Monday, September 7, 2026

वृत्त क्रमांक

पावसाच्या खंड काळात पिकांना पाण्याचा ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजना कराव्यात

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. ७ : नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला आहे. परिणामी, हलक्या मुरमाड व माळरानाच्या जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सोयाबीन, मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कपाशी व तूर या दीर्घ कालावधीच्या पिकांवरही पाण्याच्या ताणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पावसाच्या खंड काळात पिकांना पाण्याचा ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे : पिकांची वाढीची अवस्था तसेच जमिनीतील उपलब्ध ओलावा यांचे नियमित निरीक्षण करून त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात.

संवेदनशील अवस्थेतील पिकांना संरक्षित सिंचन द्यावे : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. यामुळे पिकांना पाण्याच्या ताणापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल.

जलसंधारणावर भर द्यावा : कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सरी काढून भविष्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतात अडवून जमिनीत मुरविण्याचे नियोजन करावे.

तण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे : तणांमुळे पिकांसाठी उपलब्ध असलेला ओलावा व अन्नद्रव्यांचा वापर होतो. त्यामुळे पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे.

आंतरमशागती करून जमिनीतील ओलावा टिकवावा : आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन तो अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.

कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करावे : पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. जैविक निविष्ठांचा वापर करावा. आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कीड अधिक झाल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

आच्छादनाचा वापर करावा : जमिनीवर योग्य प्रकारचे आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा संरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध साधनांनुसार आच्छादनाचा वापर करावा.

अन्नद्रव्यांची फवारणी करावी : पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. यामध्ये पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के तसेच ००:५०:३४ एक टक्का या अन्नद्रव्यांची दर ८ ते १० दिवसांनी फवारणी करावी. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते. तसेच बायो एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

पावसाच्या खंड काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीतील ओलावा संवर्धन आणि पिकांच्या गरजेनुसार व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी वरील अष्टसूत्री उपाययोजनांचा अवलंब करून पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...