Thursday, September 17, 2026

वृत्त क्रमांक 

हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा – नरेंद्र चव्हाण

बारड येथे ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड(जिमाका), दि. 17: हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग हा केवळ इतिहासाचा भाग नसून, नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा आहे. मराठवाड्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी नरेंद्र चव्हाण यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुदखेड तालुक्यातील बारड येथे केंद्रीय संचार ब्यूरो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. बारड येथील हुतात्मा स्मारक परिसरात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नरेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल, ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर, सुनील देशमुख, प्रदीप भोसिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात तरुणांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाजसेवेच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी इतिहासातील शौर्य आणि त्यागापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य तरुणांनी दाखविले पाहिजे, असे नरेंद्र चव्हाण यांनी यावेळी म्हणाले. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. येथील भूमिपुत्रांनी निजामाच्या रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा देत स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. या लढ्यात बारड गावाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, बारड येथील 33 स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले.

या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुक्तिसंग्रामाची देदीप्यमान गाथा, हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग यांची माहिती देणारे विशेष ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम छायाचित्र प्रदर्शन’ हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या शौर्याची आणि धाडसाची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आली.

बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदविला.

यावेळी शाहीर वाघमारे, शाहीर विनोद गोडबोले आणि शाहीर रमेश गिरी यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरोचे सुमित दोडल यांनी केले. ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी जोंधळे यांनी पार पाडली.

**






No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...