Wednesday, September 9, 2026

 ‘नर्व्ह कंडक्शन स्टडीज’मुळे न्यूरोलॉजिकल आजारांचे अचूक निदान शक्य- अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख

रुग्णसेवेत या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 8 : न्यूरोलॉजिकल आजारांचे वेळेत व अचूक निदान करून रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘नर्व्ह कंडक्शन स्टडीज’ हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे. ही चाचणी केवळ सैद्धांतिक संकल्पना नसून आधुनिक चिकित्साशास्त्रातील महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या वतीने ‘Demystifying Nerve Conduction Studies’ या विषयावर दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (CME) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास मुंबई येथील ज्येष्ठ न्यूरोफिजिओलॉजिस्ट डॉ. आर्थिका श्रीनिवासन तसेच नांदेड येथील सल्लागार न्यूरोफिजिओलॉजिस्ट डॉ. मयुरा धोंडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. वंदना भारतराव दुधमल यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच संदेशाद्वारे त्यांनी या CME कार्यक्रमामुळे सैद्धांतिक ज्ञान आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांमधील दरी भरून काढण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होईल, असे नमूद केले.

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले की, नर्व्ह कंडक्शन स्टडी ही क्लिनिकल न्यूरोलॉजीचा महत्त्वपूर्ण आधार आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता नर्व्ह कंडक्शन कसे मोजले जाते, त्यातून प्राप्त होणारे आलेख कसे वाचायचे आणि त्याचे चिकित्सकीय विश्लेषण कसे करायचे, याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळविणे आवश्यक आहे.

नर्व्ह कंडक्शन स्टडीजच्या अचूक विश्लेषणातून महत्त्वपूर्ण वैद्यकीय माहिती मिळू शकते. यामुळे प्राध्यापक व संशोधकांना संशोधनाच्या नव्या दिशा उपलब्ध होण्यास मदत होईल. विशेषतः न्यूरोपॅथी, अर्धांगवायू, गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) आणि मधुमेहजन्य न्यूरोपॅथी यांसारख्या आजारांचे वेळेत व अचूक निदान करण्यासाठी या तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठे आहे. अचूक निदानामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळून न्यूरोलॉजिकल आजारांमुळे होणारे अपंगत्व कमी करण्यास तसेच रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयात प्रथमच नर्व्ह कंडक्शन स्टडीज (NCV Studies) सेवा सुरू केल्याबद्दल डॉ. देशमुख यांनी शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना भारतराव दुधमल व विभागातील शिक्षकवृंदांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रमुख वक्ते डॉ. आर्थिका श्रीनिवासन व डॉ. मयुरा धोंडे यांनी ‘Demystifying Nerve Conduction Studies’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. नर्व्ह कंडक्शन स्टडीजची मूलभूत तत्त्वे, मोटर व सेन्सरी नर्व्ह स्टडीज, एफ-वेव्ह, एच-रिफ्लेक्स आणि लेट रिस्पॉन्सेस यांसह विविध बाबींचे प्रात्यक्षिक व चिकित्सकीय महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विविध वैद्यकीय प्रकरणांच्या अभ्यासाच्या माध्यमातून विषयाचे व्यावहारिक पैलूही उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमास उपअधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. शितल राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, तसेच डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. संजय मोरे, डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. मसरत फिरदोस, डॉ. उद्धव माने, डॉ. सीमा टाकरस, डॉ. मुजतबा नौशिन, डॉ. अनुब्रता मुखर्जी यांच्यासह शरीरक्रियाशास्त्र विभागातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

जनऔषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. ईनामदार यांनी कार्यक्रमासाठी व्याख्यान सभागृह उपलब्ध करून दिले. यावेळी डॉ. एम. ए. समीर, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. अनिल देगांवकर, डॉ. राजेश हनमंते, डॉ. अमित पंचमहालकर, डॉ. उबेदुल्ला खान, डॉ. जे. बी. देशमुख, डॉ. पंकज कदम तसेच प्रशासकीय अधिकारी संजय वाकडे उपस्थित होते.

या सीएमई कार्यक्रमात पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता कदम व डॉ. इंशा शिद्रा यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिरुद्ध मुनेश्वर, डॉ. दीपक वर्मा, डॉ. सीमा रघुवंशी, डॉ. यशस मुनेश्वर, डॉ. ओमकारेश्वर सावंत, जळबा इंगोले, मनमथ हिंगमिरे, मारोती लुटे, श्रीमती फुलकली चिंडालिया, श्रीमती बबीता लोट, आकाश भालेराव तसेच शरीरक्रियाशास्त्र विभागातील कर्मचारी आणि छायाचित्रकार रवी हिवाळे यांनी परिश्रम घेतले.

******* 





 

रोजगार महाकुंभांतर्गत 29 सप्टेंबर रोजी राज्यभर 500 रोजगार मेळावे

नांदेडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

 

नांदेड(जिमाका), दि. 9 : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रोजगार महाकुंभ महाराष्ट्र हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी 500 रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या रोजगार मेळाव्यात नांदेड शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे दि. 9 ते 11 सप्टेंबर 2026 तसेच दि. 21 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करावीत आणि रोजगार महाकुंभात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य ए. एस. त्रिचूरकर यांनी केले आहे.

******

 राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑईल मिल व एक्सपेलर फिल्टर प्रेससाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड जिल्ह्यास २४ एक्सपेलर यंत्रांचा लक्षांक; वैयक्तिक शेतकरी व एफपीओंना मिळणार अनुदान



नांदेड (जिमाका), दि. ९ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) योजनेंतर्गत मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर प्रेससह तसेच मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर प्रेस शिवाय या घटकांची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थी निवडीसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांमधून शेतकरी उत्पादक कंपनी व संस्था यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यास या घटकासाठी एकूण २४ एक्सपेलर यंत्रांचा लक्षांक प्राप्त झाला आहे.

यामध्ये मिनी ऑईल मिल/एक्सपेलर फिल्टर प्रेससह घटकासाठी जिल्ह्यास १२ यंत्रांचा लक्षांक असून, प्रति युनिट कमाल अनुदान मर्यादा ४ लाख रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प/सीमांत व महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ५० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ४० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

तसेच मिनी ऑईल मिल/एक्सपेलर फिल्टर प्रेस शिवाय या घटकासाठी जिल्ह्यास १२ यंत्रांचा लक्षांक असून, प्रति युनिट कमाल ३ लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. या घटकासाठीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प/सीमांत व महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ५० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याने इच्छुक वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विलंब न करता https://mahadbt.maharashtra.gov.in/ Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर⁠ ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

******

 कापूस उत्पादकता अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यास 114 कॉटन श्रेडर यंत्रांचा लक्षांक


वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ व सहकारी संस्थांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन



नांदेड (जिमाका), दि. 9 : सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कॉटन श्रेडर यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कापूस शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या घटकाचा योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला असून, नांदेड जिल्ह्यास 114 कॉटन श्रेडर यंत्रांचा तालुकानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे.

या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना घेता येणार आहे. केंद्र शासनाने या अभियानास पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या धर्तीवर या घटकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना कॉटन श्रेडर यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 75 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ (First Come, First Serve - FCFS) या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ व संबंधित सहकारी संस्थांनी विलंब न करता महाडीबीटीच्या ‘शेतकरी योजना’ विभागातून https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

कापूस उत्पादनात वाढ, पीक अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन तसेच आधुनिक यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कॉटन श्रेडर हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कापूस उत्पादन वाढीस हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

*******

Tuesday, September 8, 2026

 मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज महत्त्वाची बैठक

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्र प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासह प्रलंबित प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ (विमाका) : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी व अडचणींचे निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबींचा सखोल आढावा घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिली.

आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, विभागातील सातही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमदार प्रसाद लाड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जालना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीसह इतर संलग्न बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी, उपलब्ध माहिती, नोंदी तसेच संबंधित प्रक्रियेतील अडचणी याबाबतही चर्चा करण्यात आली.

दि. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, समितीचे सदस्य, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस अधीक्षक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांतील जात पडताळणी समित्यांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीचा आढावा, त्यातील त्रुटी व अडचणींचे निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होण्यासाठी या विषयाचा अभ्यास असलेले अभ्यासक तसेच आंदोलनाशी संबंधित अभ्यासकांनी बैठकीत सहभागी होऊन समितीसमोर आपली भूमिका व सूचना मांडाव्यात, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे.

******* 



 भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून सूचना व अभिप्राय आमंत्रित

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड, दि. ८ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासह परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित हितधारकांशी चर्चा करून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.

या समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्टसिटी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील नागरिकांकडून सूचना व अभिप्राय प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा विशेष कक्ष दि. ९ सप्टेंबर २०२६ पासून दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यरत राहणार आहे.

भरती परीक्षा पद्धत अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित व उमेदवाराभिमुख करण्यासाठी संबंधित घटकांनी आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने प्रत्यक्ष अथवा ई-मेलद्वारे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे प्रत्यक्ष सादर करण्याचे ठिकाण हे  जिल्हाधिकारी कार्यालय येथील विशेष कक्ष असून, csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर दि. ९ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान  सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर कराव्यात. ज्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय वरील ई-मेलवर विहित मुदतीत पाठवावेत.

या प्रमुख विषयांवर सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत

वि‌द्यमान परीक्षा प्रणालीचा आढावाः राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या परीक्षा पद्धती व कार्यपद्धतीबाबत अभिप्राय.

पारदर्शकता व सुरक्षितता उपायः परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सर्वकष उपाययोजना,

प्रश्नपत्रिका ते निकाल प्रक्रियाः प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षा.

माहिती तंत्रज्ञानाचा वापरः डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स व सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

गैरप्रकारांना प्रतिबंध: पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे, उत्कृष्ट पद्धतीचा अभ्यासः इतर राज्यांतील अथवा देशांतील यशस्वी, आधुनिक व सुरक्षित परीक्षा प्रणालींचा अभ्यास करून त्या राज्यात लागू करणे.

परीक्षा केंद्रांसाठी किमान मानकेः परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, मनुष्यबळ व कार्यसज्जतेबाबत किमान मानके ठरविणे.

संस्थात्मक समन्वयः जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा संस्था यांच्यात प्रभावी समन्वयाची चौकट निर्माण करणे,

तक्रार निवारण प्रणाली: उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभारुन परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करणे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर केले जाईल. ही समिती या शिफारर्शीचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास आपला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थीच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नागरिक, अभ्यासक व संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

******* 



 विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात दावे-हरकतींची अचूक पडताळणी करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि अपात्र मतदार मतदार यादीत राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांचे निर्देश

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना दिले प्रशिक्षण


नांदेड (जिमाका), दि. 8 : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरुवात झाली आहे. या टप्प्यात मतदारांकडून प्राप्त होणारे दावे व हरकती यांची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीने निपटारा करावा. जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, तसेच अपात्र अथवा चुकीची नोंद असलेला मतदार यादीत राहणार नाही, यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी अचूक व काळजीपूर्वक काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मार्गदर्शन करत होते. 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हणमंत कोळेकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी संबंधित अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओ यांचे अभिनंदन केले. जुन्या मतदार यादीतून एखादा पात्र मतदार चुकीने वगळला गेला असल्यास त्‍या मतदाराकडून फॉर्म नं 6 भरून घेण्‍यात यावी आणि त्याची योग्य पडताळणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा. ‘एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि अपात्र मतदार मतदार यादीत राहणार नाही’ याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले की, बीएलओच्या पंचनाम्याच्या आधारे अनेक त्रुटींची दुरुस्ती करणे शक्य आहे. संबंधित मतदारांना व्हॉट्सॲपद्वारे किंवा प्रत्यक्ष नोटीस देऊन आवश्यकतेनुसार सुनावणी घ्यावी. दावे व हरकतींची सुनावणी घेताना प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक तपासणी करावी. मतदार यादी अधिकाधिक अचूक करण्यासाठी योग्य नियोजन करून निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे. 

फॉर्म क्रमांक 7 व 8 बाबत निर्णय घेताना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्‍हाधिकारी यांनी दिले तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी निहाय सुनावणी बाबतचे अचूक नियोजन करण्यात यावे त्याचप्रमाणे सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओ यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे  तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही या प्रक्रियेबाबत अवगत करावे, असे त्यांनी सांगितले. पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता अथवा गंभीर स्वरूपाची चूक आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करून आवश्यकतेनुसार एफआयआर दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवीन मतदार नोंदणीवरही विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्या. मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांची माहिती घेऊन त्यांचेकडून फॉर्म नं. 6 चे अर्ज भरून घ्यावेत. मतदार यादी अधिकाधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय पातळीवर प्रभावी नियोजन करून कामाची गती वाढवावी आणि सदरच्‍या कामकाजामध्‍ये अचुकता व पारदर्शकता ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) हणमंत कोळेकर यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व बीएलओ यांनी दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामकाजाबाबत तसेच दावे व हरकती स्वीकारणे, त्यांची पडताळणी करणे, आवश्यकतेनुसार सुनावणी घेणे, प्राप्त दावे व हरकतींचा नियमानुसार निपटारा करणे तसेच मतदार यादी अचूक करण्याच्या प्रक्रियेचे सविस्‍तर सादरीकरणद्वारे प्रशिक्षण दिले. तसेच प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचेही निरसन करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार आणि इतर सर्व संबंधित अधिकारी या प्रशिक्षणास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******* 









 ‘नर्व्ह कंडक्शन स्टडीज’मुळे न्यूरोलॉजिकल आजारांचे अचूक निदान शक्य- अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख • रुग्णसेवेत या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग...