Saturday, September 19, 2026

वृत्त  

गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जागतिक पटलावर नेण्यासाठी दस्तऐवजीकरण करा

विभागीय आयुक्त जी‌ श्रीकांत यांचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ :- महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक समृद्धी व वैशिष्ट्ये जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी व्यापक डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. नागरिक, गणेश मंडळे आणि संबंधित यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने मिळविण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्व संचालनालयामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे.

या संकेतस्थळावर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील पूजा, सजावट, गणेशमूर्ती, खाद्यपरंपरा, लोककला, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यांची छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना अपलोड करता येणार आहेत. राज्यातील ३५ हून अधिक ऐतिहासिक शहरांसह देशभरातील गणेशोत्सवाशी संबंधित परंपरांची माहितीही संकलित केली जाणार आहे. सहभाग नोंदविणाऱ्या नागरिकांना ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा, महिला व बालसुरक्षा, सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, रक्तदान व व्यसनमुक्ती यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचेही दस्तऐवजीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमांतून या उपक्रमाचा प्रचार करावा तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष, महत्त्वाची ठिकाणे आणि गणेश मंडळांजवळ ‘बाप्पा डॉट ओआरजी’चा क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा.

गणेश मंडळांनीही नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सकारात्मक संवाद, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक सहभाग यांचे छायाचित्रण व व्हिडिओ संकलित करून संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत. या उपक्रमासाठी ईफ्लॅग संस्थेचे तांत्रिक सहकार्य घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्हाधिकारी व महानगरपालिका प्रशासनाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून उपक्रमाचा नियमित आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सुरक्षित, शिस्तबद्ध, सामाजिकदृष्ट्या सकारात्मक आणि सर्वसमावेशक प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवात शासकीय योजनांच्या व्यापक प्रचार - प्रसारासाठी 'लोकसंवाद' हा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी सहयोग करून उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे. 

**

सुधारित वृत्त क्रमांक 

पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे 

मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा 

चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश

मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत

लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश

शेतकरी व नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये 

नांदेड (जिमाका), दि. 19 : मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पावसात खंड पडल्याने शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक व अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आयोजित बैठकीत दिले.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. हेमंत पाटील, अमरनाथ राजूरकर, सईद खान, कैलास पाटील, बाबूराव कदम कोहळीकर, भिमराव केराम, राजेश पाटील, राजू नवघरे, प्रताप पाटील चिखलीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपायुक्त रिता मैत्रेवार, वरिष्ठ अधिकारी  बैठकीस उपस्थित होत्या. तर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह विविध विधानसभा मतदार संघातील आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठकीत सहभागी झालेले नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपली मते मांडली. 

मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये कमी पाऊस व पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांच्या अडचणी व म्हणणे समजून घ्यावे. शासन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात पिण्याचे पाणी, चारा तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. संकटाच्या काळात शासन शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात 56 लाख शेतकऱ्यांना 40 हजार 385 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. सॅटेलाईटच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. चारा व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी पीक नुकसान, चारा व पाणीटंचाई, जलजीवन मिशन, जलसंधारण, अखंडित वीजपुरवठा तसेच इतर विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडींग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. 

बैठकीचे प्रास्ताविक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. यावेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कृषी सहसंचालक तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची माहिती सादर केली.

बैठकीस नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जालना जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, बीडचे जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकिणे यांच्यासह सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

**















वृत्त क्रमांक 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे केली पीक परिस्थितीची पाहणी

• शेतकऱ्यांनी चिंता करू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी
नांदेड (जिमाका), दि. 19 : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण आणि संभाव्य नुकसानाबाबत त्यांनी माहिती घेतली.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आस्थेने ऐकून घेत, ‘शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असून, जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही श्री. भरणे यांनी दिली.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
***






Friday, September 18, 2026

वृत्त क्रमांक 

दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

नांदेड, दि. १९ : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांची व पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी व आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

00000

 वृत्त 

भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

२१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार 

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या भेटीसाठी विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी भेटसाठी उपस्थित राहून आपले अनुभव व सूचना समितीसमोर मांडाव्यात. यापूर्वी ई-मेलद्वारे सूचना व अभिप्राय सादर केलेल्या विद्यार्थी व संबंधित घटकांनीही बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत याबाबत चर्चा होणार आहे. परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध घटकांना प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.

भरती परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, क्लास चालक-मालक व संबंधित संस्थांनी या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

---

 वृत्त 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

मुंबई, दि.१८ सप्टेंबर : राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान दोन्ही महसूल विभागांतील पिकांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकींना संबंधित पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाची स्थिती आणि त्याचा शेतीपिकांवर होत असलेल्या परिणामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कार्यालयीन पातळीवरील अहवालातून जाणून न घेता मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि बळीराजाशी थेट संवाद साधावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा होत आहे.

या दौऱ्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, सुकलेल्या किंवा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच स्थानिक प्रशासन, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडूनही परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

“शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केवळ कार्यालयातील अहवाल पुरेसे नाहीत; त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या पिकांची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे एकटे सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, पिकांची सद्यस्थिती आणि स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेतल्या जातील. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 

१९ सप्टेंबर : नांदेडमध्ये आढावा बैठक; नांदेड–हिंगोली–वाशिममध्ये पिकांची पाहणी

दि.१९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील पुयणी येथे पिकांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढे हिंगोली जिल्ह्यातील बोराला व हिवरा, तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर सायंकाळी अकोला येथे मुक्काम करण्यात येणार आहे.

२० सप्टेंबर : अकोला येथे अमरावती विभागाचा आढावा

दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विभागातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित उद्घाटन व शिवार फेरी कार्यक्रमास कृषीमंत्री उपस्थित राहतील.

000

वृत्त क्रमांक 

सेवा संकल्प अभियानातून नांदेड जिल्ह्यात आरोग्य सेवांना गती

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष आरोग्य तपासणी, जनजागृती व सेवा उपक्रम

नांदेड (जिमाका), दि. १८ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

या अभियानात ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून विविध आरोग्य तपासण्या, विशेष आरोग्य शिबिरे, उपचार व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड वाटप

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचारासाठी ‘वय वंदना कार्ड’ प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच मोतीबिंदू तपासणीवर विशेष भर देण्यात येणार आहे.

माता-बाल आरोग्य व अॅनिमिया निर्मूलनावर भर

तीव्र व मध्यम रक्ताक्षय असलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष मोहीम राबवून आवश्यक उपचारांसह FCM (Ferric Carboxy Maltose) इंजेक्शन देण्यात येणार आहे. स्तनपानाबाबत जनजागृती तसेच किशोरवयीन मुला-मुलींसाठी क्षमता बांधणी कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत.

३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी

‘तिशीचा पल्ला—तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणी करण्यात येणार आहे.

दुर्धर आजारग्रस्त बालकांचा शोध

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) बालकांमधील जन्मजात दोष व दुर्धर आजारांचा शोध घेऊन आवश्यक शस्त्रक्रिया व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष उपचार, रेबीज प्रतिबंधक लस, हायड्रॉक्सीयुरिया तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबावरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

याशिवाय रक्तदान शिबिरे, अवयवदान संकल्प, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांगजन सहयोग तसेच जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले वितरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू नसलेल्या रुग्णांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्टही अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दुर्बल घटकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन अभियानांतर्गत उपलब्ध मोफत तपासणी व आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.

****

वृत्त क्रमांक   नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण   22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्...