Wednesday, June 24, 2026

वृत्त क्रमांक 

चार दिवस येलो अलर्ट जारी

नांदेड, दि. 24 जून : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २४ जून २०२६ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २४ ते २७ जून २०२६ हे चार दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.   दिनांक २४, २६ व २७ जून २०२६ हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा व दि. २५ जून २०२६ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

आकाशात विजा चमकत असल्यास:

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक 

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास लोहा तालुक्यात प्रारंभ

नांदेड, दि. २४ जून:— भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision - SIR) 2026 राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील सर्व मतदारांना गणना फॉर्म (EF) भरून देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. भेटीदरम्यान प्रत्येक मतदाराला गणना फॉर्म वितरित करण्यात येणार असून तो काळजीपूर्वक भरून संबंधित अधिकाऱ्याकडे परत करणे बंधनकारक राहणार आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार, गणना फॉर्मसोबत अलीकडील पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून ती BLO यांच्याकडे जमा करावीत. फॉर्म भरून परत करण्याची जबाबदारी संबंधित मतदाराची राहणार आहे.

फॉर्म सादर न करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याने सर्व मतदारांनी या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विठ्ठल परळीकर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, लोहा यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड येथे 26 जून रोजी समता दिंडीचे आयोजन

नांदेड दि. २४ जून:- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 08 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

समता दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा राहणार असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल.

या समता दिंडीत नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळांतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

शासकीय तंत्रनिकेतन,नांदेडच्या निकालाची उत्तुंग भरारी

नांदेड दि. २४ जून :- नुकत्याच जाहीर झालेल्या MSBTE उन्हाळी परीक्षा 2026 च्या पॉलिटेक्निक परीक्षेच्या निकालात महाविद्यालयातील विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे  लक्ष वेधून घेतले आहे. 

IT,ME,CE,EE, MU आणि PG या शाखातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उच्च  गुण घेऊन महाविद्यालयाचे  नाव उज्वल केले आहे.

यावर्षी विशेष करून महाविद्यालयानी 100 टक्के निकालाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उत्तीर्णतेमुळे तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष मिळते. जास्तीत जास्त विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.    

गुणवत्ता सुधारणा, तांत्रिक शिक्षण पद्धती, प्रात्यक्षिकांमधील सातत्य आणि परीक्षांच्या दर्जेदार पद्धतींमुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे. खालील विद्यार्थ्यांनी संबंधित शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

IF 6K सोनटक्के शैलेंद्र दीपक 94.12% ,   PG 6K राजगोरे समीक्षा उद्धवराव   91.72%,    ME 6K साळवे दक्षराज विकास 90.39% ,      MU 6K बिरादार अंजली रत्नाकर 92.00%, EE 6K जाधव प्रेरणा परमेश्वर 94.72% ,  CE 6K रविशा आर मोंढे 91.50 % या घवघवीत यशा करिता संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. एन एल जानराव यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच तंत्रनिकेतन कडे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तंत्रशिक्षण संचालनालय यांनी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.आता प्रथम वर्ष पदविका करीता अर्ज सादर करण्यासाठी सुधारित अंतिम तारीख 02 जुलै 2026 निर्धारित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सुधारित अंतिम तारखेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

000000



Tuesday, June 23, 2026

वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेतील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी अंतिम मुदतवाढ 

नांदेड, दि. 23 जून :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत सन 2024-252025-26 मधील प्रलंबित (Send Back) अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मंगळवार 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेच्या लाभ घेण्यासाठी त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहा प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवली जात आहे. योजना ही जिल्हा तसेच तालुका स्तरावर राबविण्यात येत असून जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात त्रुटी अभावी प्रलंबित असलेले अर्ज असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी https//hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पहावी. 

अर्ज Send Back मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या परिपूर्ण कागदपत्रासह करण्यासाठी मंगळवार 30 जून 2026 पर्यंत संधी देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी सुरू असून अनेक अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा तांत्रिक त्रुटी आढळून आले आहेत. स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदत वाढीचा लाभ घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर कराव्यात. 

मुदतवाढ ही शेवटची असेल व यानंतर आपला अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर सदरील मॅसेज आल्यानंतर तत्काळ स्वाधारला अर्ज करायचा आहे. जर आपला अर्ज Approved असेल तर आपल्या बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी योग्यरीत्या भरायचे आहे. आपले बँक खाते क्रमांक हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे. प्रस्तुत कार्यालयाअंतर्गत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडियाचे पेज इंस्टाग्राम व फेसबुक पेज samajkalyannanded याला फॉलो करून आपल्या येणाऱ्या अडचणीबाबत वेळोवेळी त्याच्यावर देण्यात आलेली माहिती पहावी व आपल्या शंकेचे निरसन करावे. बाहेर इतर कुठल्याही अनाधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीशी संपर्क न साधता थेट समाज कल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना येऊन आपल्या समस्या बद्दल विचारणा करावी, असेही आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 23 जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती  व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी योजना राबविल्या जात आहेत. जिल्हयातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड दूरध्वनी क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी. एम. झोंबाडे यांनी केले आहे. 

सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना योजना, बीज भांडवल कर्ज योजना, रु.1 लाख थेट कर्ज योजना या योजनांचे उद्दिष्ट या महामंडळाचे मुख्यालय मुंबईकडुन प्राप्त झाले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), लोहार समाजासाठी ब्रम्हलीन आचार्य पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), नाथपंथीय समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या सहा महामंडळाची स्थापना केलेली असुन ही सर्व महामंडळे या महामंडळाअंतर्गत कार्यरत असुन या महामंडळाच्या मुख्यालय मुंबईकडुन उद्दीष्ट प्राप्त झालेले असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आले आहे. या सर्व महामंडळाअंतर्गत पुढीलप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

या योजनेची मर्यादा रुपये 15 लाख पर्यत असुन अर्जदार हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, संबंधीत व्यवसायाचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल. 

गट कर्ज व्याज परतावा योजना

या योजनेची मर्यादा रुपये 10 लाख ते 50 लाख पर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे, गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यंत असावे, गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादीत असावी. याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा, संबंधीत व्यवसायाचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल. 

एक लाख रुपये थेट कर्ज योजना

या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक असुन या योजनेकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( रु. 1 लाखापर्यंत), रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इ. कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल.

25 टक्के बीज भांडवल योजना

ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन बँकेचा सहभाग 75 टक्के व महामंडळाचा सहभाग 25 टक्के असतो. अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (रु.1 लाखापर्यत),रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे महामंडळाने आवाहन केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

दुष्काळी परिस्थितीत चारा उत्पादनास चालना; पशुपालकांना वैरण बियाण्यांचे वाटप

नांदेड, दि. 23 जून 2026 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2026–2027 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चारा उत्पादन योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना प्रातिनिधिक स्वरूपात वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तसेच पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी चारा उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पशुपालकांनी मुरघास (सायलेज) निर्मिती व वापराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

याशिवाय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त पशुपालक शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित पशुपालकांना चारा उत्पादन व पशुधन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

00000



वृत्त क्रमांक   चार दिवस येलो अलर्ट जारी नांदेड , दि. 24 जून :  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २४ जून २०२६ रोजी दिलेल्या...