Thursday, July 2, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना


 

वृत्त क्रमांक

वन महोत्सव २०२६ ची उत्साहात सुरुवात ; जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते देगलूर नाका येथे घनवन प्रकल्पाचे उद्घाटन

नांदेड, दि. २ जुलै : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान तसेच ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वन महोत्सव २०२६ चे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड यांच्या वतीने देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातील ०.४० हेक्टर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या घनवन रोपवनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.

कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरविंद गायकवाड तसेच सहाय्यक वनसंरक्षक नितेश निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपण करून वन महोत्सवाची सुरुवात केली. कार्यक्रमास पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर, वनपाल अशोक कॅदरवाड, वनरक्षक ज्ञानेश्वर मुंडे, सुभाष पिलाजी आणि बळवंत शिंदे यांनीही वृक्षाणात सहभाग घेतला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर यांनी माहिती देताना सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या परिसरात यंदाच्या वन महोत्सवानिमित्त १८ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अंतर्गत ३५ ते ४० विविध देशी वृक्षप्रजातींची घनवन (Miyawaki) पद्धतीने लागवड केली जाणार असून, त्यामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरण संवर्धनास आणि जैवविविधतेच्या संरक्षणास मोठी चालना मिळणार आहे.

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान आणि ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

00000













वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

पहिल्याच दिवशी घेतला खातेप्रमुखांच्या कामकाजाचा आढावा

नांदेड, दि. २ जुलै :  नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे महेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

महेश पाटील हे यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व  खातेप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविणे, विकासकामांना गती देणे, तसेच नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या. तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. डी. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंते खराडे, संजय शिंदे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री द्वारकादास राठोड व बालाजी पवार, व्यंकटराव चव्हाण, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

000000



विशेष लेख - 2      

दुष्टचक्रातून कायमची सुटका... अन् पतपात्र शेतकरी !

v पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सहकार विभाग, बँका यांच्या समन्वयातून अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून कायमची सुटका करण्यासाठी, त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर अशा तरतुदी शासनाने या योजनेत केल्या आहेत. यापूर्वीच्या लेखात आपण दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा, योजनेला दिलेले विचारपूर्वक असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव, शासनाचा या योजनेमागील दूरदृष्टीकोन पाहिला.  आज या योजनेतील अभ्यासपूर्ण अशा तरतुदी पाहुयात.

शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी कल्याणाचा ३०० वर्षांपूर्वीचा आदर्श या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि नियमित परतफेड करणाऱ्यास प्रोत्साहनपर लाभ ही योजनेची तीन मुख्य स्तंभ आहेत. तब्बल ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर काढणारी ही योजना आहे. यातून  थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल. ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान अल्पमुदत पीक कर्ज घेतले. ज्यांची ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकी ३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत राहिली. अशा शेतकऱ्यांना रुपये २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठित, फेरपुनर्गठित मध्यम मुदत कर्जात रूपांतर झालेल्या खात्यांचाही समावेश असेल.

ज्या शेतकऱ्यांनी २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत घेतलेल्या पीक कर्जाची मुदतीत नियमित परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना रुपये ५० हजार पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळेल. जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये याचीही काळजी सरकारने घेतली आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. पण 2025-26 व 2026-27 मध्ये  अल्प मुदत कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करावी लागणार आहे.

              सन 2023-24 किंवा 2024-25 मध्ये अल्प मुदत कर्ज घेतले, फेडलेही. प्रत्यक्ष परतफेडीची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास किमान रुपये ५ हजार किंवा प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम प्रोत्साहनपर लाभ म्हणून दिली जाईल, अशाप्रकारे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही शासन करत आहे. त्यामुळे वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन मिळेलच.

ज्या शेतकऱ्यांची एकूण थकबाकी २ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा केल्यास त्यांना उर्वरित रुपये २ लाखांपर्यंतच्या रकमेचा 'एकवेळ समझोता' (OTS) अंतर्गत लाभ मिळणार आहे. बऱ्याचदा कर्ज दोन लाखांपेक्षा थोडे जास्त  असते आणि शेतकरी योजनेतून बाहेर पडतो. पण यावेळच्या योजनेत तसे नाही. जर तुमचे कर्ज दोन लाखांहून अधिक असेल, तर वरची अतिरिक्त रक्कम तुम्ही बँकेत भरून या योजनेत सहज सहभागी होऊ शकता. ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, ही OTS शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९' चा लाभ घेतला आहे, त्यांना या नवीन योजनेअंतर्गत रुपये ५० हजार मर्यादेपर्यंत कर्जमुक्ती किंवा OTS चा लाभ दिला जाणार आहे, हा पूर्वीच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त असा दिलासाच आहे.

            या तरतुदी अन् अंमलबजावणीतून लाखो शेतकरी बँकिंग व्यवस्थेत पुन्हा पतपात्र बनतील. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, ते यातून उभारी घेतील. ही केवळ कर्जमाफी नाही, तर क्षमता बांधणी आहे. तसेच शेती अर्थव्यवस्थेची संरचनात्मक सुधारणा देखील.                                        (क्रमश:)

 

     - डॉ. श्याम टरके,

  सहायक संचालक (माहिती),

 विभागीय माहिती कार्यालय, लातूर





वृत्त क्रमांक

पावसाळ्यातील आजार, काळजी आणि उपाययोजना : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांचे आवाहन

नांदेड दि. 2 जुलै : पावसाळा सुरू झाला की निसर्ग बहरतो, मात्र याच काळात दूषित पाणी आणि डासांमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आजारांवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्यात उद्भवणारे प्रमुख आजार

पावसाळ्याच्या दिवसांत प्रामुख्याने खालील आजार पसरण्याचा धोका असतो:

जलजन्य आजार :  दूषित पाण्यामुळे डायरिया (अतिसार), गॅस्ट्रो, कावीळ (हिपॅटायटीस ए आणि ई), आणि विषमज्वर (टायफॉइड).

कीटकजन्य आजार : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झाल्यामुळे मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकनगुनिया.

इतर आजार : लेप्टोस्पायरोसिस (दूषित पाणी व उंदरांच्या मूत्राद्वारे पसरणारा आजार) आणि फ्लू (सर्दी, खोकला, ताप).

प्रतिबंधात्मक उपाययोजना (काय काळजी घ्यावी?)

आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी खालील त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

पाण्याचे शुद्धीकरण आणि स्वच्छता :

पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे. पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि ती झाकून ठेवावीत. विहिरी व पाण्याच्या टाक्यांमध्ये नियमितपणे टी.सी.एल. (ब्लिचिंग पावडर) चा वापर करावा.

डास उत्पत्ती केंद्रांचे निर्मूलन (कोरडा दिवस) :

घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका. टायर, कुलर, नारळाच्या करवंट्या, तुटलेली भांडी त्वरित नष्ट करा. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस' (Dry Day) म्हणून पाळावा, ज्यामध्ये घरातील पाणी साठवण्याची भांडी पूर्णपणे रिकामी करून पुसून वाळवावीत. झोपताना डासदाणीचा वापर करावा.

वैयक्तिक स्वच्छता व अन्न सुरक्षा:

जेवणापूर्वी आणि शौचावरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा कापलेली फळे खाणे टाळावे. नेहमी गरम आणि ताजे अन्न खावे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात चालणे टाळावे. अपरिहार्य कारणास्तव जावे लागल्यास पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

जिल्हा आरोग्य विभागाची सज्जता

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा, ओ.आर.एस. (ORS) पाकिटे,  पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले आहे.

महत्त्वाचे आवाहन 

"पावसाळ्यात कोणताही ताप, उलट्या किंवा जुलाब झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती उपचार किंवा मेडिकलमधून स्वतः औषधे घेण्याऐवजी, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत." - डॉ. संतोष सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड

00000



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...