Thursday, June 13, 2024

 वृत्त क्र. 482

 

वीज पंप, रोटावेटर, ताडपत्री,कडबा कटर ; अनुदानावर मिळण्यासाठी संपर्क साधा

 

तालुकास्तरावर जि.प.च्या उपकर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 13 : शेतकऱ्यांना अनुदानावर कृषीविषयक सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक वस्तूंचे वाटप जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत होत आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.

 

जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अनुदानावर कृषी साहित्याचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून केवळ गटविकास अधिकारी यांच्या मार्फत अर्ज जिल्हा परिषद कृषी विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे अशा अर्जाद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पद्धतीचा अवलंब करून ताडपत्री तीन एचपी पाच एचपी चे ओपन वेल सबमर्सिबल पंप संच पावर ऑपरेटेड चाफ कटर ट्रॅक्टर चलीत रोटावेटर सोयाबीन प्लांट बीज प्रक्रियेसाठी अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट महिला बचत गट यांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी व विस्तारीकरण करण्यासाठी कृषी साहित्याचा लाभ पंचायत समिती स्तरावर देण्याचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्र. 481

 

जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 13 :- नांदेड जिल्‍हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं. 18 आणि 22 नांदेड,  आयन डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट क्रमांक 18 आणि 22 नांदेड या 3 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 13, 14 व 15 जून 2024 रोजी सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 480 

हिवताप टाळण्यासाठी आठवड्यातून

एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 13 : पावसाळ्याचे आगमन होत असताना हिवताप डेंगू मेंदू जोरासारख्या कीटकजन्य आजाराची साथ वाढण्याचा धोका असतो. सर्व आजार डासांपासून होत असतात. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडण्याच्या आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जून महिन्यात हिवता प्रतिरोध महिना राबविण्यात येतो संपूर्ण पावसाळ्यात कीटकजन्य आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली जाते नागरिकांनी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास घरामध्ये जास्त ओलावा राहणार नाही त्यासाठी दर आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाडणे आवश्यक आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते डासानची संख्या कमी झाल्यास हिवताप डेंगू मेंदू जर सारख्या कीटकजन्य आजारांची संख्या कमी होते त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक घरामध्ये शोष खड्डा, परसबाग याची निर्मिती करावी.घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील अशी व्यवस्था करावी. स्वच्छालयाचे सेप्टिक टॅंक हे डासांच्या उत्पत्तीचे स्थान असल्याने व्हॅट पाईपला जाळी बसवणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, घरा सभोवतालची गटारे वाहती करण्यात यावी, सार्वजनिक सांडपाणी गटारी यांची योग्य विल्हेवाट लावली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 479 

परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि.13 : सन 2024-25 मध्ये अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतर्गत विद्यार्थ्याकडून दि.12 जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासन निर्णय दि.30 ऑक्टोंबर 2023 अन्वये विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 478 

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन

 

·    शनिवारी सकाळी कामगार कल्याण मंडळात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

·   मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कौशल्य विकास विभागाकडून आवाहन

 

नांदेड दि. 13 : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवन आयटीआय शेजारील भवनात शनिवार 15 जून रोजी सकाळी दहा ते दोन या काळात मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे . या मार्गदर्शन शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

 

अतिशय महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक असणाऱ्या या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.दहावी व बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना, माहिती करिअर प्रदर्शनीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवता यावे यासाठीच्या आवश्यक बाबी यावेळी तज्ञांकडून सांगितल्या जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.या शिबिराला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य एस.व्ही.सूर्यवंशी यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 477 

सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास

सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा

 

कृषी विभागाचे पर्यायी खत वापरण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 13 : जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी असून बाजारामध्ये मागणीनुसार डीएपी खताची उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांनी डीएपी खताला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामात 4 लक्ष 52 हजार हेक्‍टरवर सोयाबीन लागवडीची शक्यता आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या डीएपी खताची मागणी शेतकऱ्यांकडून वाढत आहे. परंतु मागणीनुसार डीएपी खताची उपलब्धता बाजारामध्ये सध्या नाही. शासन स्तरावर त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे डीएपी खत उपलब्ध नसल्यास शेतकरी बंधूंनी डीएपी खताला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट १४३.५ किलो व युरीया १९ किलो याचा पर्यायी खत म्हणून वापर करावा. यामुळे डीएपी खताप्रमाणे अन्नद्रव्य उपलब्ध होईल व त्यासोबत गंधक 16 किलो उपलब्ध होते. गंधक हे अन्नद्रव्य हे सोयाबीन पिकांसाठी गरजेचे आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या दाण्याचा आकार वाढेल व उत्पादनामध्ये वाढ होईल. शेतकऱ्यांनी त्यामुळे गंभीरतेने पर्यायी खतांचा वापर करावा ,असे आवाहनन त्यांनी केले आहे.

