Monday, August 3, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

वृत्त  

पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन ; 

१ ते १५ ऑगस्टदरम्यान सहभागाची संधी

पुणे, दि. २९ जुलै : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच खुल्या गटातील नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुणांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी अमृत संस्थेमार्फत इतिहासतज्ज्ञ व अभ्यासकांचा समावेश असलेली ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

स्पर्धांचे स्वरूप

* निबंध स्पर्धा: शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट.

* वक्तृत्व स्पर्धा: शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट.

* रिल्स स्पर्धा: महाविद्यालयीन आणि खुला गट.

महत्त्वाचे नियम

* निबंध: कमाल १,००० शब्द; मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाइप करून PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक.

* वक्तृत्व: स्वतःचे कमाल ७ मिनिटांचे स्पष्ट आवाजातील मूळ व्हिडिओ सादर करावेत. व्हिडिओमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स किंवा AI-निर्मित प्रतिमांचा वापर करता येणार नाही.

* रिल्स: २ ते ३ मिनिटांची रील्स/शॉर्ट्स तयार करावी. स्वतःच्या आवाजात व स्वतःवर चित्रीत केलेली असावी. विषयानुरूप आवश्यक त्या इमेज, साऊंड किंवा AI चा वापर मिक्सिंगसाठी करता येईल.

स्पर्धेचे विषय

१८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे.

अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे.

थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य.

थोरल्या बाजीरावांची युद्धनीती.

थोरल्या बाजीरावांची स्वामीनिष्ठा.

थोरल्या बाजीरावांची दिल्ली मोहीम.

बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे.

थोरल्या बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय.

स्पर्धेची सविस्तर माहिती, नियमावली, संदर्भ पुस्तके, ई-बुक तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी १ ते १५ ऑगस्ट २०२६ असा आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

000

वृत्त क्रमांक 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार ई-केवायसी सेवा पूर्णपणे नि:शुल्क

नांदेड, दि. ३ ऑगस्ट : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्णपणे नि:शुल्क करण्यात आले असून, या सेवेसाठी कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्याकडून शुल्क आकारता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (MahaIT) यांच्या २८ जुलै २०२६ रोजीच्या निर्देशानुसार, प्रत्येक यशस्वी आधार ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी संबंधित आपले सरकार सेवा केंद्रास (ASSK) महाआयटीमार्फत प्रति लाभार्थी १५ रुपये मानधन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवा केंद्र चालकांनी लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये.

जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांनी ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध करून द्यावी. तसेच प्रत्येक केंद्राच्या दर्शनी भागात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार ई-केवायसी सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.” असा फलक अनिवार्यपणे प्रदर्शित करावा.

कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्राकडून शेतकरी किंवा लाभार्थ्याकडून शुल्क आकारण्यात आल्यास संबंधित केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल व आवश्यकतेनुसार केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी Aadhaar e-KYC सेवा पूर्णपणे नि:शुल्क असल्याची नोंद घ्यावी. कोणत्याही केंद्राकडून शुल्काची मागणी झाल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

नांदेड, दि. ३ ऑगस्ट : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत उद्योग कौशल्यवर्धन’ दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ नांदेड येथील अमृत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात नवउद्योजकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान उद्योगाचा विस्तार (स्केल-अप) करण्यासाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक आणि व्यावसायिक बाबींचे मार्गदर्शन पुढील दहा दिवस तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी संभाजीनगर विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे आणि नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ माळहिप्परगेकर यांनी प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेच्या संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व आणि स्वावलंबनाकडे वाटचाल याविषयी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प्रमुख प्रशिक्षक अनिरुद्ध तोष्णीवाल, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक सौरभ माळहिप्परगेकर, जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी तसेच अमृत मित्र विश्वास बदापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विश्वास बदापूरकर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील नवउद्योजक आणि प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, उद्योग व उद्योजकता क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

00000

 वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

१२२ शिबिरांमध्ये १३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी ; ३,१२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी

नांदेड दि. 3 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या समन्वयाने जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप झाला. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात एकूण १२२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १३ हजार ६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ३ हजार १२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई चे कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक  यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, आयुक्त, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका महेशकुमार डोईफोडे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

शिबिरांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका डॉ. हनमंत रीठ्ठे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

१३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी

या १२२ शिबिरांमध्ये ४,२१० पुरुष, ६,७२२ महिला, १,०६९ पुरुष बालक आणि १,६१८ महिला बालक, अशा एकूण १३,६१९ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. याशिवाय ३,१२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली.

