Sunday, February 16, 2025

 वृत्त क्रमांक 185

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 

प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द आणि सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन

नांदेड १६ फेबुरवारी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

​क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

​शासनाने 29 डिसेंबर,2023 व 25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा 14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेली असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासननिर्णय क्रं.शिछपु.2023/प्र.क्रं.188/क्रीयुसे-2, दि.29 डिसेंबर,2023 मधील नियम क्रं.1.19, नियम क्रं.1.20, नियम क्रं.1.21 अनवये एकूण गुणांकनासह 15 ते 18 फेब्रुवारी,2025 या कालावधीत सूचना व हरकतीसाठी https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर प्रसिध्द करण्यात येत आहेत.

​सदरचे प्राथमिक छाननी अहवाल हे अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/ हरकतीनंतर सदरचा अहवाल पुनश्च्य प्रसिध्द करण्यात येणार नाही.

​प्राथमिक छाननी अहवालात केलेल्‍या पुरस्कार गुणांकनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील तर त्या सोबत जोडलेल्या विहित नमून्यात सादर कराव्यात.

पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचे वेळापत्रक : 

सुचना व हरकती सादर करण्याचा सुरुवातीचा 15 फेब्रुवारी,2025

सुचना व हरकती सादर करण्याचा अंतिम 18 फेब्रुवारी,2025 सांय 05 पर्यंत

पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन लिंक: https://shivchhatrapatiawards.com यावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

००००००

 लक्षवेध

 अयोध्येला जाणाऱ्या बसला अपघात ; ४ भाविक मृत्यूमुखी 

आज दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 05:30 वाजता उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीकटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर महाराष्ट्रातून अयोध्येला जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर बस आदळून झालेल्या अपघातात एकूण चार जण मयत झालेले आहेत. उर्वरित 13 जण जखमी आहेत. 

मयतांची नावे खालील प्रमाणे आहेत.

1. सुनील दिगांबर वरपडे वय 50 रा. छत्रपती चौक, नांदेड 

2. अनुसया दिगांबर वरपडे वय 80 रा. छत्रपती चौक, नांदेड

3. दीपक गणेश गोदले स्वामी वय 40 रा. छत्रपती चौक, नांदेड

4. जयश्री कुंडलिकराव चव्हाण वय 50 रा. आडगाव रंजेबुआ ता. वसमत जि. हिंगोली.

जखमीची नावे खालीलप्रमाणे आहेत

1. चैतन्य राहुल स्वामी वय 16 

2. शिवशक्ती गणेश गोदले वय 55

3. भक्ती दीपक गोदले वय 30

4. रंजना रमेश मठपती वय 55

5. गणेश गोदले वय 55

6. अनिता सुनील वरपडे वय 40

7. वीर सुनील वरपडे वय 09

8. सुनिता माधवराव कदम वय 60

9. छाया शंकर कदम वय 60

10. ज्योती प्रदीप गैबडी वय 50

11. आर्या दीपक गोदले वय 05

12. लोकेश गोदले वय 35

13. श्रीदेवी बरगले वय 60

सर्व राहणार छत्रपती चौक नांदेड.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेली माहिती बातमी संदर्भासाठी

रमाई आवास घरकूल योजना






अत्याचारास बळी पडलेल्या कुटूंबांना #अर्थसहाय्य


 

नांदेड येथे 1985 ला संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छायचित्रात संमेलनाध्यक्ष शंकर पाटील. स्वागताध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम, साहित्यिक भु. द. वाडीतर , उद्योजक राजा बन्सी ,मुन्ना जैन दिसत आहे.

छायाचित्र सौजन्य :  छायाचित्रकार विजय होकर्णे




 वृत्त क्रमांक 184

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा किनवट दौरा

 

नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

आज रविवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वा. छत्रपती संभाजीनगर येथून जालना, बुलढाणा, वाशिम मार्गे समृद्धी महामार्गाने किनवटकडे प्रयाण. सायं 5.30 वा. किनवट येथे आगमन व 14 वी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ समृ. सोमनाथ सूर्यवंशी नगरी बुद्धमूर्ती परिसर समतानगर किनवट. सायंकाळी 6.30 वा. किनवट येथून समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.  

0000

वृत्त क्रमांक 183

100 दिवसांच्या कृती आराखड्यातून

आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

- आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके

आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यावर भर

नांदेड दि. 15 फेब्रुवारी  :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. त्या आराखड्यानुसार तळागाळातील वंचित घटकाचा विकास साध्य करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून गरीबाच्या कल्याणासह आदिवासी विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

आज किनवट येथे उपविभागीय कार्यालयात त्यांनी प्रकल्प स्तरावरील आरोग्य, शिक्षण, पाणी, आदी योजनांच्या खर्चाचा आढावा घेतला व लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी आमदार भिमराव केराम, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली व संबंधित विभागाचे अधिकारी  आदीची उपस्थिती होती.

शासनाने शेवटची व्यक्ती, कुटूंब केंद्रबिंदू मानला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचाव्यात, हाच उद्देश ठेवून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात पेसातंर्गत १३ जिल्हे व ५९ तालुके आहेत. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ७ जानेवारी रोजी राज्यातील ४९७ आश्रमशाळेत मंत्री, राज्याच्या सचिवांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुक्काम करून तेथील सर्व सोयी - सुविधांची पाहाणी केली आहे. पेसातंर्गत नोकरी भरतीत अनिमियतता, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश, विद्यार्थ्यांचा डीबीटी, आहाराचा प्रश्न यापुढे निर्माण होणार नाही. तसेच भविष्यात एकही आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही असा आराखडा तयार करण्यात आला आहे ,अशी  माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापनातील समस्यांच्या सोडवणुकीसोबतच कृती आराखड्याच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार दिला जाईल. नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या महिला, पुरुषांवरील अन्याय, अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल अशा लोकांना आदिवासी समाज कदापिही सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर उपस्थित होते. प्रकल्प स्तरावरील आरोग्य, शिक्षण, पाणी आदी योजनांच्या खर्चाचा आढावा मंत्र्यांसमोर सादर केल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

तत्पूर्वी, त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हयात आदिवासी उपाय योजनेतील सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करावी,अशी सूचना त्यांनी केली. पेसा कायदा, वसतीगृह आणि विद्याथ्र्याच्या सुविधा आदी बाबतही चर्चा झाली.

०००००











 

 विशेष लेख                

 आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५

नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील हे होते.नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनाच्या आयोजनाची धूरा पद्मश्री श्यामराव कदम यांच्या कडे होती. देशाचे केंद्रीय मंत्री स्व.शंकरराव चव्हाण हे आश्रयदाते होते.नांदेडचे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय ठरले.

  उत्तम गुणवतेचे कार्यक्रम आणि खास मराठवाडी पध्दतीचे आदारातिथ्य व जेवण.यशवंत महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात भोजन व्यवस्था केलेली होती.साहित्य संमेलनासाठी पुण्या - मुंबई वरून आलेल्या साहित्यिक पाहुण्यांनी खास नंदिग्रामी व्यंजनांची तोंड भरून तारीफ केली होती.दही,ठेसा आणि व-हाडी ज्वारीची भाकरी रूचीपालट करून गेली.

मला आठवते.मी संयोजन समितीत होतो.तेव्हा दूरदर्शन सर्वदूर पोचले नव्हते.नांदेडवरून मुंबईसाठी विमानसेवा नव्हती.नांदेड ते मुंबई हा साधारणतः बारा-चौदा तासांचा रेल्वे प्रवास.त्यामुळे मुंबईला ध्वनी चित्रफीत पोचावायची कशी?हा प्रश्न आयोजकांसमोर पडला.स.दि.महाजन हे संयोजन प्रमुख होते.ते मोठे कल्पक.संमेलनाच्या उदघाटनाची बातमी दूरदर्शनवर आली पाहिजे म्हणून आदले दिवशीच उद्घाटनाचा श्रोत्यांविना डमी सोहळा पार पडला.त्याची शुटिंग घेऊन मुंबईला पाठविण्यात आली. अर्थातच दुसऱ्या दिवशी बातमी योग्य प्रकारे सोबतीला पोहोचविण्यात आली मात्र व्हिज्युअलसाठी अशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या मागचा उद्देश हा सर्वांना उद्घाटनाची बातमी कळावी हा होता .

