Tuesday, September 1, 2026

वृत्त क्रमांक 

‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानास नांदेड जिल्ह्यात प्रारंभ

• 30 वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी मोफत तपासणी

नांदेड (जिमाका), दि. 1 : राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे 100 दिवसांचे आरोग्य अभियान दि. 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील 30 वर्षे व त्यावरील सर्व महिला व पुरुषांची असंसर्गजन्य आजारांसाठी मोफत तपासणी या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून बाधित व संशयित रुग्णांना तातडीने योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. अभियानांतर्गत 30 वर्षे व त्यावरील ज्या महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी झालेली नाही, अशा नागरिकांची यादी व नोंदणी करण्यात येणार आहे.

या अभियानात मधुमेह व उच्च रक्तदाबाचे लवकर निदान करण्याबरोबरच तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत संशयित आढळणाऱ्या रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात येईल. तपासणीपासून निदान, उपचार आणि पाठपुराव्यापर्यंतची माहिती संबंधित पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

हे अभियान जिल्ह्यातील गावपातळीवर मिशन मोडवर राबविण्यात येणार असून 30 वर्षे व त्यावरील 100 टक्के नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, एएनएम व एमपीडब्ल्यू यांच्यामार्फत घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. दररोज सुमारे 40 ते 45 घरांना भेटी देऊन तपासणी न झालेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर समुदाय वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावनिहाय पथके तयार करून नागरिकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्यात येईल.

तपासणीनंतर आवश्यकतेनुसार नागरिकांना समुपदेशन तसेच पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना उपचार मिळत आहेत की नाही, याबाबत नियमित पाठपुरावाही करण्यात येईल.

या अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व तपासण्यांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात येणार असून तपासणी, निदान, उपचार व पाठपुराव्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. तसेच डॅशबोर्डच्या माध्यमातून अभियानाच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता वयाच्या 30 वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

***

No comments:

Post a Comment

वृत्त  आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची ...