वृत्त क्रमांक
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नगारवाडीतील प्रगतिशील शेतकऱ्याच्या सेंद्रिय शेतीला भेट
बांबू लागवड, एकात्मिक शेती व शाश्वत कृषी उपक्रमांचे केले कौतुक
नांदेड, दि. 27 जुलै : अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ जायभाये यांच्या एकात्मिक सेंद्रिय शेती प्रकल्पाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन विविध सेंद्रिय व नैसर्गिक शेती उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. यावेळी ‘एक लक्ष बांबू लागवड’ उपक्रमांतर्गत शेतालगतच्या नाल्याच्या काठावर बांबूची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उत्तम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी अनिल वडजे, हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाचे प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रविण काटेवाढ, सरपंच सुधाकर जायभाये, उपसरपंच देवराव चव्हाण तसेच कृषी, महसूल, ग्रामपंचायत आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) व अश्वमेध संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतातील विविध उपक्रमांची पाहणी करताना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेली आंबा बाग, मनरेगाअंतर्गत उभारलेली सिंचन विहीर तसेच हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या गांडूळखत (वर्मी कम्पोस्ट) युनिटची पाहणी केली.
श्री. जायभाये यांच्या एकात्मिक शेतीमध्ये शेवगा, आंबा, जांभूळ, पेरू, चिंच, बोर, चिकू, आवळा, लिंबू, पपई, नारळ या फळपिकांसह काकडी, वांगे, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. याशिवाय झेंडू फुलशेती आणि त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.
यावेळी विश्वनाथ जायभाये, त्यांची पत्नी जोती जायभाये आणि मुलगा रामन जायभाये यांनी शेणखत, गांडूळखत (वर्मी कम्पोस्ट), जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर करून पिकांचे पोषण व संरक्षण कसे केले जाते, याची सविस्तर माहिती दिली. तसेच पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती, सेंद्रिय आच्छादन (मल्चिंग), जैविक कीड व रोग व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्मजीवांची संख्या वाढून मातीची सुपीकता टिकून राहते. उत्पादन खर्चात बचत होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच रासायनिक अवशेषमुक्त अन्न उत्पादनामुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षणही होते.”
या भेटीदरम्यान नगारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment