्यथा त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पणन संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

नांदेड दि. 3 जून :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक-युवतीसाठी १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CDS कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी १४ जून २०२६ सकाळी १० वा. प्रशिक्षण केंद्रात उपस्थित रहावे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. नांदेड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा संनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 7 जून 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW Portel (Resources - PCTC Nshik-CDS-६७) किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या, प्रवेशपत्र, त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परीक्षेसाठी आनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा ई-मेल आयडी training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

Tuesday, June 2, 2026

वृत्त क्रमांक 

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

नांदेड दि. 2  जून :- नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या व्दिवार्षीक निवडणूक-2026 साठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे (भाप्रसे) यांचे 1 जून रोजी नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पाहणी केली.  

त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी याप्रसंगी चर्चा केली. तसेच विविध निवडणूक कक्षासह, प्राप्त नामनिर्देशन अर्ज व मतदार यादीबाबत माहिती घेतली.  

येथील स्नेहनगर शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात त्या थांबणार आहेत. नागरिकांना नांदेड विधान परिषदेच्‍या निवडणुकी संदर्भात असणाऱ्या समस्यांबाबत 2 ते 4 जून , 12  ते 14 जून आणि 17 ते 22 जून 2026 या कालावधीत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्यांचा ई-मेल आयडी observer.mlc.ned@gmail.com आहे. त्यांचा संपर्क क्र. 9637228955 आहे. 

00000



वृत्त क्रमांक 

गुटखा-पानमसाला,  खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई 

नांदेड दि. 2 जून :- सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुटखा-पानमसाला,  खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ व इतर अन्नपदार्थांवर, साठ्यांवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पाडण्यात आली आहे. 

प्राप्त गोपनीय माहिती व नियमित तपासणीच्या आधारे शुक्रवार 29 मे 2026 रोजी मे. एम.ए. शरीफ जुना मोंढा नांदेड या आस्थापनेची तपासणी करून आस्थापनेतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 718 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 14 हजार 880 किंमतीचा अन्न पदार्थ कायद्याचे उल्लघंन करत असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे. 

शनिवार 30 मे 2026 रोजी  मे. रॉयल बेकरी, धनेगाव, ता.जि. नांदेड या पेढीतून रूपये 25 हजार 840 किंमतीचा मिल्क रस्क या मिथ्याछाप अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. रहिम किराणा दुकान माहूर या पेढीतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 358 कि. ग्रॅ. रूपये 57 हजार 280 किंमतीचा अन्न पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.  तसेच मे. भैरूनाथ आईसक्रिम ॲण्ड कुल्फी हदगाव या पेढीतून कुल्फी, मिल्कशेक या अन्न पदार्थाचा 238 लिटर,  रूपये 51 हजार 900 एवढया किंमतीचा साठा अस्वच्छ वातावरणात व विनापरवाना व्यवसाय करीत असल्यामुळे नमुना घेवून नष्ट करण्यात आलेला आहे. 

रविवार 31 मे रोजी मे. शोएब पान शॉप देगलूरनाका नांदेड, मे. दुर्गा पान शॉप इस्लापूर, ता.किनवट तसेच मे. साईश्रध्दा पान शॉप इस्लापूर ता.किनवट इत्यादी आस्थापनेत गुटखा-पानमसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात येवून एकूण 4 व्यक्तीविरूध्द संबंधित पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढया सिल करण्यात आलेल्या आहेत. 

मंगळवार 2 जून 2026 रोजी मे. जयगोपाल कृष्णकुमार ॲण्ड कंपनी जुना मोंढा नांदेड या पेढीतून 1 हजार 348 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 3 हजार 346 एवढया किंमतीचा चनाबेसन (दिनार) या अन्न पदार्थाचा साठा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून व मिथ्याछाप असल्यामुळे  नमुना घेवून जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. सैफ किराणा  शिवाजी चौक, किनवट या आस्थापनेतून गुटखा-पानमसाला इत्यादि प्रतिबंधित अन्न पदार्थाचा रूपये 47 हजार 445/- किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून  संबंधित व्यक्तीविरूध्द  पोलीस स्टेशन किनवट येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढी सिल करण्यात आलेली आहे. 

संबंधित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरूण तम्मडवार, अ. नं. ‍गिरी, श्रीमती  शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना बालाजी सोनटक्के यांच्या पथकाने सहायक आयुक्त संजय चटटे व रा. मा.भरकड यांचे व छत्रपती संभाजीनगर  विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांचे निर्देशान्वये पार पाडलेली आहे.

00000

वृत्त क्रमांक 

कृष‍ि विभागाची धडक कारवाई

व‍िनापरवाना बीटी कापुस ब‍ियाणे व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

नांदेड दि. 2 जून :- मुखेड शहरात व‍िनापरवाना ब‍िटी कापुस बियाणाची विक्री केल्या प्रकरणी तेलंगना राज्यातील श्रीधर पेन्शलवार व‍िरुध्द मुखेड पोलीसात गुन्हा नोंदव‍िण्यात आला या कार्यवाहीत सुमारे 12 लाख 37 हजार 992 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. 

दिनांक 1 जुन रोजी रात्री मुखेड येथे नवा मोंढा परीसरातील संगमेश्वर कृष‍ि सेवा केंद्राजवळ एका कारमधुन अनाधीकृत र‍ित्या व‍िनापरवाना बिटी कापुस बियाणांची व‍िक्री सुरु असल्याची माहिती कृषी व‍िभागाला मिळाली त्यानुसार जिल्हास्तरीय भरारी पथकातील पथक अध्यक्ष मोहिम अध‍िकारी जिल्हा परीषद सचिन कपाळे, ज‍िल्हा भरारी पथकातील सदस्य सचिव व जिल्हा गुणवत्ता न‍ियंत्रण निरीक्षक अमोल पेकम,  विभागीय कृष‍ि सहसंचालक कार्यालयातील गुणन‍ियंत्रण तंत्र अध‍िकारी बालाजी मुंडे, मुखेड पंचायत समितीचे कृष‍ि अध‍िकारी(गुन‍ि)अरविंद आकात, मुखेड कृष‍ि अध‍िकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरिक्षक कुलद‍िप वाघमारे यांच्या पथकाने संयुक्त कार्यवाही केली. 

                                                                                                                                                                        तपासणी दरम्यान तेलंगणा राज्यातील भैसा येथील श्रीधर पेन्शलवार हा कारमध्ये (टिजी १८ ए ४९७०) बीटी कापूस बियाण्यांचा साठा घेऊन विक्रीसाठी आला असल्याचे आढळून आले. वाहनातील पोत्यांची तपासणी केली असता आरसीएच-६६८ वाणाचे एकूण 192 पाकिटे आढळून आली. या बियाण्यांची किंमत सुमारे १ लाख ८७ हजार ९९४ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कार १० लाख ५० हजार असा एकूण १२ लाख ३७ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान संबंधिताकडे महाराष्ट्रात बीटी कापूस बियाणे विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना, पक्की पावती अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले. तसेच संबंधित वाणाला महाराष्ट्रात विक्री परवाना नसल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संशयित बियाण्यांचे नमुने घेऊन ते बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी श्रीधर पेन्शलवार (रा. भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) याच्याविरुद्ध बीज अधिनियम १९६६, बीज नियम १९६८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये कुठेही अप्रमाणित बियाणे विक्री होत असल्यास तात्काळ कृषि विभागाकडे संपर्क साधावा तसेच रासायन‍िक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास क‍िंवा विनापरवाना विक्री होत असेल अथवा खते उपलब्ध असतांना व‍िक्री करत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा, परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातूनच निविष्ठा खरेदी कराव्यात असे आवाहन कृषी विभागामार्फत ज‍िल्हा अधिक्षक कृषी अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक   शेतमालामध्ये भेसळ व रासायनिक प्रक्रिया कर ण्या स प्रतिबंध   नांदेड दि. 3 जून :- बाजार क्षेत्रात शेतीच्या व इतर विवक्षित ...