Tuesday, June 16, 2026

वृत्त क्रमांक

21 जून रोजी पोलीस कवायत मैदानावर भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

जिल्हा प्रशासनासह विविध विभागांचा संयुक्त उपक्रम; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*

नांदेड, दि. 16 जून : जगभरात 21 जून हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने यंदाही नांदेड जिल्ह्यात भव्य योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 21 जून रोजी सकाळी 7 वाजता वजीराबाद येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार असून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा योग संघटना आणि लोकमत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, युवक, क्रीडापटू, योगप्रेमी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा आणि समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा युवा अधिकारी श्रीमती कनकटे, क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर, लोकमत समूहाच्या प्रतिनिधी सपना भागवत तसेच योग विद्या धामचे योगाचार्य, जिल्हा योग संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यात योगाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना अपर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्व संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करावे. कार्यक्रमादरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या लागू असलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

योगाचा संदेश गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष पुढाकार घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना योग दिन साजरा करण्यासंदर्भात पत्र पाठवून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.

तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दिव्यांग आणि विशेष गरज असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. मैदानावर आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था, प्रवेश आणि इतर अनुषंगिक नियोजनाबाबत क्रीडा विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

बैठकीत उपस्थित योगाचार्य आणि योग संघटनांच्या प्रतिनिधींनी योग दिन अधिक प्रभावी व व्यापक करण्यासाठी काही सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि अधिकाधिक नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी लोकमत समूहाकडून जनजागृती आणि समन्वयाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या योग दिन कार्यक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

०००००


वृत्त क्रमांक

16 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत अतिसार नियंत्रण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी ; ३ लाख ३५ हजार ओआरएस पाकिटे व ९ लाख झिंक गोळ्यांच्या वितरणाचे नियोजन अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओ.आर.एस. ची घेऊनी साथ!"

नांदेड दि. 16 जून : पावसाळ्याच्या दिवसांत बालकांमध्ये उद्भवणाऱ्या अतिसाराच्या (डायरिया) संभाव्य प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि बालमृत्यू दर शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉ.संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्या नियोजनाने आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १६ जून  ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण मोहीम २०२६) अत्यंत व्यापक पातळीवर सुरू करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्याची एकूण २६,११,१०० (२६ लाख ११ हजार १००) लोकसंख्या या मोहिमेत समाविष्ट करण्यात आली असून, त्यामधील ५ वर्षांखालील सर्व २,६१,११९ बालकांना या मोहिमेचा थेट लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील लाभार्थी बालकांची अधिकृत आकडेवारी:

 एकूण जिल्हा लोकसंख्या: २६,११,१००

 ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण लाभार्थी बालके: २,६१,११९

 ० ते १ वर्षे वयोगटातील बालके (झींक सिरपचे लाभार्थी): ४३,८७६

 १ ते ५ वर्षे वयोगटातील बालके (झींक गोळ्यांचे लाभार्थी): २,१७,२४३

आरोग्य यंत्रणेचे विस्तृत जाळे आणि साठा नियोजन:

नांदेड जिल्ह्यातील दुर्गम आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ७० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३८४ उपकेंद्रे, ७१२ आरोग्य सेविका, ३,७२३ अंगणवाड्या आणि १,७५० आशा स्वयंसेविका (ASHA Workers) यांचे भव्य जाळे सक्रिय केले आहे. सर्व स्तरांवर ओ.आर.एस. पाकिटे आणि झिंक सिरप/गोळ्यांच्या वितरण करण्यात आला आहे.| 

या शिवाय, ० ते १ वर्ष वयोगटातील लहान बालकांसाठी विशेष ४३,८७६ झींक सिरप बॉटल्स वितरीत केल्या जात आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत २,१३,४४० ओआरएस पाकिटे आणि ५,१५,२४६ झींक गोळ्यांचा उपलब्ध आहे.

आशा स्वयंसेविकांद्वारे प्रत्येक घरात प्रात्यक्षिक आणि मोफत वाटप:

मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १,७५० आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला भेट देणार आहेत. ज्या घरात ५ वर्षांखालील मूल आहे, त्या मातेला ओ.आर.एस. द्रावण योग्य पद्धतीने कसे तयार करावे याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले जाईल. अतिसार आजार उद्भवल्यास त्वरित उपचारासाठी प्रति बालक २ ओ.आर.एस. पाकिटे आणि सलग १४ दिवस देण्यासाठी १४ झिंकच्या गोळ्या मोफत दिल्या जातील. तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये ORS-Zinc Corner'ची स्थापना करण्यात आली आहे.

शाळा व अंगणवाड्यांमध्ये 'हात धुणे' उपक्रम:

अतिसाराचा प्रादुर्भाव दूषित हात आणि अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर होतो. हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३,७२३ अंगणवाड्या आणि सर्व प्राथमिक शाळांमध्ये बालकांना जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्याचे (Handwashing Steps) प्रत्यक्ष धडे दिले जात आहेत. गावागावांमध्ये ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती (VHSND) च्या बैठक घेऊन जनजागृती केली जात आहे.

पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे संदेश व धोक्याची लक्षणे

बालकाला दिवसातून ३ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा पातळ संडास झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन 'जलशुष्कतेचा' (Dehydration) धोका निर्माण होतो. अशा वेळी त्वरित ओ.आर.एस. आणि झिंक सुरू करावे. खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास बालकाला विलंब न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे:

 बालक अत्यंत सुस्त होणे, चिडचिड करणे किंवा बेशुद्ध पडणे.

  डोळे खोल जाणे किंवा बालकाने अन्न-पाणी, स्तनपान घेणे पूर्णपणे बंद करणे.

  शौचातून (संडासमधून) रक्त पडणे.

  तीव्र ताप असणे आणि ओआरएस दिल्यानंतरही उलट्या होणे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पालकांनी, विशेषतः मातांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे.

0000000

वृत्त क्रमांक

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 अंतर्गत 

द्वितीय टप्यात ३८१.३३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरणास सुरुवात

नांदेड दि. 16 जून:- प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 85 महसूल मंडळातील  विमाधारक शेतकऱ्यांना एकूण 913 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळे पात्र ठरली असून 6 लाख 34 हजार 623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  सुमारे ४,४४,८७९.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

दिनांक १६ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी ८५ महसूल मंडळासाठी एकूण ९१३ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्चित झाली असून त्यापैकी प्रथम टप्यात माहे एप्रिल २०२६ मध्ये ४१ महसूल मंडळातील सोयबीन पिक विमाधारक शेतकऱ्यांना  ४९९.६० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्यात ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राज्य शासनाकडील दायित्व ३८१.३३ कोटी रुपये विमा कंपनीकडे नुकतेच जमा करण्यात आले आहेत. यापैकी सोयाबीन पिकासाठी ३८ महसूल मंडळातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना ३८०.७४ कोटी रुपये नुकसानभरपाई वितरणास आज पासून सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळापैकी ७९ महसूल मंडळातील नुकसानभरपाई वाटप पूर्णत्वाकडे जात आहे. उर्वरित १४ महसूल मंडळातील ६ महसूल मंडळातील नुकसानभरपाईचा राज्य शासनाकडील हिस्सा प्रलंबित असून ८ महसूल मंडळाची नुकसानभरपाई निश्चितीची प्रक्रिया सुरु आहे.

नुकसानभरपाई वितरीत करण्यात येत असलेली ३८ महसूल मंडळे:

मालेगाव, भोकर, भोसी, किणी, बिलोली, कुंडलवाडी, देगलूर, खानापूर, मरखेल, धर्माबाद, करखेली, सिरजखोड, निवघा, तळणी, तामसा, जवळगाव, कुरुळा, उस्माननगर, फुलवळ, बोधडी, किनवट, उमरी बा., सावरगाव, शेवडी बा., सोनखेड, मुदखेड, अंबुलगा बु., जांब बु., मुखेड, मुक्रमाबाद, बरबडा, घुंगराळा, नरसी, नांदेड ग्रामीण, तरोडा बु., विष्णुपुरी, वाजेगाव, सिंधी.

राज्य शासनाचा हिस्सा प्रलंबित असलेली ०६ महसूल मंडळे:

कंधार, इस्लापूर, मांडवी, बारड, नांदेड शहर , वसरणी

नुकसानभरपाई निश्चिती प्रक्रियेत असलेली ०८ महसूल मंडळे:

दिग्रस (बु.), जलधारा, सिंदगी (मो.), माहूर, सिंदखेड, वाई बाजार, वानोळा, धानोरा (बु.)

विमा कंपनीच्या अद्ययावत माहितीनुसार सोयाबीन, मुग, उडीद, तूर आणि ख.ज्वारी या सर्व पिकाच्या नुकसानभरपाईसाठी एकूण मंजूर रक्कम ९१८.१८ कोटी रुपये असून प्रथम टप्यात माहे एप्रिल २०२६ मध्ये त्यापैकी ५०२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३८१ कोटी रक्कम राज्य शासनाकडून विमा कंपनीला प्राप्त झाली असून पिक विमा धारकांना वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

प्रलंबित महसूल मंडळाची नुकसानभरपाई लवकरच निश्चित होणार असून सर्व सोयाबीन पिक विमा धारक शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार लिंक माहिती अद्ययावत ठेवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाची तीन नवीन कार्यालये कार्यान्वित; 

जनसामान्यांच्या सेवेसाठी कामकाजाला सुरुवात

नांदेड 16 जून : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत भूमी अभिलेख विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने मंजूर करण्यात आलेल्या 'सुधारित आकृतीबंधा'ची अंमलबजावणी 15 जून 2026 पासून राज्यभरात अधिकृतपणे करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यात तीन नवीन कार्यालये 15 जूनपासून प्रत्यक्ष कार्यान्वित झाली आहेत. यामुळे जमिनीच्या मोजणी आणि इतर तांत्रिक कामांसाठी नागरिकांना अधीक सोईचे होऊन प्रशासकीय कामात मोठी सुलभता येणार आहे.

प्रशासकीय सुधारणेचा मोठा निर्णय 11 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार, विभागातील 9 हजार 689 पदांमध्ये वाढ करून 10 हजार 683 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला. विभागाची व्याप्ती वाढवणे आणि सामान्य नागरिकांना जमिनीच्या मोजणीसह अन्य तांत्रिक व अर्धन्यायिक कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार येण्यापासून मुक्ती मिळावी, या हेतूने हे नवीन बदल करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची वाढती गरज आणि कामाचा व्याप विचारात घेऊन, या सुधारित आकृतीबंधानुसार जिल्ह्यात तीन नवीन कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या निर्मितीमुळे आता संबंधित तालुक्यातील किंवा परिसरातील नागरिकांना आपल्या परिसराजवळच भूमी अभिलेख विषयक सेवा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कामाचा वेग अधीक वाढेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांच्या आदेशानुसार, उपसंचालक भुमी अभिलेख नांदेड, प्रदेश नांदेड व जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख नांदेड क्र. 2 मुख्यालय भोकर आणि नगर भुमापन अधिकारी नांदेड या तीन नवनिर्मित कार्यालयांचे कामकाजास उपसंचालक भूमि अभिलेख किशोर जाधव छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड श्रीमती सिमा देशमुख, यांचेकडून कार्यान्वित करून सुरवात करण्यात आली आहे. 

१५ जून रोजी सकाळपासून या कार्यालयांमध्ये कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कार्यालय सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जमिनीच्या मोजणीसह इतर महसुली कामांमध्ये सुलभता येईल व कामे जलद गतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

या कार्यालयांच्या सुरुवातीमुळे महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या कामांना अधिक गती मिळेल, असे मत स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही व्यक्त केले आहे. नागरिकांनी आता आपल्या कामांसाठी नवीन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000






वृत्त क्रमांक

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड दि. 16 जून:-  वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी जिल्ह्यातून एका गावाची निवड करण्यात येणार असून इच्छुक ग्रामपंचायती, संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३० जून २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांनी केले आहे.

राज्यात पुस्तकांचे गाव निर्माण करताना सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता या उपक्रमात सहभागी व्हावे. या उपक्रमात व्यापक लोकसहभाग असणे आवश्यक असून त्याबाबतचा उल्लेख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावामध्ये असणे बंधनकारक आहे. प्रत्येक ग्रंथदालनाचे क्षेत्रफळ किमान १५० चौ. फूट असावे तसेच संबंधित जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. यासाठी किमान पाच वर्षांचा करार करणे बंधनकारक राहणार आहे. गावातील परिस्थितीनुसार उपलब्ध दालनांची संख्या व आकारमान कमी-जास्त असू शकते. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मराठी विकास संस्था घेणार आहे.

‘पुस्तकांचे गाव’ निवडीसाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ही योजना फक्त ग्रामपंचायत, नगरपंचायत व ‘क’ वर्ग नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपरिषदेचा ठराव आवश्यक राहील. शासनाने घोषित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा असलेली गावे, राज्य किंवा केंद्र संरक्षित स्मारके असलेली गावे तसेच संत गाडगेबाबा, आदर्श गाव, तंटामुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच साहित्यिक किंवा वाङ्मयीन चळवळीची परंपरा असलेल्या गावांचाही विचार केला जाणार आहे.

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मराठी भाषा समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करून पात्रतेचा अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर गावाची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या गावात सुरुवातीला किमान दहा ग्रंथदालने सुरू करण्यात येतील. या दालनांसाठी आवश्यक आवर्ती व अनावर्ती खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. उपलब्ध जागा, वाचन संस्कृतीची परंपरा आणि पर्यटन विकासाची क्षमता या बाबींचा विचार करून गावाची निवड केली जाईल. केवळ पुस्तक विक्री किंवा प्रदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता वाचन प्रेरणा, साहित्यिक उपक्रम, ग्रंथदालने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानकेंद्र उभारून मराठी साहित्यविश्वाचे दर्शन घडविणे आणि पर्यटन विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहिती, अटी व शर्तींसाठी मराठी भाषा विभागाचा  ३० जानेवारी २०२६ रोजीचा शासन निर्णय पाहावा. इच्छुक मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. ३० जून २०२६ पर्यंत संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या नावे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व डिजिटल उपकेंद्र नांदेड बहुउद्देशीय सांस्कृतिक संकुल श्री गुरुगोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर ,नांदेड येथे तीन प्रतींमध्ये सादर करावेत.

या उपक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नांदेड यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अधिक माहितीसाठी 8355966561 किंवा 9834276257  या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड दि. 16 जून:-  वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी जिल्ह्यातून एका गावाची निवड करण्यात येणार असून इच्छुक ग्रामपंचायती, संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३० जून २०२६ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांनी केले आहे.

राज्यात पुस्तकांचे गाव निर्माण करताना सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता या उपक्रमात सहभागी व्हावे. या उपक्रमात व्यापक लोकसहभाग असणे आवश्यक असून त्याबाबतचा उल्लेख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावामध्ये असणे बंधनकारक आहे. प्रत्येक ग्रंथदालनाचे क्षेत्रफळ किमान १५० चौ. फूट असावे तसेच संबंधित जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. यासाठी किमान पाच वर्षांचा करार करणे बंधनकारक राहणार आहे. गावातील परिस्थितीनुसार उपलब्ध दालनांची संख्या व आकारमान कमी-जास्त असू शकते. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मराठी विकास संस्था घेणार आहे.

‘पुस्तकांचे गाव’ निवडीसाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ही योजना फक्त ग्रामपंचायत, नगरपंचायत व ‘क’ वर्ग नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपरिषदेचा ठराव आवश्यक राहील. शासनाने घोषित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा असलेली गावे, राज्य किंवा केंद्र संरक्षित स्मारके असलेली गावे तसेच संत गाडगेबाबा, आदर्श गाव, तंटामुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच साहित्यिक किंवा वाङ्मयीन चळवळीची परंपरा असलेल्या गावांचाही विचार केला जाणार आहे.

