Friday, September 18, 2026

 वृत्त 

भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

२१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार 

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या भेटीसाठी विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी भेटसाठी उपस्थित राहून आपले अनुभव व सूचना समितीसमोर मांडाव्यात. यापूर्वी ई-मेलद्वारे सूचना व अभिप्राय सादर केलेल्या विद्यार्थी व संबंधित घटकांनीही बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत याबाबत चर्चा होणार आहे. परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध घटकांना प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.

भरती परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, क्लास चालक-मालक व संबंधित संस्थांनी या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

---

 वृत्त 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

मुंबई, दि.१८ सप्टेंबर : राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान दोन्ही महसूल विभागांतील पिकांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकींना संबंधित पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाची स्थिती आणि त्याचा शेतीपिकांवर होत असलेल्या परिणामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कार्यालयीन पातळीवरील अहवालातून जाणून न घेता मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि बळीराजाशी थेट संवाद साधावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा होत आहे.

या दौऱ्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, सुकलेल्या किंवा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच स्थानिक प्रशासन, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडूनही परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

“शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केवळ कार्यालयातील अहवाल पुरेसे नाहीत; त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या पिकांची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे एकटे सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, पिकांची सद्यस्थिती आणि स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेतल्या जातील. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 

१९ सप्टेंबर : नांदेडमध्ये आढावा बैठक; नांदेड–हिंगोली–वाशिममध्ये पिकांची पाहणी

दि.१९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील पुयणी येथे पिकांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढे हिंगोली जिल्ह्यातील बोराला व हिवरा, तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर सायंकाळी अकोला येथे मुक्काम करण्यात येणार आहे.

२० सप्टेंबर : अकोला येथे अमरावती विभागाचा आढावा

दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विभागातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित उद्घाटन व शिवार फेरी कार्यक्रमास कृषीमंत्री उपस्थित राहतील.

000

वृत्त क्रमांक 

सेवा संकल्प अभियानातून नांदेड जिल्ह्यात आरोग्य सेवांना गती

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष आरोग्य तपासणी, जनजागृती व सेवा उपक्रम

नांदेड (जिमाका), दि. १८ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

या अभियानात ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून विविध आरोग्य तपासण्या, विशेष आरोग्य शिबिरे, उपचार व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड वाटप

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचारासाठी ‘वय वंदना कार्ड’ प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच मोतीबिंदू तपासणीवर विशेष भर देण्यात येणार आहे.

माता-बाल आरोग्य व अॅनिमिया निर्मूलनावर भर

तीव्र व मध्यम रक्ताक्षय असलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष मोहीम राबवून आवश्यक उपचारांसह FCM (Ferric Carboxy Maltose) इंजेक्शन देण्यात येणार आहे. स्तनपानाबाबत जनजागृती तसेच किशोरवयीन मुला-मुलींसाठी क्षमता बांधणी कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत.

३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी

‘तिशीचा पल्ला—तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणी करण्यात येणार आहे.

दुर्धर आजारग्रस्त बालकांचा शोध

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) बालकांमधील जन्मजात दोष व दुर्धर आजारांचा शोध घेऊन आवश्यक शस्त्रक्रिया व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष उपचार, रेबीज प्रतिबंधक लस, हायड्रॉक्सीयुरिया तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबावरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

याशिवाय रक्तदान शिबिरे, अवयवदान संकल्प, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांगजन सहयोग तसेच जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले वितरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू नसलेल्या रुग्णांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्टही अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दुर्बल घटकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन अभियानांतर्गत उपलब्ध मोफत तपासणी व आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.

****

Thursday, September 17, 2026

वृत्त क्रमांक 

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

•‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमेचा शुभारंभ; आगामी सण-उत्सव स्वच्छ वातावरणात साजरे करण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 17: नांदेड शहर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून, शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि सुंदर शहर बनविण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसरही स्वच्छ ठेवावा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर व्हीआयपी रोडवरील शहीद जवान स्मारक परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता करत व भिंतीवर पेंटींग करत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, किशोर स्वामी, विविध प्रभागांतील नगरसेवक, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी सण-उत्सवांचे स्वागत स्वच्छ आणि सुंदर नांदेडमध्ये करूया, असे आवाहन केले. स्वच्छतेची ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नांदेड शहर स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनामार्फत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्या, वस्त्या आणि चौकांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. शहर संपूर्णपणे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. प्रमुख रस्ते आणि दुभाजकांची विशेष स्वच्छता, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी, दुभाजकांवरील झाडांची छाटणी आणि परिसराचे सुशोभीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

आगामी श्री गणेशोत्सव आणि दुर्गादेवी उत्सवाच्या काळात नांदेड शहरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख धार्मिक स्थळे, मंदिर परिसर, विसर्जन मार्ग आणि उत्सव मार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास स्वच्छता आणि कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

***










वृत्त क्रमांक 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी 

नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्‍यात आली. प्रबोधनकारांच्‍या प्रतिमेस पुष्‍पमाला अर्पण करून अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी रावसाहेब पोहरे,गजानन ऐनवाड,भास्‍कर गुंगे ,सुरेश पेदेवाड, संतोष गज्‍जेवार, बालासाहेब भराडे, अनिल पाटील अजय दुधकवडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

***



 वृत्त क्रमांक 

पशुधन विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा शासनाकडून भार; पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड (जिमाका), दि. 17 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, या योजनेसाठी शेतकरी-पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुधनाला आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूपासून आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी पशुसंवर्धन विभागाने ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.’ सोबत सामंजस्य करार केला आहे. राज्यभर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे एआयसीची निवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा भार केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या प्रमाणात उचलणार आहे. लाभार्थी पशुपालकाला केवळ 15 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. विमा प्रीमियमचा दर एक वर्षासाठी 4.30 टक्के, दोन वर्षांसाठी 7.50 टक्के आणि तीन वर्षांसाठी 10.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

70 हजार रुपये किमतीच्या संकरित गाईसाठी एक वर्षाचा एकूण विमा हप्ता 3 हजार 10 रुपये असून, त्यापैकी पशुपालकाचा 15 टक्के हिस्सा 451 रुपये 50 पैसे आहे. दोन वर्षांसाठी हा हिस्सा 787 रुपये 50 पैसे, तर तीन वर्षांसाठी 1 हजार 102 रुपये 50 पैसे राहील.

10 पशुधनापर्यंत अनुदानाचा लाभ

एका कुटुंबातील कमाल 10 पशुधनासाठी विमा योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. दुभत्या गाईसाठी कमाल 70 हजार रुपये, दुभत्या म्हशीसाठी 80 हजार रुपये, बैलासाठी 70 हजार रुपये, रेड्यासाठी 80 हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर कमाल 7 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

‘नो टॅग, नो क्लेम’ नियम

विम्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM) वर 12 अंकी कानातील बिल्ला (Ear Tag/UID) सह नोंदणी असणे बंधनकारक आहे. विमा कंपनीकडून UID सोबत RFID तंत्रज्ञानाचाही वापर केला जाऊ शकतो. योजनेत ‘नो टॅग, नो क्लेम’ या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

मृत्यूनंतर 15 दिवसांत थेट बँक खात्यात भरपाई

विमाधारक पशुधनाचा मृत्यू झाल्यास 24 तासांच्या आत विमा कंपनीला नोंदणीकृत संपर्क माध्यमातून माहिती देणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल सादर केल्यानंतर पात्र विमा दाव्याची रक्कम 15 दिवसांच्या आत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे. मुदतीत पात्र विमा दाव्याची भरपाई न केल्यास विमा कंपनीला 12 टक्के दराने व्याज देणे बंधनकारक राहील.

राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (MLDB), नागपूर यांच्यामार्फत करण्यात येणार असून, राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्तांकडून योजनेचे सनियंत्रण केले जाणार आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेमुळे राज्यातील पशुपालकांना पशुधनाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’वर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

**




 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका), दि. 17: अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी आता बुधवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी HMAS संकेतस्थळावर आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे जोडणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्या त्रुटींची पूर्तता करावी. अर्जाची सद्यस्थिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर वेळोवेळी तपासावी. मुदत संपल्यानंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नसल्याने पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करावा. अर्जासंदर्भातील सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर पाठविण्यात आल्या आहेत. 

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदतवाढीचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठीही तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभाग, नांदेडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरही विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आवश्यक माहिती आणि सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी Instagram व Facebook वरील samajkalyannanded हे अधिकृत पेज फॉलो करून योजनांबाबतची माहिती आणि अडचणींचे निराकरण करून घ्यावे.

विद्यार्थ्यांनी इतर अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींशी संपर्क न साधता समाज कल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. काही अडचण किंवा समस्या असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे  - जिल्हाधिकारी राहु...