Thursday, September 3, 2026

 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

नांदेड (जिमाका), दि. ३ : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेले पात्र विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरणाचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपल्या यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह ऑनलाइन सादर करावा. अर्जाची सद्यस्थितीदेखील याच संकेतस्थळावर तपासता येणार आहे. आजअखेर नूतनीकरणाचे अत्यल्प अर्ज प्राप्त झाले असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीचा लाभ घेऊन तत्काळ अर्ज सादर करावा. दि. १५ सप्टेंबर २०२६ नंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर संदेश पाठविण्यात आले आहेत.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहाशी संपर्क साधून तत्काळ प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.

अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असताना स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध होत नव्हती. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ते वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी वसतिगृहास भेट देऊन प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.

विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकृत Instagram व Facebook पेज samajkalyannanded ला फॉलो करून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी अधिकृत माहिती पाहावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिकृत व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून, त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. कोणत्याही अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता अडचणी किंवा शंका असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा.

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपला परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

****

No comments:

Post a Comment

  वृत्त    पावसाच्या खंड काळात खरीप पीक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी   लातूर (विमाका), दि. ०३ : लातूर वि...