Friday, January 18, 2019


जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारणसाठी
नांदेड जिल्ह्याची 97 कोटींची अतिरिक्त मागणीचा प्रस्ताव
औरंगाबाद, दि.17 (जिमाका) – नियोजन विभागाच्या वित्त व नियोजन मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या औरंगाबाद येथील राज्यस्तरीय बैठकीत नांदेड जिल्ह्याने सर्वसाधारण योजने अंतर्गत वर्ष 2019-20 साठी 97 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीची मागणी नोंदविली.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, आमदार नागेश पाटील अष्टीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या 2019-20 च्या आराखड्याची व अतिरिक्त मागणीची सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त मागणी मध्ये शाळा दुरूस्ती व बांधकाम, जलयुक्त शिवार, पाणंद रस्ता विकास, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी, महावितरण, वन विभाग, ग्रामीण रस्ते विकास, अंगणवाडी, बांधकाम इत्यादी योजनांच्या तरतूदींचा समावेश होता. जिल्हा नियिोजन समितीने जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेच्या एकुण 247 कोटी 95 लाख रुपयांचा प्रारुप आराखड्यास मान्यता दिलेली आहे, असेही यावेळी सांगितले.
*****

Wednesday, January 16, 2019


शिक्षकांनी विद्यार्थी व समाज घडविण्याबरोबरच
पर्यावरण संतुलनासाठी कसोशीने प्रयत्न करावेत
-         पालकमंत्री रामदास कदम

नांदेड, दि. 16:-  राष्ट्र निर्मितीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असून शिक्षकांनी विद्यार्थी व समाज घडविण्याबरोबरच पर्यावरण संतुलनासाठी कसोशीने प्रयत्न  करावेत .शिक्षणाच्या वारीच्या या कार्यक्रमातून हा संकल्प करावा असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज केले.
            चांदोजी पावडे मंगल कार्यालय, डी मार्ट, रोड नांदेड येथे दिनांक 16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीसाठी आयोजित केलेल्या' शिक्षणाची वारी' या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकारामांची पर्यावरणाप्रतीची बांधिलकी सांगत पाठ्यपुस्तकांमधून पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक लेखनाचा समावेश करण्यासाठी संबंधितांना बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले.पर्यावरणात फटाक्याने वातावरण प्रदूषित होते हे सर्वश्रुत आहे त्यामुळे सणांच्या वेळी फटाके न फोडता पर्यावरण रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून  शपथ घेतली .त्यामुळे गावागावात एक सकारात्मक वातावरण तयार झाले ,असे सांगून शिक्षकांबद्दल त्यांनी अत्यंत आदर व्यक्त केला मी शिक्षकांमुळेच घडलो आहे. अशी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी त्यांच्या शिक्षण काळातील अनेक किस्से सांगितले .
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्काईपद्वारा उपस्थितांशी मुंबईहून थेट संवाद साधला. प्रश्नांना उत्तरे दिली.
            राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी , जिल्हाधिकारी अरुण डोंगरे , मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे ,आमदार सुभाष साबणे , विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, उपसंचालक संजय यादगिरे,  विद्या प्राधिकरणच्या उपसंचालिका  शोभा खंदारे,लातूर बोर्डाचे अध्यक्ष महेश करजगावकर,यवतमाळचे शिक्षणाधिकारी दीपक चवणे,  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या जयश्रीआठवले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बालाजी कुंडगीर, निरंतरचे शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे,बीडचे  प्राचार्य जयपाल कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जयश्री आठवले यांनी केले .यावेळी डायटचे अधिव्याख्याते, व विषय सहायक यांनी तयार केलेले  इंग्रजी शैक्षणिक अॅप व अध्ययन समृद्धी पुस्तिकेचे विमोचन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण संचालक सुनील मगर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व अश्विनी कुलकर्णी यांनी तर आभार उपसंचालक संजय यादगिरे यांनी मानले.
कार्यक्रमास जालना,परभणी, बीड,लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडक शिक्षक,पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,बी.आर.कुंडगीर, अशोक  देवकरे, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकृष्ण देशमुख, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर,दीपक सिरसाठ,अधीक्षक बळीराम येरपूलवार, प्रवीण पाईकराव, चंद्रकांत धुमाळे, नंदिनी शिंदे , उमेश नरवाडे , डॉ.अतुल चंद्रमोरे, डॉ.माणिक जाधव, डॉ.विलास ढवळे, शोभा मोकले विशेष सहाय्यक सुरेश पांचाळ, शिवराज पवार ,अनुप नाईक, संतोष केंद्रे, डॉ.राजेश पावडे,अतुल कुलकर्णी , शेख नईम, संजय शेळगे, बालासाहेब कच्छवे, रामदास वाघमारे , प्रकाश गोडणारे आदींनी परिश्रम घेतले.
0000


नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी
460 कोटी 97 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा
                        - पालकमंत्री रामदास कदम  


           
नांदेड, दि. 16 :-  नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी वर्ष 2019-20 साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 460 कोटी 97 लाख 18 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.
            जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड येथील नियोजन भवनाच्या सभागृहात झाली. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, आ. अमिताताई चव्हाण,            आ. अमर राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. वसंतराव चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. डि . पी. सावंत, आ. डॉ. तुषार राठोड, आ. हेमंत पाटील,  आ. नागेश पाटील आष्टीकर, महापौर शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधिक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
           
या बैठकीत सन 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 247 कोटी 95 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 159 कोटी 3 लाख, आदिवासी उपयोजनेसाठी 29 कोटी 11 लाख 29 हजार, आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी 11 कोटी 57 लाख 6 हजार आणि म्हाडा योजनेसाठी 13 कोटी 30 लाख 83 हजार रुपयांचा नियतव्यय शासनाने ठरवून दिलेल्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार प्रस्तावित करण्यात आला आहे. शासनाच्या सुचनेनुसार 42 कोटी रुपयांचा निधी संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी राखीव ठेवण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
         
   या बैठकीस सन 2018-19 म्हणजे चालु वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेतील डिसेंबर अखेर 74.38 टक्के झालेल्या खर्चाचा आढावा सादर करण्यात आला. तसेच अखर्चित निधीतून पूनर्विनियोजनाद्वारे विविध विकास कामांसाठी महसुली लेखा शिर्षातंर्गत 19 कोटी 88 लाख 50 हजार रुपये तसेच भांडवली लेखा शिर्षातंर्गत 10 कोटी 84 लाख 35 हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.
            या बैठकीच्या प्रारंभी सदस्यांच्या निलंबनाचा विषय चर्चीला गेला. मागील बैठकीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सदस्यांच्या निलंबनाचे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. मात्र पालकमंत्री यांनी केलेले निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करीत मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी यापुढे सभागृहात समन्वयाची भूमिका ठेवावी, असे आवाहन खासदार अशोकराव चव्हाण यांनी सुरुवातीला केले. यावर बोलतांना पालकमंत्री कदम म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्यांनी समन्वय ठेवावा. विकासाच्या कामांमध्ये प्राधान्याने सक्रीय सहभागी व्हावे. सर्वांनी सभागृहात शिष्टाचार आणि शिस्त पाळावी, असे आवाहन करुन खा. अशोकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार सदस्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला व जिल्हाधिकारी यांनी योग्य ती पुढील कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.
कौठा परिसरातील निर्वाचन भवनचा प्रस्ताव मार्गी लावावा. त्यासाठी तात्काळ बांधकामाच्या नियोजनाबाबत निर्देश पालकमंत्री यांनी दिली. महावितरणचे 172 ट्रान्सफार्मर बंद पडल्याने जिल्ह्यातील होणारी अडचण लक्षात आणून देण्यात आली.  पंधरा दिवसांत ही कामे पूर्ण करण्याची सुचना पालकमंत्री यांनी केली. जिल्ह्यातील वीज व्यवस्थेविषयीचा स्वतंत्र बैठकीत आढावा घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले. दलित वस्ती सुधारणा योजनेसाठीचा निधी कुठल्याही परिस्थितीत इतर कामांना वळती करण्यात येऊ नये. नाविण्यपूर्ण योजनेच्या निधीतील कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी सुचना करुन पालकमंत्री कदम यांनी पाणीपुरवठा योजनेमध्ये सौर उर्जेचा वापर करण्याची योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री अंतिम करीत असलेल्या जलआराखड्यामध्ये नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता पालकमंत्री यांनी घ्यावी अशी विनंती खा. चव्हाण तसेच आ. राजूरकर व आ. साबणे यांनी केली. शाळा दुरुस्तीसाठी वाढीव निधी मंजूर करुन पालकमंत्री कदम यांनी 100 एकरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सेवासुविधा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.
            चालु वर्षीच्या सर्वसाधारण योजनेतील 20 कोटी रुपयांच्या अखर्चित निधीचे पूनर्विनियोजन करतांना आवश्यक त्या योजनांसाठी तो देण्याचा निर्णय यावेळी पालकमंत्री कदम यांनी घेतला. 20 कोटी रुपयांच्या अखर्चित राहण्यामागील कारणांचा आढावा संबंधित विभागाकडून घेण्यात आला. आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेतील योजनांचा खर्च लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले. याप्रमाणेच खर्च कमी करणाऱ्या विभागांना खर्च करण्याचे सक्त निर्देश दिले.
            नांदेड शहरातील पाणीपुरवठा हा विष्णूपूरी प्रकल्पातून केला जातो. उपलब्ध पाणीसाठा व तो किती दिवस पुरेल या बाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी सादर करावी, असे निर्देश देवून पालकमंत्री कदम यांनी नरेगाच्या कामांना प्राधान्य देण्याची सुचना केली. दहा तलावांच्या दुरुस्तीसाठी पर्यावरण खात्याकडून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा करीत पालकमंत्री कदम यांनी होट्टलच्या रस्ते विकासासाठी 1 कोटीचा निधी देण्याचे निर्देश दिले. डिजीटल शाळांसाठी सुध्दा अतिरिक्त निधी देण्याबाबत त्यांनी सुचना केली.
            दुष्काळ परिस्थितीत दुष्काळ निवारणाच्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्याच्या सुचना करुन पालकमंत्री कदम म्हणाले 15 तालुक्यांत टंचाई निवारण आराखडे तयार करुन प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. लोहा तालुक्याचा आराखडा अद्याप प्राप्त नाही. या सर्व आराखड्याला मंजूरी देवून जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
            या बैठकीस सर्व समिती सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले.
0000

