Tuesday, April 1, 2025

 वृत्त क्रमांक 339

विष्णुपुरी प्रकल्पातून शेतकऱ्यांना नियोजनानुसारच पाणीपुरवठा 

 जलसंपदा विभागाकडून चुकीच्या वृत्ताचे खंडण 

नांदेड दि.१ एप्रिल : जलसंपदा विभागामार्फत रब्बीसाठी चार पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामा करिता तीन पाणी पाण्याचे नियोजन कधीच घोषित करण्यात आले नाही. ही माहिती चुकीची असून 2024-25 साठी रबी हंगामाकरिता तीन पाणी पाळ्या देण्यात येणार आहे. कृपया शेतकऱ्यांनी त्यानुसार रब्बीचे नियोजन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने रब्बी हंगाम सुरू होतांना केले होते.

यासंदर्भात नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड यांनी अधिकृत माहिती जारी केली आहे. काही वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात चुकीचे वृत्त प्रसारित झाल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. सन 2024- 25 यावर्षीच्या धरण साठा व त्या अनुषंगाने सिंचन नियोजन याबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी  कार्यालयात 11 नोव्हेंबर 2024 रोजी बैठक झाली. त्यामध्ये रब्बी हंगाम 2024 -25 करिता कालव्यावरील सिंचनासाठी तीन पाणी पाळ्या देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

त्यानुसार प्रथम पाणी पाळी दोन डिसेंबर ते 25 जानेवारी या काळात देण्यात आले. तर 26 जानेवारी ते 14 मार्च या कालावधीत द्वितीय पाणी देण्यात आले. याबाबत लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधानी आहेत. रब्बी हंगाम २८ फेब्रुवारी ला समाप्त होत असला तरी उभ्या पिकांना गरजे नुसार १४ मार्च पर्यंत आवर्तन सुरू ठेवले होते. उन्हाळी हंगामा करिता कालव्याच्या सिंचनासाठी कोणत्याही पाणी पाळीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे हे निराधार वृत्त विनाकारण पसरविले जात आहे.

लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना या संदर्भातील कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही तक्रारी नाही.मात्र काही वृत्तपत्रांमध्ये रब्बी हंगामाकरिता चार पाणी पाळ्या, उन्हाळी हंगामा करिता तीन पाणी पाळयाचे नियोजन घोषित केल्याचे म्हटले आहे. ही बाब चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे.

जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील सिंचनासाठी देण्यात आलेल्या दोन आवर्तनास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

काही वृत्तपत्रांनी भुईमूग व उन्हाळी ज्वारीचा शेतकऱ्यांनी पेरा केला असून पिकांना आवश्यक ते पाणी मिळाले नाही. हाती येणारे पीक पाण्याअभावी वाळत आहे, असे नमूद केले आहे. परंतु जलसंपदा विभागातर्फे कालव्यावरील उन्हाळी हंगामातील कोणत्याही पिकांना पाणी देण्याबाबतचे नियोजन कधीच जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा जलसंपदा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती ठेवावी. त्यानुसार आपल्या पिकांचे नियोजन करावे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, योग्य ती माहिती घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 338

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन नांदेड दि. 1 एप्रिल :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. या दिवशी महसूल, गृह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे. 00000

वृत्त क्रमांक 337

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत 7 एप्रिलपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 1 एप्रिल :-  मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉनटेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबलटेनिस, वेटलिफटींग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अश्या संस्थाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

इच्छुक संस्थानी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे क्रीडा अधिकारी विपुल दापके यांचा मो.क्र. 9511724095, 9860521534 यांचेशी संपर्क साधावा. हा अर्ज 7 एप्रिल, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्यावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेधकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूसाठी करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी प्रशिक्षक व संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने सबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. क वर्ग अकादमींना वार्षिक रु 10 लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक 20 लक्ष रुपये व अ वर्ग अकादमींना वार्षिक 30 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्हयातील इच्छुकांनी या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 336

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता 

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी 

नांदेड दि. 1 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 2 व 3 एप्रिल 2025 हे दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. 

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...