वृत्त क्रमांक 571
शाश्वत शेतीसाठी जैविक संसाधनांचे महत्व
विकसित कृषि संकल्प अभियानाचा आज सातवा दिवस
नांदेड दि. 4 जून :- शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आणि जैविक शेतीला चालना देण्यासाठी विकसित कृषि संकल्प अभियान यशस्वीपणे सातव्या दिवशी पोहोचले. या उपक्रमाद्वारे शाश्वत शेतीसाठी जैविक संसाधनांचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे, अशी माहिती सगरोळीच्या कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी दिली.
शेतीसाठी जैविक संसाधनांची गरज
या अभियानाच्या सातव्या दिवशी तज्ज्ञ आणि कृषी मार्गदर्शकांनी 7 हजार 368 गावांचा दौरा केला. जिथे 7.95 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जैविक शेती, मृदा आरोग्य, नैसर्गिक खतांचा वापर आणि जलवायु अनुकूल शेती तंत्रज्ञान याबद्दल माहिती देण्यात आली.
आज हे अभियान देगलूर तालुक्यातील कुषावाडी, होट्टल, काठेवाडी आणि धर्माबाद तालुक्यातील पाटोदा खुर्द, पाटोदा बुद्रुक व चिकना या गावी प्रभावीपणे पार पडले.
मृदा आरोग्य राखणे, रासायनिक घटकांचा अतिरेक टाळणे आणि सेंद्रीय शेतीच्या संधीचा विकास हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहेत. शेतीतील जैविक संसाधनांचा प्रभावी वापर केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसेच मृदाची सुपीकता आणि जलसंधारण सुधारते, असे शेतकरी वैज्ञानिकांनी सांगितले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योजनांचा आढावा
या अभियानात कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील तज्ञांची दोन टीम्स सहभागी झाल्या असून, त्यांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक उपाय आणि तंत्रज्ञान यांचे मार्गदर्शन केले.
तज्ज्ञांची नावे
या अभियानात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे आणि राहुल डमाळे, ऊस संशोधन शास्त्रज्ञ डॉ. थोरात आणि डॉ. बोरसे तसेच संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. कपिल इंगळे, डॉ. माधुरी रेवणवार आणि डॉ. प्रियंका खोले यांनी हवामान अनुकूल शेती, पीक विविधता आणि जैविक शेतीच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.
तसेच प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापुरे, प्रशांत शिवपणोर आणि संतोष लोखंडे उपस्थित होते. शायकीय योजनांची प्रभावी लाभ घेण्यासाठी कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
याशिवाय कापूस संशोधन केंद्राचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. चींचाने यांनी कापूस उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञान, जैविक संसाधनांचा प्रभावी वापर आणि आधुनिक व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन केले.
शाश्वत शेतीकडे एक महत्वाचा टप्पा
विकसित कृषि संकल्प अभियानाच्या सातव्या दिवशी शेतकरी, तज्ज्ञ आणि कृषी संस्थानी एकत्र येऊन जैविक शेतीच्या प्रवासाला गती देण्याचा निर्धार केला. आगामी दिवसांत याला अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी शासन आणि संस्थात्मक पातळीवर निर्णय घेतले जातील. शाश्वत शेती आणि जैविक संसाधनांच्या प्रभावी वापरामुळे पर्यावरण अनुकूल शेतीस चालना मिळेल, याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment