वृत्त क्रमांक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात
नांदेड जिल्ह्यातील ५१,३३० शेतकऱ्यांना ३८१ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जमाफी
नांदेड(जिमाका), दि. २७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ३३० शेतकऱ्यांसाठी ३८१ कोटी ९४ लाख ६७ हजार ३८ रुपये इतकी कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील संबंधित बँकांमध्ये वर्ग करण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित बँकांकडून सुरू आहे.
यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ५३५ कर्जदार शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ३६ लाख ९ हजार ७३१ रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी दिली आहे.
यापूर्वी योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील १२ हजार ९२९ पात्र शेतकऱ्यांसाठी १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपये इतकी रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून, सदर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यास पात्रता प्राप्त होते.
दरम्यान, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील ७३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप २३ हजार १०६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यापैकी १२ हजार २५७ शेतकऱ्यांकडे अद्याप ॲग्रीस्टॅक आयडी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आयडी नाही, त्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक आयडी काढून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment