Tuesday, August 18, 2026

जलसंधारण दिन विशेष लेख

सुजलाम… सुफलाम… भारतासाठी जलसंधारण…!
पाणी अर्थात जल आणि आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा एक घटक म्हणून याला जीवन देखील आपण म्हणतो. प्रत्येकासाठी पाणी आवश्यक आहे. आपण सर्वच जगात विकसित संस्कृतीचा अभ्यास केल्यास आपणांस जाणवतं की, वनांमधून आणि टोळ्यांमधून जगणारा मानव प्राणी ज्यावेळी सामाजिक व्यवस्था उभारणीसह शेती व्यवसायाला लागला, त्यावेळी सर्वांचा अधिवास नद्या आणि पाण्यांचे साठे आणि पाण्यावरच अवलंबून आहे.
मानवी जीवनात पाणी हे प्राण व्यवस्था आहे. तसेच विकासाचा भाग म्हणून आपण इतर क्षेत्रांकडे बघतो. त्यावेळी कृषी सह उद्योग व्यवसासाठी देखील पाण्याचे तितकेच महत्त्व राहिलेले आहे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर नव्या उद्योगांमध्ये पाण्याचा वापर अधिक वाढत गेला.
आज विचार करायचा तर पाण्याबाबत प्रथम आकडेवारी बघायला हवी. जगात असणाऱ्या समुद्रांमधील पाणीसाठा एकूण पाणीसाठ्याच्या 97% इतका आहे आणि हे पाणी क्षार युक्त आहे. अर्थात पिण्यायोग्य पाणी नाही. जे 3 टक्के पाणी पिण्यायोग्य म्हणता येईल, अशा स्थितीत आहे. त्यातील 68 ते 70 टक्के पाणी ग्लेशियर अर्थात हिमनग आणि हिमनद्यांच्या स्वरूपात आहे. तर त्यानंतर शिल्लक राहणाऱ्या शुद्ध जलापैकी 30 टक्के पाणी हे भूजल (जमिनीखालील स्तरात) आहे. उर्वरित पाणी पावसाद्वारे जमिनीवर येते आणि नद्या, सरोवरे आणि भूतलावर येते. यात पावसाने पडणारे पाणी नद्यांमध्ये आले तरी त्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते जल उपलब्ध होत नाही, ही परिस्थिती आहे.
पृथ्वीची एकूण लोकसंख्या विभिन्न खंडांमध्ये विस्तारलेले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे. अशा स्थिती सोबत पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्ध पाणी यांचा समतोल बिघडत असल्याचे आपणास दिसते आणि त्यावर उपाय अर्थात पाणी साठवणे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे हाच आहे.
आपला भारत देश त्यातही मौसमी हवामान प्रदेशात आहे, त्यामुळे देशात चार महिन्यात पडणाऱ्या पावसावर 12 महिन्यांचे नियोजन करावे लागते. आपला देश मुख्यत्वेकरून कृषी प्रधान देश आहे आणि हे शेतीचे काम पाण्यावर आधारित असे आहे. पडणारा पाऊस कुठे आणि किती पडेल, याचा अंदाज वर्तवण्याचे तंत्र अवगत झाले असले तरी आपण लहरी अशा निसर्गावर निर्भर आहोत. यामुळे देशात पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या/पावसाच्या थेंबाला आपण वापरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
पाणी अडवणे जमिनीत जिरवून त्याचे साठे निर्माण करणे, तलावांच्या माध्यमातून अधिकाधिक पाणी साठवणे आदी पद्धतीने आपण पाण्याचा अधिक सुयोग्य वापर करू शकतो.
शेतीला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था शेतीतच असायला हवी. काही दशकांपूर्वी यांत्रिक क्षमता नव्हती, त्यावेळी शेतीत विहीर खोदून त्यातील भूजलावर शेती आपल्या देशात होत होती. परंतु यांत्रिकीकरण झाले आणि आम्ही भूजल साठा गतिमान पद्धतीने उपसा करायला लागलो आणि भूजल पातळीत झपाट्याने घट होत गेली.
नद्यांचे पाणी अडवून धरणे बांधणे पाटांच्या मदतीने शेतीस सिंचन व्यवस्था तयार करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक अशीच आहे. एका बाजूला आपण धरणं बांधत असतांना, दुसऱ्या बाजूने औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यात देखील झपाट्याने वाढ झाली. या सर्वात पिण्याच्या पाण्यास प्राधान्य असल्याने आधी पेयजल नंतर उद्योग आणि मग कृषी सिंचन या क्रमाने वापर करण्याची वेळ आल्याने धरणं भरली तरी इतर सुविधांच्या आभावी पाण्याचे संकट वाढत आहे. यासाठी आता जलसंधारणाचे महत्त्व देखील तितकेच वाढलेले आहे.
जलसंधारण क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र याला अधिक बळकटी देण्याची गरज आहे. जलसंधारण केवळ याचा पहिला भाग ठरतो. सोबतच अधिक महत्त्व आहे ते मृदसंधारण अर्थात माती टिकवून ठेवणं देखील तितकच महत्त्वाचं ठरतं. ज्यावेळी पावसाचे प्रमाण अधिक असतं, त्यावेळी सुपीक जमीन पाण्यासोबत वाहून जाते. अनेकदा अतिवृष्टीने पाण्यासोबत जमीन खरडून जाते. परिणामस्वरूप जमिनीचा पोत कमी होऊन उत्पादकता कमी होण्यास सुरुवात होते.
जल आणि मृदसंधारण एकत्रित विचार केल्यास आपणास डोंगर माथा ते जमीन असा पाणलोट विस्तार करण्यासोबत शेततळे, पाण्याचे भूगर्भात फेरभरण व्हावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी पर्याय आहे.
भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला उत्तम पर्यावरण आणि पाणीपुरवठा सुरळीत राखायचा असेल तर आजच्या पिढीची मोठी जबाबदारी हा महत्त्वाचा संदेश घराघरात आणि मनामनात पोहोचला तरच याबाबतीत सकारात्मक काम होईल आणि तसे सकारात्मक परिणाम, बदल आगामी काळात आपणास दिसतील. मी समाजाचा एक घटक आहे आणि ही माझी जबाबदारी आहे, असे म्हणत प्रत्येक नागरिक यात सहभागी झाला तरच आगामी काळात चांगली स्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते.
कधी काळी पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या मध्य प्रदेशातील देवास मधील रेनवॉटर हार्वेस्टिंगने जलसंधारणाचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून पाणी आणून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची दुर्दैवी वेळ आपण अनुभवलेली आहे.
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे हे 150 वे वर्ष आहे. यातील प्रथम ओळींमध्ये सुजलाम, सुफलाम…! शब्दांचा वापर याच अर्थाने आहे. त्यामुळे आताच कामाला लागूया… पडणारा प्रत्येक थेंब जिरावला तर भारत पुन्हा सुजलाम व्हायला वेळ लागणार नाही.
प्रशांत दैठणकर
9823199466
********


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   माहूरमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी #इमारत भाडेतत्त्वावर हवी नांदेड दि. 19 ऑगस्ट : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्...