Friday, September 19, 2025

वृत्त क्रमांक 987 

दहावी-बारावी परीक्षेसाठी  खाजगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज भरण्यास मुदतवाढ  

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत इ. १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फेब्रु-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इ. १० वी व इ.१२वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 

इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी,शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 

विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन मूळ अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क केल्याबाबत पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा (मुदतवाढ) मंगळवार १६ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२ वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. 

पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 986

   

रब्बी पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :रब्बी पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कडधान्यगहूहरभरापोष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वार राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया करडईसुर्यफुल व राष्ट्रीय कृषी विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेतर्गत ज्वार या घटकातर्गत रब्बी हंगामात गहूहरभराज्वारीकरडई व सुर्यफुल या पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे हे या योजनेचे मुख्य उद्यिष्ट आहे.

 

पिक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च 2024 पूर्वी नोदणीकृत शेतकरीगटमहाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. ही सुविधा सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध करुन दिली आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक औषधे आणि खते या शिर्षकाखाली शेतकरीगटांना अर्ज करता येईल.

 

तालुक्यातील शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पिक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी गावाचे सहय्यक कृषी अधिकारीउपकृषी अधिकारीमंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावाअसे आवाहन अर्धापूर तालुका कृषी अधिकारी सुनील देवकांबळे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 985   

किनवट उपविभागीय कार्यालयात दाखल

अपील प्रकरणे तडजोडीने निकाली काढता येणार 

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- शासन निर्णय 29 ऑगस्ट 2025  रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियांना अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणुन किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत दाखल झालेली अपील प्रकरणे लोकअदालत मोहिमेच्या धर्तीवर तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. याद्वारे प्रस्तुत कार्यालयात दाखल अपील प्रकरणातील सर्व पक्षकार व विधिज्ञ यांना नोंद घ्यावी असे आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.   

यासंदर्भात प्रस्तुत कार्यालयात दाखल अपील प्रकरणातील सर्व पक्षकार व विधिज्ञ यांनी आपसातील तडजोडनुसार किंवा स्वसंमतीने प्रकरणे निकाली काढावयाची असल्यास पक्षकार स्वतः किंवा आपल्या विधिज्ञामार्फत मंगळवार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे लिखीत स्वरुपात निवेदन सादर करावे. अशा प्रकार प्राप्त झालेली निवेदने सेवा पंधरवडा या कालावधीत निकाली काढण्याच्या कार्यवाहीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपल्या अपील प्रकरणांच्या आपसातील तडजोडीबाबत तपशीलवार निवेदने सादर करुन सहकार्य करावे, असेही आवाहन सहायक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.  

00000

वृत्त क्रमांक 984   

येसगीच्या जुन्या नवीन पुलावरील वाहतुकीची

16 नोव्हेंबर 2021 रोजीची अधिसूचना रद्द 

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- बिलोली तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदीवरील येसगी जुन्या पुलावरुन 20 टन वाहन भार क्षमतेपेक्षा कमी भार असलेली वाहतुक सुरू करण्याबाबत व येसगी मांजरा नदीवरील येसगी नवीन पुलावरुन कसल्याही प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्याबाबतची 16 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसुचना रद्द करण्यात आली आहे. याबाबत अधिसुचना जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमीत केली आहे. 

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्याा अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी वाहतुक संबंधाने आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी. या अधिसुचनेबाबतची माहिती लगतच्या सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग व इतर आवश्यक सर्व संबंधित विभागास अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी द्यावी, असेही अधिसुचनेत स्पष्ट केले आहे.

00000

 


वृत्त

 नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान पंधरवड्याला सुरुवात :

पहिल्या दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ

मुंबई, दि.18  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) चालणाऱ्या या भव्य उपक्रमांतर्गत 10 लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 15 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी होऊन 1,857 मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचाराला सुरूवात झाली.

मुख्यमंत्री यांची संकल्पना

संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या भव्य उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन

राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ मिळत आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग

या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्रतज्ज्ञ रुग्णालये व विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरत आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी दिलासा

नेत्ररोग उपचाराचा खर्च गोर-गरीब नागरिकांना परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.

१७ सप्टेंबर रोजी अभियानातून मिळालेला लाभ

•          अभियानात सहभागी रुग्णालयांची संख्या : 426

•          आयोजित शिबिरांची संख्या : 128

•          शिबिरांत सहभागी एकूण रुग्णसंख्या : 15,469

•          पुढील उपचारासाठी संदर्भित रुग्ण : 717

•          मोफत चष्म्यासाठी नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या : 1,590

•          मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलेल्या रुग्णांची संख्या : 1,857

•          इतर नेत्र विषयक शस्त्रक्रियांची संख्या (मोतीबिंदू वगळून) : 127 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून सुरू केलेले ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण आहे. या अभियानातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत नेत्रचिकीत्सा करण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. जे रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नव्हते, त्यांनाही मोफत उपचाराची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम तळागाळातील जनतेसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

००००

 स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ आज

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची विशेष उपस्थिती
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८वा दीक्षान्त समारंभ आज शनिवार, दि.२० सप्टेंबर, रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे कुलपती तथा आय.आय.टी., कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय गोविंद धांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदचे सर्व सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी दिली.
याप्रसंगी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चान्सलर सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी हा बहुमान परभणी येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ एज्युकेशनची विद्यार्थींनी सयदा तयबा एसडी. एम.डी. मझहर हस्मी यांना मिळणार आहे. याशिवाय इतरही ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
अठ्ठावीसाव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या एकूण १९,४०० विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासामारंभात प्रत्यक्ष विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ३१९ , वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या १०८ मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या ६१ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास मंडळ विद्याशाखेच्या ६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या समारंभात ७० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
हा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक समिती आप-आपली कार्य जबाबदारीपूर्वक पूर्ण करीत परिश्रम घेत आहेत.
००००००




वृत्त क्रमांक 983

हवामान विभागाच्या सूचना

नांदेड, दि. 19 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १९ व २१ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. १९ व २१ सप्टेंबर २०२५ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहान जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
00000

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...