हा सोहळा संपल्यानंतर कथाकार शंकर पाटील गमतीने म्हणाले.'यावर छान विनोदी कथा लिहिता येईल.'तेव्हा खूप हशा पिकला. बातमीसाठीची धडपड आणि साहित्य संमेलनाच्या बातमीचे महत्त्व कायम मनावर अधोरेखित राहिले संमेलन आठवले की ही घटना मात्र आठवतेच आठवते.

नांदेडचे हे साहित्य संमेलन आठवणीत राहण्याची तशी अनेक कारणे आहेत.राजा गोसावी हे अंध कवी या संमेलनातून रसिक श्रोत्यांसमोर आले.राजा मुकुंद यांच्या 'पोरी जरा जपून ' या कवितेला रसिकांनी जोरदार दाद दिली.
राम नगरकर यांच्या 'रामनगरी'ने हसवता हसवता श्रोत्यांना अंतर्मुख केले.आकाशवाणीला मुलाखत देण्यासाठी त्यांना जे अनुभव आले.ते ऐकताना सतत हास्याचे फवारे उडत होते.

संमेलनाचे अध्यक्ष कथालेखक शंकर पाटील हे तीनही दिवस साहित्य संमेलनात अत्यंत साधेपणाने वावरले.पद्मश्री श्यामराव कदम यांच्या लिंबगाव येथील शेतात आम्ही गेलो होतो तेव्हा शेती, सहकार, शिक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. निजामी राजवटीत मराठवाड्यातील जनतेवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या हकिकती ऐकून शंकर पाटील व्यथित झाले.हा किस्सा कवी ना.धों.महानोर यांनी सांगितला.

कथाकथनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्याकडे होते.द.मा.मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या कथांना रसिक श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.मराठवाडी बोलीतून सादर केलेल्या रा.रं.बोराडे यांच्या 'म्हैस' या कथेने तर श्रोत्यांची हसून हसून मुरकुंडी वळवली.​ या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा' हा खानदेशची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरील कार्यक्रम खूप भाव खाऊन गेला.परभणीचे आशा जोंधळे आणि अशोक जोंधळे यांच्या गळ्यातून उतरलेली बहिणाबाईंची गाणी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचली.त्यांना बेहद्द आवडली.दत्ता चौगुले यांच्या बासरीने ही गाणी अमीट केली.फ.मुं.शिंदे यांच्या मार्मिक आणि गंभीर निवेदनाने हा कार्यक्रम उंचीवर गेला.या संमेलनानंतर महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे प्रयोग झाले.

या साहित्य संमेलनानिमित्त 'नांदण' नावाची अत्यंत देखणी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.नांदेडच्या सांस्कृतिक, साहित्यिक वैभावाची नोंद घेणारे लेख या अंकात असून भालचंद्र कहाळेकर,नरहर कुरुंदकर, नागनाथ कोत्तापल्ले अशा नांदेड जिल्ह्यातील लेखक,कवींवर स्वतंत्र टिपणे आहेत.नांदेडचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा समजावून घेण्याच्या दृष्टीने ही स्मरणिका महत्त्वाची ठरेल.

नांदेड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तम व्यवस्था,काटेकोर नियोजन आणि कसल्याही प्रकारच्या वादविवादाविना पार पडले.या संमेलनात एकच उणीव जाणवत होती.ती म्हणजे विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडत होते.कुरूंदकर गुरूजी हयात असते तर या संमेलनाची उंची आकाशाला गवसणी घालणारी ठरली असती.

प्रा.डॉ.जगदीश कदम
ज्येष्ठ साहित्यिक
नांदेड
९४२२८७१४३२


नांदेड येथे 1985 ला संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छायचित्रात संमेलनाध्यक्ष शंकर पाटील. स्वागताध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम, साहित्यिक
भु.द. वाडीतर , उद्योजक राजा बन्सी ,मुन्ना जैन दिसत आहे.
छायाचित्र सौजन्य :  छायाचित्रकार विजय होकर्णे


महसूल विभागाच्या राज्यस्तरीय   क्रीडा स्पर्धा 21, 22, 23 फेब्रुवारीला होत आहे. यानिमित्ताने आयोजित आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर...