वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन
नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा
नांदेड(जिमाका), दि. 20 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. दरम्यान, या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
‘सेवा संकल्प अभियान’च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त , यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिककेंद्री विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले.
या अभियानांतर्गत ‘सेवा सेतू अभियान’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’, ‘सेवा माझे योगदान’, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘सेवा ज्योत यात्रा’, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ‘अंगणवाडी उत्सव’, ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘बदलाची गोष्ट’, ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’, ‘नमो सेवा गाथा’, ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’ तसेच ‘जनसेवक महाकुंभ’ यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व विभागप्रमुखांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी तसेच अभियानात केलेल्या कामाची पूर्वीची व नंतरची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रिकरण करून ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांचा या अभियानात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रमांचे नियोजन करावे. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश, अपेक्षित लाभार्थी, आवश्यक मनुष्यबळ, प्रसिद्धी-प्रसार आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या.
‘सेवा सेतू’च्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’, युवक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, महिला व बालकल्याणाशी संबंधित उपक्रमांद्वारे जनसहभाग वाढविणे, तर ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’च्या माध्यमातून जलसंवर्धन व लोकसहभागाचा संदेश देण्यावर भर देण्यात येणार आहे.
अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक प्रसिद्धी-प्रसार करण्याच्या दृष्टीनेही संबंधित विभागांनी नियोजन करावे. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
‘सेवा परमोधर्म’ या संकल्पनेनुसार नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी यावेळी सांगितले.
***



.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)



.jpeg)