Tuesday, January 15, 2019

धम्म परिषद शांततेत व चांगल्यारितीने पार पडेल
यासाठी विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत
                                                      - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
       
नांदेड, दि. 15:- अर्धापूर तालुक्यातील महाविहार बावरीनगर दाभड येथे 32 व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद 20 व 21 जानेवारी 2019 या कालावधीत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवापूर्वी संबंधित विभागांनी कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षितता राखून धम्म परिषद शांततेत व चागल्यारितीने पार पडेल यासाठी संबंधीत विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.   
महाविहार बावरीनगर दाभड येथील अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेनिमित्त सोई, सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हाधिकारी यांचे कक्षात घेतला त्यावेळी ते बोलत होते.  
            यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. डी. राजपूत, अर्धापूर तहसीलदार सुजि नरहरे, विद्युत वितरण कंपनीचे एस. ए. दासरकर, बावरीनगर दाभडचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, राज्यासह शेजारच्या राज्यातून बावरीनगर येथील भारतीय बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येने जनसमुदाय येतो. या परिसरात गर्दी कालावधीत पोलीस विभागांनी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्हा परिषदेने त्यांच्या विभागाशी संबंधित असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत. यासंदर्भात एसओपी तयार करुन सादर करण्यात यावा. या महोत्सव यात्रा कालावधीत एसओपीनुसार कार्यवाहीच्या अनुषंगाने पथके तयार करुन पथकातील अधिकारी, कर्मचारी यांचे 24 तासासाठी पथके नेमून त्यांचे वेळापत्रक तयार करावे यासह इतर महत्वाच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हा परिषद आरोग्य विभागाने महोत्सव कालावधीत आरोग्य केंद्र अर्धापूर व परिसरातील आरोग्य केंद्र येथे राखीव वैद्यकीय पथक, मोबाईल व्हॅन, विविध गटाचे रक्त, औषधीसाठा आणि खाटा राखीव ठेवाव्यात. कोणत्याही प्रसंगी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. तज्ञ वैद्यकीय पथके अनुभवी स्टाफ नेमावा.
            विद्युत वितरण विभागाने महाविहार बावरीनगर दाभड अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद कालावधीत अर्धापूर परिसरात विद्युत पुरवठा 24 तास अखंडीत ठेवावा. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून विद्युत पोली वरिल वाकलेल्या विद्युत तारा, उघडे डिपी यांची तात्काळ दुरुस्ती करावी.  यात्रेकरुसाठी परिसरात अखंडीत शुध्द पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पिण्यासाठी टँकर व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने येणाऱ्या जनसमुदायाची होणारी गर्दी पाहता अर्धापूर तसेच नांदेड शहरास जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी महोत्सवापुर्वी पूर्ण करावी. वळण व उताराच्या ठिकाणी मार्गदर्शक चिन्हांची फलके लावावीत. राज्य परिवहन महामंडळाने या कालावधीत जनसमुदायाच्या गर्दीचा अंदाज घेवून चांगल्या व सुस्थिती असलेल्या पुरेश्या बसेसची व्यवस्था करावी, अशाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी सुचना दिल्या.
000000

 लोकसंवादकार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज
उलगडल्या शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाच्या यशोगाथा ...
नांदेड, दि. 15: शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या  ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मांडल्या. सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशीया कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत होते.
सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसोबत संवादाला सुरुवात केली. शेतकरी बांधवांच्या जीवनात कष्टाने पिकविलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा कायम रहावा, अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी चर्चेला सुरुवात केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुक्तपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे तसच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल.  म्हणून 2022 पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली  16 हजार गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे 34 लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये 45 टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे.
राज्यात 1 लाख 37 हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत  1 लाख 30 हजार सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी अशी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा दिलासा दिला आहे. आतापर्यंत सुमारे 51 लाख खातेदार शेतकऱ्यांसाठी 24 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 2014-15 पासून आतापर्यंत राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकरी बांधवाना 15 हजार 240 कोटी रुपये वाटप केले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देत गेल्या चार वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात दरवर्षी सरासरी 77 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. योजनेतून सरासरी 55 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2 हजार 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी दिली आहे.
कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यासाठी  600 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान 5 लाख शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 18 हजार ट्रॅक्टरचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. 8 हजार पेक्षा जास्त पॉवर टीलर्स व 45 हजार पेक्षा जास्त यांत्रिक अवजारे वितरित केली आहेत.
राज्यातल्या ग्रामीण भागाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला एक मोठा प्रकल्प आपण हाती घेतला आहे. जागतिक बँकेनं त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये गुंतवण्याचे मान्य केलं आहे. महाराष्ट्र राज्य कृषी-व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) याद्वारे शेतमाल विक्रीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, उपलब्ध सुविधांचं  आधुनिकीकरण व बळकटीकरण करणं, शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती करणं आणि शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणं या गोष्टी करणार आहोत.
 राज्य शासन योजना आखतं, तसेच त्याची अंमलबजावणी करतं. या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना खरोखरचं किती लाभ मिळाला आहे हे समाजवून घेणं, जर काही अडचणी आल्या असतील तर त्या कशा दूर करता येतील याची माहिती घेणं हे महत्वाचं वाटतं. म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे. दुष्काळी परिस्थितीची झळ जास्त बसलेल्या मराठवाड्यापासून आपण चर्चेला सुरुवात करुया, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी सर्वप्रथम चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी शेततळ्यांमुळे उत्पादन वाढीस लागल्याचे सांगतानाच उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवली नाही. जिथे पिण्यासाठी पाणी नव्हते तेथे आता ऊस, द्राक्षासारखी पिके घेतोय, असे सांगत बहुतांश शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजना वरदान ठरल्याचे सांगितले. सोलापूर येथील बिराजदार आजोबा आपल्या शेतात तयार केलेल्या शेततळ्याच्या काठी बसून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत होते. साहेब, तळ्यातील पाण्याचे जलपूजन व्हायचे आहे, आपण रिमोटद्वारे बटन दाबून जलपूजन करावे,’ अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करताच रिमोटचे बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन जलपूजन केले. पालघर जिल्ह्यातील गणपत गावंडा यांनी अनुभव कथन करताना मुख्यमंत्र्यांना दुर्गम भागातील शेतीच्या सपाटीकरणाबाबत अडचण सांगितली. ती ऐकून ज्या भागात शेतीचे समतलीकरण करता येत नाही अशी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तातडीने विभागाला दिले.
गटशेतीला राज्य शासनाने चालना दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहे. पालघर येथे पाच हजार शेतकरी गट तयार झाल्याचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. गटशेतीमुळे शेतकरी एकत्रित आल्यावर जी शक्ती निर्माण होते त्याचा फायदा मिळतो आणि एकरी उत्पन्न वाढीतही त्याचे लाभ मिळतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी गटांनी मेगा फूड पार्क योजना राबवावी. त्याला शासनातर्फे अनुदान दिले जाईल. नाशवंत मालावर प्रक्रिया केल्यावर त्याला भाव देखील चांगला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनुदानासाठी कोणाला पैसे द्यावे लागतात का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीच्या कुठल्याही अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ऑनलाईनमुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादन, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण, कर्जमाफी यासह शेतमालाला बाजारभाव, फुलशेती, सेंद्रीय शेती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल केले. त्याचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात लवकरच एक लाख सौर ऊर्जा पंप वाटपास सुरुवात करण्यात येणार असून शेतीला वीज पुरवठा करणारे सर्व फिडर सौर ऊर्जेवर चालणारे करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सुमारे तीन तास मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्षात बोलायला संधी मिळाली याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तळागाळातील शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधला, आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया जालना जिल्ह्यातील वरुड येथील दीपक म्हस्के यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांशी संवाद साधणारे मुख्यमंत्री आम्हाला पुढेही लाभो, अशी इच्छा गोंदियातील बाबुलाल गौतम यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी थेट शेतातल्या बांधावरुन शेतकऱ्यांनी सहकुटुंब संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी देखील संवाद साधला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सुरुवात झालेल्या महाॲग्री टेक कार्यक्रमामुळे शेतीत आधुनिकता येईल. त्या माध्यमातून राज्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या बरोबरचा संवाद प्रेरक आणि मार्गदर्शक ठरला. शेतीच्या प्रश्नांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
चौकट
मुख्यमंत्र्यांना आवडतो हातसडी तांदळाचा भात
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी आपल्या भागातील चिकू, नारळ, पपई, पेरु या फळांसोबतच विविध भाज्या आणि फुलांची माहिती देत होते. माझ्या घरी पालघर जिल्ह्यात पिकणारा हातसडीचा तांदूळ मी नेहमी आणतो. या तांदळाचा भात पौष्टिक असतो. तो मला आवडतो, असे कौतुकाचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढताच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आनंद अवर्णनीय होता.
टोपलंभर पेढे पाठवतो ...
संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट विक्रीसाठी आणता येतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान परभणी येथील प्रताप काळे या शेतकऱ्याने आपला अनुभव सांगताना आज माझ्यासाठी दिवाळी असल्याचे सांगत काल आठवडे बाजारात मी नेलेल्या वांग्यांना चांगला भाव मिळाला. मला हजार रुपये एक दिवसात मिळाले. माझ्यासाठी ही दिवाळीच, असे सांगताना प्रताप यांनी मुख्यमंत्र्यांना टोपलभर पेढे देतो, असे उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी दिली.
बीई एमबीए झालेली तरुणी शेतीकडे वळली
गोंदिया जिल्ह्यातील राणू रहांगडाले या तरुणीने बीई इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले. एमबीए केले. मात्र ती शेतीकडे वळली. आता सध्या 35 एकर शेतीवरील भाजीपाल्यासह पपई, केळी यांचे उत्पादन घेते. स्ट्रॉबेरी पिकविते. यासाठी तिने सिंचन योजनांचा लाभ घेतला. शेती करताना शासनाच्या विविध योजनांमुळे कसा फायदा झाला. हे अनुभव सांगताना राणूने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणूच्या शेती व्यवसायाकडे वळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. उच्च शिक्षित असूनही शेती करताय याबद्दल तुमचे अभिनंदन असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
ऑनलाईन जलपूजन
सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी येथील सिद्धराम बिराजदार या शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांना शेततळ्यातील पाण्याचे जलपूजन रिमोटचे कळ दाबून करावे, अशी विनंती केल्यानंतर त्याला मान देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम सुरु असतानाच रिमोटची कळ दाबून जलपूजन केले. अशा प्रकारे ऑनलाईन जलपूजन करण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितींना हसू आवरले नाही.
डाळींब खायची इच्छा होतेय
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय, अशी स्तुती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 
००००

लोहयात सीआरपीएफ जवानांचे चित्‍तथरारक प्रात्‍यक्षिक
आपत्‍तीला तोंड देण्‍यासाठी यंत्रणा सक्षम : परळीकर
लोहा :
       मानवी साधन संपत्‍तीला व पर्यावरणाला हानिकारक ठरणा-या कोणताही आपत्‍तीला समर्थपणे तोंड देण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारची यंत्रणा सक्षम आहे. यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून नैसर्गिक आपत्‍ती निवारण करण्‍यासाठी आपले योगदान दयावे, असे आवाहन लोहयाचे तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. दरम्‍यान, मुदखेड येथील सिआरपीएफच्‍या  जवानांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अंतर्गत रंगीत तालिम करुन प्रात्‍यक्षिक दाखविले.
       आपत्‍ती व्‍यवस्‍थापन जनजागृती अभियान अंतर्गत लोहा तहसिल कार्यालयाच्‍यावतीने श्री. संत गाडगे बाबा महाविद्यालयात 14 जानेवारी रोजी मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलीस दलाच्‍या जवानांचे प्रात्‍यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी अध्‍यक्षीय भाषणात तहसिलदार परळीकर बोलत होते. यावेळी कंधारच्‍या तहसिलदार श्रीमती. संतोषी देवकुळे, लोहयाचे गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड, ग्रामीण रुग्‍णालयाचे अधीक्षक जिवनराव पावडे , सिआरपीएफ मुदखेडचे उपनिरीक्षक शिवाजी मुलगीर, लोहयाचे पोलीस उपनिरीक्षक कुंदन परिहार, लोहा तालुका कृषि अधिकारी भूमनवाड, कंधार तालुका कृषि अधिकारी आर.एन. देशमुख, बालविकास प्रकल्‍प अधिकारी पांडे, भूमि अभिलेख कार्यालयाचे अडकिणे, नायब तहसिलदार एस.एम. देवराये, सारंग चव्‍हाण, लोहा न.प.चे उल्‍हास राठोड, मुख्‍याध्‍यापक एल.के भगत, पर्यवेक्षक बि.डी.जाधव, पेशकार श्रीमती. एस.आर.वाळूक्कर यांचेसह विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोहा तहसिल कार्यालयाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी तसेच विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
       तहसिलदार परळीकर पुढे बोलताना म्‍हणाले की, भूकंप, पूर, आग, भूस्खलन, दुर्घटना, गॅस गळती, आदि नैसर्गिक व माननिर्मित आपत्‍तीला तोंड देण्‍यासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचा कायदा केला आहे व या कायदयाने सर्वांचीच जबाबदारी निश्चित केली आहे. प्रत्‍येकाने आपली जबाबदारी ओळखून होणारी हानी टाळावी.
       सीआरपीएफ मुदखेडचे उपनिरीक्षक शिवाजी मुलगीर यांनी यावेळी सविस्‍तर मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले आपत्‍तीत धैर्य खचू न देता कार्य करावे. भूकंप आला तर टेबलचा आधार घ्‍यावा. तसेच आग लागली तर गॅस व लाईट बंद करावी. यावेळी सीआरपीएफच्‍या जवानांनी रंगीत तालीमव्‍दारे विविध प्रात्‍यक्षिक दाखविले तसेच  उंच इमारतीवर आग लागली असेल तर कसे कार्य केले जाते याचे चित्‍तथरारक प्रात्‍यक्षिक दाखविले.
       यानिमित्‍ताने आयेाजीत निबंध स्‍पर्धेतील विजेते सृष्‍टी शंकरराव पारेकर, अंकिता कदम, अजय आनेराव या विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम कदम यांनी तर आभार बी.डी. जाधव यांनी मानले.
व्‍हीव्‍हीपॅटचे प्रात्‍यक्षिक
इव्‍हीएम व व्‍हीव्‍हीपॅट मशीनव्‍दारे मतदान विषयक प्रात्‍यक्षीक यावेळी दाखविण्‍यात आले. ज्‍या उमेदवारांना मतदान केले त्‍याच उमेदवाराना मतदान केल्‍याचे दिसत असल्‍याचे उपस्थितांनी प्रात्‍यक्षिकाव्‍दारे पाहिले.
00000

Monday, January 14, 2019


हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 14 : नांदेड जिल्हयात हरभरा  पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी पक्षी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस.जी 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळ फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपट नष्ट करावीत हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक...