वृत्त क्रमांक 552
जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड दि. 29 मे :- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन बालविवाह निर्मूलन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, पंचायत, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), उमेद या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला “बालविवाह मुक्त नांदेड जिल्हा” हा कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” ची नियुक्ती केली आहे. या सर्व विभागाच्या चॅम्पियन्ससाठी एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेचे 28 मे रोजी हॉटेल सिटी सिंफोनी नांदेड येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मंजुषा कापसे, शिक्षणाधिकारी प्रा. श्रीमती सविता बिरगे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालविवाहाच्या कोणत्याही प्रकरणात दिरंगाई होणार नाही याबाबत सर्वांनी कटाक्षाने कायद्याचे पालन करावे. बालविवाहात कोणतेही बालक ओढले जाणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून कार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मनमोकळा संवाद साधला.
या प्रशिक्षणात आराखडयाची अंमलबजावणी, पाठपुरावा, नियोजन, माहिती विश्लेषण, समन्वय, मूल्यमापन आणि संनियंत्रण संदर्भातील गुगल फार्मवर देखरेख तालुका निहाय, बालविवाहाची कारणे व विभाग निहाय उपाय व हॉटस्पॉट गावाची ओळख, महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण परिणाम, सक्षम कार्यक्रम आढावा, बालहक्क, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, असुरक्षित बालकांची ओळख, बालविवाह प्रकरण हाताळणे हेतु कार्यवाही व पाठपुरावा, किशोरवयीन मातांसाठी सहाय्य करण्यासाठी यंत्रणांचे बळकटीकरण विभागांचा दृष्टिकोण व समन्वय, बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सची भुमिका आणि जबाबदारी, कम्युनिकेशन किट, युनिसेफचे-बालविवाह समाप्त करण्यासाठी जागतिक कार्यक्रम, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा कार्यान्वयन योजना तयार करणे, साप्ताहिक देखरेखीचे फॉरमेट तयार करणे, जिल्हा कृती दल बैठकीसाठी अहवाल तयार करणे, जिल्हा कृती आराखड्यासाठी सहाय्य व नियोजन, महिती संकलन आणि विश्लेषण, प्रेरणादायी व सकारात्मक प्रकरणांचे दस्तऐवजीकरण आदी विषयांवर हे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय कर्मचारी, चाईल्ड लाईन 1098 कर्मचारी, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद अभियान) यांनी नियुक्त केलेल्या एकूण “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास साधन व्यक्ती म्हणून एसबीसीथ्रीचे बालविवाह निर्मूलन प्रकल्पाचे प्रकल्प अंमलबजावनी प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बढिये, प्रकल्प समन्वयक रुचिका अहिरे, मोनाली धुर्वे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात संबंधित सर्व विभागातील बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स यांचा उत्कृष्ट सहभाग होता.
0000
No comments:
Post a Comment