Thursday, September 17, 2026

वृत्त क्रमांक 

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

•‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमेचा शुभारंभ; आगामी सण-उत्सव स्वच्छ वातावरणात साजरे करण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 17: नांदेड शहर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून, शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि सुंदर शहर बनविण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसरही स्वच्छ ठेवावा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर व्हीआयपी रोडवरील शहीद जवान स्मारक परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता करत व भिंतीवर पेंटींग करत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, किशोर स्वामी, विविध प्रभागांतील नगरसेवक, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी सण-उत्सवांचे स्वागत स्वच्छ आणि सुंदर नांदेडमध्ये करूया, असे आवाहन केले. स्वच्छतेची ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नांदेड शहर स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनामार्फत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्या, वस्त्या आणि चौकांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. शहर संपूर्णपणे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. प्रमुख रस्ते आणि दुभाजकांची विशेष स्वच्छता, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी, दुभाजकांवरील झाडांची छाटणी आणि परिसराचे सुशोभीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

आगामी श्री गणेशोत्सव आणि दुर्गादेवी उत्सवाच्या काळात नांदेड शहरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख धार्मिक स्थळे, मंदिर परिसर, विसर्जन मार्ग आणि उत्सव मार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास स्वच्छता आणि कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

***










वृत्त क्रमांक 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी 

नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्‍यात आली. प्रबोधनकारांच्‍या प्रतिमेस पुष्‍पमाला अर्पण करून अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी रावसाहेब पोहरे,गजानन ऐनवाड,भास्‍कर गुंगे ,सुरेश पेदेवाड, संतोष गज्‍जेवार, बालासाहेब भराडे, अनिल पाटील अजय दुधकवडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

***



 वृत्त क्रमांक 

पशुधन विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा शासनाकडून भार; पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड (जिमाका), दि. 17 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, या योजनेसाठी शेतकरी-पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुधनाला आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूपासून आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी पशुसंवर्धन विभागाने ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.’ सोबत सामंजस्य करार केला आहे. राज्यभर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे एआयसीची निवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा भार केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या प्रमाणात उचलणार आहे. लाभार्थी पशुपालकाला केवळ 15 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. विमा प्रीमियमचा दर एक वर्षासाठी 4.30 टक्के, दोन वर्षांसाठी 7.50 टक्के आणि तीन वर्षांसाठी 10.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

70 हजार रुपये किमतीच्या संकरित गाईसाठी एक वर्षाचा एकूण विमा हप्ता 3 हजार 10 रुपये असून, त्यापैकी पशुपालकाचा 15 टक्के हिस्सा 451 रुपये 50 पैसे आहे. दोन वर्षांसाठी हा हिस्सा 787 रुपये 50 पैसे, तर तीन वर्षांसाठी 1 हजार 102 रुपये 50 पैसे राहील.

10 पशुधनापर्यंत अनुदानाचा लाभ

एका कुटुंबातील कमाल 10 पशुधनासाठी विमा योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. दुभत्या गाईसाठी कमाल 70 हजार रुपये, दुभत्या म्हशीसाठी 80 हजार रुपये, बैलासाठी 70 हजार रुपये, रेड्यासाठी 80 हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर कमाल 7 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

‘नो टॅग, नो क्लेम’ नियम

विम्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM) वर 12 अंकी कानातील बिल्ला (Ear Tag/UID) सह नोंदणी असणे बंधनकारक आहे. विमा कंपनीकडून UID सोबत RFID तंत्रज्ञानाचाही वापर केला जाऊ शकतो. योजनेत ‘नो टॅग, नो क्लेम’ या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

मृत्यूनंतर 15 दिवसांत थेट बँक खात्यात भरपाई

विमाधारक पशुधनाचा मृत्यू झाल्यास 24 तासांच्या आत विमा कंपनीला नोंदणीकृत संपर्क माध्यमातून माहिती देणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल सादर केल्यानंतर पात्र विमा दाव्याची रक्कम 15 दिवसांच्या आत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे. मुदतीत पात्र विमा दाव्याची भरपाई न केल्यास विमा कंपनीला 12 टक्के दराने व्याज देणे बंधनकारक राहील.

राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (MLDB), नागपूर यांच्यामार्फत करण्यात येणार असून, राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्तांकडून योजनेचे सनियंत्रण केले जाणार आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेमुळे राज्यातील पशुपालकांना पशुधनाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’वर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

**




 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका), दि. 17: अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी आता बुधवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी HMAS संकेतस्थळावर आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे जोडणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्या त्रुटींची पूर्तता करावी. अर्जाची सद्यस्थिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर वेळोवेळी तपासावी. मुदत संपल्यानंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नसल्याने पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करावा. अर्जासंदर्भातील सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर पाठविण्यात आल्या आहेत. 

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदतवाढीचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठीही तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभाग, नांदेडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरही विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आवश्यक माहिती आणि सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी Instagram व Facebook वरील samajkalyannanded हे अधिकृत पेज फॉलो करून योजनांबाबतची माहिती आणि अडचणींचे निराकरण करून घ्यावे.

विद्यार्थ्यांनी इतर अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींशी संपर्क न साधता समाज कल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. काही अडचण किंवा समस्या असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा – नरेंद्र चव्हाण

बारड येथे ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड(जिमाका), दि. 17: हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग हा केवळ इतिहासाचा भाग नसून, नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा आहे. मराठवाड्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी नरेंद्र चव्हाण यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुदखेड तालुक्यातील बारड येथे केंद्रीय संचार ब्यूरो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. बारड येथील हुतात्मा स्मारक परिसरात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नरेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल, ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर, सुनील देशमुख, प्रदीप भोसिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात तरुणांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाजसेवेच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी इतिहासातील शौर्य आणि त्यागापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य तरुणांनी दाखविले पाहिजे, असे नरेंद्र चव्हाण यांनी यावेळी म्हणाले. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. येथील भूमिपुत्रांनी निजामाच्या रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा देत स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. या लढ्यात बारड गावाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, बारड येथील 33 स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले.

या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुक्तिसंग्रामाची देदीप्यमान गाथा, हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग यांची माहिती देणारे विशेष ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम छायाचित्र प्रदर्शन’ हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या शौर्याची आणि धाडसाची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आली.

बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदविला.

यावेळी शाहीर वाघमारे, शाहीर विनोद गोडबोले आणि शाहीर रमेश गिरी यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरोचे सुमित दोडल यांनी केले. ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी जोंधळे यांनी पार पाडली.

**






सुधारित वृत्त क्रमांक 

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री अतुल सावे

पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा व वीजपुरवठ्याचा घेतला आढावा

आवश्यक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

नांदेड(जिमाका), दि. 17: दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, महावितरणचे अधीक्षक अभियंता अजितकुमार खंदारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, विष्णुपुरीचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. बनसोड, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि नियमित वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. पावसाचा खंड तसेच पावसातील अनियमिततेचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांच्या संभाव्य नुकसानीची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीत संभाव्य उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना आतापासूनच कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याचाही आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा, पाणी आराखडा आणि नियमित वीजपुरवठा याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. तसेच संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा लागवड, केटीवेअर बंधारे आणि इतर आवश्यक उपाययोजनांचा आढावाही सादर केला.

जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित उपाययोजना आणि सद्यस्थितीची माहिती बैठकीत सादर केली. 

**







वृत्त क्रमांक 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 17 : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे दि. 18 व 19 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 4.55 वाजता पुणे विमानतळ येथून नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.15 वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. 6.20 वाजता नांदेड विमानतळावरुन प्रयाण व सायंकाळी 6.45 वाजता नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शनिवार, दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीबाबत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत पिक परिस्थितीचा आढावा घेतील. 11.30 वाजता पुयणी ता. नांदेड येथे पीक परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर ते बोराला ता. वसमत, जि. हिंगोली येथील पिक परिस्थिती पाहणीसाठी प्रयाण करतील.

**

वृत्त क्रमांक   नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण   22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्...