विशेष वृत्त
150 दिवसीय ई - गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल
मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान
नांदेड, दि.२८ मार्च:-मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मुल्यमापनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व परिक्षेत्रांत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दिनांक 28 मार्च रोजी, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभात, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. तत्पूर्वी, श्री उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आयोजित समारंभात दिली.
दिनांक 7 मे, 2025 रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन सुधारणा घडवून आणण्यासाठी 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. सदर कार्यक्रमांतर्गत प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित व्हावे, या उद्देशाने विविध स्तरांवर व्यापक सुधारणा अपेक्षिल्या होत्या. यामध्ये संकेतस्थळ सुधारणा, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, व्हॉट्सॲपद्वारे सेवा वितरण तसेच नाविन्यपूर्ण वेब ॲप्लिकेशन या विषयांवर विशेष भर देण्यात आला होता.
त्यानुसार, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रासाठी संकेतस्थळ नव्याने तयार करून ते अधिक सुरक्षित व नागरिकाभिमुख केले होते. संकेतस्थळावर विविध शासकीय योजना व सेवांचे केलेले एकत्रीकरण, आपले सरकार पोर्टल अंतर्गत तक्रारींची विहित वेळेतील सोडवणूक, ई-ऑफिस प्रणालीद्वारे कागदविरहित व जलद फाईल निपटारा, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्डद्वारे अचूक व अद्ययावत माहितीची उपलब्धता, याशिवाय, परिक्षेत्रातील अर्ज चौकशीच्या कामकाजासाठी सुरू केलेली ‘संवेदना’ ही AI आधारित संगणकीय कार्यप्रणाली, तक्रारदारांचे समाधान अजमावण्यासाठी दिलेली Feedback सुविधा, नांदेड परिक्षेत्रातातील गुन्हयांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू केलेली Eagle Eye ही प्रणाली व परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी सुरू केलेली हेल्पलाइन ‘खबर’ ( 91 50 100 100) या बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या.
150 दिवसांच्या सदर कार्यक्रमाची मुदत दिनांक 10 जानेवारी, 2026 रोजी पूर्ण झाल्यानंतर, परीक्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथमतः पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येऊन, त्यातून (4) परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. यात, नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची देखील निवड करण्यात आली होती. त्यानंतर परिक्षेत्र कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांनी केले होते. परिषदेने पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या उपरोक्त कामकाजाची दखल घेऊन परिक्षेत्रास प्रथम क्रमांक बहाल केला होता.
यापूर्वी, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात देखील नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.
परिक्षेत्र कार्यालयातील पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांचेसोबतच Rythmbytes कंपनीचे सॉफटवेअर इंजिनिअर हर्षानंद शर्मा, SETTribe कंपनीचे संचालक सारंग वाकोडीकर व सॉफटवेअर इंजिनिअर शहेबाज खान, पोलीस अंमलदार दिपक पवार यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले असून, या यशामध्ये नांदेड परिक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा वाटा आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.
000000

.jpeg)