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मराठी भाषा समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करून पात्रतेचा अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर गावाची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या गावात सुरुवातीला किमान दहा ग्रंथदालने सुरू करण्यात येतील. या दालनांसाठी आवश्यक आवर्ती व अनावर्ती खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. उपलब्ध जागा, वाचन संस्कृतीची परंपरा आणि पर्यटन विकासाची क्षमता या बाबींचा विचार करून गावाची निवड केली जाईल. केवळ पुस्तक विक्री किंवा प्रदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता वाचन प्रेरणा, साहित्यिक उपक्रम, ग्रंथदालने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानकेंद्र उभारून मराठी साहित्यविश्वाचे दर्शन घडविणे आणि पर्यटन विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहिती, अटी व शर्तींसाठी मराठी भाषा विभागाचा  ३० जानेवारी २०२६ रोजीचा शासन निर्णय पाहावा. इच्छुक मंडळांनी, देवस्थानांनी, ग्रामपंचायतींनी, संस्थांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. ३० जून २०२६ पर्यंत संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या नावे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व डिजिटल उपकेंद्र नांदेड बहुउद्देशीय सांस्कृतिक संकुल श्री गुरुगोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर ,नांदेड येथे तीन प्रतींमध्ये सादर करावेत.

या उपक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नांदेड यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अधिक माहितीसाठी 8355966561 किंवा 9834276257  या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी

गुरूवार 18 जून रोजी मतदान ; 452 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नांदेड दि. 16 जून :- महाराष्ट्र विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी नांदेड जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण आठ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

मतदान गुरूवार 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.

सदर निवडणुकीमध्ये एकूण 452 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी 224 स्त्री मतदार तर 228 पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्ह्यातील महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे. 

मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.    

तहसील कार्यालय किनवट येथील मतदान केंद्रात किनवट नगरपरिषद-24, नगरपंचायत माहूर-17 असे एकूण 41 मतदार मतदानाचा हक्क बजावतील याप्रमाणे तहसील कार्यालय हदगाव या मतदान केंद्रावर नगरपरिषद हदगाव-23, नगरपंचायत हिमायतनगर-19 एकूण 42, तहसील कार्यालय भोकर येथील मतदान केंद्रात नगरपरिषद भोकर-25, नगरपरिषद मुदखेड-23 एकूण 48 मतदार, तहसील कार्यालय नांदेड येथील मतदान केंद्रात अर्धापूर नगरपंचायत-19, नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड-89 असे एकूण 108 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.   

तहसील कार्यालय कंधार येथील मतदान केंद्रात नगरपरिषद कंधार-23, नगरपरिषद लोहा-23 असे एकूण 46 मतदार तर तहसील कार्यालय धर्माबाद येथील मतदान केंद्रात नगरपरिषद धर्माबाद-25, नगरपरिषद उमरी-23 एकूण 48 तर तहसील कार्यालय बिलोली येथील मतदान केंद्रात नगरपंचायत नायगाव-19, नगरपरिषद बिलोली 23, नगरपरिषद कुंडलवाडी-23 असे एकूण 65 तर तहसील कार्यालय देगलूर येथील मतदान केंद्रात नगरपरिषद देगलूर-31, नगरपरिषद मुखेड-23 असे एकूण 54 मतदार आहेत. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील एकुण 452 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.  

त्यानंतर सोमवार दिनांक 22/06/2026 रोजी सकाळी 08.00 वाजता या निवडणुकीची मतमोजणी कॅबिनेट हॉल नियोजन भवन तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होणार आहे.

00000

वृत्त क्रमांक 21 जून रोजी पोलीस कवायत मैदानावर भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासनासह विविध विभागांचा संयुक्त उपक्रम; नागरिका...