 

कृषी विभागाने पर्यायी खत वापरणे शेतकऱ्यांसाठी खर्चात कपात करण्याचे ही स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी डीएपी व गंधक वापर केल्यास 1990 रुपये खर्च लागतो. परंतु युरिया व सिंगल फॉस्फेट वापर केल्यास 1661 मध्ये 16 किलो गंधकासह डीएपीतील घटक उपलब्ध होतात. त्यामुळे बचत होऊ शकणाऱ्या या पर्यायी खतांचा वापर करण्याचेही कृषी विभागाने सुचवले आहे. तथापि, पर्यायी खते वापरताना कृषी विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अन्य कोणाच्या सूचनेनुसार पर्यायी खते वापरू नये असेही आवाहन कृषी विकास अधिकारी विजय बतीवार यांनी केले आहे.

 

 विक्रेत्यांनी लिंकींग करू नये

उपलब्धता नसल्यास कोणते खते वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे. अशावेळी शेतकरी विक्रेत्यांची मदत घेतो. मात्र शेतकऱ्यांच्या असाहेतेचा फायदा घेऊन काही विक्रेते अनावश्यक खते व रासायनिक द्रव्य शेतकऱ्यांना घेण्यास मजबूर करतात. यापासून शेतकऱ्यांनी सावध असावे.

 

खत विक्रेत्यांकडून अनेक वेळा चुकीच्या पद्धतीची खते वापरण्याची सक्ती होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खत विक्रेत्यांना आवाहन करताना लिंकिंग विरहित रासायनिक खताचा पुरवठा करण्याचे बजावले आहे. मात्र अशावेळी काही आवश्यक खतांची उपलब्धता नसल्यास कृषी  विभागाने सुचविलेल्या पर्यायी खतांचाच वापर करावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र. 476 

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा

कृषी विभागाचा सोप्या सूचनांसह शेतकऱ्यांना सल्ला

 

नांदेड दि. 13 : गुलाबी बोंड अळीने अख्खी कपाशी वाया जाण्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळी येणारच नाही. त्यामुळे पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये बोंड अळी पासून संरक्षित असलेल्या व कृषी विभागाने शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी वाणांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतामध्ये बीटी कापसाच्या पूर्ण प्लॉट शेजारी नॉन बीटीची थोड्या प्रमाणात लागवड करण्याची सूचनाही कृषी विभागाने केली आहे .जमिनीत पूर्ण ओलावा आल्याशिवाय पेरणीला हात घालू नये असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय नत्र खताचा वापर न करता जमिनीची पत तपासून ( मृदा परीक्षण ) खतांचा वापर करण्याची सूचना केली आहे.

 

कृषी विभागाने काही सूचना व प्रायोगिक तथ्य शेतकऱ्यांना सांगितले असून जिनिंग मध्ये किंवा साठवलेल्या कापसामध्ये किडीचा जीवनक्रम अखंडित सुरू असतो हे लक्षात घेण्याचे स्पष्ट केले आहे. जिनिंग प्रेसिंग तसेच गोडाऊन मधील स्वच्छता व कीड नियंत्रण याकडे लक्ष देणे ही आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे तसेच बोंड आळी साठी फेरोमन सापडे लावून अळ्या व कोष नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

एका गावात एकाच वानाची लागवड झाल्यास किड नियंत्रण आणखी सोपे होत असल्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. कापूस पिकाचे फरदड घेऊ नये काही ठिकाणी शेतात उभे असलेल्या कापूस पिकामध्ये शेळ्या मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत पराठ्यांचे लहान लहान तुकडे करून ते शेतात काढावेत किंवा त्याचा वापर शेताबाहेर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करावा ,असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 475 

सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत का ?

सुप्रीम कोर्टाच्या विशेष लोक अदालतीत सहभागी व्हा

 

नांदेड दि. 13 :- नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खटल्यांना निकाली काढण्याची एक संधी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन विधी विभागाने केले आहे.

 

तडजोडीची तयारी हवी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या सचिवांकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात या संदर्भातील आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात 29 ते 30 ऑगस्ट या दरम्यान ही विशेष लोक अदालत होत आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आणि ही प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची ज्यांची इच्छा आहे, अशाच प्रकरणाचा या ठिकाणी निपटारा होणार आहे.

 

ऑनलाईन सहभागही शक्य

या लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने ( ऑनलाईन ) सहभागी होऊ शकतात. नांदेड जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालती मध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांना किंवा ज्यांच्या केसेस पेंडिंग आहेत अशा नागरिकांना या संदर्भात अधिक माहिती व मदत हवी असल्यास नांदेड येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुरेखा कोसमकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

 

वेळ व पैशाची बचत

नागरिकांनी 29 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या लोकदालतीचा लाभ घ्यावा, यामुळे साध्या सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम अंमलबजावणी होऊ शकणारा असतो. तसेच यामध्ये वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते. त्यामुळे या लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

00000

  वृत्त क्र. 526   अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   नांदेड दि. 25 :- जिल्ह्यात गत ...