Sunday, September 20, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन 

नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा

नांदेड(जिमाका), दि. 20 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. दरम्यान, या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

‘सेवा संकल्प अभियान’च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

 या बैठकीस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त , यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिककेंद्री विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. 

 या अभियानांतर्गत ‘सेवा सेतू अभियान’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’, ‘सेवा माझे योगदान’, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘सेवा ज्योत यात्रा’, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ‘अंगणवाडी उत्सव’, ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘बदलाची गोष्ट’, ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’, ‘नमो सेवा गाथा’, ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’ तसेच ‘जनसेवक महाकुंभ’ यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व विभागप्रमुखांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी तसेच अभियानात केलेल्या कामाची पूर्वीची व नंतरची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रिकरण करून ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांचा या अभियानात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रमांचे नियोजन करावे. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश, अपेक्षित लाभार्थी, आवश्यक मनुष्यबळ, प्रसिद्धी-प्रसार आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या.

‘सेवा सेतू’च्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’, युवक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, महिला व बालकल्याणाशी संबंधित उपक्रमांद्वारे जनसहभाग वाढविणे, तर ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’च्या माध्यमातून जलसंवर्धन व लोकसहभागाचा संदेश देण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक प्रसिद्धी-प्रसार करण्याच्या दृष्टीनेही संबंधित विभागांनी नियोजन करावे. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

‘सेवा परमोधर्म’ या संकल्पनेनुसार नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी यावेळी सांगितले.

***



Saturday, September 19, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण  22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार

नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दि. 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 सरपंच पदे, तर खुल्या प्रवर्गासाठी 37 सरपंच पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यापैकी एकूण 28 सरपंच पदे महिलांसाठी राखीव असतील. नागरिकांचा मागास प्रवर्गातील 9 आणि खुल्या प्रवर्गातील 19 पदे महिलांसाठी राखीव राहतील.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सरपंच पदांच्या आरक्षणात बदल होत नसल्याने, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे आरक्षण निश्चित करण्याचे आदेश तहसीलदार, नांदेड यांना देण्यात आले होते. त्यानुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील सरपंच पदांचे आरक्षण सोडत पद्धतीने मंगळवार, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, नांदेड येथील मा. उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या बैठक कक्षात (दुसरा मजला) निश्चित करण्यात येणार आहे.

हे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. या सोडतीसाठी सर्व संबंधित तसेच माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी निर्धारित दिनांक व वेळेस तहसील कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, नांदेड यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक 

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद ! 

विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे

 

नांदेड, दि. 19 :- राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दौऱ्यावर येत आहे.

 

यावेळी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर व हितसंबंधित घटकांशी संवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.३० या वेळेत पत्रकार परिषद, तर दुपारी २.३० नंतर जिल्हास्तरीय उमेदवार व इतर भागधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.

 

भरती परीक्षा पद्धतीबाबत अनुभव व सूचना मांडू इच्छिणाऱ्या संबंधितांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

वृत्त  

गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जागतिक पटलावर नेण्यासाठी दस्तऐवजीकरण करा

विभागीय आयुक्त जी‌ श्रीकांत यांचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ :- महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक समृद्धी व वैशिष्ट्ये जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी व्यापक डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. नागरिक, गणेश मंडळे आणि संबंधित यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने मिळविण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्व संचालनालयामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे.

या संकेतस्थळावर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील पूजा, सजावट, गणेशमूर्ती, खाद्यपरंपरा, लोककला, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यांची छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना अपलोड करता येणार आहेत. राज्यातील ३५ हून अधिक ऐतिहासिक शहरांसह देशभरातील गणेशोत्सवाशी संबंधित परंपरांची माहितीही संकलित केली जाणार आहे. सहभाग नोंदविणाऱ्या नागरिकांना ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा, महिला व बालसुरक्षा, सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, रक्तदान व व्यसनमुक्ती यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचेही दस्तऐवजीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमांतून या उपक्रमाचा प्रचार करावा तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष, महत्त्वाची ठिकाणे आणि गणेश मंडळांजवळ ‘बाप्पा डॉट ओआरजी’चा क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा.

गणेश मंडळांनीही नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सकारात्मक संवाद, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक सहभाग यांचे छायाचित्रण व व्हिडिओ संकलित करून संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत. या उपक्रमासाठी ईफ्लॅग संस्थेचे तांत्रिक सहकार्य घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्हाधिकारी व महानगरपालिका प्रशासनाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून उपक्रमाचा नियमित आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सुरक्षित, शिस्तबद्ध, सामाजिकदृष्ट्या सकारात्मक आणि सर्वसमावेशक प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवात शासकीय योजनांच्या व्यापक प्रचार - प्रसारासाठी 'लोकसंवाद' हा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी सहयोग करून उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे. 

**

सुधारित वृत्त क्रमांक 

पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे 

मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा 

चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश

मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत

लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश

शेतकरी व नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये 

नांदेड (जिमाका), दि. 19 : मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पावसात खंड पडल्याने शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक व अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आयोजित बैठकीत दिले.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. हेमंत पाटील, अमरनाथ राजूरकर, सईद खान, कैलास पाटील, बाबूराव कदम कोहळीकर, भिमराव केराम, राजेश पाटील, राजू नवघरे, प्रताप पाटील चिखलीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपायुक्त रिता मैत्रेवार, वरिष्ठ अधिकारी  बैठकीस उपस्थित होत्या. तर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह विविध विधानसभा मतदार संघातील आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठकीत सहभागी झालेले नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपली मते मांडली. 

मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये कमी पाऊस व पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांच्या अडचणी व म्हणणे समजून घ्यावे. शासन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात पिण्याचे पाणी, चारा तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. संकटाच्या काळात शासन शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात 56 लाख शेतकऱ्यांना 40 हजार 385 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. सॅटेलाईटच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. चारा व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी पीक नुकसान, चारा व पाणीटंचाई, जलजीवन मिशन, जलसंधारण, अखंडित वीजपुरवठा तसेच इतर विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडींग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. 

बैठकीचे प्रास्ताविक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. यावेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कृषी सहसंचालक तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची माहिती सादर केली.

बैठकीस नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जालना जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, बीडचे जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकिणे यांच्यासह सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

**















वृत्त क्रमांक 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे केली पीक परिस्थितीची पाहणी

• शेतकऱ्यांनी चिंता करू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी
नांदेड (जिमाका), दि. 19 : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण आणि संभाव्य नुकसानाबाबत त्यांनी माहिती घेतली.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आस्थेने ऐकून घेत, ‘शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असून, जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही श्री. भरणे यांनी दिली.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
***






Friday, September 18, 2026

वृत्त क्रमांक 

दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

नांदेड, दि. १९ : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांची व पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी व आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक   नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे  - जिल्हाधिकारी राहु...