शिबिरांमध्ये नागरिकांची विविध आजारांसाठी आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन व इतर आवश्यक निदान चाचण्या करण्यात आल्या. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर शासकीय आरोग्य योजनांतर्गत उपलब्ध उपचार सुविधांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

विविध यंत्रणांचा प्रभावी समन्वय

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे आणि समन्वयक संभाजी लोंढे यांनी जिल्ह्यातील शासकीय व संलग्नित खासगी रुग्णालये, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून शिबिरांचे नियोजन, आयोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली.

उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्नित खासगी रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालये, तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व संबंधित विभागांनी मोलाचे योगदान दिले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः दुर्गम व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी, निदान, मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने हा उपक्रम लोकाभिमुख व परिणामकारक ठरला.

भविष्यातही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या समन्वयातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशाच लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

00000




 वृत्त क्रमांक 

SIR अंतर्गत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे 99 टक्के काम पूर्ण ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी अंतिम टप्प्यात

नांदेड, दि. 3 ऑगस्ट : 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आजअखेर 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ 1,847 मतदारांचे काम शिल्लक असून येत्या तीन दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर आज (3 ऑगस्ट) उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व बीएलए-1 यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत गणना पत्रांचे वाटप, बीएलओंकडे प्राप्त झालेले व डिजिटायझेशन झालेले फॉर्म, ‘अनकलेक्टेबल’ (मयत, स्थलांतरित, गैरहजर, दुबार इ.) म्हणून नोंद झालेल्या मतदारांची माहिती तसेच प्रस्तावित नवीन मतदान केंद्रांची मतदान केंद्रनिहाय यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली.

087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व 312 मतदान भागांमध्ये गणना पत्रांचे 100 टक्के वाटप पूर्ण झाले असून डिजिटायझेशनचे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रक्रियेत 99 टक्के प्रगती झाली असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. खल्लाळ यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आवाहन केले की, ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांचे गणना पत्र संबंधित बीएलओंकडे जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्या मतदारांनी विहित मुदतीत गणना पत्र सादर केले नाही किंवा ज्यांचे फॉर्म ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंदविण्यात आले आहेत, अशा मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत. अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) मोहिमेतील अवघड वाटणारे काम बीएलओ, पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच राजकीय पक्षांचे बीएलए आणि प्रतिनिधी यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पूर्णत्वाकडे जात असल्याचे सांगून डॉ. खल्लाळ यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

0000







वृत्त क्रमांक 

माय भारततर्फे 'नशामुक्त युवा -विकसित भारत' संकल्प अभियान उत्साहात संपन्न

नांदेड, दि. 3 ऑगस्ट : भारत सरकारच्या मेरा युवा भारत नांदेड यांच्या वतीने 'नशामुक्त युवा – विकसित भारत' संकल्प अभियानाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील समाजशास्त्र विभागाच्या सहकार्याने 2 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास २०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून   राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड तसेच जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे उपस्थित होत्या.

थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवकांना व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढील १०० रविवार विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संदेश दिला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 'नशामुक्त युवा-विकसित भारत' संकल्पाची शपथ घेतली.

यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी युवकांची सामाजिक जबाबदारी, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. मारोती गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

जिल्हा युवा अधिकारी, MY Bharat अशनी अनिल कनकटे यांनी मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चळवळ असून प्रत्येक युवकाने समाजात जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बंडू कांबळे, सिस्टीम एक्सपर्ट विभागाचे विजय हनवते, सह्याद्री पगडे, नरसिंग कागडा तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

माय भारतच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करत 'विकसित भारत' घडविण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला बळकटी दिली.

00000





  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...