Friday, April 21, 2017

प्रशासकीय कामकाजात मानवी आस्थेचा चेहरा जपा
– जिल्हाधिकारी पाटील
नागरी सेवा दिन कार्यक्रम संपन्न
नांदेड दि. 21 :- प्रशासकीय कामकाजात मानवी आस्थेचा चेहरा जतन करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने अभिनंदनही करण्यात आले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,  कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, कार्यकारी अभियंता श्री. दारमवाड, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, तहसिलदार संतोषी देवकुळे, तहसिलदार ज्योती पवार आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनपर भाषणात श्री. पाटील म्हणाले की, राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. उदारीकरणाच्या धोरणाचा स्विकार केल्यानंतर, अनेक नव संकल्पनाही रुजल्या. त्यामुळे नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली आहे. शिक्षण, आर्थिक कुवत आणि नागरिकांना झालेली अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. माहितीचा अधिकारी, सेवा हक्क अधिनियम यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजात गुणात्मक बदल झाल्याचेही जाणवते. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागेल. त्यासाठी आता सांघिकरित्याही प्रयत्न करावे लागतील. कर्तव्य  आणि सचोटीने प्रयत्न केल्या, सेवेचे दायित्त्व पार पाडल्यास कामाचे समाधानही मिळविता येते. त्यामुळे आता यापुढे प्रशासकीय कामकाजातही मानवी आस्थेचा चेहरा जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कार्यक्रमात सुरवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले. अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांनी कर्मचाऱ्यांसाठी संवैधानीक आचारसंहिता या विषयावर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या वाटचालीबाबत आणि वंचितासाठीची अन्नसुरक्षा योजनेबाबत माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पिनाटे यांनीही नागरी सेवा दिन संकल्पनेची माहिती देतानाच प्रेरक असे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. दारमवाड यांचेही भाषण झाले. उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

000000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...