वृत्त
पावसाच्या खंड
काळात खरीप पीक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी
लातूर (विमाका), दि. ०३ : लातूर विभागात मागील सुमारे २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे विशेषतः हलक्या जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला असून पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लातूर विभागातील सर्व तालुक्यांमधील खरीप पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, जमिनीतील ओलावा आणि पीकनिहाय नुकसानाची पातळी विचारात घेऊन कृषि विभागाने तातडीच्या पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांसाठी सविस्तर उपाययोजना व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
कृषि विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करून उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थांमध्ये संरक्षित सिंचन द्यावे. तसेच कपाशी आणि तूर यांसारख्या पिकांमध्ये जलसंधारणासाठी आंतरमशागतीद्वारे सरी काढून पुढे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपट तणांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, जेणेकरून तणमुक्त जमिनीतील ओलावा मुख्य पिकासाठी उपयोगी पडेल. यासोबतच पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आंतरमशागत करून जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत होईल.
पिकांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध अन्नद्रव्ये व जैविक निविष्ठांच्या फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. पिकांच्या स्थितीनुसार पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) या अन्नद्रव्यांची दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, ज्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. या व्यतिरिक्त बायो एनपीके, बायोमिक्स आणि मायकोऱ्हायझा यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांना जैविक व अजैविक ताण सहन करण्यास मदत होते. फळबागा आणि ऊस पिकांमध्ये जमिनीतील ओलावा संरक्षित ठेवण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा प्रभावी वापर करावा. तसेच पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित पाहणी करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
तसेच, शेततळ्यांमधील साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी विशेष तांत्रिक उपाययोजना सुचवण्यात आली असून, त्यासाठी सिटाईल अल्कोहोल २० मिली प्रति चौरस मीटर या प्रमाणात दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर पसरवावे, असे आवाहन लातूर विभागीय कृषि सहसंचालक महेश तीर्थकर यांनी केले आहे.
ठळक मुद्दे :
• पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करण्यात
यावे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संवेदनशील अवस्थेतील पिकांना संरक्षित सिंचन
द्यावे.
• कपाशी, तूर पिकांत जलसंधारण सरी काढून पुढे पडणा-या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करावे.
• उपट तणांना काढून तण नियंत्रण
करावे जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहून पिकासाठी उपयोगी पडेल.
• पिकांच्या अवस्थेनुसार आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा
बुजवून ओलावा टिकवून ठेवावा.
• पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन
करावे.
• फळबाग आणि ऊसामध्ये आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित
करावा.
• पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. त्यासाठी
पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के), ००:५०:३४ (१ टक्के) अशा अन्नद्रव्यांची फवारणी दर
८ ते १० दिवसांनी करावी जेणे करून पिकांना पाण्याचा ताण सहन करता येईल.
• जैविक निविष्ठा जसे बायो एनपीके, बायोमिक्स, मायकोऱ्हायझा इत्यादींचा वापर करावा जेणेकरून जैविक व अजैविक
ताण सहन करण्यास पिकांना मदत होईल.
• शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी सिटाईल अल्कोहोल
20 मिली/चौ मी दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर
पसरावे.
***



