Monday, April 20, 2026

वृत्त क्रमांक

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक-युवतींना आवाहन 

नांदेड  दि. 20 एप्रिल :- भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या इंटर्नशिप योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पूर्ण वेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवावर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा आर्थिक सहायता 9 हजार रुपये व एकरकमी सहायता 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. 

या इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवरील Register now या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांच्या आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून आधार लिंक मोबाइल क्रमांक वर ओटीपी पाठवण्यात येतो त्यानंतरच उमेदवारांची नोंदणी होऊ शकते. 

जिल्ह्यातील 18 ते 25 वयोगटातील जास्तीत पात्र युवक-युतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी व अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड येथे ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्रमांक

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

नांदेड  दि. 20 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 22 एप्रिल 2026 सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार असून जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांनी 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.पासून हिरकणी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था माहुर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.रा.म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

आधिक माहितीसाठी संपर्क सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड. दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२५१६७४ येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्रमांक

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

नांदेड, दि. 20 एप्रिल:- सोमवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन व एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे १३ लाख रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात मौजे भनगी येथे करण्यात आली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही धडक कारवाई केली.

या मोहिमेत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

00000







 

  वृत्त क्रमांक

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत

 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

नांदेड, दि. 20 एप्रिल:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” (CRT) बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने माहे एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्याचे नियोजन केले होते.  त्यानुसार 1,8,15 एप्रिल रोजी डिजीटल शेतीशाळा संपन्न झाल्या असून चौथी विशेष डिजीटल शेतीशाळा 22 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. 

सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी  शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

यापूर्वी दिनांक १, ८ व १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग ४ भात शेतीचे लागवड तंत्र : भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणी साठी यांत्रिकी पद्धत बाबत नियोजित दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे. 

 तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. चला, हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवूया.   

उपरोक्त शेती शाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता- 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu  

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH 

या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा  तसेच प्रत्येक गावातील जास्तीत जास्त शेतक-यांनी विशेषत: बिलोली, देगलूर, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील गावांमधील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 

00000

  वृत्त क्रमांक

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम 

नांदेड  दि. 20 एप्रिल :- महाराष्ट्र राज्य कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे 21 व 22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

मंगळवार 21 एप्रिल 2026 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथून रात्री 8 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. 

बुधवार 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वा. विश्रामगृह नांदेड येथून मुदखेडकडे प्रयाण. विश्रामगृह मुदखेड येथे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांच्यासमवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडसंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 1 वा. तहसिलदार मुदखेड यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट. 

दुपारी 2 वा. हदगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. विश्रामगृह हदगाव येथे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडसंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 4 वा. तहसिलदार हदगाव यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट. सोईनुसार काटोल (जि. नागपूर) कडे प्रयाण करतील.

0000

 

 विशेष लेख             

निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन देते. मातृ व बाल आरोग्य ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची बाब आहे. गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत अनेक महिलांना कुपोषण,रक्तक्षय, आरोग्य तपासणीचा अभाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषण, आरोग्य आणि आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) सुरू केली. ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नसून मातृत्वाला सन्मान आणि सुरक्षितता देणारी महत्त्वाची पायरी ठरली आहे.

योजनेची गरज आणि पार्श्वभूमी

भारतीय राज्यघटनेतील कलम ४२ नुसार प्रसूतीसंदर्भात महिलांना आवश्यक संरक्षण आणि दिलासा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या संकल्पनेतूनच आधी ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ काही जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली होती. त्यानंतर तिचा विस्तार करून संपूर्ण देशभर प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू करण्यात आली.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे

या योजनेचा मुख्य भर महिलांच्या आरोग्य आणि पोषणावर आहे. गर्भवती आणि स्तनदा महिलांना सकस आहारासाठी प्रोत्साहन देणे, नियमित आरोग्य तपासणी सुनिश्चित करणे, सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसूतीला चालना देणे, तसेच माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. यासोबतच महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि मातृत्वाला सामाजिक मान्यता देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पात्रता आणि लाभार्थी

या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी गर्भवती आणि स्तनदा महिलांना दिला जातो. मात्र, सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आणि पगारी प्रसूती रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ लागू होत नाही. 

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांसाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत एकूण 5 हजार रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यांत दिली जाते. गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता 1 हजार रुपये, किमान एक आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2 हजार रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर त्याची नोंदणी व प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता 2 हजार रुपये दिला जातो. याशिवाय ‘जननी सुरक्षा योजना’ अंतर्गत संस्थात्मक प्रसूतीसाठी स्वतंत्र प्रोत्साहन दिले जाते.

ऑगस्ट 2023 पासून दुसरे अपत्य मुलगी झाल्यास प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यानंतर एकदाच 6 हजार रुपये लाभ लागू करण्यात आला.

अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खाते, गर्भधारणा नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पीएमएमव्हीवाय-सीएएस प्रणालीद्वारे पार पडते आणि लाभाची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते. महिला व बाल विकास मंत्रालय हे या योजनेचे नोडल विभाग असून अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य विभाग यांची तळागाळात महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा आणि राज्यस्तरावर देखरेख यंत्रणा कार्यरत असून पीएफएमएस प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता राखली जाते.

या योजनेमुळे देशभरातील लाखो महिलांना थेट लाभ मिळाला आहे. संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण वाढले असून महिलांच्या पोषणातही सकारात्मक बदल दिसून येत आहे. महिलांमध्ये आरोग्य तपासणी आणि लसीकरणाबाबत जागरूकता वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृत्वाला कुटुंब आणि समाजात अधिक सन्मानाचे स्थान मिळाले आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही मातृत्वाला सुरक्षित, सन्माननीय आणि सक्षम बनवणारी प्रभावी योजना ठरली आहे. आर्थिक सहाय्याबरोबरच आरोग्य आणि पोषणाचा मजबूत आधार देत ही योजना देशाच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. योग्य अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण सुधारणा यामुळे ही योजना अधिक परिणामकारक ठरत आहे.

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

000000




वृत्त क्रमांक प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक - युवतींना आवाहन   नांदेड   दि. 20 एप्रिल :- भारत सरकारच्या मिनि...